BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एमओएस (MOS) शिष्टमंडळाची डोळ्यांची सुरक्षा आणि बाल दृष्टी उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्र्यांशी भेट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) च्या शिष्टमंडळात महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर आणि सचिव डॉ. प्रीती कामदार आणि लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजी कलगे यांचा समावेश होता. त्यांनी काल संध्याकाळी माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली.

बैठकीदरम्यान, शिष्टमंडळाने कार्बाइड गन फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापतींमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे मुलांवर होणाऱ्या विनाशकारी परिणामांवर भर देऊन, तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. पुढील अपघात टाळण्यासाठी आणि सार्वजनिक डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री तसेच मा. शिक्षण मंत्री, श्री दादासाहेब भुसे, जेथे डॉ. अनघा हेरूर यांनी "बाल दृष्टी अभियान" साठी त्यांचे MOS व्हिजन सादर केले. या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यभरातील शालेय मुलांची वार्षिक दृष्टी तपासणी सुनिश्चित करणे आहे जेणेकरून अपवर्तक त्रुटी, मायोपिया, स्क्विंट, अँब्लियोपिया आणि इतर डोळ्यांच्या आजारांचे लवकर निदान आणि व्यवस्थापन सुलभ होईल.

हा कार्यक्रम टाळता येण्याजोग्या दृष्टीदोष रोखण्यासाठी आणि मुलांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. ही खरोखरच एक ताकदीची फलदायी आणि आशादायक बैठक होती, ज्यामुळे सर्वांसाठी चांगल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (MOS) आणि राज्य सरकारमधील सहयोगी प्रयत्नांना बळकटी मिळाली.

ठाणे पोलीसांकडून राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एकता दौडचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती निमित्त ठाणे शहरात दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष दिवशी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपुर्ण देशभरात 'एकता दौड' आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर एकता दौड मध्ये ठाण्यातील सर्व नागरिकांनी, ठाणे पोलीस व त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार बंधु भगिनी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून करण्यात येत आहे. तरी इच्छुक नागरिकांनी सदर कार्यक्रमासाठी दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजे पर्यत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपाळी, ठाणे येथे उपस्थित रहावे.

"एकता दौड मार्गीका खालील प्रमाणे आहे."

छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथुन सुरू होवुन मुस चौक उजवी बाजु - साईकृपा हॉटेल, गडकरी रंगायतन सर्कल उजवी बाजु परफेक्ट ड्रायव्हिंग स्कुल सेंटजॉन हायस्कुल - चिंतामणी ज्वेलर्स चौक छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथे समाप्त होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत पोलीसांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमेत ३५० हून अधिक समाजकंटकांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भुरट्या चोर्‍या, घरफोड्या, वाटमार्‍या, रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चालणारे अवैध धंदे, दारू, तसेच अंमली पदार्थांची सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात चोरी-छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४३ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कल्याण-डोंबिवलीत पोलीस राज असल्याचे दाखवून दिले. रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अचानक धरपकडीसह धाडसत्र मोहीम राबवून ३५३ बदमाशांवर कारवाई केली.

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात यापूर्वीही अशाच प्रकारची धरपकड मोहीम सलग दोन ते तीन महिने राबविण्यात आली होती. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिवसाच नव्हे तर रात्रीच्या सुमारास चालणारे अवैध धंद्यांचे अड्डे शोधून उद्धवस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून गुंडांना तुरूंगात धाडण्यात आले, तर अनेकांना कोर्टाच्या फेर्‍या मारण्यास भाग पाडण्यात आले. कल्याण-डोंबिवलीला नशामुक्त करण्याचा विडा उचललेल्या पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या या मोहिमेमुळे रहिवासी, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 कारवायांनी उसंत घेतल्याने बदमाश मंडळींनी पुन्हा डोके वर काढले होते. रात्रीच्या सुमारास गैरधंदे करणार्‍यांसह सार्वजनिक ठिकाणी अड्डे सुरू झाले असल्याची चाहूल लागताच उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना शनिवारी रात्री अचानक संदेश देऊन धरपकड आणि धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले. या मोहिमेत उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे सहभागी झाले होते. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील इमारती, रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांच्या आडोशाने लपलेले भुरटे चोर, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांची धरपकड सुरू केली. विविध भागात झाडा-झुडपांचा आधार घेऊन मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी बसलेल्या समाजकंटकांच्या झुंडी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. काहींनी पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापी अशांना पोलीसांनी पकडून त्यांची शहरात धिंड काढली. मद्यपान करून वाहने चालविणार्‍या चालकांकडून ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत ६ खतरनाक गुंडांना कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला. २७ तडीपार गुंडाची तपासणी केली.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

 कल्याण-डोंबिवलीचे शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या कारवाईसाठी १७ पोलिस निरीक्षक ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, २३६ पुरूष कर्मचारी आणि १८ महिला कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. २७ तडीपार, दारू पिऊन वाहन चालवणारे ६, जुगार खेळणारे ३, घातक शस्त्र बाळगणारे ३, तर नाकाबंदी दरम्यान हाती लागलेल्या ४५ जणांकडून ४१ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकांनी २० लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग, २० हॉटेल्स आणि १२ बार तपासले. त्यामुळे 'ऑपरेशन ऑल आऊट'ची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार

 कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक पोलीसांकडून धरपकड आणि छापा मोहीम सुरू झाल्याने मोकळ्या मैदानांमध्ये ओल्या पार्ट्या झोडण्यासाठी बसलेल्या टोळक्यांची पळापळ झाली. धरपकड केलेल्या मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील काही जण हाती लागले. या सगळ्यांची कान पकडून उठाबशा काढल्या. त्यानंतर या सर्वांची ते राहत असलेल्या परिसरात वरात काढण्यात आली. शिवाय पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री आठ वाजल्यापासून सुरू केलेली ही धरपकड मोहीम पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. ३५० हून अधिक गुंड, समाजकंटक, मद्यपी, गर्दुल्ले, गैरधंदे करणार्‍यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयामार्फत कारवाई केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, शांततेचा भंग करणारे, परिसरात गैरधंदे करणार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवलीच्या डॉ. अनघा हेरूर यांची महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि अनिल आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. अनघा हेरूर यांची नुकतीच महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (एमओएस) या भारतातील सर्वात मोठी नेत्रतज्ज्ञांची संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील नेत्ररोग क्षेत्राची नवी उंची गाठली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
३५ वर्षांची अखंड रुग्णसेवा आणि नेतृत्व

डॉ. अनघा हेरूर या गेली ३५ वर्षे नेत्ररोग क्षेत्रात रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली 'अनिल आय हॉस्पिटल'ने डोंबिवली, ठाणे, कल्याण, पलावा आणि बदलापूर येथे सात सुपरस्पेशालिटी नेत्ररुग्णालयांचा विस्तार साधला असून, संस्था यावर्षी ५३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे.

त्यांनी आजवर लाखो रुग्णांना नेत्रारोग्य सेवा दिली असून मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिनाचे आजार, लेसिक शस्त्रक्रिया व इतर नेत्रशस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे. त्यांच्या कुशल हातून असंख्य रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे.

पुरस्कार व गौरव!

नेत्ररोग क्षेत्रातील उत्कृष्टता, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम डॉ. अनघा हेरूर यांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
🏅 प्रमुख पुरस्कार आणि सन्मान:

Bhishagvarya Award – The Best Doctor
Doctor of the Year Award – IMA
Ishwarchandra Award – MOSCON
Hargobind Mishra IIRSI Gold Medal – Gwalior
Albal Oration Award – Solapur, 2025
RJK Singh Community Ophthalmology Award
Tejaswini Award
Dombivli Bhushan Puraskar
Adarsh Dombivilikar Award
Navdurga Puraskar
Stree Sanman Puraskar (मार्च 2023)
Woman Ophthalmologist of the Year – Hyderabad, 2023
Business Leader Award
Role Model of the Year – Noida
Best Surgical Video Award – Rajasthan Ophthalmological Conference, 2018
Best Surgical Skills Award – Women’s Ophthalmological Society, 2018
Best Scientific Team Presentation – WOS, Bengaluru, 2019
Winner – Best Surgical Video (Challenging Cases) – ROSCON, 2019
Gold Medal – IBeach Film Festival

हे पुरस्कार केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे नव्हे, तर त्यांचा दृष्टीकोन, समर्पण आणि नेतृत्वगुणांचेही प्रतीक आहेत.

महिला सक्षमीकरण व समाजसेवा

डॉ. अनघा हेरूर यांना महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर प्रगाढ विश्वास आहे. त्या अनेक आरोग्य जनजागृती उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहेत आणि अनेक महिला डॉक्टर्स व तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.

अध्यक्षा म्हणून दृष्टीकोन – “Unite, Illuminate, Innovate”

MOS च्या अध्यक्ष म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी या वर्षासाठी थीम जाहीर केली आहे —
“Unite, Illuminate, Innovate”*
त्यांचा दृष्टीकोन — *“One Vision, One Mission, One MOS.”

त्या महाराष्ट्रातील सर्व नेत्रतज्ज्ञांना एकत्र आणून अभ्यास, संशोधन, आणि उत्कृष्ट रुग्णसेवा यांचे केंद्र तयार करण्याचा संकल्प बाळगतात.

नवीन उपक्रम – रुग्ण व डॉक्टरांसाठी

अध्यक्षा म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी काही महत्त्वाचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत —

👁️🗨️ डायबेटिक आय अवेअरनेस वॉक – डोंबिवली
१६ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा 'डायबेटिक आय अवेअरनेस वॉक' आयोजित केला जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश आहे — “डायबेटिसमुळे होणारे अंधत्व टाळूया.”

👶 Bright Eyes – बाल सृष्टी अभियान
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी आणि दृष्टिजागर कार्यक्रमाचे आयोजन.
“आपल्या पुढच्या पिढीची दृष्टी सुरक्षित ठेवूया.” हा यामागील हेतू आहे.

🎓 तरुण नेत्रतज्ज्ञांसाठी ऍकॅडमिक प्रोग्राम्स..
MOS च्या माध्यमातून तरुण डॉक्टर्ससाठी अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन संधी निर्माण केल्या जातील, ज्यामुळे महाराष्ट्रातील नेत्रवैद्यक क्षेत्र जागतिक दर्जावर पोहोचेल.

