BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'यूपीआय' च्या नवीन नियमानुसार आता प्रत्येक ₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाणार ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - युपीआय च्या नवीन नियमानुसार डिजिटल इंडियाच्या युगात यूपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चहाच्या टपऱ्यांपासून मोठ्या शोरूमपर्यंत आपण सर्वत्र स्कॅन करून पेमेंट करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ₹१,००० च्या यूपीआय ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल अशा बातम्या व्हायरल होत आहेत. तुमचा खिसा खरोखरच लुटला जाणार आहे का, की ही फक्त अफवा आहे ? चला, सत्य जाणून घेऊया.

₹१,००० च्या ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाईल का ? साधे आणि स्पष्ट उत्तर..नाही !.. सामान्य ग्राहकांसाठी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात होणारे पीटूपी (व्यक्ती ते व्यक्ती) ट्रान्सफर अजूनही पूर्णपणे मोफत आहेत. एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने स्पष्ट केले आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्यातून मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या खात्यात पैसे पाठवले, मग ती रक्कम ₹१,००० असो किंवा ₹१०,०००, तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. Google Pay, PhonePe किंवा Paytm द्वारे केलेले सामान्य यूपीआय पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. मग हे शुल्क कुठून आले ? 'एनपीसीआय' ने 'पीपीआय' (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) म्हणजेच वॉलेट व्यवहारांसाठी इंटरचेंज फी लागू केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.

सोप्या भाषेत: वॉलेट व्यवहार: जर तुम्ही Paytm Wallet, Amazon Pay Wallet किंवा PhonePe Wallet वापरून व्यापाऱ्याला ₹२,००० पेक्षा जास्त पेमेंट केले, तर व्यापाऱ्याला शुल्क लागू होऊ शकते. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत. हा शुल्क व्यापारी आणि बँकेमधील बाब आहे.

यूपीआय बद्दल माहित असाव्यात अशा ३ गोष्टी

दैनिक मर्यादा : बहुतेक बँका दररोज ₹१ लाखपर्यंत यूपीआय व्यवहारांना परवानगी देतात. काही बँका फसवणूक टाळण्यासाठी लहान व्यवहारांसाठी ₹२,००० ची मर्यादा ठेवतात.

यूपीआय लाईट : जर तुम्ही वारंवार ₹५०० पेक्षा कमी रकमेची छोटी पेमेंट करत असाल, तर यूपीआय लाईट वापरा. पेमेंट पिन न टाकता व्यवहार होतो आणि बँक स्टेटमेंटमध्ये गर्दी होत नाही.

घोटाळे टाळा : पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते. कोणी पैसे पाठवण्याच्या नावाखाली पिन मागत असेल, तर ती फसवणूक आहे.

प्रत्येक ₹१,००० वर शुल्क आकारल्याबद्दल सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या फक्त क्लिकबेट किंवा अफवा आहेत. 'भारत सरकार' आणि एनपीसीआय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सध्या सामान्य वापरकर्त्यांसाठी यूपीआय शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही. निर्धास्तपणे यूपीआय वापरत रहा.

नायजेरियन नागरिकासह दोन तस्करांकडून एमडी-कोकेनसह एकूण २ कोटी १५ लाख ८० हजारांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करत ड्रग्ज रॅकेटचा केला भांडाफोड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात नायजेरियन तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं पोलीसांच्या कारवाईत उघड झालं आहे. डोंबिवली जवळील उंबार्ली गणेशनगर परिसरात पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एक नायजेरियन नागरिकासह अंबरनाथमधील दोन तस्करांना रंगेहाथ पकडलं. या तिघांकडून मेफोड्रोन आणि कोकेन या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी १५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती कल्याण विभाग परिमंडल-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

मागील वर्षभरात १४६ तस्करांना अटक

मागील वर्षभरात कल्याण-डोंबिवली शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करांकडून ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १११ ग्रॅम चरस, १८०० कोडीनयुक्त बाटल्या, निंदिया गोळ्या, निट्राझेपम गोळ्या तसेच ४ किलो १४७ ग्रॅम एमडी पावडरचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, देवरे आणि खरसाण यांचे पथक शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) डोंबिवली-शिळफाटा रस्त्यालगत उंबार्ली गाव हद्दीतील गणेशनगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी तीन इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यापैकी एक जण नायजेरियन नागरिक असल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला.
१७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अविनाश व्यंकटेशन सदरला (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथ पश्चिम येथील पनवेलकर आयकॉन सोसायटीत राहतो. गजेंद्रन संजीव नायडू (वय: ३४ वर्षे) हा अंबरनाथमधील नवरे पार्क, चिंचपाडा येथील दोस्ती कॉलनीमध्ये राहतो. त्यांच्यासोबत एक नायजेरियन नागरिक असून तो पलावा सिटी या हायप्रोफाईल सोसायटीत मागील २ ते ३ वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या तिघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन (एम.डी.) साठा, १५ लाख रुपये किमतीचे कोकेन, २१ हजार रुपये रोख रक्कम तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली.

