BREAKING NEWS
latest

एसटी मध्ये १७४५० चालक, सहाय्यकांची पदे भरण्याची मेगा भरती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  एसटी मध्ये मोठी नोकरभरती जाहीर झाली आहे. आगामी नवीन बसेससाठी कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरतीसाठी किमान वेतन ३० हजार रुपये असणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल.

डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, यांच्या तर्फे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्त डोंबिवलीत 'रासरंग - २०२५ उपक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व कार्यसम्राट डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' हा शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी १० व्या वर्षात पदार्पण करत असून २२ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी डी.एन.सी. रोडवरील शाळेच्या मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०१७ पासून 'डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन' आणि 'श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली' यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवणारे हे फाऊंडेशन सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी कार्य करत असून, त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हा रास रंग नवरात्र उत्सव.
सदर नवरात्र उत्सवाची घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता होणार असून देवीची आरती दररोज सकाळी ११:०० वाजता आणि संध्याकाळी ७:०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. या नवरात्र उत्सवाचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय गोपाळ लांडगे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता नऊ विविधरंगी २१०० फुगे आसमंतात सोडून करण्यात येणार आहे. दररोज रात्री ८:३० वाजता विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता भोंडला सोहळा आणि ३० सप्टेंबर - दुपारी ३:०० वाजता कुमारीका पूजन / कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्रपणे आव्हान महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायं. ७:३० ते रात्री १०:००  प्रसिद्ध तबलावादक व संगीतकार नैतिक नागदा यांच्या ऑर्केस्ट्राद्वारे दांडिया-गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवली शहरासह अनेक शहरांतील युवक-युवती मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रास रंग २०२५ नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या मान्यवर मंडळी, दुर्गा भक्त व दांडिया प्रेमींच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था डीएनसी रोडवरील श्री स्नेहांकित मित्र मंडळाच्या कमानी शेजारील भूखंड, कलावती आईच्या मठासमोर या ठिकाणी करण्यात आलेली असून दुचाकी, चार चाकीने येणाऱ्यांनी इतर ठिकाणी पार्किंग करून रहदारीस अडथळा न करता या पार्किंग व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये राबविण्यात येणारे आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा प्रोत्साहन, महिला सबलीकरण, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक एकोपा यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास करून कायापालट घडवून आणणाऱ्या डॉ. शिंदे यांचे योगदान आणि जनतेवरील प्रेम या उत्सवाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. या शारदीय नवरात्र उत्सवात जास्तीत जास्त दुर्गाभक्त, युवक-युवती, महिला आणि गरबा-प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्यावतीने शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी डीएनसी शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख आणि जेष्ठ नगरसेवक रवी मट्या पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ, युवा सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन मट्या पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन मराठे, ज्येष्ठ नगरसेवक रणजीत जोशी, माजी नगरसेवक संजय पावशे, माजी नगरसेविका सारीकाताई चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक खामकर, शिवसेना कल्याण तालुका सचिव बंडू पाटील, कल्याण ओपन तालुकाप्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन मोतीराम पाटील, युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, शहर सचिव संतोष चव्हाण, शाखाप्रमुख अमित बनसोडे, व्यापारीं संघटनेचे गजानन व्यापारी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक उज्वलाताई भोसले, महिला आघाडीच्या केतकीताई पोवार, माजी नगरसेवक तथा खासदार कार्यालयाचे प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना महिला आघाडी युवा सेनेचे अनेक मान्यवर महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'५८ व्या युवा महोत्सव' सांस्कृतिक कार्यक्रमात 'जे एम एफ' संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावत केले भव्य यश संपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये १२ झोन मधील ३६० महाविद्यालय व त्यातून सुमारे ४५ महाविद्यालयांची अंतिम सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभाग दर्शवला होता. डोंबिवली येथील 'जे एम एफ" शिक्षण संस्थेच्या वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाने मराठी नाटक सादर करून ४५ महाविद्यालयांमधून 'रौप्य पदक' प्राप्त करून आपला दुसरा क्रमांक निश्चित केला.
मराठी गट नाटक 'अ' मधून दिवेश मोहिते, साई कुडतुडकर, यश बाडेकर, सानिका तांबोळी, दुर्वा घाडी, तन्वी गुरव या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बाजी मारली तर संगीतकार आयुष सावंत व संस्कार कदम यांनी अवीट गोडीचे संगीत दिले. नाट्य दिग्दर्शक प्रथमेश देवकुळे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. सांस्कृतिक विभागाच्या संयोजक मिस मृणाली यांनी जातीने लक्ष घालून सांस्कृतिक विभागाची धुरा सांभाळली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे अभिनंदन व कौतुक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल तुम्ही सर्वांनी वंदे मातरम् महाविद्यालयाचे नाव उज्वल केले तर मिळालेल्या यशाचे श्रेय हे कोणा एकाचे नसून सर्व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या समुदायाचे असते, तुमच्या मधील दिसणारे प्रयत्न, एकी आणि जिद्द हेच खरे तर चकाकणारे 'रौप्य पदक' आहे असे सांगून सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मराठी नाटकाची अस्मिता जागरूक ठेवून दर्जेदार नाटक लिहून सर्वच  विद्यार्थी कलाकारांनी आणि दिग्दर्शकाने झोकून देऊन रौप्य पदक भूषविले व आपल्या सांस्कृतिक शहर डोंबिवली आणि 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयचे नाव रोशन केले त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर, उप प्राचार्या डॉ.वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी या सर्वांचे अभिनंदन केले.

ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१२ - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर, बृहनमुंबई, नवी मुंबई व ठाणे ग्रामीण हद्दीतील २६ गुन्ह्यांचा छडा लावत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये इतकी आहे.

अटक केलेले आरोपी

गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण व घटक-२ भिवंडी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत खालील आरोपींना जेरबंद केले आहे..
१) अतुल सुरेश खंडाळे (वय:२४ वर्षे, राहणार. हडपसर, पुणे)
२) शेखर गोवर्धन पवार (वय:३० वर्षे, राहणार. जळगाव)
३) आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय:२३ वर्षे, राहणार. चक्की नाका, कल्याण पश्चिम)
४) गाझी लकीर हुसैन (वय:१९ वर्षे, राहणार. आंबिवली, कल्याण)
५) मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय:३१ वर्षे, राहणार. भिवंडी)

उघडकीस आलेले गुन्हे

अटक आरोपींकडून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, वासिंद, तळोजा, नवी मुंबईसह मुंबईतील धारावी, कांदिवली, माहिम, नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले २६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये भादंवि कलम ३७९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर, व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाची कामगिरी

या तपास मोहिमेत वपोनि. जनार्दन सोनवणे (घटक-२, भिवंडी), वपोनि. अजित शिंदे (घटक-३, कल्याण) यांच्यासह सपोनि. श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता. महिलांसह जवळपास ५० हून अधिक अंमलदारांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या मोठ्या चोरी प्रकरणांची मालिकाच उघडकीस आली आहे. ठाणे पोलीसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणाला दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांचा नामांकित "जे एम एफ शिक्षाविद पुरस्कार २०२५" पुरस्कृत सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  ५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे हाडाचे शिक्षक आणि स्वतंत्र  भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती, त्यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीय हा दिवस शिक्षक दीन म्हणून साजरा करतात. 
'जे एम एफ' संस्थेमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिक्षक दीन पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुमारे  ३० मान्यवर शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांना 'जे एम एफ  पुरस्कार २०२५' ने पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजराथ, दिल्ली अशा अनेक ठिकाणाहून शिक्षाविद शिक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी राजकुमार कोल्हे त्याच बरोबर मुख्य अतिथी श्री. एस.सत्यकुमार, (हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच विशेष अतिथी पद्मश्री पुरस्कृत  श्री. गजानन जगन्नाथ माने, श्री. ए.के.सिन्हा, श्री. बी.एम.