महाराष्ट्रात नेत्रसेवा उच्च दर्जावर

डॉ. अनघा हेरूर यांचे ध्येय आहे की राज्यातील प्रत्येक नागरिकाला आधुनिक, सुलभ आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी. त्यांच्या मते, “नेत्रसेवा ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नाही, ती मानवी सेवेचे सर्वोच्च रूप आहे.”

अंतिम संदेश

“असेल दृष्टी, तर पाहू सृष्टी!”
या विश्वासाने प्रेरित होत,
डॉ. अनघा हेरूर MOS च्या माध्यमातून महाराष्ट्रात नेत्रस्वास्थ्याचे नवे युग सुरू करत आहेत. जिथे प्रत्येक नेत्रतज्ज्ञ एकत्र, प्रत्येक रुग्ण सुरक्षित, आणि प्रत्येक दृष्टी उजळलेली असेल.

लाचलूचपत विभागाने खडकपाडा पोलीस ठाण्यातील एपीआय व हवालदार यांना लाच घेताना रंगेहात पकडले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडण्यात आले आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवशी ही घटना उघड झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कुशल सापळा रचून ही कारवाई केली, या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक टी.जोशी आणि पोलीस हवालदार व्ही.काळे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध पुढील चौकशी सुरू आहे. 

ज्याच्या हाती जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच भ्रष्टाचारात अडकले, याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "सर्वसामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा ?" असा सवाल सामान्य लोकातून विचारला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण परिमंडळ-३ च्या पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

सफाई कर्मचाऱ्याने कचऱ्यामध्ये चुकून आलेला सोन्याचा हार महिलेला केला परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :  एकीकडे सोन्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असून दिवसागणिक नवनविन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हारही टाकून दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. मात्र सफाई कर्मचाऱ्याने या सोन्याच्या महागड्या हाराबाबत कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला हा हार परत मिळवून दिला आहे. केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. 

केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्याकडून नेहमीप्रमाणे आज सकाळीही कल्याण पूर्वेच्या विविध भागातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. त्याचदरम्यान सकाळी कचरा घेण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्याला कचरा देताना त्यामध्ये नजरचुकीने एका महिलेकडून सोन्याचा हारही टाकला गेल्याची तक्रार सुमित कंपनीचे '४-जे' प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली. त्यावरून ही तक्रार आलेल्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना समीर खाडे यांनी या सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. आणि त्यांनी लगेचच कचरा संकलन केलेली ही गाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर नेण्याच्या सूचना गाडीचालकाला केली. 

तसेच हार गहाळ झालेल्या महिलेलाही या इंटरकटिंग पॉइंटवर बोलवण्यात आले. त्यावेळी या गाडीमध्ये गोळा करण्यात आलेला कचरा संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष वेगळा करण्यात आला आणि त्यामध्ये या महिलेकडून चुकून आलेल्या सोन्याच्या हाराचा यशस्वीपणे शोध घेऊन तो हार पुन्हा त्या महिलेच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या समीर खाडे यांनी दिली. 

केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे या महिलेसह सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे.  तर आपला महागडा सोन्याचा हार सुखरूप परत मिळाल्याबद्दल या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

वयाच्या ८४ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२० : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या असरानींवर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. असरानींच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दीपावलीच्या आनंदाच्या दिवशी ही दुःखद बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की, "दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यातच आज त्यांचं निधन झालं."

असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियां' या चित्रपटातून असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, 'शोले' चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची स्मरणात राहणारी आहे. या चित्रपटातील त्यांचा संवाद, "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं.”, खूप गाजलं वं प्रसिद्ध झालं आणि अनेक दशकांनंतरही लोक अजूनही त्या संवादाने असरानींना ओळखतात. 'कोशिश' (१९७३), 'बावर्ची' (१९७२), 'चुपके चुपके' (१९७५), 'छोटी सी बात' (१९७५), आणि 'शोले' (१९७५) हे त्यांचे अविस्मरणीय असे चित्रपट आहेत.

गुटक्याची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: गुजरात राज्यातुन आयशर टेम्पोमधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरित्या वाहतुक करून विक्री केली जात असल्याबाबत गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी ०५:३० वाजता गांधारी ब्रिज चौक, कल्याण पश्चिम, जि. ठाणे या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी, राहणार: वार्ड नंबर १३ मु.पो. लालासी ता. लक्ष्मणगढ, जि. शिकर, राज्य: राजस्थान हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमधुन प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतुक करताना मिळुन आला व त्याच्याकडुन एकुन ८७,३७,४७२/- रू. किंमतीचा अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक-३च्या पोलीस पथकास यश आले आहे.
सदर बाबत आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी याचे व चौकशीत निष्पन्न पाहिजे आरोपी यांच्या विरोधात खडकपाडा पो.स्टे. गु.र.नं. ७३८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२)) (1), कलम २७(१) सह वाचन ३(१) (ZZ) (IV), शिक्षा कलम ५९(३) तसेच २६ (२) (IV), २७ (३) (d),२७ (३) (e) सह वाचन कलम ३०(२), (a), व मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना क्रमांक अ.सु.मा.अ./अधिसुचना-४११/२०२५/०७, दि. १६/०७/२०२५ ची अवज्ञा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील, पोलीस उप निरीक्षक नेम गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याण हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व मा. श्री. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सहा.पो निरी. सर्जेराव पाटील, पोउपनिरी विनोद पाटील, किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, पोहवा बोरकर, सुधीर कदम, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडु, आदिक जाधव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, पोना प्रविण किनरे, दिपक महाजन, पोशि मिथुन राठोड, सतिश सोनवणे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.