दरम्यान, पोलीस त्यांच्या दिशेनं येत असल्याचं पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी तत्काळ झडप घालून त्यांना पकडले. अंगझडती आणि दुचाकीच्या डिकीची तपासणी केली असता एम.डी. पावडर व कोकेनचा साठा आढळून आला. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढे त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कारवाईमुळे तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

दरम्यान, मागील वर्षभरात कल्याण पोलीस परिमंडल-३ अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १४६ तस्करांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोन प्रकरणांमध्ये तस्करांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षात कल्याण पोलीस परिमंडळानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन आंतरराज्य टोळ्यांना अटक केली होती. या कारवाईदरम्यान गांजा, चरस, कोडीनयुक्त सिरपच्या बाटल्या, निंदिया गोळ्या तसेच निट्राझेपम गोळ्या असा साठा जप्त करण्यात आला. या कठोर कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सेंटर ऑफ 'एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग' साठी कोलंबिया विद्यापीठ - आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 
   
नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यात आयआयटी मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया-आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आला.

हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) हब म्हणून कार्य करेल. वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली विकसित करण्यावर त्याचा भर असेल, ज्यामुळे भारतातील नवोन्मेष परिसंस्था आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदारही प्रक्रियेत आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आतापर्यंत चार वेगवेगळी एआय केंद्रे सुरू केली आहेत. ‘कोलंबिया-आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ हे संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) केंद्र असून, वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित 'एआय' प्रणाली विकसित करण्याचा त्याचा उद्देश आहे. या केंद्रात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदार सध्या प्रक्रियेत आहेत.

पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी आज नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये होते. सुमारे २.२६  लाख चौरस फूट (सुमारे ५ एकर) क्षेत्रात बांधले आहे. हे 'एल अँड टी कंपनी'ने ₹११८९ कोटी रुपयांमध्ये बांधले आहे. सेवा तीर्थ कॉम्प्लेक्समध्ये तीन इमारती आहेत: सेवा तीर्थ-१, सेवा तीर्थ-२ आणि सेवा तीर्थ-३. सेवा तीर्थ-१ मध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. गुलामगिरीच्या भारताच्या भूमीवर ब्रिटिश महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी या इमारती एक माध्यम म्हणून काम करत होत्या. आपल्याला गुलामगिरीच्या या मानसिकतेतून मुक्त होणे आवश्यक आहे.

पंतप्रधान म्हणाले, “दिल्लीच्या इमारती आणि ऐतिहासिक स्थळे गुलामगिरीच्या खुणांनी भरलेली आहेत. स्वतंत्र भारतात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक नव्हते. २०१४ मध्ये, देशाने निर्णय घेतला की गुलामगिरीची मानसिकता आता सहन केली जाणार नाही. या निर्णयांमागे आमची सेवाभावी भावना आहे.”

सेवा तीर्थ संकुलात तीन इमारती आहेत: सेवा तीर्थ-१, सेवा तीर्थ-२ आणि सेवा तीर्थ-३. सेवा तीर्थ-१ मध्ये पंतप्रधान कार्यालय, सेवा तीर्थ-२ मध्ये कॅबिनेट सचिवालय आणि सेवा तीर्थ-३ मध्ये एनएससीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कार्यालय आहे. ही कार्यालये पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती.

सप्टेंबर २०२५ मध्ये कॅबिनेट सचिवालय सेवा तीर्थ-२ मध्ये हलविण्यात आले. आज, पीएमओ सह, एनएससीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय देखील तेथे हलविण्यात आले.

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा तडकाफडकी बंद, पालक चिंतेत.

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : जोगेश्वरी पश्चिम परिसरात 'सिटी इंटरनॅशनल स्कूल' अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मनसे पक्षाने याची दखल घेत शाळेत धाव घेतली आहे.

मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा म्हणत शाळा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, 'सिटी इंटरनॅशनल स्कूल' नावाने मागील २५ वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे ३५ लाख रुपयांच्या जागेवर आता ५० लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हा ३७ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आणि जागतिक उलथापालथीचे संकेत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (सोलर एक्लिप्स) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल. ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे.

या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी कुंभ राशीत राहु, बुध, शुक्र आणि चंद्रही राहतील. असा योग यापूर्वी ७ मार्च १९८९ रोजी झाला होता. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे जिथे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, त्यामुळे सूर्याच्या सभोवताल एक “रिंग ऑफ फायर” किंवा तेजस्वी वलय दिसते. ग्रहण दक्षिणी आफ्रिका, अंटार्कटिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात जिम्बाब्वे, जाम्बिया, तंजानिया, नामीबिया, मॉरिशस, बोत्सवाना, मोजाम्बिक, अर्जेंटिना आणि चिली या भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. सहसा ह्या ग्रहणानंतरचा प्रभाव हा जादा कालावधी करीता राहतो. ह्या ग्रहणाच्या पत्रिकेचा विचार केला असता संपूर्ण जगात/देशात मोठी अस्वस्थता पसरेल. संपूर्ण जगात मोठे बदल घडतील. नैसर्गिक आप्पतीत वाढ. मोठे भूकंप, वादळे, तुफान, वायू प्रदूषण, युद्धयजन्य परिस्थिती निर्माण होईल, किंवा युद्ध सुरू होईल. बॉर्डरवर कुरापती वाढतील. भयंकर घटना तसेच अत्याचार घडतील. दरड कोसळतील. उंचावरून पडण्याच्या घटना. शेजारील राष्ट्रे तसेच मित्र राष्ट्रे यांच्यासोबत संबंध बिघडतील.

हवाई अपघात, शांततेचा पुरस्कार करणाऱ्या देशावर संकटे, संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर ताण, उत्पन्नात घट. सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल, वृद्ध राजकीय नेत्यांना प्रतिकूल. राजकीय लोकांवर कारवाया, राजघराण्यातील तसेच मोठ्या पदावरील, अधिकारपदावर बसलेल्याना लोकांना प्रतिकूल, मंत्र्यांना प्रतिकूल. राजीनामे, पदावरून पायउतार व्हावे लागेल. मोठ्या लोकांवर तसेच काही धर्माशी संबंधित लोकांवर मोठे आरोप होतील. मोठी बंड, चकमकी, काही ठिकाणी सत्ता परिवर्तन. महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी घडतील. प्रजा व प्रशासनाचे मतभेद हिंसक विरोधात बदलणार.

संपाचे प्रमाण वाढेल, शिक्षकांचे संप होण्याची शक्यता अधिक, सरकार, विरोधी पक्ष यांच्यातील मतभेद-विरोध वाढतच जाणार. बेकारीचे प्रमाण वाढणार. खून, दरोडे, माऱ्यामाऱ्या, मोठे हिंसाचार यात वाढ. मृत्युसंख्येत वाढ, म्युनिसिपालीटी प्रतिकूल, अग्निकांडाच्या घटनांमध्ये वाढ. रोग्याच्या साथी पसरतील, तापाची साथ पसरेल. सरकारचे दुर्लक्ष आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन भयंकर आपत्ती बनून लोकसंपत्तीला हानी पोहोचणार.

संसदेत अनपेक्षित परिस्थितीमुळे कामकाज अडचणीत येणार, अनुशासनहीनता किंवा अप्रिय वर्तनामुळे सदस्यांना राग येणार, ज्यामुळे सामान्य काम करणेही कठीण होणार. मंत्र्यांच्या बेसावधपणे केलेल्या किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे संसदेत तणाव आणि विरोध वाढणार. संसद सदस्यांच्या अपघाताची शक्यता.

लेखक, साहित्यिक, पत्रकार, लहान मुले, सुप्रीम कोर्टातील वकील, न्यायाधीशांना प्रतिकूल, मृत्यूची शक्यता, बुद्धिवादी लोक, स्त्रिया, ग्रंथकार,  ग्रंथप्रकाशक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक, बँकर यांना प्रतिकूल. स्पर्धा, संमेलने, कार्यक्रम यात खंड. सभा, संमेलने यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील.

