BREAKING NEWS
latest

अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच, युनिट-५ ठाणेकडुन जेरबंद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे : कासारवडवली पी.स्टे.गुन्हा नोंद कांक ६५५/२०२५ कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-५, वागळे, ठाणे कडुन करण्यात येत होता. नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले बाबत कळवा पोलीस स्टेशनं येथे गुन्हा नोंद क्रमांक ५९२/२०२५ कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर गुन्ह्याचा राखोल तपास करण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सपोनि. शरद पाटील, सपोउनि. राजेंद्र चौधरी, पोना. बंडगर, तेजस ठाणेकर, पोशि. यश यादव, असे एक पथक तयार केले. सदर पथकाने नमुद मयत अल्पवयीन मुलगी दि.०४/०७/२०२५ रोजी रहात्या घरातुन निघुन गेली त्यावेळेपासुन सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी केली असता सदर मुलगी ही घरातुन निघुन ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टॅण्ड येथे असल्याचे दिसुन आले, त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता सदरची अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसुन गेल्याचे दिसून आले. सदर माहितीच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रीक तपासामध्ये रिक्षा चालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचे आढळुन आले. त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेवुन रिक्षाचालक समाधान अर्जुन सुर्यवंशी, (वय: ४० वर्षे), व्यवसाय: ऑटो रिक्षा चालक, राहणार: सुखशांती चाळ, आंबेडकर पुतळ्याच्या जवळ, लोकमान्यनगर, पाडा नं. ३, ठाणे पश्चिम याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निषन्न झाल्याने त्यास दि.१०/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कासारवडवली पोलीस स्टेशनं कडुन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ.पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त शोध-१ (गुन्हे) श्री. शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, शरद पाटील, पोउपनिरी तुषार माने, स.पो.उप.निरी. चौधरी, पो.हवा. निकम, शिंदे, कार्ले, रावते, पालांडे, काटकर, पाटील, जाधव, मपोहवा. गिते, महाले, पो.ना. गार्डे, बंडगर, ठाणेकर, पो.शि. शेडगे, शिकारे, यादव या पथकाने यशस्वीपणे केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'गुरू शिष्य' परंपरा जपणारी "गुरूपौर्णिमा" भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिविली : गुरू पौर्णिमा म्हणजे आषाढ शुक्ल व्यास पौर्णिमा. गुरू वीण कोण दाखवी वाट.. अशा गुरुंचा वरदहस्त शिष्यावर असणे म्हणजे त्रिभुवनात संजीवनी मिळाल्यासारखे आहे. दिनांक १० जुलै, गुरुवार रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा, वंदे मातरम विद्यामंदिर, कनिष्ठ व पदवी महाविद्यालय तसेच नागपूर
 (दावसा) स्थित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा इथे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून मोठ्या उत्साहात गुरु पौर्णिमा साजरी केली. योगायोग असा की गुरुवार हा गुरूंचाच वार असून "गुरु पौर्णिमा" देखील याच दिवशी संपन्न झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी यांनी महर्षी वेद व्यास व सरस्वती पूजन करून  कार्यक्रमांना सुरुवात केली. इयत्ता आठवी मधील विभूती धसाडे या विद्यार्थिनीने आपल्या गायनतून गुरू वंदना सादर केली. संपूर्णतः कार्यक्रमाची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी उचलून घेतली होती. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व शिक्षकांचे शाळेच्या प्रवेशद्वारात त्यांचे पाय धुवून पाद्य पूजन केले, औक्षण करून व फुलांचा वर्षाव करत मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये वाजत गाजत सर्वांचे स्वागत केले. 
अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांना व्यासपीठावर स्थानापन्न करून स्वतः विद्यार्थांनी हस्त कलेने बनवलेले मुकुट मान्यवर आणि सर्व शिक्षकांच्या मस्तकावर परिधान केले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली "गुरु हमारे मन मंदिर मे.. गुरु हमारे प्यार" हे गुरु गीत सादर करून सर्व शिक्षकांना मानवंदना दिली. त्यानंतर नाट्य व नृत्य शिक्षक प्रमोद पगारे, अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु द्रोणाचार्य व एकलव्य हे नाटक नृत्य सादर केले. तर प्रांजल मिश्रा आणि अर्णव अंबिके या विद्यार्थ्यांनी गुरू शिष्य कथा सांगितली. शिशु विहारच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांचे पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन  फुले वाहून, ओवाळून त्यांच्या पाऊलांची पूजा केली. वंदे मातरम महाविद्यालयात सौ. खुशबू दुबे, प्रमोद गुप्ता व प्राचार्य डॉ. नाडर, उपप्राचार्या वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व विद्यार्थी काव्या कट्टी, श्लोक साळवी,  अनुज तिवारी, शिव श्याम यादव यांनी पुढाकार घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य अलपेश खोब्रागडे उपप्राचार्य चौधरी व विद्यार्थी सोबत आंचल पटवा, सोफिया, अवनीश पटवर्धन, पार्थ चोणकर यांनी भाग घेवून गुरुपौर्णिमा साजरी केली. 
जे एम एफ संस्थेचे २०२५ हे वर्ष 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. त्याच अनुषंगाने गुरू पौर्णिमा निमित्त जे एम एफ संस्थेची इमारत रांगोळ्या, फुलांनी सजवण्यात आली. शाळेतील इयत्ता नववी, दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेला हा कार्यक्रम पाहून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे भारावून गेले. व सर्वांचे मनापासून कौतुक केले.
सर्व प्रथम आपला आत्मा हा आपला गुरू आहे, गुरू हा कधीही वाईट मार्ग दाखवत नाही, म्हणून आपले मन, आपला आत्मा आपल्याला कधीही वाईट मार्गावर जाऊ देण्यास प्रतिबंध करत असतो म्हणून तो आपला गुरू आहे, आपले आई वडील हे प्रथम आपले गुरू आहेत, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक सजीव हा आपला गुरू असतो, कारण प्रत्येकाकडून काही ना काही आपण शिकतच असतो आणि त्यातूनच बोध घेत असतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले, आयुष्यामध्ये चढ उतार करत असतानाच यश अपयशाचे चटके, टक्के टोणपे खात असताना जो हात हातात घेऊन आपल्याला दिलासा देतो तो  गुरुंचा हात म्हणजे आपले गुरू होय. केवळ शिकवणे , शिकणे म्हणजे गुरू नाही तर येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव हा देखील आपला गुरु आहे, असे संस्थापकानी आपल्या भाषणात नमूद केले.
ब्रह्मांड रचिता ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती मधील स्वतः दत्त गुरु महाराजांनी चोवीस गुरु केले होते. मुंगीला देखील त्यांनी गुरु मानले, सर्व सजीवांमध्ये मुंगी हा असा जीव आहे की तो कधीही झोपत नाही, अविरतपणे आणि चिकाटीने कार्य करणे हे मुंगीचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच दत्त गुरुंनी मुंगीला आपले गुरू मानले, अशी गुरु शिष्यांची बरीच उदाहरणे देऊन सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना गोष्ट देखील सांगितली व गुरू पौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या. 
सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व फळ देऊन गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन इयत्ता दहावी मधील इव्हा शॉ व सार्थक भाईंबीड या विद्यार्थ्यांनी केले तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान दिले.

एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालात टेकऑफनंतर दोन्ही इंजिन बंद असल्याचा धक्कादायक खुलासा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद : अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या एएआयबीच्या चौकशी अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवाल याने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले? अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. अपघाताच्या महिन्याभरानंतर आलेल्या या चौकशी अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार, टेकऑफ झाल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन काही सेकंदात बंद पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल प्राथमिक आहे. सध्या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे, असेही तपास अहवालात म्हटले आहे.

एएआयबी ने १५ पानांचा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, विमानाने सकाळी ०८:०८ वाजता १८० नॉट्सची कमाल इंडिकेटेड एअरस्पीड घेतली होती. त्यानंतर लगेचच, इंजिन-१ आणि इंजिन-२ चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनांना इंधन पाठवतात) ते ‘रन’ वरून ‘कटऑफ’ परिस्थितीत गेले. फक्त एका सेंकदात हे घडले. त्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले. त्यानंतर दोन्ही इंजिन एन१ व एन२ रोटेशन स्पीड वेगाने निकामी झाले.

अपघातात २६० जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन लंडन जाण्यासाठी टेकऑफ घेतले होते. विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात मेडिकल कॉलेजच्या हॉस्टल परिसरात क्रॅश झाले. या अपघातात विमानातील २४१ जणांसह २६०  जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक व्यक्ती वाचला. विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनडाचा नागरिक तर ७ पोर्तुगाल नागरिक होते.

राज्य सरकारच्या अन्यायकारक कारवाढी विरोधात 'आहार' संघटनेची सोमवारी महाराष्ट्र बंद ची हाक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे : दोनच दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी 'भारत बंद' ची हाक दिली होती, आणि आता त्यानंतर येत्या १४ जुलैला म्हणजेच सोमवारी 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली आहे. हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलैला 'महाराष्ट्र बंद' ची हाक दिली आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच 'आहार' संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत.

यामुळे राज्याच्या महसुलावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 'आहार' संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'महाराष्ट्र बंद' बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. १४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंद ! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे ! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड कारवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील. दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली. परवाना शुल्क १५ टक्के वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६० टक्केची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. 'हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो. चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया आता पुरे झाले ! असेही या संघटनेने म्हटले आहे. 

राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढीच्या धोरणाविरोधात इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात 'आहार' संघटनेने १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान या आंदोलनांतर्गत राज्यभरातील २० हजार हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 'महाराष्ट्र बंद' चा सर्वाधिक प्रभाव मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील प्रमुख शहरी भागांमध्ये जाणवणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारने जर याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही संघटनेने दिला आहे.

