BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१२ - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर, बृहनमुंबई, नवी मुंबई व ठाणे ग्रामीण हद्दीतील २६ गुन्ह्यांचा छडा लावत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये इतकी आहे.

अटक केलेले आरोपी

गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण व घटक-२ भिवंडी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत खालील आरोपींना जेरबंद केले आहे..
१) अतुल सुरेश खंडाळे (वय:२४ वर्षे, राहणार. हडपसर, पुणे)
२) शेखर गोवर्धन पवार (वय:३० वर्षे, राहणार. जळगाव)
३) आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय:२३ वर्षे, राहणार. चक्की नाका, कल्याण पश्चिम)
४) गाझी लकीर हुसैन (वय:१९ वर्षे, राहणार. आंबिवली, कल्याण)
५) मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय:३१ वर्षे, राहणार. भिवंडी)

उघडकीस आलेले गुन्हे

अटक आरोपींकडून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, वासिंद, तळोजा, नवी मुंबईसह मुंबईतील धारावी, कांदिवली, माहिम, नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले २६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये भादंवि कलम ३७९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर, व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाची कामगिरी

या तपास मोहिमेत वपोनि. जनार्दन सोनवणे (घटक-२, भिवंडी), वपोनि. अजित शिंदे (घटक-३, कल्याण) यांच्यासह सपोनि. श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता. महिलांसह जवळपास ५० हून अधिक अंमलदारांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या मोठ्या चोरी प्रकरणांची मालिकाच उघडकीस आली आहे. ठाणे पोलीसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणाला दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांचा नामांकित "जे एम एफ शिक्षाविद पुरस्कार २०२५" पुरस्कृत सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  ५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे हाडाचे शिक्षक आणि स्वतंत्र  भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती, त्यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीय हा दिवस शिक्षक दीन म्हणून साजरा करतात. 
'जे एम एफ' संस्थेमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिक्षक दीन पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुमारे  ३० मान्यवर शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांना 'जे एम एफ  पुरस्कार २०२५' ने पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थान, गुजराथ, दिल्ली अशा अनेक ठिकाणाहून शिक्षाविद शिक्षकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जाह्नवी राजकुमार कोल्हे त्याच बरोबर मुख्य अतिथी श्री. एस.सत्यकुमार, (हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच विशेष अतिथी पद्मश्री पुरस्कृत  श्री. गजानन जगन्नाथ माने, श्री. ए.के.सिन्हा, श्री. बी.एम.सिन्हा, डॉ. मोसेझ, श्री. युवराज कोल्हे, श्री. कोळेकर, डॉ. कुमार, श्री. परशुराम भांगे गुरुजी, सौ. पुष्पा भांगे व उपस्थित असलेले सर्व विभूषित शिक्षकगण तसेच इतर पदाधिकारी यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रशिक्षक रमेश वागे, सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम ढोलताशे वाजवून व नृत्य शिक्षक अभिषेक देसाई व सौ. कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी  स्वागत नृत्य करून जल्लोषात स्वागत केले. सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या दिग्दर्शनाखाली मुलांनी लघुनाट्य सादर केले तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक मोठे शिक्षक होऊन गेले. 
यावेळी प्रसार माध्यमाचे मुख्य श्री. रोहित राजगुरु, अखिल नायडू, आकाश व त्यांच्या चमूने तयार केलेली विभूषित शिक्षकांची लघु चित्रफित दाखवण्यात आली तर 'जाह्मविज मल्टी फाऊंडेशन' चा २५ वर्षाचा प्रवासाचा माहितीपट देखील  दाखवण्यात आला. शिक्षक कसा असावा तर प्रेम आणि उद्वेग यांचा समतोल साधणारा असावा, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढविणारी असते तर वेळप्रसंगी पाठीवर मारलेली तीच थाप ही वाईट वळणावरून चांगल्या मार्गावर नेणारी असते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिक्षणाने माणूस मोठा होतो तर अनुभवाने माणूस शहाणा होतो, पृथ्वीतलावरील सर्वोच्च श्रेष्ठ पद व सन्मान कोणते असेल तर ते शिक्षक होण्याचे. आणि हे भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही. ज्ञान दानाचे कार्य करत असताना देखील विद्यार्थी दशेतली शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणे म्हणजे शिक्षक. शिक्षकांचे ऋण हे कधीही न फिटणारे असते किंबहुना ते न फेडता त्या साठलेल्या व्याजावर मिळालेल्या ज्ञानाच्या  यशाचे मनोरे बांधावेत असे सांगून, आज अनेक उच्चशिक्षित, विभूषित शिक्षक मंडळींना "जे एम एफ शिक्षाविद २०२५"  पुरस्कार प्रदान करताना मला वाटते की एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला दिलेला आशीर्वादच आहे. असेही ते म्हणाले.
ज्या प्रमाणे मातीला आकार देऊन कुंभार मडके बनवतो त्याच प्रमाणे  बालमनाच्या कोऱ्या पाटीवर  श्री गणेशा लिहून भविष्य घडवतो तो शिक्षक होय, शिक्षणाला मर्यादा नाहीत आणि शिकायला वय नाही आणि शेवटपर्यंत शिकणारा आणि शिकवणारा असतो तो म्हणजेच शिक्षक. असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने  रौप्य महोत्सव मानचिन्ह, 'जे एम एफ' शिक्षाविद पुरस्काराचे मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल प्रदान करण्याकरिता उपस्थित व निवडक ३० मान्यवर शिक्षकांना मंचावर बोलावून श्री. एस.सत्यकुमार अध्यक्ष, हेवी वॉटर बोर्ड, भारत सरकार, मुंबई, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जाह्नवी कोल्हे, यांच्या हस्ते पूरस्कार देण्यात आले. तर संस्थेतील सर्व शिक्षकांना चांदीची गणपती व लक्ष्मी ची प्रतिमा देण्यात आली. पुरस्कार विजेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. एकनाथ चौधरी, सौ. श्रेया कुलकर्णी, श्री. योगेश शिरसाट, शर्वरी मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या ज्योती व्यंकटरामण यांनी केले. राष्ट्रगान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम 'ना भूतो ना भविष्यती' असा झाला.