पायांची दुखणी बळावतील, वाढतील, या संबंधी त्रास वाढेल. हवामान बिघडेल, प्रदूषणात वाढ. नट, कलाकार, गायक, चित्रकार स्त्रिया, खास करून स्त्री कलाकारांना प्रतिकूल अपघात होण्याची शक्यता. श्रीमंत लोक मृत्यू पावतील. नर्तिका, गायिका, प्रसिद्ध महिला, फॅशन डिझायनर, रेडिओ, दूरदर्शन कलाकार यांना प्रतिकूल. हा काळ सामाजिक दृष्टिने पण चांगला नाही. देशामध्ये घटस्फोटांची संख्या वाढते. स्त्रियांवर अत्याचार झाल्यामुळे खळबळ उत्पन्न होणार. भगदड माजून मृत्यू, समुद्रात मोठी वादळे, समुद्रातील अपघातात वाढ, जहाज, बोटी बुडतील, जलसमाधी, जलमृत्यू तसेच धार्मिक चळवळीत वाढ. धार्मिक संस्था, ट्रस्ट किंवा यासंबंधी अनैतिक वर्तन, चुकीचे किंवा बेकायदेशीर कृत्य (भ्रष्टाचार, फसवणूक, अन्याय करणे, नियमांचे उल्लंघन) अश्या प्रकारची प्रकरणे समोर येतील
परदेशातील व्यापारात अडचणी, काही गूढ मृत्यू होतील.

उद्योगधंदे, रोजगार यांना प्रतिकूल, एखादा न आवडणारा कर वाढण्याची शक्यता. काही आंतरराष्ट्रीय करार बंद होतील, संकटात येतील. बँक आणि शेअर बाजाराला प्रतिकूल. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार. बाजरात मोठी अस्थिरता दिसेल, गुंतवणूकदारांचे अंदाज चुकतील चलनाचे अवमूल्यन, रुपयाची घसरण वाढणार. या ग्रहणामुळे तेलाचे भाव वाढतील. मूग, मसूर, कापूस, गूळ, गहू, साखर, सुती वस्त्रे, तूप यांच्यात ३-४ महिने तेजी.

लेखक
जितेश सावंत 
के. पी. विशारद, नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ, शेअरबाजार, सायबरकायदा, तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदातज्ज्ञ आहेत.
ईमेल: <jiteshsawant33@gmail.com>

बँकांच्या वसुली एजंट्सना आर बी आय चा लगाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : आरबीआय ने कर्जवसुली प्रक्रियेत होणाऱ्या दादागिरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीबाबत नियमांचा मसुदा काल जाहीर करण्यात आला असून, हे नवे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. यानुसार कर्जदारांना बँकेचे कर्ज थकल्यानंतर येणारे धमकीचे फोन आणि वसुली  एजंट्सचा त्रास कमी होणार आहे.

आरबीआय ने बँक आणि रिकव्हरी एजंट्सना वसुलीसाठी कोणत्याही प्रकारच्या कठोर किंवा अपमानास्पद पद्धत वापरण्याला मनाई केली आहे. यामध्ये, धमकीची किंवा अपमानास्पद भाषा वापरणे, मोबाईल किंवा सोशल मीडियावर अयोग्य संदेश पाठवणे, कर्जदाराच्या नातेवाईक, मित्र, सहकारी यांना त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान किंवा गोपनीयतेचा भंग करणे, थकबाकी किंवा कायदेशीर कारवाईबाबत दिशाभूल करणारी माहिती देणे अशा प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

नियमांनुसार, रिकव्हरी एजंटने ग्राहकांशी सभ्य आणि सन्मानपूर्वक संवाद साधणे बंधनकारक असेल. ग्राहकांसोबत झालेल्या सर्व दूरध्वनी संभाषणांचे रेकॉर्डिंग ठेवणे आवश्यक राहील. तसेच, सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेतच कर्जदाराशी संपर्क साधता येईल. वसुली एजंट फक्त कर्जदार किंवा हमीदाराशीच संवाद साधू शकतील. शोककाळ, लग्नसमारंभ किंवा सण-उत्सव अशा प्रसंगी संपर्क टाळणे बंधनकारक असेल. कर्जदाराने विशिष्ट वेळेत संपर्क न करण्याची विनंती केल्यास ती मान्य करावी लागेल.

नव्या मसुद्यानुसार, कर्जदाराची तक्रार प्रलंबित असताना बँकांना वसुलीची कारवाई करता येणार नाही. प्रथम तक्रार निकाली काढणे बंधनकारक असेल. तसेच, रिकव्हरी एजंटने कर्जदाराशी संपर्क साधण्यापूर्वी स्वतःचे नाव, संपर्क तपशील आणि तो कोणत्या बँकेच्या वतीने काम करत आहे, याची माहिती द्यावी लागेल.

