BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' संचालित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये विद्यार्थी परिषद, मतदान, लोकशाही च्या धड्यांचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

 डोंबिवली - भारतातील अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. अठरा वर्षा खालील प्रत्येकाला या हक्काची अप्रूपता असते. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेअंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये दिनांक २८ आणि ३० जून रोजी विद्यार्थी परिषद मतदान पार पडले. आणि इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंत च्या सर्वच मुलांना मतदानाचा हक्क मिळाला.
सर्वच विद्यार्थ्यांना काही ना काही समस्या असतात, त्या समस्या समजून घेणारा एखादा प्रतिनिधी असावा असे वाटत असते, त्याच विचारातून विद्यार्थी समुदायातून काही विद्यार्थी निवडणुकीसाठी उभे राहतात. असेच एक पर्व म्हणजे विद्यार्थी परिषद निवडणूक आयोग. प्रत्येक वर्गातून काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आणि इतर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन प्रचार केला. एका वर्ग खोलीमध्ये गोपनीयता पाळून मतदान केंद्र उभे केले व सर्वांनी आपल्याला विश्वसनीय वाटणाऱ्या विद्यार्थी उमेदवाराला मतपेटी मध्ये आपल्या मताची चिठ्ठी टाकली. त्यावेळी पोलीसांच्या रुपात आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी ओळख पत्र बघूनच आत सोडले. वेगवेगळी वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत केले.
एकाच रांगेत व शांततेत चाललेले मतदान बघुन संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे भारावून गेले,  एकीचे बळ हे निश्चितच महत्वाचे आहे, परंतु ज्या विश्वासाने तुम्ही तुमच्याच मित्रमैत्रिणीला निवडून देणार आहात त्यांनी देखील कर्तव्यामधील प्रामाणिकपणा आणि संयम राखला पाहिजे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी म्हटले. तर केवळ मतदानाचा हक्क बजावयाला मिळतो आहे म्हणून त्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची ही काळजी घ्या, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले आणि सर्व उमेदवारांना आणि मतधारकांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षकांनी देखील शालेय आणि सामाजिक जबाबदारीतून मतदान केले. दोन दिवसांनी मत मोजणी झाल्यावर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा ''पद ग्रहण समारंभ" मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. निवडून आलेल्या प्रत्येकाला संस्थापक व सचिव यांच्या हस्ते पदाधिकारी बिल्ले देण्यात आले. पद ग्रहण केल्यावर तुमची जबाबदारी आणि भूमिका काय असेल याचेही धडे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी दिले.
 मुख्याध्यापिका ज्योती व्यंकटरामण  आणि तेजावती कोटीयन यांनी शपथ ग्रहण प्रतिज्ञा वदवून घेतली. प्राप्त झालेल्या पदाचा योग्य वापर आणि विद्यार्थी नागरिकांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला तडा न जाता तुम्ही केलेले कार्य अतुलनीय असणार आहे हे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नमूद केले. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  कलात्मक शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांनी व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रुती चौधरी व स्नेहा कलप या विद्यार्थिनीने केले व मीरा देवघरे ने सर्वांचे आभार मानले. सोबत डॉक्टर व चार्टर्ड अकाऊंटंट दिवस पण डॉ. हेरंब व डॉ. विलास लड्डे यांचा उपस्थितीत साजरा करण्यात आला.

ठाण्यात होणार पहिल्या 'स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मिती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - ठाण्यातील 'अंबर इंटरनॅशनल स्कूल’ आणि 'भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात इसरोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात शनिवारी, २८ जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील (एम.एम.आर) पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील `अंबर इंटरनॅशनल स्कूल’ येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.