समृद्धी महामार्ग भिवंडीतून थेट ठाण्यात जोडत विनाअडथळा मुंबईत प्रवेश करता येणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून ठाण्यात आणि पुढे मुंबईत थेट प्रवेश  करता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे.

मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावरुन ठाण्यात येण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी असते. मात्र आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. मुंबई आणि ठाण्यातून प्रवास करणाऱ्या रहिवाशांना आता लवकरच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर या समृद्धी महामार्गाशी थेट जोडता येणार आहे.

(भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान उन्नत मार्ग आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए  ने (भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान २९.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, एलिवेटेड ब्रिज उभारण्याची योजना आखली आहे. या उन्नत मार्गासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. भिवंडी येथील आमने ते ठाणे येथील साकेत या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवाशांना विनाअडथळा थेट मुंबईत प्रवेश करता येणार आहे. नव्या आमने ते साकेत या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.

ठाणे ते मुंबई प्रवास होणार सुखकर

सध्या भिवंडीतून आमने ते ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे जवळपास दीड ते दोन तास लागतात. तसंच ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जातानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए 'इस्टर्न फ्री वे' चा विस्तार करणार आहे. घाटकोपर येथील छेडानगर ते आनंदनगर दरम्यान हा फ्री वेचा विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचं कामही सुरू करण्यात आलं आहे. छेडानगर ते आनंदनगर हा मार्ग १२.९५५ किलोमीटर लांबीचा असेल. तसंच या मार्गावर सहा लेन असतील. या कामासाठी २६८३ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसंच आनंदनगर ते साकेत (ठाणे) या मार्गावरही उन्नत मार्गाचं काम सुरू आहे. हा मार्ग ८.२४ किलोमीटर लांबीचा असून यासाठी १८७४ कोटी खर्च येईल. एखादा महामार्ग जेव्हा बनतो तेव्हा विकासाची दालनं खुली करतो त्यामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरुन विनाअडथळा मुंबईत जाता येईल. भिवंडी-आमने ते ठाणे-साकेत, साकेत ते आनंदनगर आणि आनंदनगर - छेडानगर-घाटकोपर आणि पुढे सध्याच्या 'इस्टर्न फ्री वे' ने दक्षिण मुंबईत पोहोचणं अतिशय सुलभ होईल.

मुंबई - सोलापूर विमान प्रवासाला हिरवा कंदील..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर येथे 'मुंबई-सोलापूर विमान सेवे'चा शुभारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि अडथळ्यांवर मात करत आज विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. शहराचा विकास आणि रोजगारासाठी तसेच नवीन उद्योगांसाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवाई सेवा. आज मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू आहे आणि आपण जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहोत, अशा परिस्थितीत विकास साधायचा तर कार्यक्षम (functional) विमानतळ आणि चांगली हवाई जोडणी असणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सोलापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा, या जिल्ह्याच्या जवळपासच्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सोलापूरला सिद्धरामेश्वर, तुळजापूरला आई तुळजाभवानी, अशा पवित्र स्थळांना जोडणाऱ्या भागात हवाई सेवा अत्यावश्यक म्हणून हे विमानतळ सुरू करण्याचा निर्धार आम्ही केला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात हवाई सेवांचे महत्त्व ओळखून 'उडान योज़ना (RCS)' सुरू केली. सोलापूरसाठी आम्ही 'वायबिलिटी गॅप फंड' तयार केला. मुंबईशी हवाई जोडणी ही सर्वात महत्त्वाची होती, कारण मुंबईला जोडले की संपूर्ण जगाशी जोडले जातो. आज सोलापूरहून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाली आहे. काही वेळातच मुंबईहून विमान सिद्धरामेश्वराच्या नगरीत उतरणार आहे. या पहिल्या उड्डाणाचा साक्षीदार होण्याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याआधी सोलापूरला आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती, मात्र त्यासाठी 'फंक्शनल विमानसेवा' अत्यावश्यक आहे, आता विमानसेवा सुरू झाल्याने आयटी पार्क सोलापूरमध्ये उभारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक, 'स्टार एअर'चे संजय घोडावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवली सेवाकेंद्र के 'स्वर्ण जयंती उत्सव' निमित्त, VIP प्रोग्राम (दुआओं का सफर, दिल से दिल तक) संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली :   ओम शांति 🙏ब्रह्माकुमारीज डोंबिवली शाखा, (घाटकोपर सब-झोन) की ओर से डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष पुरे होने के "स्वर्ण जयंती उत्सव" के उपलक्ष्य में, आदरणीय शकु दीदीजी (निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र) के मार्गदर्शन एवं प्रेरणा से, "दुआओं का सफर, दिल से दिल तक” (A Blessed journey from Heart to Heart) इस विषय पर विशेष VIP कार्यक्रम का आयोजन किया गया। 