केळी पीक विम्याचा २१७ कोटींचा घोटाळा उपग्रहाद्वारे आला समोर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
जळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता येते हे बाब जळगाव येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत पुन्हा सिद्ध झाली आहे. केळी पिकाच्या नावाखाली तब्बल २१७ कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा कट जळगावमध्ये उपग्रहाद्वारे केलेल्या सर्व्हे  तपासणीत उघड झाला आहे. लागवड नसतानाही कागदोपत्री केळीची बाग दाखवून पीक विम्याचे संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो बनावट अर्जांचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे.

पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या ‘आंबिया बहर’ हंगामात यंदा जळगाव जिल्ह्यातून अर्जांची संख्या अनपेक्षितपणे वाढल्याचे दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार २५९ अतिरिक्त अर्ज दाखल झाले होते, तर विमा संरक्षित क्षेत्रात २८ हजार १९६ हेक्टरची मोठी वाढ झाली होती. केळी लागवडीखालील क्षेत्रात झालेली ही वाढ संशयास्पद वाटल्याने कृषी आयुक्तालयाने उपग्रहाच्या साहाय्याने जमिनीची प्रत्यक्ष सर्व्हे पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.

या अत्याधुनिक तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले. जिल्ह्यातील एकूण ९६ हजार १५२ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी प्रत्यक्षात केवळ ५२ हजार ११० हेक्टरवरच केळीची लागवड आढळली. उर्वरित ४४ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर केळीचे पीकच अस्तित्वात नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा झालेले सुमारे ३७ कोटी ४३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. वेळेत पडताळणी झाल्यामुळे राज्य सरकारचे १२३ कोटी ५३ लाख आणि केंद्र सरकारचे ९३ कोटी ५८ लाख, असे एकूण सुमारे २१७ कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. संबंधित बोगस अर्जदारांवर कठोर कारवाईचे संकेत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास रस्तोगी यांनी दिले आहेत.

केडीएमसीत ५१ वारसांना नोकरीची संधी देत महापौरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या ५१ वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती आदेशांचे वितरण आज महापौर दालनात करण्यात आले. महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सहा. आयुक्त सुषमा मांडगे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे तसेच पालिका सदस्य वरुण पाटील, गणेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

नियुक्ती पत्र देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या स्वच्छता व विकासासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा द्यावी, असे मार्गदर्शन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.

महापालिकेकडून गेल्या वर्षभरात एकूण २३२ वारसांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून, वारसा हक्कासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन वेळा मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

ज्युपिटर हॉस्पिटल कडून डोंबिवलीत ५०० बेड्सचे बहुविशेषज्ञ रुग्णालय सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी : ज्युपिटर हॉस्पिटल तर्फे डोंबिवली येथे ५०० बेड्सचे अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालय रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज झाले असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील प्रगत आरोग्यसेवा सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (केडीएमसी), उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवेची दीर्घकाळापासून गरज भासू लागली होती. या भागातील रुग्णांना गंभीर उपचारांसाठी ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागत असल्याची अडचण लक्षात घेऊन 'ज्युपिटर हॉस्पिटल'ने डोंबिवली येथे ५०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे रुग्णालय सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे पूर्ण-सुविधायुक्त केंद्र असेल. नवजात शिशूंच्या जन्मापासून ते अवयव प्रत्यारोपण आणि कर्करोग उपचारांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध असतील. समाजातील सर्व घटकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याचा यामागील उद्देश आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या रुग्णालयात आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग (क्रिटिकल केअर) आणि प्रगत डायग्नॉस्टिक सुविधा उपलब्ध असतील. तसेच हे रुग्णालय  (आय जी बी सी) च्या सर्वोच्च पर्यावरणीय मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे.

डॉ. अजय ठक्कर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ज्युपिटर हॉस्पिटल, म्हणाले, “मोठ्या भारतीय शहरांमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी कोणालाही ४५ मिनिटांपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये. आमची दृष्टी नेहमीच सर्वसमावेशक आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा रुग्णांच्या जवळ उपलब्ध करून देण्याची राहिली आहे. डोंबिवलीतील ५०० बेड्सच्या रुग्णालयाचे उद्घाटन हे वाढत्या समुदायांसाठी प्रगत आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा विस्तारण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.”