ठाण्यातील तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याच्या हेतूने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या 'अंबर इंटरनॅशनल स्कूल' येथे स्पेस एज्युकेशन लॅबनिर्मित करण्यात येणार आहे. इसरोच्या स्पेसट्यूटर प्रोग्राम अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या लॅब निर्मितीबाबत शनिवारी 'अंबर इंटरनॅशनल स्कूल' आणि 'व्योमिका स्पेस अकॅडमी' यांच्या सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्राचे अभ्यासक डॉ. प्रतीक मुणगेकर, व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रदीप ढवळ, अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कल्पेश जाधव (प्रोग्रॅम आणि ऍडमीन हेड), दिलीप त्रिपाठी यांच्यासह दूरदृश्यप्रणाली द्वारे इसरोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी एन सुरेशकुमार तसेच खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण, अंबर इंटरनॅशनल स्कूलमधील मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम यांनी देखील आपली भूमिका मांडली. ही स्पेस लॅब विद्यार्थ्यांसाठी सहभागशील करण्याच्या दृष्टीने भर देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. आमचा उद्देश भावी अंतराळवीर, ऍस्ट्रोफिजीसिस्ट, स्पेस सायंटिस्ट आणि एअरोस्पेस इंजिनिअर्स घडवण्याचाआहे, असे संचालक लक्ष्मण कदम यांनी यावेळी नमूद केले.

व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव यांनी या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची मूलभूत ओळख होईल आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे अंतराळ संशोधक क्षेत्राचे अभ्यासक प्रा.डॉ. प्रतीक मुणगेकर यावेळी म्हणाले की, शिक्षण हे सामाजिक गतिशीलतेचे साधन असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या दृष्टीने सशक्त बनवणे आणि त्यांच्यासाठी व्यावसायिकसंधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अंतराळ संशोधन क्षेत्रासंदर्भात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रतिभा आणि गुणवत्ता असूनही या क्षेत्रात राज्याचे प्रतिनिधित्व कमी दिसून येते.

विद्यार्थ्यांना शालेय वयातच अंतराळ संशोधन क्षेत्राची ओळख करून देणाऱ्या विशेष पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास याक्षेत्रात मराठी टक्का वाढेल, असा विश्वास डॉ.मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र हे औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य असून देशाच्या अंतराळ क्षेत्रात मोठे योगदान देण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. शाळांमध्ये स्पेस सायन्स आणि इनोव्हेशन लॅब्स स्थापल्यास ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडता येईल असे डॉ.मुणगेकर यांनी याप्रसंगी सांगितले.

शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी या स्पेस लॅबच्या माध्यमातून शिक्षण रंजक आणि प्रेरणादायी करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. प्राध्यापक डॉ. ढवळ म्हणाले की, महाराष्ट्राला डॉ.जयंत नारळीकर, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर अशी थोर विज्ञान संशोधकांची उज्वल परंपरा आहे. त्यांची प्रेरणा असे उपक्रम राबवताना आमच्या समोर आहे. त्यातूनच मुंबई महानगरक्षेत्रातील पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ही अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या मानका नुसार ही प्रयोगशाळा उभी करण्यात येईल आणि मान्यवर शास्त्रज्ञ व संशोधकांचे मार्गदर्शन या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास प्रा.डॉ. ढवळ यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

यावेळी इसरो चे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.टी एन सुरेश कुमार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या सामंजस्य कराराबद्दल संबंधितांचे अभिनंदन करून प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, अशा प्रयोगशाळांमुळे भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्य उज्वल होणार आहे. या प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि विज्ञानाची आवड निर्माण होईल, असा विश्वास डॉ. टी. एन.सुरेशकुमार यांनी व्यक्त केला.

वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या एक दलाल महिला आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिनांक २७/०६/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती चेतना चौधरी यांना माहिती मिळाली की, “हॉटेल शुभम कम्फर्ट रेस्टॉरंट, शिळ डायघर रोड, कल्याण फाटा, ठाणे या ठिकाणी एक महिला दलाल काही पिडीत व असहाय्य महिलांना फुस लावुन वेश्यागमनासाठी बोलवणार आहे.” सदर मिळालेल्या माहिती वरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून एक दलाल महिलेस ताब्यात घेवुन तिच्या रखवालीत असलेल्या ०४ पिडीत महिलांची सुटका केली आहे.

