BREAKING NEWS
latest

दिव्यात ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुखांनी हाती घेतला शिंदेंचा धनुष्यबाण..

विशेष प्रतिनिधी

दिवा:  दिवा शहरातील ठाकरे गटाला धक्का देत त्या पक्षाच्या दोन ज्येष्ठ विभागप्रमुखांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. माजी उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपशहर प्रमुख, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, श्रीधर बेडेकर यांच्यासह माधुरी नाईक, सचिन भुवड आणि विकी नाईक यांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे दिवा शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक गुरुनाथ नाईक यांचे त्यांच्या स्वगृही मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिवा शहरात सन १९८४ साली शिवसेना उभी राहत असताना केवळ पाच कार्यकर्ते सक्रिय होते, त्यापैकी एक म्हणून गुरुनाथ नाईक यांचे नाव घेतले जाते. पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, माजी महापौर रमाकांत मढवी यांच्या निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला दिवा शहरात बळकटी मिळणार असून, येत्या काळात राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

दिव्यातील भाजपचे सतीश केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. १८ डिसेंबर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. माधवी नाईक-मेंढे तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विरसिंह पारछा यांनी विशेष मार्गदर्शन करत, सतीश केळशीकर आपल्या कार्यकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.

नवनियुक्त सरचिटणीस सतीश केळशीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पक्षाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करू. वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली विकासकामे पुढे सुरू ठेवून संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल. भारतीय जनता पार्टीत कोणतेही गट नसून सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डोंबिवलीत ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त महापालिकेच्या चर्चासत्रात ७ कलमी शाश्वत विकास उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे आयोजित चर्चासत्राला डोंबिवलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील रोटरी भवन येथे आयोजित या अनोख्या उपक्रमाला डोंबिवली परिसरातील १५० हून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने ७ कलमी मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आहे. आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि विद्युत-यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात मुद्द्यांचा समावेश असून त्याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमाचे डोंबिवलीकरांकडून विशेष कौतुक !

या सात मुद्द्यांवर कल्याण डोंबिवलीतील गृहसंकुलांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज ओळखून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. येत्या काळात कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक लहान मोठ्या निवासी संकुलापर्यंत हा ७ कलमी कार्यक्रम पोहोचवण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा मानस आहे. त्यादृष्टीने कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही डोंबिवली रोटरी क्लब ऑफ ईस्टचे माधव चिकोडी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांनी शाश्वत आणि सुरक्षित विकास हा कार्यक्रम सोसायटीनिहाय घेऊन सोसायटीनुसार त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.

संपूर्ण त्वचा व सौंदर्य सेवा एकाच छताखाली देण्यासाठी डोंबिवलीत ‘स्किनराईज एस्थेटिक्स’चा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – त्वचा, केस व सौंदर्य उपचारांच्या आधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा 'स्किनराईज एस्थेटिक्स' या क्लिनिकचे नुकतेच डोंबिवलीत उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचा व सौंदर्यविषयक उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले असून, याठिकाणी त्वचारोग, सौंदर्य उपचार, स्किन केअर, ऍन्टी-एजिंग, पिंपल्स, डाग, केस गळती, हेअर ट्रीटमेंट्स तसेच लेझर व आधुनिक एस्थेटिक प्रक्रियांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि वैयक्तिक गरजांनुसार उपचार याठिकाणी पुरविले जाणार आहेत.
श्रीमती ईश्वरी शिरोडकर यांनी सुरु केलेले 'स्किनराईज एस्थेटिक्स' नागरिकांना दर्जेदार उपचार प्रदान करते. हे क्लिनिक आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजेनुसार उपचार प्रदान करते. रुग्णांना त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांचे उपचार किंवा कॉस्मेटिक उपचारांचा लाभ याठिकाणी घेता येणार आहे. आपले आरोग्य आणि सुरक्षिततेचे भान ठेवत आपले नैसर्गिक सौंदर्य वाढविणे हे या स्किनराईज एस्थेटिक्सचे मुख्य ध्येय आहे.