यह कार्यक्रम डोम्बिवली पूर्व के पाटीदार भवन सभागृह में रविवार, १२ अक्टूबर २०२५ को १०.३० बजे संपन्न हुआ।
आए हुए मेहमानों का गोल्डन बैच एवं फोल्डर देकर स्वागत किया गया। कार्यक्रम की शुरुवात परमात्मा की याद से हुई। तत्पश्चात, पवित्र भट ग्रुप डांस अकादमी द्वारा सुन्दर नृत्य प्रस्तृत किया गया ।

आदरणीय ब्रह्माकुमारी राजयोगिनी शकू दीदी जी ने प्रेरणादाई विचार व्यक्त करते हुए कैसे इस डोम्बिवली सेवाकेंद्र की स्थापना १९७५ में २५ दिसंबर को आदरणीय परम श्रद्धेय डॉक्टर नलिनी दीदी के द्वारा हुई, और उसी समय एक आध्यात्मिक प्रदर्शनी का आयोजन किया गया था । उस प्रदर्शनी में आया हुए नगराध्यक्ष भ्राता पटवारीजी ने कहा था मुझे इस डोम्बिवली नगरी को देव नगरी बनाना है, उसी तरह परमात्मा सिर्फ डोम्बिवली नहीं परतु पुरे विश्व को देव नगरी बनाने आये है । साथ ही उन्होंने कहा की हमे अपने अंदर के रावण को पूरी तरह से ख़त्म करना होगा उसीसे हमारे जीवन में परिवर्तन आएगा और सुख शांति की प्राप्ति होगी ।
साथ ही सभी को माउंट आबू, घाटकोपर योग भवन तथा डोम्बिवली सेवाकेंद्र पर आने का हार्दिक निमंत्रण दिया।

तत्पश्चात, आदरणीय निकुंज भाई जी (स्तंभकार एवं मीडिया विंग के राष्ट्रीय समन्वयक) ने अपने बोल रखे, उन्होंने अपने वक्तव्य में VIP का एक अलग ही अर्थ बताया उन्होंने कहा  VIP मतलब वेरी इनोसेंट पर्सन ।
तत्पश्चात, आदरणीय रविंद्र जी ने (अध्यक्ष-भाजपा, प्रदेशाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश) डोम्बिवली सेवाकेंद्र के ५० वर्ष होने के निमित्त शुभ कामनाये दी, और कैसे वे इस ब्रह्माकुमारीज़ संस्था से पिछले कई वर्ष से जुड़े हुए है वो अनुभव साँझा किया ।
कार्यक्रम में आगे आदरणीय शकू दीदीजी, आदरणीय निकुंज भाई जी का और मुख्य अतिथियोंको मोमेंटो देकर सन्मान किया गया ल

निम्नलिखित अतिथि उपस्थित रहे:

1. Bro. Ravindra Chavanji (President of BJP and Pradeshadhyaksh, Maharashtra)
2. Bro. Rajesh More (MLA from Kalyan Rural Assembly constituency in Thane district)
3. Sis. Alka Mutalik Ji (President of Shree Ganesh Mandir Sansthan, Dombivli east) 
4. Bro. Dr. Rajkumar Kolhe Ji (Founder President of Jahnvis Multi Foundation's Vande Mataram Degree College, Dombivli west)
5. Bro Ashok Chandravarkar Ji & Mangala Chandravarkar Ji (Director FDC Ltd)
6. Karnataka Sangha'S Manjunatha College Of Commerce (On Behalf Of Chairaman Bro. Dr.Divakar Shetty, Trustee Devidas Kulal Sir, Urmani Sir,Taranath Sir, Principal Sushila Madam, Mrs Veena Subhash Palan)
7. Bro. Amit Mhatre (Secretary Youth Congress,Dombivli)
8. Sis. Dr. Tara Naik (Md and Gynaecologist, owner of Ashwini Maternity, Nursing Home)
9. Bro. Mr. Bhola Patil (Secretery Obc Dept)
10. Bro Niranjan Kadam (Trustee- Mumbreshwar Temple)
11. Bro. Yogesh Patil (Priest- Mumbra devi Temple) 
12. Bro. Mohan Bhagat (Trustee-Mumbreshwer Temple)
13. Bro.Mr. Shantilal Jain (Prop. M/S Darshan Marbal)
14. Bro. Manoj Kantak Ji (President, Toshvin Analytical Pvt Ltd)
15. Bro. Mahendra Patil (Vice President – Kalyan Jilha OBC Morcha – BJP Mr. Nitin patil (corporator)
16. Bro. Ravi Patil, and Mrs. Jyoti Marathe (corporator)
17. Bro. Dr Milind shirodkar (Director and Chief general surgeon at Aims hospital, Dombivli east)

कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए RJ दिलीप भाई ने आदरणीय शकू दीदीजी तथा आदरणीय निकुंज भाई जी से कुछ सामान्य सवाल जवाब किये । आदरणीय विष्णु बहन जी ने सभी को मेडिटेशन कराया, सभी ने शांति और शक्ति की अनुभूति की ।
कार्यक्रम के अंत में सभीने आ. नलिनी दीदीजी को पुष्पांजलि अर्पित करते हुए सौगात और टोली स्वीकार की और ब्रह्मभोजन के लिए प्रस्थान हुए ।
इस तरह VIP कार्यक्रम उमंग उत्साह के साथ संपन्न हुआ ।
 
Photo and link:
<https://photos.app.goo.gl/nGHZH8AWQLTAREfv6>

<https://drive.google.com/drive/folders/1NYWecg-2TQCBjfX981CVDSS1TzYArAWo?usp=sharing>  

ओम शांति
राजयोगिनी ब्रह्माकुमारी शकु दीदीजी
निर्देशिका – घाटकोपर उपक्षेत्र, प्रभारी – डोंबिवली सेवाकेंद्र

६० दिवसांचे पैसे भरुन करा ९० दिवस प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकतील. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार आहे.