सदर प्रकाराबाबत महिला आरोपीविरूध्द डायघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर । ६९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४३(१), १४३ (३), सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्रीमती चेतना चौधरी, मपोउपनि. स्नेहल शिंदे, सपोउपनि. वालगुडे, पोहवा. किशोर पाटील, सुवारे, मपोअंम. खरात, थोरात, पोअंम. व्ही. बी. यादव चापोशि. पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

मोबाईल ऍपद्वारे देशात पहिल्यांदाच मतदान प्रणाली ची प्रक्रिया..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
बिहार - भारताने निवडणूक प्रक्रियेत एक ऐतिहासिक पाऊल उचलत पहिल्यांदाच मोबाईल ऍपद्वारे मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. बिहार राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ४२ नगरपालिकांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये या नव्या प्रणालीचा वापर करण्यात आला. या पायलट प्रोजेक्टमध्ये सहा नगरपालिकांमध्ये ई-व्होटिंग ऍपच्या माध्यमातून मतदारांनी आपला हक्क बजावला. या उपक्रमासाठी “ई-वोटिंग SECBHR” नावाचं ऍप C-DAC आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे विकसित केलं आहे. या ऍपमध्ये फेस रिकग्निशन, लाईव्ह फेस स्कॅन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे. या प्रयोगामुळे भारतात निवडणूक प्रक्रियेच्या डिजिटल परिवर्तनाला चालना मिळाली असून, भविष्यात देशभरात ही प्रणाली लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे, दुबई, कतारसारख्या देशांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित बिहारी नागरिकांनीही या ऍपद्वारे मतदानात सहभाग घेतला. मोतिहारी येथील विभा या देशातील पहिल्या ई-मतदार ठरल्या, ज्यांनी ऍपद्वारे मतदान करून इतिहास रचला. या प्रणालीचा उद्देश म्हणजे मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांना जसे की स्थलांतरित कामगार, दिव्यांग, वृद्ध, गर्भवती महिला आणि गंभीर आजारी व्यक्ती यांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणं. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या ई-मतदानात ८०% पेक्षा जास्त मतदारांनी सहभाग घेतला, तर उर्वरितांनी पारंपरिक पद्धतीने मतदान केले.

उच्च न्यायालयाचे पप्पू कालानी यांच्या 'सीमा हॉली डे होम रिसोर्ट' मधल्या अनधिकृत बांधकामांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : येथील वरप गावातील अनधिकृत 'सीमा रिसॉर्ट' व सेक्रेड हार्ट स्कूलच्या सरकारी जमिनी बाबत जनहित याचिका क्र. ५३/२००५ दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना तेथील जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर ४ आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

टाडा कायद्यातंर्गत अटक केलेले तत्कालीन आमदार पप्पू कलानीचे अनधिकृत सीमा रिसोर्ट त्यावेळेचे जिल्हाधिकारी मधुकर पाटील यांनी २०-११-१९९२ रोजी जमिनदोस्त केले तेव्हा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता तसेच सिमा रिसोर्टच्या जमिनीत कलानी यांनी मातीचा अनधिकृत भराव केल्याच्या कारणावरुन पप्पू कालानी याचेवर महसूल विभागातर्फे रू. १९,९२,३००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्या दंडाचा बोजा संबंधित ७/१२ व ८ अ उताऱ्यावर ठेवण्यात आला होता.