चैन स्नॅचिंग सारख्या जबरी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलीसांनी केला परदाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास चामुण्डा सोसायटी गेट जवळ, ९० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली (पूर्व) येथुन वृध्द महिला पायी  चालत जात असताना मोटार सायकलवर दोन इसम येवून वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन खेचुन पळून गेले. त्याबाबत डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस उप आयुक्त साो. श्री. अतुल झेंडे, व सहा पोलीस आयुक्त  साो. श्री. सुहास हेमाडे यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जावदवाड यांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी व शोध घेणेकामी डोंबिवली पोलीस ठाण्याचे शोध पथकांतील सपोनि. मुपडे व पोउनि. चव्हाण यांच्या दोन टिम तयार करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाचे व इतर ठिकाणाचे एकूण १०६ सी.सी.टिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता आरोपी याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एमएच-२०/ एफआर-१८५१ ही असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोटार सायकल मालकास संपर्क केला असता त्याने सांगितले की, सदर मोटार सायकल त्यांने दिनांक २२/०८/२०२५ रोजी नारायण पेठ, पुणे येथे पार्क केली असुन सदर ठिकाणाहुन ती चोरीस गेली  आहे त्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा नोंद आहे. यावरून समजले की, दाखल गुन्ह्यातील आरोपी यांनी सदर मोटार सायकल चोरी करून डोंबिवली येथे येवुन चैन स्नॅचिंग केली आहे. त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचा गुन्हा केलेल्या ठिकाणाचा माग घेवुन त्यांच्या बाबत अधिक माहिती प्राप्त केली. तपासादरम्यान गुन्हे तपास पथकांनी अथक परिश्रम घेवून सदर आरोपी हे सुनिल नगर, डोंबिवली (पूर्व) येथे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावुन सदर संशयीत्त इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नावे विचारता त्यांनी त्याची नावे १) अभय सुनील गुप्ता, (वय: २१ वर्षे), राहणार. कुमारनटोला, खुटार रोड, गोला गोकर्णनाथ, ठाणे. गोला गोकर्णनाथ, जिल्हा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश, २) अभिषेक ओमप्रकाश जौहरी, (वय: ३२ वर्षे), राहणार, खोली क्रमांक १४/१५, हरिहरगंज, ठाणे. कोतवाली, फतेहपूर, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश, ३) अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला, (वय: २७ वर्षे), राहणार, खमरीया, ठाणे, खेरी, जिल्हा. लखीमपुर खिरी, उत्तरप्रदेश, अशी असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अभय सुनिल गुप्ता, याच्याकडे १ गावठी रिव्हॉलव्हर व अभिषेक ओमप्रकाश जौहरी, याच्याकडे ०४ जिवंत काडतूसं सापडले. तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदरचा मुद्देमाल हा डोंबिवली व मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याने त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे, येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. आरोपी यांच्याकडे १ गावठी कट्टा व ०४ जिवंत काडतूसं मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६८४/२०२५ आर्म ऍक्ट कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे वरील आरोपीकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ३०,०००/- रू. किंमतीचा एक देशी बनावटीचा गावटी क‌ट्टा..
२) ८,००० /- रू. किंमतीची, गावठी बनावटीची ०४ जिवंत काडतुसे..
३) ३७,२६०/- रू. किंमतीची, एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
(डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं. ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५)
४) २,१५.०१०/- रू. किंमतीचे, एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम..
(मानपाडा पोलीस ठाणे गुरनं. १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५)
५) ९०,०००/- रू. किंमतीची. यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची नंबर एमएच-२०/ एफआर-१८५१ (विश्रामबाग पो.स्टे, पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) 