डॉ. अंकित ठक्कर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटल, यांनी सांगितले,“भारतीय संस्कृतीत रुग्णाच्या कुटुंबाची भूमिका त्याच्या उपचार प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असते, याची आम्हाला जाणीव आहे. आमची रुग्णालये केवळ रुग्णांच्या नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीय आणि काळजीवाहूंच्याही गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच उत्तम आरोग्यसेवेचा अनुभव मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

गुन्हे प्रकाटीकरण तसेच गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण पोलीस प्रथम क्रमांकावर..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - आयुक्त आशुतोष डुंबेरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्ह्यांचा तपास आणि शोध घेत गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण पोलीस परिमंडल-३ ने नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाच्या संख्येत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी केवळ अभिमानाची नाही तर पोलीस विभागाच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या वर्षात ३,००० हून अधिक गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करण्यात आली आहे.

कल्याण विभाग परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या ही केवळ आकडेवारी नाही तर जनतेचे रक्षण करण्याच्या पोलीसांच्या दृढनिश्चयाचा आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा पुरावा आहे.
सार्वजनिक सुरक्षिततेचा निर्धार

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम, धाडसी कारवाई आणि दिवसरात्र शिस्तबद्ध तपासातून हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले की, पोलीसांची तत्परता, समर्पण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे आणि नागरिकांचा सुरक्षेवरील विश्वास आणखी दृढ करते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपच्या रितू तावडे तर उप महापौर पदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा बिनविरोध शिक्कामोर्तब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून, अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम ३७ (१) अन्वये महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत म्हणजे शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षांकडून रितू राजेश तावडे आणि संजय शंकर घाडी यांचे क्रमशः महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची तर उप महापौर पदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामकाज सांभाळले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोन्हे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे व उप महापौर संजय घाडी यांचे पुष्पगुच्छ प्रदान करुन अभिनंदन केले.

पॅनल क्र. २१ मधून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना म्हात्रे यांनी केला विकास कामांचा शुभारंभ..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली, दि.१० फेब्रुवारी –  भारतीय जनता पार्टीची पॅनल क्र. २१ मधून उमेदवारी मिळवत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांनी विकास कामांना जोरदार सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २१ मधून त्या विजय मिळवत निवडून आलेल्या आहेत. १५ जानेवारी ला मतदान १६ जानेवारी निकाल लागला आणि लगेच कामाला सुरुवात करत, जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी खरी उतरेन, असे म्हणत त्यांनी निवडणुकीनंतर कोणत्याही पर्यटन स्थळी फिरायला जाण्याऐवजी जनतेची काम करण्यास पसंती देत कामाला सुरुवात केली.

पहिलं काम त्यांनी जनतेच्या सुविधेसाठी एक ऍम्बुलन्स स्वखर्चातून चालू केली आहे. शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयामध्ये हृदयविकारावर कोणताही उपचार नसल्यामुळे अशा रुग्णांना शिवाजी हॉस्पिटल कळवा किंवा परळ ला केईएम सारख्या ठिकाणी उपचारासाठी न्यावं लागतं. इतका लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्या पेशंटच्या जीवाला दगा फटका न होता तो सुरक्षित रुग्णालयापर्यंत पोहोचावा यासाठी, कार्डियाक ॲम्बुलन्स ही खूप गरजेची असते म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रभागासाठी सुरू केली आहे. 

रुग्णांना उपचार हे आपल्या इथे डोंबिवली मधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्व नगरसेवकांच्या मदतीने सर्वच सर्जरी केल्या जातील याचा प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच "सुभाष रोड" चे डोंबिवली स्टेशन पासून नवापाडा चौक पर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. गटार असेल त्यावरील चेंबर, रोडच्या बाजूला असलेले पादचारी रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू केले आहेत. 

पाण्याच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून गणेश घाट येथील, २.५० लक्ष मिली लिटर जलकुंभाचे काम ८०% पूर्ण झाले, पुढील चार ते पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन लवकरच या जलकुंभामुळे डोंबिवली पश्चिमेतील जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र तोपर्यंत डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांच्या स्वखर्चातून ज्या ठिकाणी जुन्या विहिरी आहेत त्या विहिरी स्वच्छ करून त्या विहिरीतील पाणी नागरिकांना वापरासाठी पुरवण्यात येत आहे.