काय आहे योजना ?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

कोणत्या बससाठी पास उपलब्धः ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)

मासिक पास (३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ३० दिवस वैध

त्रैमासिक पास (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन ९० दिवस वैध

एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बसेस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.

१७ ड्रग्स माफियांवर ११५ किलो गांजा जप्त करत कल्याण खडकपाडा पोलीसांची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : अंमली पदार्थांच्या तस्करी जाळ्याचा धसका भरवणारी भव्य कारवाई करत खडकपाडा पोलीसांनी तब्बल १७ ड्रग तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मोक्का अंतर्गत ड्रग माफियांविरोधात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. कल्याण झोन-३ चे उपयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलीसांनी तब्बल ११५ किलो गांजा, पिस्तूल, वॉकी-टॉकी संच, वाहने आणि तब्बल ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विशाखापट्टणम ते कल्याण असा अंमली पदार्थाचा पुरवठ्याचे जाले उभारले होते.

कल्याण जवळ बाल्ल्यानी परिसरात राहणारा गुफरान हजरान शेख हा या तस्कर टोळीचा म्होरक्या असून, त्यांच्यासह १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ४ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील पोलीसांना 'ऑपरेशन ड्रग बर्स्ट' ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे व पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने केली. या तपासात पोलीसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आरोपींच्या ताब्यातून ६२ किलो गांजा, १ पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संच चार्जरसह जप्त केले.
अटक केलेल्या आरोपींची नावे गुफरान शेख, बाबार शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, असिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश ननावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिंगारदे, गणेश जोशी अशी असून आणि इतर ५ आरोपींचा समावेश आहे.

'ड्रग माफियांचा सळसळाट रोखण्यासाठी मोक्का हाच प्रभावी उपाय' - डीसीपी अतुल झेंडे


या प्रकरणात आरोपींनी आर्थिक लाभासाठी संघटित गुन्हेगारी केल्याचे स्पष्ट झाल्याने, महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. उपयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, 'राज्यातील ड्रग तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी खडकपाडा पोलीसांची ही कारवाई आदर्श ठरेल'. या संपूर्ण तपासाचा पुढील भाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना आणि बीड  येथील आसपासच्या गावातील बऱ्याचशा भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाल्याकारणाने शिवसेनेच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार, संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात मराठवाडा येथील जालना, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात एकूण ४५०० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची मदत पोहचविली जात आहे. आज बीड जिल्हा तालुका बीड येथील कुर्ला गाव येथे सकाळी १० वाजता सिंदपाना नदी किनाऱ्यावरील एकूण १४ गावांच्या आपतग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गरजेच्या वस्तू असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.
शिवसेना कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक राजन मराठे, डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेधे, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे, संजय निकते हे पदाधिकारी उपस्थित होते. बीड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुलुक, स्वप्नील गलधर आणि श्याम सुंदर पडुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती  ह्यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून हा वाटप कार्यक्रम पार पडला.

पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा स्वबळाचा नारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पॅनल निहाय संघटनात्मक बैठका तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भारतीय जनता पार्टी स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या बरोबर माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शहर अध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पॅनल निहाय सभांचा धडाका सुरू आहे.

या बैठकीत भाजपचे सर्व जेष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी देखील एक सुराने स्वबळावर निवडणूक लढण्यास उत्सुकता दर्शविली. कल्याण-डोंबिवली मध्ये भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा मोठा वर्ग राहत असून पूर्वी पासून भाजप चा गड मानला जातो म्हणून या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे मत जिल्हा अध्यक्ष नंदु परब यांनी व्यक्त केले.

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून बलात्कार केला आणि व्हिडीओ काढल्याने एकच खळबळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : दिल्लीत एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर भागातील एका हॉटेलमध्ये १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने २० वर्षीय तरुणावर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली, असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी तिच्या कॉलेजमध्ये शिकत असून मित्र आहे. त्याने मैत्रीच्या बहाण्याने तिला 'हॉटेल ऍपल' मध्ये नेले. पोहोचताच त्याने तिला अंमली पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने त्याच्यावर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचा आरोपही केला आहे. गुन्हा करत असताना त्याने फोटो, व्हिडीओ काढले असा तिचा दावा आहे. 

पीडित तरुणी हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहे. ती दिल्लीच्या रोहिणी येथील 'बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज'च्या वसतिगृहात राहत आहे. पोलीसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशात आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका शाळेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, दक्षिण दिल्लीच्या सीआर पार्क परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षकाने तीन वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या शिक्षकानेही मुलीला धमकावले आणि ब्लॅकमेल केले, असे पोलीसांनी सांगितले.