तरी सदर ३ इसमांकडे वरिल प्रमाणे असा एकूण ३,८०,४२० /- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा ठाणे
१) डोंबिवली पोलीस ठाणे गुरनं.  क्रमांक ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (६). ३(५) मधील एक सोन्याची लगड, ४१४ ग्रॅम वजनाची..
२) मानपाडा पोलीस ठाणे गुरनं १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९ (४), ३(५) मधील एक सोन्याचे मंगळसुत्र, २३.८९ ग्रॅम वजनाचे, मध्यभागी दोन वाटया असलेले, अर्धवट तुटलेले..

पुणे जिल्हा
३) विश्रामबाग पो.स्टे. पुणे, गुरनं १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३ (२) मधील मॅट ब्लॅक रंगाची एक यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची मोटार सायकल क्र. एमएच-२०/एफआर-१८५१..
४) बिबेवाडी पोलीस ठाणे गुरनं. २१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०९(४) ३(५)
५) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ३६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०३(२)
६) हडपसर पोलीस ठाणे गुरनं.  ७६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३०४(२) ३(५)

उत्तर प्रदेश राज्य येथे अटक आरोपी अभिषेक ओमप्रकाश जौहरी याच्यावर दाखल असलेले गुन्हे..
१) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६६/२०१९ शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे..
२) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. क्र. २६९/२०१९ भादंवि. कलम ४११, ४१४, ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे..
३) हारगाव पोलीस ठाणे गुरनं. २६४/२०१९ भादंवि. कलम ३९, ४०२ प्रमाणे..
४) कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. ५९६/२०१९ भादंवि. कलम ३९२, ४११ प्रमाणे..

तसेच आरोपी अर्पित ऊर्फ प्रशांत अवधेश शुक्ला याच्या विरुद्ध भादंवि. कलम ३०२ प्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

वरील आरोपी यांची पोलीस कोठडी मंजूर असून त्याचा अधिक तपास पोउनि. प्रसाद चव्हाण करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव, (पूर्व प्रादेशिक विभाग) कल्याण, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण श्री. अतुल झेंडे,  मा. सहा पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली  मा. वपोनि. श्री. गणेश जावदवाड, मा. पोनि. श्री. विक्रम गौड, मा. पोनि.(गुन्हे) श्री. राजेंद्र खेडकर डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. अच्युत मुपडे, पोउनि. प्रसाद चव्हाण, पोहवा. सुनील भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, पोकॉ. शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी यशस्वीरित्या केली आहे.

विवाह नोंदणी सुट्टीच्या दिवशीही होऊन त्याचदिवशी मिळणार नोंदणी प्रमाणपत्र..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

मुंबई :  नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेगवान तसेच सुलभकरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याचदिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. 

