BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'सार्वत्रिक निवडणूक सन २०२५' मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगर रचना, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२ इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या ३१ असून तीन जागांचे ०२ प्रभाग व चार जागांचे २९ प्रभाग आहेत.
१२२ जागापैकी १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी ०६ जागा अनुसूचित जाती (महिला), ०२ जागा अनुसूचित जमाती (महिला), १६ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि ३७ सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
"आरक्षण सोडत बाबत १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार नागरिकांच्या हरकती.."

सदर आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप (ड्राफ्ट) प्रसिद्ध केले जाणार आहे.
नागरिकांना १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात ८ ठार अनेक जखमी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : देशात निवडणूक वातावरण चांगलेच तापले असताना राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाने हादरली. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्ब स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना तातडीने एल.एन.जेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोट स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता झाला. स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली, आसपास उभ्या असलेल्या काही वाहनांना देखील आग लागल्याने काही क्षणांतच भगदड माजली. परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

*राजधानी दिल्लीत "हाय अलर्ट.."*

घटनास्थळी तातडीने दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तसेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एन एस जी) यांचे पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे. परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. घटनास्थळावरून काही संशयास्पद अवशेष आणि सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “स्फोट अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. दोषींना वाचू दिले जाणार नाही,” असे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे दिल्ली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.

डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे १६ नोव्हेंबर रोजी सर्वात मोठ्या 'व्हिजन वॉक' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS), 'डोंबिवलीकर ग्रुप', आणि 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA)  डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेत्ररक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक” ही भव्य जनजागृती मोहीम रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या नेत्र जनजागृती मोहिमेत डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृतीसाठी एक मोठी मोहीम राबवली जात असून, या माध्यमातून नागरिकांना मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांबद्दल आणि अंधत्व टाळण्यासाठी वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार श्री. रवींद्र चव्हाण, (अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) असतील. सुमारे २,००० पेक्षा अधिक नागरिक या जनजागृती वॉकमध्ये सहभागी होणार असून. यात कॉलेज विद्यार्थी, रोटरी व रोटरॅक्ट क्लबस्, विविध सामाजिक व धार्मिक संस्था, डायबेटॉलॉजिस्ट, डॉक्टर तसेच डोंबिवलीतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. 
रॅलीची सुरुवात सकाळी ७.०० वाजता गणेश मंदिर रोड येथून होणार असून, सकाळी ९.०० वाजता त्याच ठिकाणी समारोप करण्यात येईल. समारोपानंतर माननीय श्री. रवींद्र चव्हाण आणि डॉ. अनघा हेरूर संचालक 'अनिल आय हॉस्पिटल' तसेच अध्यक्षा (MOS) यांचे विशेष मार्गदर्शन होईल.

या निमित्ताने डॉ. अनघा हेरूर यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार वेळेवर तपासणी केल्यास टाळता येऊ शकतात. चला, आपण सगळे मिळून डोंबिवलीला डायबेटीसजन्य अंधत्वमुक्त बनवूया.”

'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे सर्व नागरिक, सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरिक, कॉर्पोरेट्स आणि युवकांना या मोहिमेत सहभागी होऊन “वेळीच नेत्रतपासणी करा आणि दृष्टी सुरक्षित ठेवा” हा संदेश समाजात पोहोचवण्याचे आवाहन डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

* श्री. भूषण फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ९८२१८८७७१६

* श्री. जय चौधरी, मार्केटिंग मॅनेजर  'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ८१०८८८१५५५

भाजप चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे शिंदे सेनेत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षदा भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे कट्टर शिंदे गटाचे समर्थक दीपेश म्हात्रे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) सचिव संतोष केणे यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : एकेकाळचे कट्टर शिंदे समर्थक आणि आताचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, तसेच काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत डोंबिवली जिमखाना येथे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. हे पक्ष प्रवेश उद्धवसेना आणि काँग्रेसला धक्का देणारे असले, तरी उद्धवसेनेत येण्यापूर्वी शिंदेसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दीपेश म्हात्रेना आपल्या गळाला लावून एकप्रकारे भाजपने केडीएमसी निवडणुकीआधी शिंदेसेनेलाही शह दिल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
डोंबिवलीतील जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. सुलभा गायकवाड, आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे, शशिकांत कांबळे, पूर्वमंडल अध्यक्ष मितेश पेणकर, पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस यांसह भाजपमधील अन्य मान्यवर तसेच महिला कार्यकर्त्या मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
             
भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू जयेश म्हात्रे, मातोश्री रत्नप्रभा म्हात्रे, काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे, संतोष तरे, अनंता गायकवाड, रामभाऊ ओव्हळ, देवानंद गायकवाड, प्रधान पाटील, माजी नगरसेविका वैशाली केणे, अनिता कर्पे, पूजा म्हात्रे, उद्योगपती संजय गायकवाड यांनी प्रवेश केला.