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

उल्हासनगर - गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून त्यांची प्रशंसा होतं आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बदलापुर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ०१/०७/२०२५ रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुह्याचा तपास गुन्हे शाखा घटक-४ कार्यालयाकडुन करण्यात येत असतांना पोहवा. गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमीदाराकडून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रोशन बाळा जाधव हा बंद असलेल्या 'अमर डाय कंपनी' जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर-१ येथे फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने उल्हासनगर क्राईम ब्रांच युनिट-४ चे पोलीस अधिकारी व पथकाने कारवाई करून आरोपी रोशन बाळा जाधव (वय: ३४ वर्षे), राहणार हनुमान मंदिर जवळ, निळजेगाव, कल्याण फाटा, डोंबिवली पुर्व, जि. ठाणे यास ताब्यात घेतले व बदलापुर पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामधील सोन्या, चांदीचे दागिणे, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असुन खालील नमुद प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) बदलापुर पश्चिम पो.स्टे.गु.र.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे
२) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.र.नं. ३९१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१ (३),३०५ प्रमाणे
३) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३५७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे 
४) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३७०/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे
५) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.२२९/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५)प्रमाणे 
६) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३७१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(१), ३०५ प्रमाणे
७) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि. नं.३०७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे
८) शिवाजीनगर पो.स्टे.गु.रजि.नं. ४७८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(ए) प्रमाणे

तरी गुन्हे शाखा घटक-४ उल्हासनगर यांनी परिमंडळ-४, उल्हासनगर यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ०८ गुन्हे आरोपी रोशन बाळा जाधव यास अटक करून उघडकीस आणले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीने चोरी केलेले १८९.१७ ग्रॅम वजनाचे १५,१३,३६०/- रू. किंमतीचे  सोन्याचे दागिने व १०,०००/- रू. किंमतीचे चांदीचे दागिणे, ८०,०००/- रू. किंमतीचे दोन लॅपटॉप, ५०,०००/-   
रू. किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि गुन्हयात चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी ३,२८,०००/- रू. रोख रक्कम असा एकुण १९,८१,३६०/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, अमरसिंह जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सपोनि. श्रीरंग गोसावी, पोहवा. गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोना. कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोशि. संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले नेमणूक गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत प्रथमच संपन्न झाला महापालिका आयुक्तांचा जनता दरबार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्यांचे जलद गतीने निराकरण व्हावे, या दृष्टीकोनातून दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. आता डोंबिवलीतील नागरीकांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना देखील जनता दरबारात समक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्तांसमोर मांडता याव्यात यासाठी प्रथमच आयुक्तांच्या जनता दरबाराचे आयोजन डोंबिवली (पूर्व) येथील पी.पी चेंबर्स येथे 'फ' प्रभाग कार्यालयाच्या इमारतीत काल दुपारी करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७५ ते ८० नागरीकांनी जनता दरबारास उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्त व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सदर समस्यांवर चर्चा करुन त्यांचे त्वरीत निराकरण करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना सक्त सुचना देण्यात आल्या असून असे बांधकाम होताना दिसले तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत, महापालिका रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या “नॅशनल क्वालिटी अश्यूरन्स स्टँडर्ड” व “कायाकल्प” या प्रकल्पा अंतर्गत/सेवांतर्गत नागरी आरोग्य केंद्रे व महापालिका रुग्णालये यांच्या कार्यप्रणालीबाबत कालबध्द नियोजन करण्यात येत आहे आणि येत्या कालावधीत अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी योवळी पत्रकारांशी बोलताना दिली.

जनता दरबार संपन्न झाल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच इतर अधिकाऱ्यांसमवेत थेट चालत डोंबिवली स्थानक परिसराची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्याकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली - मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर ठिकाणी मिळून आलेल्या आरोपीकडून एकुण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे २.१२ कोटी रकमेपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करून गु.र.नं ७८७/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मी कलम ८ (क), २१(क) २२(क) मध्ये त्यास अटक केलेली आहे. सदरचा आफ्रिकन देशातील परदेशीय नागरीक आरोपी नामे इसा बकायोका (वय: ३७ वर्षे) मुळ राहणार आयवोरी कोस्ट याच्याकडून एकूण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
यापुर्वी दिनाक २७/०६/२०२५ रोजी गु.र.नं ७३१/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनीव्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१(क) २२(क) अन्वये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एमडी) पकडण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपीचा शोध येत असताना वरील माहीती मिळाल्याने यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या गु.र.नं ७३१/२०२५ मधील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख याच्या कडुन बँगलोर येथील चोरीची गाडी एम.डी सह ताब्यात घेण्यात आलेली आहे.

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत काही गोपनीय माहीती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण तसेचं मानपाडा पोलीस ठाणे यांच्या दुरध्वनी कमांक (०२५१)२४७०१०४ यावर संपर्क साधावा. माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

सदरची यशस्वी कामगिरी ही ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाचे श्री. संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ कल्याणचे श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त डोबिवली विभागाचे श्री. सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, सपोनि सागर चव्हाण, अजय कुंभार, पोहवा. पाटील, माळी, राठोड, पोशी. आडे, गरुड, झांझुर्णे, चौधर यांच्या पथकाने केलेली आहे.