प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे तसेच नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वेग आणणे, यासाठी सर्व विभाग तथा खाती यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. असे असले तरी, वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे. याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता, महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५००/- इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे म्हणाले की, या दोन्ही सेवा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहेत. या दोन्ही नवीन सेवांमुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया आणखी जलद होईल. तसेच, विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

मुंबईतील धावपळीचे, धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता, नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांनाही कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुट्टी घेऊन विवाह नोंदणीसाठी महानगरपालिकेकडे यावे लागते. कारण, सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कार्यकाळात, विवाह नोंदणीसाठी नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सबब, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पती-पत्नी किंवा त्यांचे साक्षीदार यांना आपल्या कामकाजाच्या दिवशी सुटी घ्यावी लागते. यामुळे संबंधितांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही अडचण दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठवडा अखेरीस (वीक एन्ड) म्हणजे शनिवार व रविवार या दोन्ही सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत विवाह नोंदणी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये, दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - 'ए', 'सी', 'ई', 'एफ दक्षिण', 'जी दक्षिण', 'एच पूर्व', 'के पूर्व', 'पी दक्षिण', 'पी उत्तर', 'आर मध्य', 'एल', 'एम पश्चिम', 'एस' या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी 'बी', 'डी', 'एफ उत्तर', 'जी उत्तर', 'एच पश्चिम', 'के पश्चिम', 'पी पूर्व', 'आर दक्षिण', 'आर उत्तर', 'एन', 'एम पूर्व', 'टी' या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

दरम्यान, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या पाच दिवसांमध्ये होणारी विवाह नोंदणीदेखील जलद व्हावी, संबंधितांना वारंवार महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी आणखी एक सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. 'जलद विवाह नोंदणी सेवा' (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून ही सेवा ओळखली जाईल. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या ३० विवाह नोंदणी कोट्यामधून २० टक्के म्हणजे एकूण ६ विवाह नोंदणी या 'जलद विवाह नोंदणी सेवा' म्हणून राखीव राहतील. या जलद नोंदणीचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना, सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करुन त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. मात्र, या दोन्ही विवाह नोंदणी सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (पब्लिक हॉलिडे) उपलब्ध नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशी निमित्त ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहरात ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जना निमित्त होणाऱ्या मिरवणुका व या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व हे उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

सणांच्या काळात गर्दीचा फायदा घेत चैन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स व मोटारवाहन चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष शाखा व गुन्हे शाखेतील साध्या वेशातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत.
सोशल मिडीयावरून धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओ पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीया सेलला विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.