केडीएमसी पालिकेला भाजपच महापौर देणार : रवींद्र चव्हाण

भाजपावर विश्वास दाखवून ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपच महापौर देईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या दिशेने नेणारे पारदर्शक सरकार कोणी देऊ शकत असेल तर ते भाजप आहे. केडीएमसीतील आणखी काही नगरसेवक येत्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहितीदेखील चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

'जे एम एफ' चा नागपूर ग्रामीण भागात लेकीच्या विवाह मंडपात सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि कौतुकास्पद विवाह सोहळा धूमधडाक्यात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दावसा गावातील 'जन गण मन' कॉन्व्हेंट शाळेच्या प्रांगणात, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे यांची सुपुत्री जाह्नवी हिच्या विवाहानिमित्त, दिनांक ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचा उत्सवमय सोहळा पार पडला. या दरम्यान शाळेचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा, 'जे. एम. एफ. ग्रामज्योत पुरस्कार' वितरण, आरोग्य शिबिर, आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.

पहिल्या दिवशी, ढोल–ताशांच्या गजरात, ग्रामीण भागातील सर्वांना लग्नासाठी मानाच्या अक्षता व भेटवस्तू देऊन आमंत्रित करण्यात आले. स्वतः डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सहकाऱ्यांसह घरोघरी जाऊन सर्वांना विवाह आणि आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त, पाहुण्यांचा रजत स्मरणिका आणि लक्ष्मी-गणपती मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण जनतेसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा ठरला.

१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक श्री. भूपेंद्र भजन, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, श्री. युवराज कोल्हे, श्री. विजय भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य आणि अभिनयातून अप्रतिम सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी डॉ. कोल्हे म्हणाले, “लग्न आधी कोंडाण्याचे आणि मग रायबाचे, हाच शिवछत्रपतींचा संस्कार आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पाच वर्षांतून एकदा दिल्या जाणारा मानाचा ‘जे.एम.एफ. ग्रामज्योत पुरस्कार’ यावेळी श्री. पवन बोंद्रे (सरपंच), श्री. योगेश नासरे, श्री. सागर दुधाने, आणि श्री. हितेशदादा बनसोड या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या विभूतिंचा सन्मान करताना डॉ. कोल्हे म्हणाले, “स्वार्थापेक्षा परमार्थाचे कार्य करणाऱ्यांचा समाज नेहमी ऋणी असतो.”

आरोग्य शिबिर हे दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री डॉ. महात्मे हॉस्पिटल व परमपूज्य श्री. नायर गुरुजी यांच्या चेतना परिवार, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. २ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी जाह्नवी आणि रोहित यांच्या साखरपुड्याचा, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम दिमाखात साजरा झाला. संपूर्ण दावसा गावासोबत रशिया आणि बेंगळुरू येथील पाहुण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
रशियाहून आलेल्या मिस रशिया आणि मिस ग्लोबल मिसेस वेल्लेरी, श्री. व सौ. इरिना आंद्रे डॅनिलोव, तसेच इम्पीरियल कॉलेज, बेंगळुरूचे चेअरमन डॉ. हरिकृष्ण मारम हे विशेष पाहुणे उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांनी भारतीय परंपरेप्रमाणे साडी आणि पारंपरिक पोशाख घालून कार्यक्रमात सहभाग घेतला आणि नृत्याविष्कार सादर करून सर्वांचे मन जिंकली. याच दिवशी तुळशी विवाह देखील पार पडला. मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये चिन्मयी साळवी (वागळे की दुनिया फेम), आयुष्य संजीव, पियुष पांडे, बलजीत पांडे, आदित्य काळे, सिद्धार्थ अखाडे, आणि सिधांत खाडे आदींचा सहभाग विशेष ठरला.
३ नोव्हेंबर रोजी सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण उजाडला. मुंबई स्थित जाह्नवी कोल्हे आणि रोहित राजगुरू यांचा विवाह सोहळा भव्य थाटात संपन्न झाला. सर्वांचे लक्ष वेधणारा क्षण म्हणजे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः लिहिलेला मंगलाष्टक, ज्याला रोहित राजगुरू यांनी संगीतबद्ध केले. या मंगलाष्टकाच्या सुरात संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
m"ईश्वराच्या दैव हाती, तोच जुळवितो नातीगोती.."

वराची मिरवणूक बैलजोड गाडीतून काढण्यात आली, आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पाच सुवासिनींसह औक्षण आणि पदप्रक्षालन करून स्वागत केले. सुमारे ३,००० हून अधिक लोक आणि ५० गावांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. वधू-वराने एकमेकांना हार घालून पवित्र बंधनात अडकले. आई-वडील म्हणून डॉ. कोल्हे दांपत्यांनी भावनिक क्षणी आपल्या लाडक्या लेकीचा कन्यादानाचा संस्कार पूर्ण केला. भारतीय परंपरेनुसार परदेशी पाहुण्यांनी भारतीय पोशाख परिधान करून आपल्या संस्कृतीबद्दल आदर व्यक्त केला. तीन दिवसांच्या या सोहळ्यात संपूर्ण दावसा गाव रोषणाईने उजळून निघाले.