कसारा जलद लोकलचा दिवा थांबा रद्द करण्याची प्रवासी संघटनेची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कसारा जलद लोकलचा दिवा स्थानकातील थांबा रद्द करावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या सर्व लोकलला दिवा स्थानकात थांबा दिल्याने अधिक प्रमाणात गर्दी होत आहे. दिवा, ठाणे स्थानकात उतरण्याचा दरवाजा एकाच दिशेला येत असल्याने प्रवाशात भांडणे होत आहेत.

संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी ही मागणी करत सांगितले की, प्रवाशांमध्ये अशा घटना वाढत असून, आता त्या शाब्दिक बाचाबाची, हाणामारीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. नव्याने येणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, दिव्यांग, महिलांना ठाणे स्थानकात उतरणे आणि चढणे अत्यंत कठीण आणि जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. भविष्यात ही स्थिती अशीच राहिली तर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होऊन उद्रेक होईल.
कळवा-मुंब्रा मार्गावर गेले सर्वाधिक बळी

डोंबिवली-कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सर्वाधिक लोकलमधील प्रवासात बळी गेले आहे. दोन्ही स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी पारसिक स्थानक पुन्हा सुरू करा, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सिद्धेश देसाई यांनी केली आहे. त्यांनी नव्या ठाणे स्थानकापेक्षा पारसिक स्थानक व्हावे असे म्हटले आहे.

माणकोली उड्डाण पुलावर 'रेस' लावणाऱ्यांना विष्णूनगर पोलीसांचा मोठा दणका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील माणकोली-मोठागाव ठाकुर्ली उड्डाणपुलावर रेस लावून स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना विष्णूनगर पोलीसांनी मंगळवारी चांगलाच दणका दिला. मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितांकडून दंड वसूल करून पुन्हा असे प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पीयूष म्हात्रे (२१), वेदांत सावंत (१८), प्रदीप ढाकणे (२१) या वाहनचालकांसह रेसिंगचा व्हिडिओ तयार करणारे विशाल विश्वकर्मा (२१), कृष्णा विश्वकर्मा (१९) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्रामवर मैत्री करून संबंधितांनी कार, जीप रेसिंसाठी व्हॉट्सऍपवर एक ग्रुप तयार केला होता. त्या सर्वांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

भाजप नगरसेवकाची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

माणकोली उड्डाणपुलावर सुरू असलेल्या जीवघेण्या रेसिंग स्टंटबाजी प्रकरणी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने थेट ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे तक्रार केली होती.

विष्णूनगर पोलीसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना दंड ठोठावत तंबी दिली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे यांचे पथक आणि डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे पथक यांनी ही कारवाई केली.

कोपरमधील विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून अपघाती मृत्यू..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.१० फेब्रुवारी - बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीतील कोपर येथे राहणारा सोहम सचिन कठरे हा विद्यार्थी बारावीची परीक्षा देण्यासाठी कळवा येथील मनिषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जाणार होता. यासाठी तो कोपरहून कळव्याला जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होता.

दरम्यान, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमधून पडून सोहमचा अपघाती मृत्यू झाला. लोकलमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विकास कामे मिळविण्यासाठी केडीएमसीच्या नव्या महापौरांना ठेकादारांचा गराडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारी पार पडली. नव्या महापौर पदी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल चौधरी या विराजमान झाल्या. महापौर झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच कामकाज सुरु केले. त्यांनी कामकाज सुरु केल्यापासून त्यांना ठेकेदारांनी गराडा घातला आहे. विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग सुरु झाली आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहेत, अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येते. 

महापालिकेच्या निवडणूक २०१५ साली झाली होती. त्या वेळच्या सदस्यांची मुदत २०२० साली संपुष्टात आली. निवडणुकीची मुदत संपली तेव्हा कोरोना महामारी सुरु होती. त्यामुळे राज्यात कोणत्याही महापालिकेत निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूकही झाली नाही. गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीत आयुक्तांच्या अधिकारात विकास कामांना मंजूरी दिली गेली. आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन कोरोना काळात आरोग्य सोयी सुविधांकरीता लागणारी खरेदी असो किंवा अन्य विकास कामे यांना मंजूरी दिली गेली.

