BREAKING NEWS
latest

पहलगाम हल्ल्याबाबत पार पडली सर्वपक्षीय बैठक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि. २४ : मंगळवारी (दि. २२) रोजी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काल दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काल सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनतर संध्याकाळी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही खासदार उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना श्रद्धांजली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला. अतिरेक्यांच्या या पूर्वनियोजित आणि घृणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मात्र जनतेत दहशतवादाविरुद्ध तीव्र असंतोष आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याने वातावरणात कमालीची शांतता आणि दुःख पसरले होते.
 मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अनेकजण भावुक होऊन फडणवीस यांना म्हणाले, "फक्त तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता." रात्री ९:०० च्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यापूर्वी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. "भावपूर्ण श्रद्धांजली" असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते, ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्रे होती. ही अंत्ययात्रा डोंबिवलीतील  डॉमिनोज पिझ्झा, एम. जी. रोड, डोंबिवली स्टेशन (पश्चिम), कोपर रोड, कोपर ब्रिज, टंडन रोड, आर.पी. रोड या प्रमुख मार्गांवरून गेली आणि शेवटी शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक यावेळी आपल्या भावनांना आवरू शकले नाहीत.
अंत्यसंस्कारापूर्वी भगशाला मैदानात स्मशान शांतता पसरली होती, कारण शोकाकुल नागरिक शांतपणे शवपेट्यांजवळून जात होते. अनेकजण स्तब्ध उभे होते, तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता. यापूर्वी, जेव्हा पार्थिव विमानतळावर पोहोचले, तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 
दरम्यान, ठाणे जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, जिल्ह्यातील १५६ पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत. विशेष विमाने आणि गाड्यांच्या माध्यमातून त्यांची घरवापसीची व्यवस्था केली जात आहे आणि ती उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनी समस्त देशवासियांना न्याय देण्याची तसेच दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.