वधूचे आजी-आजोबा डॉ. मारोतराव कोल्हे व सौ. शकुंतला कोल्हे, तसेच श्री. परशुरामजी भांगे व सौ. पुष्पा भांगे यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. महेश कळंबे, श्री. विठ्ठल कोल्हे, श्री. अल्पेश खोब्रागडे,  श्री. सोमेश भांगे, श्री. देवीदास सावरकर, श्री. आकाश नेहारे, सतीश कुशराम, श्री. बाबू सावरकर, श्री. नरेश पिसाट, आणि श्री. अवधूत देसाई, अनिल गुहेर, सोनू यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. श्री योगेश भाऊ भोसे यांनी जे बी. फार्म वर पाहुण्याचं मनसोक्त स्वागत केले,  तसेच श्री सती अनुसया माता भक्त निवास पारडसिंगा येथे शेकडो पाहुण्यांचे निवास सोय झाली. या सर्वांचे स्वागत आहे. 

शेवटी, वधूच्या पाठवणीचा क्षण सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. आई डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “सोनपावलांनी आमच्या आयुष्यात आलेली आमची जाह्नवी म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. आता हीच लक्ष्मी सासरी जाऊन ते घर मंगलमय करणार यात शंकाच नाही.” वडील डॉ. राजकुमार कोल्हे यांनीही निशब्दपणे लेकीला आलिंगन देऊन भावूक निरोप दिला. नवरदेव श्री. रोहित राजगुरू यांनी हातात हात घेऊन आयुष्यभर विश्वास आणि प्रेम टिकवण्याचे वचन दिले.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी जा, लाडके सुखाने..."

या गीताच्या सुरात कोल्हे परिवाराने आपल्या लेकीला सासरी पाठवले. दुसऱ्या दिवशी हळद उतरविण्याचा कार्यक्रम आणि विविध खेळांचा आनंदोत्सव साजरा झाला, ज्यात सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.

चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित यांचे ७१ व्या वर्षी निधन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात बहीण अभिनेत्री विजया पंडित, संगीतकार भाऊ जतीन-ललित असा परिवार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका आणि अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या सुलक्षणा यांचा जन्म १२ जुलै १९५४ मध्ये हरियाणातील फतेहपूरमध्ये झाला. गायनाचा वारसा त्यांचे वडील प्रतापनारायण पंडित यांच्याकडूनच लाभला होता. दिवंगत गायक पं. जसराज हे त्यांचे काका होते. सुलक्षणा पंडित यांनी आपल्या वडिलांकडेच गायनाचे धडे गिरवले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना चित्रपटात गायनाची संधी मिळाली. अर्थात, तो चित्रपट 'तकदीर' होता. या चित्रपटात त्यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरसची साथ दिली होती. या चित्रपटानंतर त्यांनी १९७१ मध्ये 'दूर का राही' या चित्रपटात गायक किशोरकुमार यांनी 'बेकरार दिल तू गाये जा' या गीतासाठी गायनाची संधी दिली. दिग्दर्शक रघुनाथ झालानी यांनी १९७५ मध्ये त्यांना 'उलझन' चित्रपटाची नायिका म्हणून घेतले. नायिका म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.

प्रवासी महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवुन पसार झालेल्या रिक्षा चालकांस गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांनी केले २४ तासात जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दि. ३०/१०/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस (वय: ५६ वर्षे) धंदा: गृहीणी, मुळ गाव: मुळ झरे बांबर, पोष्ट: दोडा मार्ग, जिल्हा- सिंधुदुर्ग या दिपावली सणानिमित्त टाटा पॉवर, कल्याण (पुर्व) व स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथे राहणाऱ्या आपल्या दोन्ही मुलींकडे फराळाचे सामान घेवुन भेटण्याकरीता आल्या होत्या.

सदर प्रवासी महिला या स्टार कॉलनी डोंबिवली (पूर्व) येथील मुलीस भेटुन दि. ३१/१०/२०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजण्याच्या  सुमारास त्या त्यांच्या टाटा पॉवर कल्याण (पुर्व) येथे राहणाऱ्या दुसऱ्या मुलीस भेटण्याकरीता स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथुन प्रवासी रिक्षा पकडुन जात असताना त्यांनी रिक्षात बसल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र त्यांच्याकडील बॅगेत ठेवले होते. त्यांनतर त्या पिसवली येथील पिंगारा बारच्या समोर पोहचल्या असता रिक्षातुन खाली उतरून रिक्षा चालकाचे भाडे दिल्यानंतर त्या आपल्या मुलीची वाट पाहत उभ्या असताना रिक्षा चालक बॅगसह निघुन गेला. त्यानंतर काही वेळाने प्रवासी महिलेच्या लक्षात आले की, सोबत घेवुन आलेल्या व रिक्षामध्ये ठेवल्या दोन बॅगा त्यापैकी काळया रंगाच्या बॅगेत ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र असलेली बॅग सहीत दुसरी बॅग अशा ०२ बॅगा ह्या रिक्षावाला घेवुन गेला असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनतर काही वेळात प्रवासी महिलेची मुलगी त्यांना घेण्याकरीता आली तेव्हा त्यांनी सदरची हकिगत आपल्या मुलीस सांगितली. त्यांनतर प्रवासी महिला व तिच्या मुलीने रिक्षाचा शोध घेतला पंरतु सदर रिक्षा आढळुन आली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्या रिक्षामध्ये गळ्यातुन काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र तसेच कपड्याच्या दोन बॅगा ह्या रिक्षात ठेवलेले असल्याचे रिक्षा चालक यांस माहिती असताना सदरच्या बॅगा ह्या रिक्षा चालक पळवून घेवुन गेला आहे.