बंदोबस्तासाठी उप-पोलीस आयुक्त ११, सहाय्यक पोलीस आयुक्त २६, पोलीस निरीक्षक १००, तसेच ७००० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार, मुंबई व लोहमार्ग पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या व ८०० होमगार्ड्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय बंदोबस्तादरम्यान सर्व ठिकाणी ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाच्या या तयारीमुळे दोन्ही सण शांततेत व उत्साहात पार पडतील, असा विश्वास पोलीस आयुक्त यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस कासारवडवली पोलिसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा अग्नीशस्त्र बाळगणे खरेदी-विक्री करणाऱ्या तसेच समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त ठाणे यांनी सुचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त, व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर यांनी विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याकरिता आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ५, ठाणे शहर श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम चालू आहे. त्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीत व अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी-विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक ०१/०९/२०२५ रोजी कासारवडवली पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनि. मनिष पोटे यांना नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे याठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र विक्री करण्याकरीता येणार असल्याचे खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर यांना कळविल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नागलाबंदर सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी सापळा लावुन दिनांक ०१/०९/२०२५ रोजी २२:५५ दरम्यान इसम नामे जोगिन्दर लछीराम राजभर (वय: २७ वर्षे), धंदा: प्लंबर, राहणार: कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम मुळ राहणार ग्राम तणवा, ता. जखनिया, जि. गाझीपुर, राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे असलेल्या लाल रंगाची सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीन सह व ०२ जिवंत काडतुसे किंमत अंदाजे रु.६५,६००/- मिळुन आले. सदर अग्निशस्त्र व काडतुसे त्यांनी बेकायदेशीर बाळगल्याबाबत त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे कडील मनाई आदेशाचा भंग केला आहे, त्याच्या विरूध्द कासारवडवली पोलीस स्टेशन गु.र.नं ८१९/२०२५ भा.ह.का.क. ३, २५ सह म. पो. अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, वागळे इस्टेट, ठाणे, श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर, सपोनि. मनिष पोटे, पोउपनिरी. नितीन हांगे, सुनिल सुर्यवंशी, पो. अंमलदार. जगदीश पवार, जयसिंग रजपुत, गोरक्षनाथ काळे, संदीप तुपे यांनी केलेली असून पुढील तपास सपोनि. मनिष पोटे हे करीत आहेत.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी "महामुंबई मंथन" चे संपादक व विशाल वी. शेटे यांचे विरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक १३/०८/२०२५ रोजी 'महामुंबई मंथन' या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती समाजातील लोकांचा अवमान करणारी बातमी सुपारी घेऊन छापून आणल्यामुळे "महामुंबई मंथन" चे संपादक व संस्थापक अध्यक्ष (सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) चे विशाल वी. शेटे यांनी या प्रकरणाला कटकारस्थान रचून आर्थिक देवाण-घेवाण करून शहरात जातीय दंगल घडवून आणू पाहणाऱ्या 'अविष्कार बार रेस्टॉरंट' तसेच 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' चे मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौ. आशा अभय गोरे या सर्व जातीवाद्यांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कलम ३(१) (आर) (एस) (टी) (यु) व्ही प्रमाणे तसेच बी.एन.एस कायदा कलम २९९, ३५२, ३५६, ६१, ७ प्रमाणे तसेच इतर संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याबाबत यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्षणराव अंभोरे यांनी अशी मागणी डोंबिवली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे यांच्याकडे केली आहे.
:
दिनांक १३/०८/२०२५ रोजी 'महामुंबई मंथन' या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती जमातीतील लोकांचा अवमान करणारी बातमी वृत्तपत्रावर छापून प्रसिद्ध करण्यात आली त्या संबंधात ह्या अगोदर संविधान चौकात बाजूलाच असणाऱ्या 'अविष्कार बार रेस्टॉरंट' व 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' असणाऱ्या रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये अनाधिकृत अतिक्रम केलेला 'अविष्कार बार रेस्टॉरंट' तसेच रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारे 'गुरुदेव पॅलेस गेस्ट हाऊस' तसेच त्या बिल्डिंगमध्ये अनाधिकृतपणे काम चालू असल्याच्या तक्रारी महानगरपालिका व पोलीस स्टेशनला याआधी देण्यात आलेल्या असून याचाच मनात राग धरून पैशाच्या जोरावर काही जातीयवादी पत्रकार/संपादक हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून एकत्रित येऊन कटकारस्थान