त्यामुळे त्यावर राजकीय पदाधिकारी यांचा वचक नव्हता. गेल्या पाच वर्षात ठेकेदारांना कामे मिळाली. मात्र त्यांना कामे देण्याचा अथवा नाकारण्याचा सर्वस्वी अधिकार हा आयुक्तांचा होता. गेली पाच वर्षे ठेकेदारांवर प्रशासनाचे नियंत्रण कामे वाटपाच्या बाबतीत होते. आत्ता निवडणूक होताच कामे होतील अशा ठेकेदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे कामे मिळविण्याकरीता ठेकेदारांनी नवनिर्वाचित महापौराना गराडा घातला आहे. ठेकेदारांचा राबता महापौरांच्या केबीनमध्ये वाढला आहे. विकास कामे पदरात पाडून घेण्यासाठी महापाैरांच्या दालनात काही मंडळी जास्त प्रमाणात ये-जा करीत आहेत. महापालिकेती ठेकेदारी ही काही विशिष्ट ठेकेदारांच्या हाती आहे. त्यांच्याशिवाय अन्य ठेकेदारांचा पत्ता हालत नाही. त्यांना कामेही मिळत नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊनच महापौरांनी या संदर्भातील निर्णय घेणे अपेक्षित आहेत. त्यातही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे विकास कामांची कंत्राटं घेण्यासाठी आघाडीवर असतील हे विरोधकांनाही चांगलेच ठाऊक आहे.

एसटीच्या ताफ्यात लवकरच राजमाता जिजाऊ बस..

प्रतिनिधी:अवधुत सावंत

मुंबई - शिवशाही, शिवनेरीनंतर आता एसटीची 'राजमाता जिजाऊ' बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ही नवीन बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागू नये यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी नव्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभ्या राहिलेल्या राजमाता जिजाऊ या प्रेरणास्थान आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या या नव्या बसेसना 'राजमाता जिजाऊ' असे नामकरण करण्यात आले आहे.

सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसची आसन क्षमता ४० इतकी आहे. मात्र, नवीन 'राजमाता जिजाऊ' बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसून प्रवास करू शकतील. यामुळे अतिगर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करणाऱ्या अतिरिक्त १५ प्रवाशांना आता बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. दोन शहरांमधील मुख्य मार्गांवर ही सेवा प्राधान्याने सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे.

या नवीन बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतील. या बस भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत तयार करण्यात आल्या असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. केवळ नावच नाही, तर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बस प्रवाशांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यापासून प्रवाशांना या नवीन आणि आरामदायी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतही पुन्हा देवेंद्र - रविंद्र यांचं वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.०९ : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा पटकाविण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि महाराष्ट्र विकस आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हीच राजकारणातील आजची जोडी नं. १ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाच्या बळावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा मिळविण्याची अनोखी हॅटट्रिक प्राप्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणूका, त्यानंतर जानेवारीत झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि या फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत देवेंद्र आणि रविंद्र या राजकीय पॉवरफुल जोडीने अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती, स्थानिक पातळीवरील पक्षासोबत राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वय अशा विविध माध्यमातून भाजपाला उच्च दर्जाची सक्षम पक्ष यंत्रणा उभारली. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला शीर्षस्थ नेतृत्वाचा वरदहस्त लाभला आणि धाकही जाणवला. याचा सकारात्मक परिणाम होऊन पक्षाने अनेक ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक विजय नोंदवले. या यशाचे मुख्य शिल्पकार देवेंद्र फडणवीस तर सूत्रधार रविंद्र चव्हाण हे आहेत हे निर्विवादपणे म्हणावे लागेल.

रविंद्र चव्हाण यांना निवडणूक सिद्ध नेता म्हणून ओळखले जाते. ते जमिनीवर वावरणारे आणि कार्यकर्त्यात रमणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत अत्यावश्यक असणारे साम, दाम, दंड, भेद वापरताना विचारधारेच्या धाग्याने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडणारे असे त्यांचे नेतृत्त्व आहे म्हणूनच दिल्ली आणि नागपूर दोन्ही सत्ताकेंद्रांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्याच बरोबर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आणि सहकार्य कायम मिळतच असते.

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.०९ - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी "पत्रकार विकास योजना" राबवण्या बाबत "क्रांतिकारी पत्रकार संघाच्या" वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.

तसेच पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक 'पत्रकार विकास योजना' राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःचं घर आहे त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या. 
शासनाने पत्रकारांसाठी राबविलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबुत राहण्यासाठी ही वस्तुथिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले. 

यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष - गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव - प्रमोद तांबे, पत्रकार - राजू काऊटकर, दीपक इंगळे यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण उपमहापौर राहुल दामले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.