त्यांनतर सदर प्रवासी महिला व तीचा जावई योगेश सावंत यांनी सदरबाबत गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना माहिती दिली असता पोलीसांनी सी.सी टि.व्ही फुटेजची पाहणी केली असता सदर रिक्षाचा नंबर MH05/CP-3343 असा असल्याचे समजले त्यानंतर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षा चालकाचा शोध घेतला असता तो पोलीसांना सापडल्याने सदर प्रवासी महिलेस गुन्हे शाखा घटक-०३ कल्याण येथे बोलाविण्यात आले. त्याप्रमाणे त्या हजर झाल्या असता सदर प्रवासी महिलेस रिक्षाचालक नामे जयेश वसंत गौतम (वय: ३२ वर्षे) धंदा: रिक्षा चालक राहणार: पटवा चाळ, रूम नंबर ०२, गणेशवाडी, टिटावाळा मांडा रोड, टिटवाळा, ता. कल्याण यांस बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र दाखविले असता सदरचे दागिने व रिक्षा चालक तोच असल्याचे पोलीसांना ओळखुन सागितले.

तरी गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस या प्रवासी महिलेचे चोरीस गेलेले ३,६०,०००/- रूपये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व आरोपी रिक्षा चालक तसेच त्याचे ताब्यातील रिक्षा असा एकूण ५,२१,५५०/- रू किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत करून रिक्षा चालकांस २४ तासात जेरबंद करून त्याच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि. सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउपनि. किरण भिसे, विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंदारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांचे पथकाने यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत अवैध ऑनलाईन लॉटरीचा धंदा पोलीसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जोमात सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाले असूनही राम नगर पोलीसांना याची काहीच माहिती नाही असे होऊ शकत नाही. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र चालू आहे. अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांची कुटुंबे हलाकी आणि हालपेष्टाचे दिवस काढत आहेत. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर आहुजा, भानुशाली नावाच्या व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.


राम नगर पोलीसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. रामनगर डोंबिवली पोलीसांच्या हद्दीत हा प्रकार घडत असूनही, पोलीसांना याची साधी कल्पना हि नाही हे होऊच शकत नाही असा डोंबिवलीकर नागरिकांचा समाज आहे. या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत राम नगर पोलीसांना विचारणा केली असता ते माहिती घेऊन कळवतो असे उत्तर थातूरमातूर देत आहेत. तसेच ठाणे, कल्याण पोलीस कंट्रोल कडून माहिती घेतली असता त्यांनाही या लॉटरीबाबत काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र सुरु आहेत. एकीकडे शासन ऑनलाईन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोकं कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्थानिक वरिष्ठ पोलीसांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालकांवरती ताबडतोब कठोर कारवाई करावी तसेच यामागे वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकर नागरिकांकडून जोर धरत आहे.