वरप येथील भूमिहीन शेतकरी दौलत उंदऱ्या भोईर, प्रकाश बाबू पावशे व दुंदा बाबू पावशे यांना सीमा रिसॉर्ट परिसरात नवीन शर्थी प्रमाणे शासनाने जमिनींचे वाटप केले होते. परंतु त्यांच्या जमिनीत मातीचा भराव टाकून कलानी यानी जमीन नापीक करून वापराखाली घेतल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सर्वे नंबर ५०/६ व अन्य जमिंनीच्या शर्थींचा भंग झाल्याने त्यांच्या नावाची नापीक शेतजमीन शासन जमा करावी या करिता दि. ०२/९/२००२ रोजी कल्याण तहसीलदार तसेच नंतर जिल्हाधिकारी, ठाणे यांना निवेदन दिले होते. मात्र त्यांनी कलानी यांस झुकते माप देऊन जमीन शासन जमा करणेकामी कोणतीही कारवाई केली नव्हती.

वरप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच भगवान भोईर यांनी काही कालावधी उलटल्या नंतर कलानी यांना बांधकाम परवानगी दिल्याने त्या ठिकाणी हळू हळू पून्हा नव्याने अनधिकृत बांध‌काम उभी राहीली तसेच राजकीय वरदहस्तामुळे पप्पू कलानीवर शासनाने सन १९९२ साली आकारलेल्या दंडाचा रुपये १९,९२,३००/- रुपयांचा बोजा कल्याण तहसीलदार रंगनाथ गरुड यांनी फेरफार क्र. ६३५ अन्वये शासनाच्या आदेशानुसार दिनांक २४-६-२००२ रोजी माफ करून शासनाचे नुकसान केले होते.

त्याच प्रमाणे वरप ग्रामपंचायतीच्या नाहरकती मुळे तसेच संमतीने वरप ग्रामस्थ आणीबाणी तसेच पुर संकटाच्या वेळी वापरीत असलेली सर्वे न. २६अ हिस्सा न १६ ही ५२ गुंठे क्षेत्राची सरकारी जमीन सेक्रेड हार्ट स्कूलच्या आलविन चाको यांस अनधिकृतपणे वापरण्यास दिली होती. 

पप्पू कलानीचा महसूल खात्याने माफ केलेला दंड रुपये १९,९२,३००/- वसूल करावा, वीज मंडळाची रुपये ४ लाख ७१ हजार थकबाकी वसुल करावी, सेक्रेड हार्ट शाळेच्या ताब्यातील ग्रामस्थांची ५२ गुंठे शासकीय जमीन मोकळी करावी या करिता पत्रकार अजित म्हात्रे, संतोष होळकर, समाजसेवक बालसुंदरम आरसन यांनी उच्च न्यायालयात सन २००५ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. 

दरम्यान, अजित म्हात्रे यांच्या निधनानंतर वकील ज्ञानेश्वर देशमुख यांच्या मदतीने संतोष होळकर व ईतर याचिकाकर्ते काम पाहत होते. सदर जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठा पुढे नुकतीच पार पडली.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रुपये १९,९२,३००/- दंडाची रक्कम व्याजासह वसूल करावी, अनधिकृत बांधकामा बाबत याचिकाकर्ते तसेच इतर सर्व संबंधितांना कळवावे, चौकशीत सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे तसेच सीमा रिसॉर्ट मधील जमिनींचा सर्व्हे करावा व अनधिकृत बांधकामा विरुद्ध ४ आठवड्यात पाडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. ५३/२००५ सुरू असतानाही वरप येथील गावकऱ्यांच्या वापराची ५२ गुंठे सरकारी जमीन शासनाने सेक्रेड हार्ट स्कूलच्या नावे करून आलविन चाको याला देण्यात आली. सदर जमीन ग्रामस्थांना परत मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून वेळ पडल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे याचिकाकर्ते संतोष होळकर तसेच बालसुंदरम आरसन यांची तयारी असल्याचे त्यांनी कळविले आहे.