बलात्काराची तक्रार कशी दाखल करावी ?
पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑनलाइन (१०० किंवा महिला हेल्पलाइन १८१) तक्रार नोंदवा. CrPC कलम १६४A अंतर्गत रुग्णालयात तक्रार नोंदवता येते. पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये कायद्याने मदत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, ज्यात महिला पोलीस किंवा वकीलाची उपस्थिती असते. तक्रार नोंदवण्यासाठी वय किंवा इतर कोणतीही अट नाही.

बलात्कार प्रकरणात कायद्याची तरतूद काय आहे ?
भारतीय न्याय संहिता (२०२३) अंतर्गत बलात्कारासाठी किमान १० वर्षांची तुरुंगवास आणि कमाल मृत्युदंडाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कारासाठी कठोर शिक्षा, ज्यात २० वर्षांपर्यंत किंवा मृत्युदंड. नवीन कायद्यात पीडितांच्या संरक्षणासाठी झीरो टॉलरन्स धोरण आहे, ज्यात तपासासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वैवाहिक बलात्कार अद्याप गुन्हा मानला जात नाही, परंतु यावर चर्चा सुरू आहे.

बलात्कार पीडितांसाठी मदत आणि संरक्षण काय उपलब्ध आहे ?
पीडितांना वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत मिळते. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) किंवा UNFPA सारख्या संस्था समुपदेशन देतात. POCSO कायद्याखाली अल्पवयीनांसाठी विशेष संरक्षण. पोलिस तपासादरम्यान पीडितेची ओळख गोपनीय ठेवली जाते आणि तिला सुरक्षित निवासाची व्यवस्था केली जाते. 

हेल्पलाइन क्रमांक:
 १०९८ (बालिका) किंवा १८१ (महिला).

सरकारच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ सिरप देण्यास बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : मध्य प्रदेशात कफ सिरप दिल्यानंतर लहानमुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याने अनेक राज्य सरकारनी या औषधांवर बंदी घातली असताना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकारने दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेतला आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयाने उच्चस्तरिय व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन जिल्हा स्तरिय अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. औषधांचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्याने करावा आणि याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आदेश आरोग्य कर्मचारी आणि संबंधितांना दिले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये सामान्यत: सर्दी आणि पडसे आपोआपच बरा होत असतो. यासाठी औषधे देणे अनावश्यक असते.

सर्वसामान्य जनतेनेही मनाने डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरु केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांचे रिस्क बेस्ड इन्स्पेक्शन (Risk-Based Inspection) करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथके नेमली आहेत.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये नवकन्या आणि मातृ पितृ पूजन व दसरा उत्साहात साजरा..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) :  दर वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील 'जे एम एफ' मंडपम मध्ये नव कन्या पूजन करण्यात आले. "या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेंनं संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" पार्वती मातेची नऊ रूपे ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गा तसेच सरस्वती, लक्ष्मी, पद्मावती, या शिशु विहार मधील छोट्या बालिका नव दुर्गेच्या रूपात नटून थटून आल्या होत्या. त्याच बरोबर व्यंकटेश, भृगूऋषी, गणपती बाप्पाच्या रूपात छोटी बालके आली होती. जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये स्वर्गच अवतरला होता असे जाणवत होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेश दारापासून सर्व देवी देवतांचे  पाय प्रक्षाळून व त्यांचे औक्षण करून सर्वांना सन्मानाने वाजत गाजत मंडपम मध्ये आणून त्यांच्या स्थानावर विराजमान केले. नऊ देवी देवतांची शास्त्रशुद्ध पूजा करून आरती केली व सर्व देवींची साडी खण नारळाने ओटी भरली. शिशु रूपातील नव दुर्गेच्या तेजानी जणू सारा जे एम एफ मंडपम तेजोमय  झाला होता. सर्व पालकांनी देखील कन्या पूजन केले. देवीच्या नवरात्र बरोबरच ही नवरात्र गिरी बालाजी म्हणजेच व्यंकटेशाची देखील आहे म्हणूनच शेष शय्येवर साक्षात बालाजी व त्यांच्या द्विपत्नी लक्ष्मी आणि पद्मावती देखील आपल्या रूपात विराजमान झाल्या होत्या. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी भृगूऋषी आणि लक्ष्मी रागाने का निघून गेली याची कथा सांगितली. शिशु विहारच्या उप मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी बालकांना उत्तम सहकार्य करून शिशु रूपातील देवतांनी नाटिका रंगवली.
     