सिन्हा, डॉ. मोसेझ, श्री. युवराज कोल्हे, श्री. कोळेकर, डॉ. कुमार, श्री. परशुराम भांगे गुरुजी, सौ. पुष्पा भांगे व उपस्थित असलेले सर्व विभूषित शिक्षकगण तसेच इतर पदाधिकारी यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रशिक्षक रमेश वागे, सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम ढोलताशे वाजवून व नृत्य शिक्षक अभिषेक देसाई व सौ. कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी  स्वागत नृत्य करून जल्लोषात स्वागत केले. सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या दिग्दर्शनाखाली मुलांनी लघुनाट्य सादर केले तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक मोठे शिक्षक होऊन गेले. 
यावेळी प्रसार माध्यमाचे मुख्य श्री. रोहित राजगुरु, अखिल नायडू, आकाश व त्यांच्या चमूने तयार केलेली विभूषित शिक्षकांची लघु चित्रफित दाखवण्यात आली तर 'जाह्मविज मल्टी फाऊंडेशन' चा २५ वर्षाचा प्रवासाचा माहितीपट देखील  दाखवण्यात आला. शिक्षक कसा असावा तर प्रेम आणि उद्वेग यांचा समतोल साधणारा असावा, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढविणारी असते तर वेळप्रसंगी पाठीवर मारलेली तीच थाप ही वाईट वळणावरून चांगल्या मार्गावर नेणारी असते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिक्षणाने माणूस मोठा होतो तर अनुभवाने माणूस शहाणा होतो, पृथ्वीतलावरील सर्वोच्च श्रेष्ठ पद व सन्मान कोणते असेल तर ते शिक्षक होण्याचे. आणि हे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. ज्ञान दानाचे कार्य करत असताना देखील विद्यार्थी दशेतली शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणे म्हणजे शिक्षक. शिक्षकांचे ऋण हे कधीही न फिटणारे असते किंबहुना ते न फेडता त्या साठलेल्या व्याजावर मिळालेल्या ज्ञानाच्या  यशाचे मनोरे बांधावेत असे सांगून, आज अनेक उच्चशिक्षित, विभूषित शिक्षक मंडळींना "जे एम एफ शिक्षाविद २०२५"  पुरस्कार प्रदान करताना मला वाटते की एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला दिलेला आशीर्वादच आहे. असेही ते म्हणाले.
ज्या प्रमाणे मातीला आकार देऊन कुंभार मडके बनवतो त्याच प्रमाणे  बालमनाच्या कोऱ्या पाटीवर  श्री गणेशा लिहून भविष्य घडवतो तो शिक्षक होय, शिक्षणाला मर्यादा नाहीत आणि शिकायला वय नाही आणि शेवटपर्यंत शिकणारा आणि शिकवणारा असतो तो म्हणजेच शिक्षक. असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने  रौप्य महोत्सव मानचिन्ह, 'जे एम एफ' शिक्षाविद पुरस्काराचे मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल प्रदान करण्याकरिता उपस्थित व निवडक ३० मान्यवर शिक्षकांना मंचावर बोलावून श्री. एस.सत्यकुमार अध्यक्ष, हेवी वॉटर बोर्ड, भारत सरकार, मुंबई, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जाह्नवी कोल्हे, यांच्या हस्ते पूरस्कार देण्यात आले. तर संस्थेतील सर्व शिक्षकांना चांदीची गणपती व लक्ष्मी ची प्रतिमा देण्यात आली. पुरस्कार विजेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. एकनाथ चौधरी, सौ. श्रेया कुलकर्णी, श्री. योगेश शिरसाट, शर्वरी मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या ज्योती व्यंकटरामण यांनी केले. राष्ट्रगान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम 'ना भूतो ना भविष्यती' असा झाला.