पंतप्रधान मोदींनी साधला अंतराळवीर सुभांशू शुक्लाशी संवाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) उपस्थित असलेल्या भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी थेट संवाद साधला. व्हिडिओ कॉलद्वारे पार पडलेला हा संवाद देशभरात प्रसारित झाला आणि नागरिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. शुक्ला हे 'अ‍ॅक्सिओम स्पेसच्या एएक्स-४' मोहिमेचे मिशन पायलट आहेत आणि १९८४ नंतर अंतराळात गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून ओळखले जातात. त्यांनी फ्लोरिडा मधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेस एक्स च्या ड्रॅगन यानातून उड्डाण घेतलं होतं, ज्याअंतर्गत सात महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग सध्या अंतराळात राबवले जात आहेत.

संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी विचारले की, अंतराळात पोहोचल्यावर त्यांच्या मनात पहिला विचार कोणता आला? त्यावर शुक्ला म्हणाले की, बाहेरून पृथ्वी पाहताना कोणतीही सीमारेषा दिसत नाही, ती एकसंध आणि विलक्षण भासते. “तेव्हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या संस्कृतीचा खरा अर्थ समजला,” असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी पुढे अंतराळात सुरू असलेल्या प्रयोगांविषयी माहिती दिली, विशेषतः स्टेम सेल्सवरील प्रयोग वृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असंही ते म्हणाले. या संवादात एक हलकीशी हास्याची लहरही उमटली, जेव्हा शुक्ला यांनी त्यांच्या टीमला अंतराळात गाजराचा हलवा दिल्याचं आनंदाने सांगितलं, त्यावर मोदींनी हसून प्रतिक्रिया दिली – “तुमच्यातला भारतीयपणा तुमच्या अन्नातही दिसतो!”

हा संपूर्ण संवाद केवळ वैज्ञानिक  दृष्टिकोनातून नव्हे, तर भावनिक आणि सांस्कृतिक बंध प्रस्थापित करणारा ठरला. भारताच्या अंतराळ संशोधनाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असून, पंतप्रधान मोदींनी आपल्या शेवटच्या शब्दांत म्हटलं “तुम्ही अंतराळात असलात, तरी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहात.” हा संवाद आणि शुक्ला यांचे योगदान अनेक भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी एका सराईत गुन्हेगारास दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूसासह केले जेरबंद..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहराच्या नेमणुकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम नामे सचिन शिंदे, राहणार: रोशन किराणा स्टोरच्या बाजुला बंदरपाडा, कल्याण पश्चिम याच्या ताब्यात दोन अग्नीशस्त्र व काडतुस आहेत. सदर मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने दिनांक २५/०६/२०२५ रोजी १६:४५ वा अधिकारी अंमलदार यांच्यासह रोशन किराणा स्टोअर्स च्या बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण पश्चिम याठिकाणी सापळा कारवाई करून दुखापत व अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेला रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन गोपी उर्फ गोकुळ  शिंदे, (वय: ३० वर्षे), व्यवसाय फळविक्री, राहणार: स्वतःचे घर, रोशन किराणा स्टोअर्सच्या बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण (पश्चिम) हा कोणतातरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याचे इराद्याने बेकायदेशिर रित्या विनापरवाना दोन गावठी बनावटीचे पीस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण १,००,५००/- (एक लाख पाचशे) रूपये किंमतीचे अग्नीशस्त्रासह मिळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले असुन सदर आरोपीच्या विरूद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४७/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ सह महा.पो.का.कलम ३७(१)१३५ अन्वये दिनांक २५/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपी यांची दिनांक ३०/०६/२०२५ रोजी पर्यंत  पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे हे करीत आहे.


अटक आरेापी याच्या विरूध्द यापुर्वी १) खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६/२०२३ भादंवि कलम ३२६, ५०४, ३४ प्रमाणे २) खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४४/२०२५ एनडीपीएस कायदा कलम ८(क) २०(ब) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 


सदरची कारवाई मा. आशुतोश डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, मा. डाॅ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, राठोड, कानडे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे, पाटील, शेजवळ, मपोशि. भोसले यांनी यशस्वीपणे केली आहे.