रचून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी रेस्टॉरंट बारचे मालक लॉजिंग चालक-मालक अभय गोरे, मुलगा अभिजीत अभय गोरे, सौं. अशा अभय गोरे, 'महामुंबई मंथन' वृत्तपत्राचे संपादक व विशाल वि. शेटे (संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन) या सर्वांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे तसेच इतरही संबंधित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी असे पत्र दिनांक २१/०८/२०२५ रोजी देण्यात येणाऱ्या ह्या तक्रारी अर्ज संदर्भात संबंधितांवरती चौकशी होऊन ३०/०८/२०२५ पर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा असे मागणीत नमूद करण्यात आलेले होते. फौजदारी गुन्हे दाखल न करण्यात आल्यास कुठलीही सूचना न देता दिनांक १०/०९/२०२५ पर्यंत गुन्हे दाखल नाही केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाणे कार्यालयावर पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये शहरातील सर्व बहुजन पक्ष सामील होणार असल्याची नोंद व माहिती लक्षणराव अंभोरे यांनी  प्रसिद्धी पत्रकातुन दिली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता व माझे अस्तित्व' चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  अगणित पदव्या प्राप्त केलेले 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे हे नेहमीच वेगवेगळ्या नवीन विषयाची हाताळणी करून त्या विषयांमधील सखोलता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यरत असतात. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा विषय होता ' कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (Artificial Intelligence) जे सध्याच्या काळात कुतुहलाचा आणि नवीन काही शिकण्याचा विषय झाला आहे. याच विषयावर आणि या सारख्या अनेक विषयांवर खूप काही शंका कुशंका विद्यार्थ्यांच्या मनात रेंगाळत असतात त्यासाठीच चर्चासत्राचे आयोजन केले गेले. दहा दिवसांसाठी 'जे एम एफ' चा गणपती बाप्पा मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये विराजमान झाला आहे. बाप्पाची आरती करून चर्चासत्राची सुरुवात झाली.
गणपती हा बुद्धीचा दाता आहे, म्हणूनच मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने अनेक नवनवीन गोष्टी निर्माण करतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तर आजच्या युगात स्वतः मध्ये प्रगल्भता आणून विकास करावा हे सांगताना अनेक तज्ञांची नावे घेऊन उदाहरण दिले. एखादे चित्र मनात साकारून कल्पनेतून ते सजीव करणे म्हणेजच स्वप्न पडणे होय. याच स्वप्नांना अस्तित्वात आणून, रेखाटलेल्या चित्रांना सजीव करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence या तंत्रज्ञान माध्यमातून साकारले जाते. सध्याच्या काळात रोजच्या जीवनातील घडामोडी मध्ये Artificial Intelligence हा महत्वाचा घटक ठरला आहे. तंत्रज्ञानाने माणूस किती पुढे जातो त्यासाठी AI हे चपखल उदाहरण आहे. नवनवीन, प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे चेहरे बनवून त्यामधून सहजपणे व्हिडीओ बनवता येतात. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने  संगणक बनवला, त्यामध्ये अनेक विषयांचे प्रोग्राम आखून देऊन सर्वांना सहज सोयीचे माध्यम उपलब्ध करून दिले. तर अनेक अभ्यासक्रम देखील माहिती करून दिले. थोडक्यात काय तर पूर्वी आपण अभ्यास करताना मार्गदर्शिका अर्थात गाईड वापरत असू तेच आता AI च्या माध्यमातून सुलभपणे गाईड उपलब्ध झाले आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षरित्या वाचून तुमच्या शंकेच निरसन होते.
सारासार विचार करता जी गोष्ट जास्त फायदेशीर होऊन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहते तिचीच दुसरी बाजू ही तोट्याची देखील असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, जग जवळ आले, अनेक गोष्टी साकारायला मिळाल्या, परंतु त्याचा परिणाम असा झाला की माणूस विचार करून आपल्या बुद्धीने जे कार्य करत होता ती बुद्धिमत्ता खुंटत चालली आहे, सहजरित्या मिळालेल्या गोष्टीचा आनंद हा असतोच परंतु त्या गोष्टीवर  विचार करून ती कल्पना शक्तीने अंमलात आणून साकारलेल्या गोष्टीचा आनंद हा आभाळा एवढा आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. परंतु काळाबरोबरच आपणही चालले पाहिजे म्हणूनच AI हे माध्यम तुम्हा तुम्हां आम्हाला नवीन दिशा देणारे आहे म्हणूनच काळानुसार रोजच्या घडामोडी मध्ये सतर्क राहा असेही सांगितले.
प्रसार माध्यमाचे मुख्य आयोजक श्री.रोहित राजगुरु व त्यांच्या चमू ने कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे अनेक चित्र दाखवून त्यांचे चलचित्र कसे तयार करता येते हे देखील विद्यार्थ्यांना दाखवले. जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी व सर्व शिक्षक या चर्चासत्रात उपस्थित होते. अनेकांनी प्रश्न विचारून उत्तरे देखील घेतली. वंदे मातरम् म्हणून चर्चासत्राची सांगता झाली.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाबाबत गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळाले आहे. सरकारने याबाबतचा जीआर काढल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडत आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे आणि ते आंतरवाली सराटी च्या दिशेने निघाले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला जीआर

१. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

२. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे. पैठण (प्रतिष्ठाण) ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक म्हणून आज सुद्धा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दि.१७ सप्टेंबर, १९४८ साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमितून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी-वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तिर्थक्षेत्रे निर्माण झाली. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत.

३. मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमितून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र नागा, एकनाथ, सेना न्हावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमिमध्ये सहिष्णूता, भागवत धर्माचा प्रसार, भूतदया, समानतेचा संदेश दिला आहे. तसेच श्री गुरू गोविंद सिंघजी यांची समाधी नांदेड येथे असून त्याठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आजसुद्धा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात. या नद्याने यांतील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे. गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तिरावर वसलेला आहे.

४. असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दि. ०१ नोव्हेंबर, १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दि.०१ मे, १९६० पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालिन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी, कुणबी मराठा तसेच मराठा- कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दि.०७ सप्टेंबर, २०२३ रोजी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी/दौरे करून बैठका घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी याकारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे ७ हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहेत. तसेच, देशाची जनगणना आणि त्याअनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत. याचदरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी शासनाने स्विकारल्या आहेत व याआधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.

५. तथापि, मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी-मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निदेशित करण्यात आले असून, त्याकरिता उक्त समितीस दि.३१ डिसेंबर, २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड व उस्मानाबाद) माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. या कागदपत्रांमध्ये / गॅझेटिअरमध्ये (सन १९२१ व सन १९३१) कुणबी/कापू अशा नोंदी आहेत. यापुर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १८ च्या पोट कलम १ मध्ये आणि नियम, २०१२ च्या नियम ४ मधील उप-नियम (२) मधील खंड (च) मध्ये (च) नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४ अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, मराठा समाजास कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे. आता, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन वाचा क्र.१ व क्र.३ अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

समिती सदस्यः

१. ग्राम महसूल अधिकारी
२. ग्रामपंचायत अधिकारी
३. सहायक कृषी अधिकारी

मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि.१३.१०.१९६७ पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.

या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.

श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण विक्रमाची 'ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड' मध्ये झाली नोंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पिंपरी, दि २ : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' मध्ये करण्यात आली आहे. या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र 'ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड' या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनेही डॉ. दीपक हरके यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डॉ. हरके यांनी गणेश भक्त, भाविकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आणि मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण समजाला न्याय द्यायचा हेच ध्येय होतं. तो न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, अन्यायाची भावना निर्माण होणार नाही असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात.

“मराठा समाजाच्या हिताचा तोडगा मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला. त्यामुळे मनोज जरांगे यांचं उपोषण आता संपवण्यात आलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. मात्र मनोज जरांगे यांची सरसकटची मागणी होती. पण त्यात कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाहता सरसकट करणं शक्य नव्हतं. ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून दिली. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण समूहाला नसून, व्यक्तीला मिळत असतं आणि त्याने तो दावा करायचा असतो. त्यांनीदेखील काल ती भूमिका समजून घेतली, स्विकारली आणि कायद्यात सरसरकट बसत नसेल तर करु नका सांगितलं. त्यातून तोडगा निघाला आणि उपसमितीने चर्चा करुन मसुदा तयार केला आणि आता जीआर काढला गेला आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“मला उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि सर्वांचे अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सातत्याने अभ्यास, बैठका, चर्चा करुन मार्ग काढला आहे. मार्ग निघाल्यामुळे मराठवड्यात राहणारे मराठा समाजाचे लोक ज्यांचा कधीकाळी त्यांच्या रक्ताच्या नात्यातील कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना नियमाने प्रमाणपत्र देता येतं. हैदराबाद गॅझेटमुळे या नोंदी शोधणं सोपं होईल. फॅमिली ट्री स्थापित करुन आरक्षण देता येणार आहे. म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सर्वांना ते आरक्षण मिळेल,” असंही त्यांनी सांगितलं.

“ओबीसी समाजात जी भीती होती, सरसकट सगळे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेदेखील आरक्षण घेतील, तसंच इतर समाजाचेही घुसण्याचा प्रयत्न करतील. तर अशाप्रकारे होणार नाही. ज्यांचा खरा दावा आहे, पण कागदपत्रांच्या अभावी मिळत नव्हता अशा समाजाच्या लोकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे. मराठवाड्यात रेकॉर्ड्स नसल्याने त्यांच्यासाठी मोठा प्रश्न होता. त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा काढू शकलो आहोत जो कोर्टातही टिकेल आणि लोकांना फायदा होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.

भारताने तयार केली पहिली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : भारताची पहिला स्वदेशी 'विक्रम मायक्रोप्रोसेसर चीप' केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमिकॉन इंडिया २०२५ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थिती होत्या.

‘विक्रम’ मध्ये ३२-बिट मायक्रोप्रोसेसर आणि चार मंजूर प्रकल्पांचे चाचणी चिप्सचा समावेश होता. विक्रम चिपची रचना इसरो च्या सेमिकंडक्टर लॅबमध्ये झाली आहे. ती प्रक्षेपण यानांमधील कठीण हवामानात वापरण्यास पात्र आहे. ही चिप भारतात विकसित झालेली पहिली पूर्ण स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर चीप आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, की काही वर्षांपूर्वी आपण पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने सेमी कंडक्टर मिशन सुरू केले. साडेतीन वर्षांनंतर आपण भारतात तयार झालेली पहिली चिप पंतप्रधानांना सादर करत आहोत.

सध्याच्या जागतिक अनिश्चित आणि अस्थिर काळात भारत एका प्रकाश स्तंभासारखा उभा आहे. गुंतवणुकदारांनी स्थिर धोरणे असलेल्या भारतात यावे. देशात मागणी प्रचंड आहे. दर तिमाहीत सेमिकंडक्टरची मागणी वाढत आहे. हीच भारतात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे, असे आवाहनही वैष्णव यांनी गुंतवणूकदारांना केले.