चैन स्नॅचिंग सारख्या जबरी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलीसांनी केला परदाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास चामुण्डा सोसायटी गेट जवळ, ९० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली (पूर्व) येथुन वृध्द महिला पायी  चालत जात असताना मोटार सायकलवर दोन इसम येवून वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन खेचुन पळून गेले. त्याबाबत डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस उप आयुक्त साो. श्री. अतुल झेंडे, व सहा पोलीस आयुक्त  साो. श्री. सुहास हेमाडे यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जावदवाड यांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी व शोध घेणेकामी डोंबिवली पोलीस ठाण्याचे शोध पथकांतील सपोनि. मुपडे व पोउनि. चव्हाण यांच्या दोन टिम तयार करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाचे व इतर ठिकाणाचे एकूण १०६ सी.सी.टिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता आरोपी याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एमएच-२०/ एफआर-१८५१ ही असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोटार सायकल मालकास संपर्क केला असता त्याने सांगितले की, सदर मोटार सायकल त्यांने दिनांक २२/०८/२०२५ रोजी नारायण पेठ, पुणे येथे पार्क केली असुन सदर ठिकाणाहुन ती चोरीस गेली  आहे त्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद आहे. यावरून समजले की, दाखल गुन्ह्यातील आरोपी यांनी सदर मोटार सायकल चोरी करून डोंबिवली येथे येवुन चैन स्नॅचिंग केली आहे. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचा गुन्हा केलेल्या ठिकाणाचा माग घेवुन त्यांच्या बाबत अधिक माहिती प्राप्त केली. तपासादरम्यान गुन्हे तपास पथकांनी अथक परिश्रम घेवून सदर आरोपी हे सुनिल नगर, डोंबिवली (पूर्व) येथे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावुन सदर संशयीत्त इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नावे विचारता त्यांनी त्याची नावे १) अभय सुनील गुप्ता, (वय: २१ वर्षे), राहणार. कुमारनटोला, खुटार रोड, गोला गोकर्णनाथ, ठाणे. गोला गोकर्णनाथ, जिल्हा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश, २) अभिषेक ओमप्रकाश जौहरी, (वय: ३२ वर्षे), राहणार, खोली क्रमांक १४/१५, हरिहरगंज, ठाणे. कोतवाली, फतेहपूर, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश, ३) अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला, (वय: २७ वर्षे), राहणार, खमरीया, ठाणे, खेरी, जिल्हा. लखीमपुर खिरी, उत्तरप्रदेश, अशी असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अभय सुनिल गुप्ता, याच्याकडे १ गावठी रिव्हॉलव्हर व अभिषेक ओमप्रकाश जौहरी, याच्याकडे ०४ जिवंत काडतूसं सापडले. तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदरचा मुद्देमाल हा डोंबिवली व मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याने त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे, येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. आरोपी यांच्याकडे १ गावठी कट्टा व ०४ जिवंत काडतूसं मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६८४/२०२५ आर्म ऍक्ट कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे वरील आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ३०,०००/- रू. किंमतीचा एक देशी बनावटीचा गावटी क‌ट्टा..
२) ८,००० /- रू. किंमतीची, गावठी बनावटीची ०४ जिवंत काडतुसे..
३) ३७,२६०/- रू. किंमतीची, एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
(डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं. ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५)
४) २,१५.०१०/- रू. किंमतीचे, एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम..
(मानपाडा पोलीस ठाणे गुरनं. १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५)
५) ९०,०००/- रू. किंमतीची. यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची नंबर एमएच-२०/ एफआर-१८५१ (विश्रामबाग पो.स्टे, पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) 

तरी सदर ३ इसमांकडे वरिल प्रमाणे असा एकूण ३,८०,४२० /- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा ठाणे
१) डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं.  क्रमांक ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (६). ३(५) मधील एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
२) मानपाडा पोलीस ठाणे गुरनं १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (४), ३(५) मधील एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम वजनाचे, मध्यभागी दोन वाटया असलेले, अर्धवट तुटलेले..