स्किनराईज एस्थेटिक्समध्ये त्वचारोग तज्ज्ञ, सौंदर्य तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम उपलब्ध आहे, जी त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांवर उपचार करते. वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त, स्किनराईज ऍन्टी-एजिंग उपचार, लेझर प्रक्रिया, डाग कमी करणे आणि कायाकल्प करणारे फेशियल यांसारख्या सौंदर्य सेवा देखील प्रदान करते. सर्व वयोगटांमध्ये जीवनशैली-संबंधित त्वचा आणि केसांच्या समस्या वाढत असल्याने, हे क्लिनिक प्रत्येक रुग्णासाठी सुरक्षित, प्रामाणिक आणि वैयक्तिक उपचार योजना तयार करते. वैद्यकीय सेवांमध्ये लेझर हेअर रिमूव्हल, केमिकल पील्स, मायक्रोनिडलिंग, एचआयएफयु, मेडिफेशियल्स, इन्फ्युजन फेशियल्स, पीआरपी, केस प्रत्यारोपण, आयव्ही वेलनेस ड्रिप्स, बॉडी कॉन्टूरिंग आणि इंटिमेट वेलनेस उपचारांचा समावेश आहे.

स्किनराईज एस्थेटिक्स केवळ बाह्य रुपावरच नाही, तर अंतर्गत सौंदर्यावरही लक्ष केंद्रित करते. निरोगी पर्यायांचा वापर करुन नैसर्गिक सौंदर्य वाढवणे हे आमचे ध्येय आहे. या क्लिनिकमुळे डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील लोकांना त्वचा आणि केसांच्या उपचारांचा लाभ घेता येईल.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये केडीएमसी च्या शिक्षण विभागातर्फे सकारात्मक शिस्त आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांचे सकारात्मक विचार आणि शिस्त हा महत्वाचा घटक आहे, या संदर्भात जिल्ह्यामध्ये मनपा, तालुका व केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन 'जे एम एफ' मधुबन वातानुकूलित दालनात करण्यात आले होते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व या चर्चासत्राचे वक्ते डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सकारात्मक शिस्ती बाबतचे व्याख्यान दिले. आयोजित केलेल्या व्याखनाला 'सी आर सी' प्रमुख क्रमांक २१ च्या सौ.राजश्री जतकर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण येथील प्रशासन अधिकारी श्री.भारत बोरनारे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागत करून व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी  विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षक कसा असावा तर शिक्षक हा संयमी, सकारात्मक विचारांचा, वेळ प्रसंगी कठोर पण मृदु देखील असावा असे सांगितले. मस्ती करणे हा विद्यार्थ्यांचा स्वाभाविक गुण आहे, अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन हा कंटाळवाणा विषय वाटत असतो, शिक्षक शिकवत असताना एकमेकांच्या खोड्या काढणे, आपापसात कुजबूज करणे, अशा प्रकारच्या मस्ती करत रहाणे या गोष्टी विद्यार्थी दशेत घडणे हे स्वाभाविक आहे,  त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा ही दिली जाते परंतु दिलेल्या शिक्षाचा वाईट परिणाम मुलांवर होऊन मुले वैचारिक रित्या कठोर होऊ लागतात, म्हणून शिक्षकांनी मुलांना शिक्षा न करता सकारात्मक विचाराने आणि संयमाने सद्य परिस्थिती हाताळणे आणि  विद्यार्थ्यांना सकारात्मक शिस्त लावणे हे योग्य ठरेल असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. जेव्हा मूल वाचन, संभाषण, आणि अभ्यास अशी बौद्धिक कामे करत असतो, अशा वेळेला त्याला रागावले तर त्याला भीती वाटते. मग बुद्धीचे काम थांबवून भावनांचे काम सुरू होते, आणि अशा वेळी जर अजून मोठी शिक्षा झाली तर विद्यार्थी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो यासाठी संवाद, सहकार्य व समुपदेशन करण्याचे कार्य आणि कर्तव्य हे शिक्षकाचे आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षा न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थी दशेत अनेक वेळा अपयशी ठरलेले परंतु भविष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींची उदाहरणे विद्यार्थांना द्यावीत, फेसबुक , व्हॉट्सऍप, अशा अनेक 
संगणकीय उपयोजन विकसित केलेले तद्न्य हे विद्यार्थी दशेत असताना यशस्वी नव्हते ते देखील आजच्या विद्यार्थ्यांसारखेच होते परंतु शिक्षकांच्या सकारात्मक शिस्तीने त्यांच्या मधे बदल घडवून आला आणि ते यशस्वी झाले, म्हणून ध्येय गाठायचा आधी तिथं पर्यंत पोहचण्याचा प्रवासाची तयारी आधी करा असा मोलाचा सल्ला डॉ.राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना दिला.
अनेक यशस्वी अयशस्वी मोठ्या व्यक्तींची चित्रफित दाखवून यशाची आणि सकारात्मक शिस्ती ची व्याख्या डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितली. या चर्चासत्रात अनेकांनी आपल्या मनातले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व समाधान कारक उत्तरे मिळवली. सुमारे २५० ते ३०० शिक्षक या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.

ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईत एम.डी.(मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या इसमाकडुन १०.८८ लाख रूपये किंमतीचा १०८.८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक ८/१२/२०२५ रोजी २२.५० वा. कल्याण पूर्वेतील आडवली, ढोकळी, हाजीमंलग रोड, येथील काका ढाबा, येथे असलेल्या श्री. गजानन रेसिडेन्सी, दिनकर विहार को.ऑप हौ.सोसायटी लिमि. रुम नं. ००२, डी-विंग याठिकाणी इसम नामे आकिब इकबाल बागवान (वय: ३३ वर्षे) हा एकुण १०८ ग्रॅम ८ मिलीग्रॅम वजनाचा १०,८८,०००/- रुपये किंमतीचा एम.डी.(मफेड्रोन) हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता जवळ बाळगला असताना व ५०,०००/- रुपये किंमतीची विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगुन ठेवले असल्याने मिळुन आला म्हणुन आरोपी नामे १) आकिब इकबाल बागवान याच्या विरुध्द मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५०२/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह म.पो. कायदा कलम ३७ (१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण गुन्हा रजि नं. ५०५/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (ब) व ५६०/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (क) या दोन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातीलं अटक आरोपी याच्याकडे चौकशी केली असता सदरचे अग्नीशस्त्र त्याने भरत शत्रुध्न यादव याच्याकडुन घेतल्याचे सांगितले.

त्यामुळे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे २) भरत शत्रुध्न यादव याचा तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेवुन त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडती मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण २ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्यांच्याकडुन १०८.८ ग्रॅम वजनाचा एम.डी.(मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ११,४१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे, नेम - खंडणी विरोधी पथक, ठाणे हे करीत आहे.

सदरची कारवाई श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध - २, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावस्कर, चापोहवा. हिवरे, पोशि. वायकर, पाटील, शेजवळ, मपोशि. भोसले यांनी केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीच्या 'रोटरी डाऊनटाउन क्लब' तर्फे धावण्याची स्पर्धा आयोजित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने शालेय विद्यार्थ्यांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. डोंबिवली शहरातील सुमारे १४० शाळांमधील एकूण २,१०० विद्यार्थ्यांनी या धावण्याच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. इतर मान्यवरांमध्ये आमदार श्री. राजेश मोरे, श्रीमती. सुलभा गायकवाड, रोटेरियन श्री. हर्ष मोकल तसेच होली एंजल शाळेचे मुख्याध्यापक श्री. बिजॉय ओमेन यांचा समावेश होता.
वंचित मुलांसाठी बालरोग हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला अनेक संस्थांकडून मोठा पाठिंबा मिळाला. रुस्तमजी ग्रुप, फेडरल बँक, डेकॅथलॉन आणि डोंबिवली शहरातील १५ हून अधिक संस्थांनी आपले मौल्यवान योगदान दिले.
गेल्या वर्षी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने केलेल्या अशाच निधी संकलनाच्या प्रयत्नांमुळे मुरबाडमध्ये चेक डॅम बांधणे शक्य झाले होते. त्याच भावनेला अनुसरून, या वर्षीच्या स्कूल रनमधून उभारलेला निधी लहान मुलांसाठी जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी समर्पित केला जाईल असे आयोजक रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या रोटेरियन ऍनी बिजॉय यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.