दिव्यात ‘जय जय रवळनाथ’ नाट्यप्रयोगाला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळाच्या वतीने आयोजित ‘जय जय रवळनाथ’ या चालचित्रयुक्त नाट्यप्रयोगाचा भव्य कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी दिव्यातील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हा चलचित्रीत दशावतार नाट्यप्रयोग दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ या मंडळाने तर मंडळाचे संचालन सिध्देश सुधीर कलिंगण यांनी केले. या वर्षीच्या दिग्गज नावलौकीक उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार संचासहित, महान पौराणिक भव्यदिव्य, संघर्षमय, चलचित्रीत नाट्य कलाकृती काल चाकरमान्यांसमोर सादर झाली. तसेच कार्यक्रमाचे समालोचन विवेक पोरजी आणि करुना ढेगे यांनी सादर केले. कार्यक्रमाआधी थोडासा पाऊस पडला असला तरी चाकरमान्यांच्या उत्साहात किंचितही फरक पडला नाही. एक वर्षांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील दिव्यातील नागरिकांनी उपस्थित राहून ‘जय जय रवळनाथ’ दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला.
महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन, चित्रविचित्र किड्यावर मांत्रिक ध्यानस्त, चलचित्रीत मंदिराचा देखावा, बुरुजातून दिव्य शक्ती प्रगट, रुद्र तेजोमय त्रिशूळ रवळनाथाच्या हाती येणे, घोड्यावर बसून रवळनाथाचे आगमन, अचाट शक्तीची निमिर्ती, ज्योतीबा दर्शन आणि महाकाय रेडा संग्राम, त्रिशूळ तेजोमय होणे, त्रिसूळातून अधांतरी चितविचित्र पिशाच्छ निमिर्ती, त्रिशूळाच्या सहाय्याने रेड्याचे शीर मारणे, त्रिशूळाने मांत्रिकाचा संहार होणे हे सर्व नाट्य प्रयोग हलत्या चलचित्रातून चाकरमान्यांनी पाहिले. दिव्याच्या संस्कृतीत भर घालणारा हा नाट्यप्रयोग सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदु परब, माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे, ठाणे जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, विजय भोईर, अशोक पाटिल, गणेश भगत, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रोशन भगत, रेश्मा पवार, सीमा भगत, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, चेतन  पाटिल, समीर चव्हाण, सतीश केळशीकर, साहिल पाटिल, अशोक गुप्ता, गौरीशंकर पटवा, अवधराज राजभर, जिलाजीत तिवारी, पूनम सिंग, रीना सिंग, नीलम मिश्रा आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या दशावतारी नाट्य प्रयोगासाठी विशेष मेहनत नितिश कोरगांवकर, रवी मुननकर, विठ्ठल गावडे, किरण कोरगांवकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ आणि अनिल गावकर यांनी घेतली होती.
कलाकार सिध्देश कलिंगण, काका कलिंगण, निळकंठ सावंत, रोहित नाईक, राधाकृष्ण नाईक, सुनील खोरजूवेकर, पप्पू घाडीगावकर, संजय लाड, परशुराम मोरजकर, तर लोकराजा ट्रीकसीन ग्रुप नेरुर कौस्तुभ कलिंगण, प्रतिक कलिंगण, संजय नेवगी, तुषार परब, रोहित नारकर, श्रीकृष्ण सावंत, प्रथमेश परब, सिध्देश तारवे, कुणाल पेंडुरकर, मयूर माने, मनीष नेरुरकर, तर संगित साथ हार्मोनिअम आशिष तवटे, मृदुंगमणी चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण यांनी संगतील दिले आहे.

निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. १ : सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष ऍड. अभय छाजेड, आमदार भाई जगताप, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डॉ. अजित नवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले.

विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकार नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूणच घेत नाही.

सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का ? अशी शंका येते.. ज्येठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

डोंबिवलीकरांचा 'रन फॉर युनिटी' एकता दौड ला एकतेचा संदेश देत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३१ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी डोंबिवली येथे ठाणे पोलीस कमिशनरेट यांच्या माध्यमातून "रन फॉर युनिटी" या एकता दौड चे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमांस डोंबिवलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे पोलीस कमिशनरेट आयोजित 'एकता दौड' आप्पा दातार चौक येथून सुरू होऊन गणेश मंदिर संस्थान - नेहरू रोड - भाजी मार्केट - फडके रोड  - मदन ठाकरे चौक या मार्गे परत आप्पा दातार चौक येथे समाप्त झाली. कार्यक्रमादरम्यान डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे नागरिकांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी या प्रदर्शनास विशेष उत्साहाने भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात रामनगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग) सुहास हेमाडे, डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड, सोनी मराठी वरील क्राईम पॅट्रोल मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता तथा निवेदक सतीश नायकोडी, डोंबिवलीतील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, तसेच शाळा-कॉलेजमधील एनएसएस व एनसीसी विद्यार्थी आणि स्पोर्ट्स ऍकॅडमी चे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सुमारे २५० ते ३०० नागरिक "रन फॉर युनिटी" या एकता दौड कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी डोंबिवली पोलीसांकडून योग्य ती दक्षता घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीसांकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.

महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) संघाच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे कार्बाइड गन (Carbide Gun) वर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका आणि महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी कार्बाइड गन आणि स्फोटक फटाके यांचा वापर तात्काळ थांबवावा, असे आवाहन केले आहे. या कार्बाइड गनमुळे देशभरात अचानक नेत्र अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटी) च्या अहवालानुसार भोपालमध्ये १५० हून अधिक मुले जखमी झाली आणि काहींनी दृष्टी गमावली. मध्य प्रदेश, चंदीगड आणि पुणे येथे सुद्धा अशाच घटना नोंदल्या गेल्या ज्यात बहुतेक लहान मुले बळी ठरली. कॅल्शियम कार्बाइड आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार होणारी ही कार्बाइड गन धोकादायक गॅस उत्पन्न करते ज्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी गमावणे आणि चेहऱ्याचे विकृतीकरण होऊ शकते.



डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या,“ही खेळणी नाहीत, ही तर रासायनिक स्फोटके आहेत जी काही क्षणांत डोळ्यांचे नुकसान करू शकतात. सण आनंदाचा असावा, दुःखाचा नव्हे. सरकारने यावर पूर्ण बंदी आणावी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.” MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी) ने AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)च्या लोकजागृती मोहीम, कायदेशीर कारवाई आणि रुग्णालयांच्या तयारीबाबतच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. नुकतीच दिवाळी आणि छटपूजा सण संपून ख्रिसमस आणि नववर्ष हे सण जवळ आल्याने MOS कडून सर्वांना विशेषतः पालकांना, शाळा प्रशासन यांना अशा धोकादायक वस्तूंचा वापर टाळावा आणि मुलांना त्यापासून दूर ठेवावे “दिवाळी संपली असली तरी सणांचा मौसम अजून सुरू आहे. आता एका डोळ्याचे सुद्धा नुकसान होऊ देऊ नका. प्रकाशाचा सण अंधाराचा कारण होऊ नये.”
 असे आवाहन MOS संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या कडून करण्यात आले आहे.
AIOS (ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
आणि MOS (महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी)
यांचे एकत्रित आवाहन केले आहे  कि कार्बाइड गनवर बंदी घाला, प्रत्येक डोळा आणि प्रत्येक मुलाचे संरक्षण करा.

पहिल्या ह्युमनॉईड रोबोट चे प्री-बुकिंग सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
कॅलिफोर्निया : 1X कंपनीने 'ह्युमनॉईड रोबोट निओ' या पहिल्या ह्युमनॉईड रोबोटचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर या रोबोटची प्री-बुकिंग सुरू झाली आहे, बुकिंगसाठी २०० डॉलर (सुमारे १७,६५६ रुपये) द्यावे लागतील, ज्यांना हा रोबोट प्रवेश हवा आहे त्यांना हा रोबोट २०,००० डॉलर (सुमारे १७ लाख  ६५ हजार ६४० रुपये) मध्ये मिळेल.

कॅलिफोर्नियास्थित एआय आणि रोबोटिक्स कंपनी 1X ने एक रोबोट तयार केला आहे जो माणसासारखा दिसतो, कंपनीने पहिल्या 'ह्युमनॉईड रोबोट निओ' चे प्री-बुकिंग सुरू केले आहे, हा ह्युमनॉईड रोबोट तुम्हाला साफसफाई, स्वयंपाक, भांडी धुणे आणि कपडे धुणे, दरवाजा उघडणे, सामान आणणे, लाईट चालू / बंद करणे यासारख्या सर्व दैनंदिन कामांमध्ये मदत करेल.

हा रोबोट अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की तो लोकांचे शब्द समजू शकेल. २९.९४ किलो वजनाचा हा रोबोट ६९.८५  किलोपर्यंत वजन सहज उचलू शकतो. हा रोबोट आजच्या आधुनिक रेफ्रिजरेटरपेक्षा कमी आवाज (नॉईज लेव्हल २२ डिबी) करतो. रोबोटशी संवाद साधण्यासाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय आणि 5G सपोर्टशिवाय श्रोणि आणि छाती जवळ ३ स्टेज स्पीकर आहेत.

देशात लवकरच सुरु होणार थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : एलॉन मस्क यांची कंपनी, स्टारलिंक, भारतात त्यांच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू करत आहे. कंपनी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत एक डेमो रन आयोजित करेल. सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेसाठी नियामक मंजुरी मिळविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की या डेमोमध्ये तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर केला जाईल. पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कायदा अंमलबजावणी संस्था या ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवतील.

भारताचा सॅटेलाईट ब्रॉडबँड बाजार अजूनही नवोदित अवस्थेत आहे. जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या देखील बाजारात प्रवेश करत आहेत, परंतु स्टारलिंकची तंत्रज्ञान जागतिक स्तरावर ओळखली जाते. भारतीय बाजारपेठेत स्टारलिंकच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढेल, किंमती कमी होतील आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.

स्टारलिंक हा एक स्पेसएक्स प्रकल्प आहे जो उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करतो. त्याचे उपग्रह पृथ्वीच्या जवळून फिरतात, ज्यामुळे जलद आणि सुरळीत इंटरनेट प्रवेश सुनिश्चित होतो. हे विशेषतः ग्रामीण भाग किंवा पर्वतरांगासारख्या भागात फायदेशीर आहे जिथे नियमित इंटरनेट प्रवेश उपलब्ध नाही.

चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पॅरीस : फ्रान्समध्ये जगातील सर्वात मोठा असा अनोखा मोटर-वे तयार झाला असून, इथे इलेक्ट्रीक वाहनं आहे त्या वेगात चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार आहेत. हा रस्ताच उर्जेचा स्त्रोत म्हणून काम करताना दिसतोय. फ्रान्समध्ये जगातील हा पहिलावहिला वाहनं चार्ज करणारा मोटर-वे सुरू झाला असून, यामध्ये डायनामिक वायरलेस चार्जिंग सिस्टम लावण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं इलेक्र्टीक वाहनं आपोआप चार्ज होणार असून, आता कार किंवा ट्रकला चार्जिंग स्टेशन शोधत तिथं थांबण्याची गरज नाही.

