BREAKING NEWS
latest

पासपोर्टसाठी महिलांना पतीच्या सहीची गरज नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे. पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आतापर्यंत महिलांना पासपोर्टसाठी अर्ज करताना कागदपत्रांवर पतीच्या सहीची आवश्यकता असे. मात्र, आता मद्रास उच्च न्यायालयाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय देताना जाहीर केले आहे की, पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे यामुळे घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे.

रेवती नावाच्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. रेवती यांचे २०२३ मध्ये लग्न झाले होते, परंतु त्यांचा घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे. त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला, परंतु प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (आरपीओ) फॉर्म-जे मध्ये पतीच्या स्वाक्षरीची आवश्यकता असल्याचे कारण देत अर्जावर प्रक्रिया करण्यास नकार दिला. याविरोधात रेवती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी सुनावणीदरम्यान तीव्र टिप्पणी करताना म्हटले की, पती-पत्नीमधील संबंध बिघडले असताना पतीची स्वाक्षरी घेण्यास भाग पाडणे म्हणजे महिलेला अशक्य गोष्ट करण्यास सांगण्यासारखे आहे. “पासपोर्टसाठी पतीच्या परवानगीचा आग्रह धरणे हे स्त्रीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समाजाला शोभत नाही. ही प्रथा पुरुष वर्चस्ववादाशिवाय दुसरे काही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. आरपीओचा हा आग्रह विवाहित महिलांना पतीची मालमत्ता मानणाऱ्या मानसिकतेचे द्योतक आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. न्यायमूर्तींनी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला रेवती यांच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे आणि इतर अटी पूर्ण झाल्यास चार आठवड्यांत पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश दिले.

'DGCA' ने एअर इंडियाच्या ३ अधिकाऱ्यांना केले निलंबीत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या भीषण अपघातानंतर विविध स्तरांवर याबाबत चौकशी सुरु आहे. याबाबत DGCA ने आज एअर इंडियाला ३ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीजीसीएने पायलटला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिका आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यास सांगितले आहे. काढून टाकण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनाशी संबंधित पायल अरोरा यांचा समावेश आहे.

काल जारी केलेल्या आदेशात DGCA एअर इंडियाला तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ टेकऑफ नंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले, ज्यामध्ये प्रवाशांसह एकूण २७० लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी डीजीसीएचा आदेश स्वीकारला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे.

निलंबीत अधिकाऱ्यांविरुद्ध ३ आरोप

नियमांविरुद्ध क्रू पेअरिंग केल्याबद्दल ३ आरोप आहेत
अनिवार्य उड्डाण अनुभव आणि परवाना नियमांचे उल्लंघन..

वेळापत्रक प्रोटोकॉलचे पालन न करणे..

एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तात्काळ काढून टाकावे. या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ आंतर-शिस्तबद्ध कारवाई सुरू करावी. १० दिवसांच्या आत डीजीसीएला कळवावे.

दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांची नॉन-ऑपरेशनल पोस्टवर बदली करावी आणि त्यांना कोणत्याही उड्डाण सुरक्षा किंवा क्रू अनुपालनाशी संबंधित पदांवर काम करण्याची परवानगी देऊ नये. भविष्यात क्रू शेड्युलिंग, परवाना किंवा उड्डाण वेळेशी संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. ज्यामध्ये दंड, परवाना निलंबन किंवा ऑपरेटर परवानगी रद्द करणे समाविष्ट असू शकते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : संगीत आणि योग दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत. आणि योगायोग हाच की दोन्ही जागतिक दिवस हे एकाच दिवशी म्हणजेच २१ जून रोजीच साजरे केले जातात. 'जे एम एफ' शिक्षण संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय, वंदे मातरम् पदवी महाविद्यालय मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात शिशु विहार ते पदवी पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांनी जागतिक योग दिवस साजरा केला. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, इतर पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे डॉ.निखिल शासने, डॉ.दिलीप मनोत, योग संचालक श्रीपाल मेहता, रंजना निकम यांनी सरस्वती व योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग प्रदर्शनास सुरुवात केली. नियमित योग करणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आपले शरीर हे परमेश्वराने आपल्याला दिलेली संपत्ती आहे, ही संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक योगा करणे आवश्यक आहे, केवळ आजच्या एका दिवशीच योगा करून स्वास्थ टिकणार नाही तर रोजच वेळ काढून योगा करणे हे फायद्याचे आहे, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपस्थित योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्व सांगून सर्व विद्यार्थी, शिक्षकांना योगाचे धडे दिले.
जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गायन, वादन सादर केले. भावनिक, शारीरिक, आणि मानसिक आरोग्यासाठी "संगीतोपचार"  पद्धत किती महत्वपूर्ण ठरते, तर संगीतामधले सात सूर घेऊन आपले आयुष्य संगीतमय होऊन जाते आणि हाच जगण्याचा निखळ आनंद म्हणजेच सप्तसुरांची गुंफण होय, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर डॉ.निखिल शासने यांनी संगीतोपचार पद्धतीने योगा कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक  संगीताच्या तालावर  दाखवले व सर्व विद्यार्थी शिक्षकांनी देखील नृत्य करून आनंद घेतला. शारीरिक प्रशिक्षक श्री.रमेश वागे, सौ.वैशाली शिंदे यांनी देखील योगा प्रात्यक्षिके करून दाखवली. मनावरचा आणि शारीरिक ताण हलका करण्यासाठी रोज योगा करणे आणि संगीत ऐकणे, गुणगुणने या सारखे शक्तिवर्धक औषध कुठेच नाही असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उपचार पद्धतीमध्ये नमूद केले. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये उत्साहात योगा आणि संगीत दिवस पार पडला.

कल्याण-डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
कल्याण : आज २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि एसकेडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कल्याण स्थानकाजवळील कै. दिलीप कपोते वाहनतळाच्या सहाव्या मजल्यावर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "योग ही एखाद्या दिवसापुरती उत्सवाची गोष्ट नसून, ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावी. जसे गाड्यांना वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते, तसेच आपल्या मनालाही विश्रांती, एकाग्रता व सकारात्मकतेसाठी योगाची गरज असते."
या योग शिबिरात महापालिकेचे महापालिका आयुक्तांसमवेत उपायुक्त रमेश मिसाळ, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे जेष्ठ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्वसन तंत्र, आसने व मानसिक शांततेसाठी विविध आसन प्रकार शिकवण्यात आले. यावेळी उपस्थितांसाठी स्नॅक्स व जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती.
महापालिका क्षेत्रातील शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने करीत योगाभ्यासाचा लाभ घेतला.