पुणे जिल्हा
३) विश्रामबाग पो.स्टे. पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) मधील मॅट ब्लॅक रंगाची एक यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची मोटार सायकल क्र. एमएच-२०/एफआर-१८५१..
४) बिबेवाडी पोलीस ठाणे गुरनं. २१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९(४) ३(५)
५) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ३६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३(२)
६) हडपसर पोलीस ठाणे गुरनं.  ७६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०४(२) ३(५)

उत्तर प्रदेश राज्य येथे अटक आरोपी अभिषेक ओमप्रकाश जौहरी याच्यावर दाखल असलेले गुन्हे..
१) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६६/२०१९ शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे..
२) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. क्र. २६९/२०१९ भादंवि. कलम ४११, ४१४, ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे..
३) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६४/२०१९ भादंवि. कलम ३९, ४०२ प्रमाणे..
४) कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. ५९६/२०१९ भादंवि. कलम ३९२, ४११ प्रमाणे..

तसेच आरोपी अर्पित ऊर्फ प्रशांत अवधेश शुक्ला याच्या विरुद्ध भादंवि. कलम ३०२ प्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

वरील आरोपी यांची पोलीस कोठडी मंजूर असून त्याचा अधिक तपास पोउनि. प्रसाद चव्हाण करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव, (पूर्व प्रादेशिक विभाग) कल्याण, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण श्री. अतुल झेंडे,  मा. सहा पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली  मा. वपोनि. श्री. गणेश जावदवाड, मा. पोनि. श्री. विक्रम गौड, मा. पोनि.(गुन्हे) श्री. राजेंद्र खेडकर डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. अच्युत मुपडे, पोउनि. प्रसाद चव्हाण, पोहवा. सुनील भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, पोकॉ. शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी यशस्वीरित्या केली आहे.

विवाह नोंदणी सुट्टीच्या दिवशीही होऊन त्याचदिवशी मिळणार नोंदणी प्रमाणपत्र..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई :  नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेगवान तसेच सुलभकरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याचदिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. 

प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वेग आणणे, यासाठी सर्व विभाग तथा खाती यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. असे असले तरी, वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे. याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता, महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५००/- इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे म्हणाले की, या दोन्ही सेवा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहेत. या दोन्ही नवीन सेवांमुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया आणखी जलद होईल. तसेच, विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

मुंबईतील धावपळीचे, धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता, नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांनाही कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुट्टी घेऊन विवाह नोंदणीसाठी महानगरपालिकेकडे यावे लागते. कारण, सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कार्यकाळात, विवाह नोंदणीसाठी नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सबब, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पती-पत्नी किंवा त्यांचे साक्षीदार यांना आपल्या कामकाजाच्या दिवशी सुटी घ्यावी लागते. यामुळे संबंधितांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही अडचण दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठवडा अखेरीस (वीक एन्ड) म्हणजे शनिवार व रविवार या दोन्ही सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत विवाह नोंदणी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये, दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - 'ए', 'सी', 'ई', 'एफ दक्षिण', 'जी दक्षिण', 'एच पूर्व', 'के पूर्व', 'पी दक्षिण', 'पी उत्तर', 'आर मध्य', 'एल', 'एम पश्चिम', 'एस' या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी 'बी', 'डी', 'एफ उत्तर', 'जी उत्तर', 'एच पश्चिम', 'के पश्चिम', 'पी पूर्व', 'आर दक्षिण', 'आर उत्तर', 'एन', 'एम पूर्व', 'टी' या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या पाच दिवसांमध्ये होणारी विवाह नोंदणीदेखील जलद व्हावी, संबंधितांना वारंवार महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी आणखी एक सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून ही सेवा ओळखली जाईल. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' म्हणून राखीव राहतील. या जलद नोंदणीचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना, सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करुन त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. मात्र, या दोन्ही विवाह नोंदणी सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (पब्लिक हॉलिडे) उपलब्ध नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.