"मातृ देवो भव, पितृ देवो भव गुरू देवो भव, आचार्य देवो भव"
ब्रह्मांडामध्ये देवांपेक्षाही सर्व श्रेष्ठ कोण असेल तर "माता पिता" म्हणूनच गणपती बाप्पाने देखील आपल्या आईवडिलांचे पूजन करून त्यांनाच तीन प्रदक्षिणा घातल्या, हेच संस्कार आपल्या पाल्यामध्ये असणे गरजेचे आहे म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या भोवती परिक्रमा केली.
अनेक वेळा भगवतीने नऊ पेक्षा अधिक रूपात प्रकट होऊन वाईट शक्तींचा संहार केला आहे, आज ही निरागस दिसणारी शिशु देवींची रुपे म्हणजे आपल्या मधील षडरिपुंवर मात करून ब्रह्मचारिणी देवी  संसारात राहून सुद्धा विरक्त जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगुन नऊ रूपमधील देवींची माहिती सांगितली तसेच वैकुंठपती व्यंकटेशाला देखील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी भगवतीला पाचारण करावे लागले असेही सांगितले. त्यानंतर सर्वांना नवरात्री व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी म्हणजेच दसरा, रामाने रावणाचा वध करून विजयी पताका फडकवत ठेवली म्हणून आजही आपण नऊ शक्तींची पूजा करून विजया दशमीला वाईट गोष्टी नष्ट करून एकमेकांना आपट्याची पाने 'सोने' म्हणून pदेवाणघेवाण करत आलिंगन देतो, संस्कृती आणि संस्कार हे आपल्या चांगल्या विचारांवर टिकले आहेत म्हणूनच ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीनेही टिकवून ठेवावी हीच शिकवण शाळेच्या माध्यमातून देत आहोत असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी देखील देवी झालेल्या सर्व बालिकांचे कौतुक केले, तर इतर वेळी एका ठिकाणीही शांत न बसणारे हे विद्यार्थी खरोखरच संयमाने बसले आहेत तर साक्षात देवीच स्वर्गातून खाली उतरून बसल्या आहेत असा भास होत असल्याचा त्या म्हणाल्या. शिशु विहारच्या सर्व शिक्षिकांनी, पालकांनी देखील मनापासून मुलींना वेशभूषा करून सहकार्य केले. या नंतर सर्व पालक, शिक्षकांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करून गरबा दांडिया चा खेळ रंगला.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले शाश्वत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना शाश्वत केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी  दिली.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तसेच या विमानतळाला आदरणीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या भूमिपुत्रांच्या तीव्र भावनांची माहिती दिली. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढावा. तसेच आदरणीय दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत शाश्वत करावे, अशी आग्रही मागणी कपिल पाटील यांनी केली. 
लोकसभेत २०१६ मध्ये सर्वप्रथम कपिल पाटील यांच्याकडून दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला. तो नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर तो गृह मंत्रालयात मंजुरीसाठी गेला. गृह मंत्रालयाच्या मान्यतेनंतर संबंधित प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला, अशी माहिती कपिल पाटील यांनी या बैठकीत दिली. तसेच संबंधित प्रस्तावात अडचणी आहेत का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार असल्याचे शाश्वत केले.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व इतर लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा समावेश होता.

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाचे '५८ व्या युथ फेस्टिवल मुंबई' विद्यापीठामध्ये नावलौकिक व पालकांसह कौतुक सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) : डोंबिवली स्थित 'जेएमएफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. '५८ व्या युथ फेस्टिवल' मध्ये मुंबई विद्यापीठातील ३०० च्या वर १२ झोन मधुन २७ कॉलेजमध्ये 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माईम ऍक्ट मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच मराठी नाटक 'माझी शाळा' यामध्ये ३५० च्या वर १२ झोन मध्ये ४७ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि यात रौप्य पदक पटकविणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक व गुणगौरव सोहळा 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या मधुबन वातानुकुलीत बँक्वेट हॉलमध्ये आज दिनांक २७/०९/२०२५ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या नियोजनाखाली पार पडला. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ एडिटर 'सी न्यूज भारत' चैनल दिल्ली चे श्री. पवन शर्मा हे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा आणि सन्मान करण्याचे सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत किती महत्त्वाची आहे जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकतात आणि इथेच परिवाराचा एक हिस्सा म्हणून नोकरीही करतात. 
सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना आपल्या पाल्याचे कौतुक बघुन अतिशय आनंद झाला होता व डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन.नाडार  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. असेच यश संपादन करत रहा असेही मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज चे डॉ . कुमार सर, उपप्राचार्य डॉ. वनिता लोखंडे, प्रमुख समन्वयक मंजूला ढवळे हेही उपस्थित होते. या कौतुक सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति आपले मनोगत व्यक्त केले आणि आपले अनुभव सांगितले. नाटकाचे दिग्दर्शक प्रथमेश देवकोळे आणि शुभम जाधव यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच प्राध्यापिका मृणाली जाधव यांनी मुलांच्या तयारीला मोलाचे सहकार्य केले.  कार्यक्रमाला संपूर्ण महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

माइम ऍक्ट सहभागी..
पराग सुतार, तन्वी गुरव, दिवेश मोहिते, निधी अमीन, मितेश पाटील, मंथन पाटील
साथीदार
 मयंक कोठारी, स्नेहा मिश्रा

माझी शाळा स्किट सहभागी..
दिवेश मोहिते, तन्वी गुरव, यश बडेकर, साई कुड्तुडकर, दुर्वा घाडी, सानिका तांबोळी
साथीदार
आयुष सावंत, संस्कार कदम
या कार्यक्रमाचे टिळक देऊन स्वागत सौ. खुशबू दुबे तसेच सूत्रसंचालन प्रा. एकनाथ चौधरी आणि प्रा. सुनिता पाटील यांनी केले.