पॅरिसपासून जवळपास ४० किमी अंतरावर दक्षिण पश्चिमेस असणाऱ्या ए१० मोटर-वे वर हा प्रयोग सुरू करण्यात आला असून, अनेक संस्थांनी मिळून 'Charge As You Drive' हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. फ्रान्सचा हा ए१० मोटर-वे १.५  किलोमीटर लांबीचा असून, या रस्त्यामध्ये अनेक कॉईल बसवण्यात आल्या आहेत. याच कॉईलच्या माध्यमातून त्यावरून जाणारी इलेक्ट्रीक वाहनं आपोआपच त्यातून वाहणाऱ्या विजेच्या माध्यमातून चार्ज होतील. चाचणी दरम्यान हे तंत्रज्ञान यशस्वी ठरलं. यामध्ये ३०० किलोवॅटहून अधिक पीक पॉवर आणि सरासरी २००  किलोवॅट इतकी विद्युत संक्षेपण क्षमता दिसून आली.

ऊर्जा क्षेत्रात भारताची ऐतिहासिक कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : भारताच्या ऊर्जा क्षेत्राने २०२५ मध्ये दोन ऐतिहासिक टप्पे पार करत स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता ५०० गीगावॉटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत ५००.८९ गीगावाटवर पोहोचली. ही कामगिरी दीर्घकालीन धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या एकूण क्षमतेपैकी २५६.०९ गीगावॉट म्हणजेच ५१% पेक्षा अधिक क्षमता गैर-जीवाश्म इंधन स्रोतांमधून प्राप्त होते, ज्यामध्ये सौर, पवन, जलविद्युत आणि अणुऊर्जा यांचा समावेश आहे. उर्वरित २४४. ८० गीगावॉट क्षमता जीवाश्म इंधनावर आधारित आहे. सौर ऊर्जा १२७.३३ गीगावॉट आणि पवन ऊर्जा ५३.१२ गीगावॉट पर्यंत पोहोचली आहे, जी भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रगती दर्शवते.

वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) भारताने २८ गीगावॉट गैर-जीवाश्म क्षमता आणि ५.१ गीगावॉट जीवाश्म इंधन क्षमता निर्माण केली, यावरून स्वच्छ ऊर्जा क्षेत्र किती वेगाने विस्तारत आहे हे स्पष्ट होते. याच वर्षी २९ जुलै २०२५ हा दिवस भारतासाठी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. त्या दिवशी देशाच्या एकूण २०३  गीगावॉट वीज मागणीतून ५१.५% वीज नवीकरणीय स्रोतांद्वारे पुरवली गेली. त्यात सौर ऊर्जा उत्पादन ४४.५५ गीगावॉट, पवन ऊर्जा २९. ८९  गीगावॉट आणि जलविद्युत उत्पादन ३०.२९ गीगावॉट इतके होते. याचा अर्थ असा की प्रथमच भारताने एका दिवसात अर्ध्याहून अधिक वीज हरित स्रोतांद्वारे निर्माण केली हे परिवर्तनाचे ऐतिहासिक संकेत आहे.

या प्रगतीमुळे भारताने COP26 मध्ये घेतलेल्या पंचामृत संकल्पांपैकी एक २०३० पर्यंत ५०% विद्युत क्षमता गैर-जीवाश्म स्रोतांद्वारे प्राप्त करणे हे लक्ष्य पाच वर्षे आधीच पूर्ण केले आहे. हे यश भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनातील नेतृत्व सिद्ध करते, जे स्थिर आणि विश्वासार्ह ग्रिड व्यवस्थापनासह साध्य झाले आहे. यामुळे उत्पादन, स्थापनेपासून ते देखभाल आणि नवकल्पनांपर्यंत अनेक रोजगार संधी निर्माण होत आहेत, ज्याचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना मिळत आहे.

ऊर्जा मंत्रालय आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) यांनी सर्व वीज निर्मिती कंपन्या, ट्रान्समिशन युटिलिटीज, सिस्टम ऑपरेटर आणि राज्य संस्थांना त्यांच्या योगदानासाठी अभिनंदन दिले आहे. भारताचा ऊर्जा क्षेत्रातील हा टप्पा जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे आणि भविष्यातील हरित भारताच्या दिशेने एक ठाम पाऊल आहे.

एमओएस (MOS) शिष्टमंडळाची डोळ्यांची सुरक्षा आणि बाल दृष्टी उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्र्यांशी भेट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) च्या शिष्टमंडळात महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर आणि सचिव डॉ. प्रीती कामदार आणि लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजी कलगे यांचा समावेश होता. त्यांनी काल संध्याकाळी माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.

बैठकीदरम्यान, शिष्टमंडळाने कार्बाइड गन फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापतींमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे मुलांवर होणाऱ्या विनाशकारी परिणामांवर भर देऊन, तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. पुढील अपघात टाळण्यासाठी आणि सार्वजनिक डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री तसेच मा. शिक्षण मंत्री, श्री दादासाहेब भुसे, जेथे डॉ. अनघा हेरूर यांनी "बाल दृष्टी अभियान" साठी त्यांचे MOS व्हिजन सादर केले. या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यभरातील शालेय मुलांची वार्षिक दृष्टी तपासणी सुनिश्चित करणे आहे जेणेकरून अपवर्तक त्रुटी, मायोपिया, स्क्विंट, अँब्लियोपिया आणि इतर डोळ्यांच्या आजारांचे लवकर निदान आणि व्यवस्थापन सुलभ होईल.

हा कार्यक्रम टाळता येण्याजोग्या दृष्टीदोष रोखण्यासाठी आणि मुलांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. ही खरोखरच एक ताकदीची फलदायी आणि आशादायक बैठक होती, ज्यामुळे सर्वांसाठी चांगल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) आणि राज्य सरकारमधील सहयोगी प्रयत्नांना बळकटी मिळाली.

ठाणे पोलीसांकडून राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एकता दौडचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती निमित्त ठाणे शहरात दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष दिवशी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपुर्ण देशभरात 'एकता दौड' आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर एकता दौड मध्ये ठाण्यातील सर्व नागरिकांनी, ठाणे पोलीस व त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार बंधु भगिनी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून करण्यात येत आहे. तरी इच्छुक नागरिकांनी सदर कार्यक्रमासाठी दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजे पर्यत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपाळी, ठाणे येथे उपस्थित रहावे.

"एकता दौड मार्गीका खालील प्रमाणे आहे."

छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथुन सुरू होवुन मुस चौक उजवी बाजु - साईकृपा हॉटेल, गडकरी रंगायतन सर्कल उजवी बाजु परफेक्ट ड्रायव्हिंग स्कुल सेंटजॉन हायस्कुल - चिंतामणी ज्वेलर्स चौक छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथे समाप्त होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत पोलीसांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमेत ३५० हून अधिक समाजकंटकांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भुरट्या चोर्‍या, घरफोड्या, वाटमार्‍या, रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चालणारे अवैध धंदे, दारू, तसेच अंमली पदार्थांची सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात चोरी-छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४३ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कल्याण-डोंबिवलीत पोलीस राज असल्याचे दाखवून दिले. रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अचानक धरपकडीसह धाडसत्र मोहीम राबवून ३५३ बदमाशांवर कारवाई केली.

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात यापूर्वीही अशाच प्रकारची धरपकड मोहीम सलग दोन ते तीन महिने राबविण्यात आली होती. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिवसाच नव्हे तर रात्रीच्या सुमारास चालणारे अवैध धंद्यांचे अड्डे शोधून उद्धवस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून गुंडांना तुरूंगात धाडण्यात आले, तर अनेकांना कोर्टाच्या फेर्‍या मारण्यास भाग पाडण्यात आले. कल्याण-डोंबिवलीला नशामुक्त करण्याचा विडा उचललेल्या पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या या मोहिमेमुळे रहिवासी, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 कारवायांनी उसंत घेतल्याने बदमाश मंडळींनी पुन्हा डोके वर काढले होते. रात्रीच्या सुमारास गैरधंदे करणार्‍यांसह सार्वजनिक ठिकाणी अड्डे सुरू झाले असल्याची चाहूल लागताच उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना शनिवारी रात्री अचानक संदेश देऊन धरपकड आणि धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले. या मोहिमेत उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे सहभागी झाले होते. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील इमारती, रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांच्या आडोशाने लपलेले भुरटे चोर, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांची धरपकड सुरू केली. विविध भागात झाडा-झुडपांचा आधार घेऊन मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी बसलेल्या समाजकंटकांच्या झुंडी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. काहींनी पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापी अशांना पोलीसांनी पकडून त्यांची शहरात धिंड काढली. मद्यपान करून वाहने चालविणार्‍या चालकांकडून ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत ६ खतरनाक गुंडांना कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला. २७ तडीपार गुंडाची तपासणी केली.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

 कल्याण-डोंबिवलीचे शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या कारवाईसाठी १७ पोलिस निरीक्षक ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, २३६ पुरूष कर्मचारी आणि १८ महिला कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. २७ तडीपार, दारू पिऊन वाहन चालवणारे ६, जुगार खेळणारे ३, घातक शस्त्र बाळगणारे ३, तर नाकाबंदी दरम्यान हाती लागलेल्या ४५ जणांकडून ४१ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकांनी २० लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग, २० हॉटेल्स आणि १२ बार तपासले. त्यामुळे 'ऑपरेशन ऑल आऊट'ची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार

 कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक पोलीसांकडून धरपकड आणि छापा मोहीम सुरू झाल्याने मोकळ्या मैदानांमध्ये ओल्या पार्ट्या झोडण्यासाठी बसलेल्या टोळक्यांची पळापळ झाली. धरपकड केलेल्या मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील काही जण हाती लागले. या सगळ्यांची कान पकडून उठाबशा काढल्या. त्यानंतर या सर्वांची ते राहत असलेल्या परिसरात वरात काढण्यात आली. शिवाय पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री आठ वाजल्यापासून सुरू केलेली ही धरपकड मोहीम पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. ३५० हून अधिक गुंड, समाजकंटक, मद्यपी, गर्दुल्ले, गैरधंदे करणार्‍यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयामार्फत कारवाई केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, शांततेचा भंग करणारे, परिसरात गैरधंदे करणार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.