सरकारच्या शिष्टाईला यश, जीआर लागू होताच जरांगेंनी सोडले उपोषण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण आज संध्याकाळी संपुष्टात आले. राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मराठ्यांकडून विजयी जल्लोष केला जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर काढला आहे. तर सातारा गॅझेटसंदर्भातील जीआर काढण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर मनोज जरांगे यांच्याकडे दिला असून, जीआर आल्यावर एका तासात मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीने केलेल्या शिफारशींना मराठा अभ्यासकांनी आणि वकिलांनी योग्य ठरवले आहे. या शिफारशींवर झालेल्या चर्चेनंतर, आता सरकारकडून तातडीने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढण्यात आला. या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

सरकारने या जीआरमध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी तरतूद केली आहे. मराठा समाजाच्या व्यक्तीला आता कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन या जीआरमध्ये करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा घेऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांनी जरांगे यांना तो मसुदा दाखवला. त्यानंतर जरांगेंनी तो वाचून दाखवला. तसेच आपण विचार करून कळवतो असे सांगितले. तसेच जीआर काढल्याशिवाय आपण इथून हलणार नाही असेही स्पष्ट केले. त्यानंतर जरांगे म्हणाले, आम्ही सरकारकडे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली होती. विखे पाटलांनी तुम्हाला मान्य झाले तर तातडीने जीआर काढतो असे सांगितले आहे. आपण आपल्या अभ्यासकांकडे हे योग्य आहे का हे पाहायला देणार आहोत, नाहीतर पुन्हा वाशीसारखे होणार. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता दिली आहे. यासंबंधीचा जीआर लवकरच काढला जाईल.

जरांगे म्हणाले, आम्ही सातारा गॅझेटियर पुणे व औंध यामध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. कायदेशीर बाबी तपासून त्या पद्धतीने निर्णय घेण्यात येईल असे यात म्हटले आहे. मी सरकारला कारण विचारले, त्यावर त्यांनी औंध व साताऱ्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत असे सांगितले. शिवेंद्रराजे भोसले यांनी याची जबाबदारी घेतलेली आहे. ते १५ दिवस म्हणाले मी एक महिना दिला आहे. शिवेंद्रराजे बोलले म्हणजे विषय संपला.

*आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे होणार*

जरांगे पुढे म्हणाले, राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती. त्यात काही गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे कोर्टाच्या माध्यमातून मागे घेतले जाणार आहेत. यासाठी सरकारने सप्टेंबर अखेरची मुदत मागितली आहे. सरकार हा ही जीआर काढणार आहे. राज्यपालांच्या सहीने लगेच जीआर काढणार आहेत, असे विखे पाटलांनी सांगितले आहे.

*आंदोलनात मृत पावलेल्यांना आर्थिक मदत आणि नोकरी*

आम्ही सरकारकडे मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्यांना तत्काळ आर्थिक मदत आणि कुटुंबाला नोकरी देण्याची मागणी केली होती. आतापर्यंत मयतांच्या कुटुंबाला १५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. उर्वरित मदत लवकरच दिली जाईल. राज्य परिवाहन महामंडळात ही नोकरी दिली जाणार आहे. यात बदल करून ज्याचे चांगले शिक्षण झाले असेल त्याला ड्रायव्हर बनविण्यापेक्षा त्याला दुसरे त्याच्या सक्षमतेचे काम दिले तरी चालेल. एमआयडीसी, एमएसईबी आदी ठिकाणी नोकरी द्या, असे जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, कुणबीच्या ५८ लाख नोंदीचे रेकॉर्ड ग्रामपंचायतीला लावावे. लोकांना मेळच लागत नाही. लोक अर्ज करतील आणि त्यांचे आरक्षण घेतील. व्हॅलिडिटी आतापर्यंत द्यावी. अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या आहेत. २५ हजार रोख दिले की लगेच दिली जाते. म्हणजे ती अनधिकृत आहे का नाही? सरकारने यासंबंधीचा आदेश काढण्याची तयारी दर्शवली आहे.

खंडणी विरोधी पथकाने ०४ अग्निशस्त्रे व ०८ काडतुसे विक्रीकरिता आलेल्या तीन इसमांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव तसेच अगामी ईद-ए-मिलाद इ. सण-उत्सवाच्या  कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहुन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडण्याच्या पार्श्वभुमीवर मा. पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना अवैध शरत्र खरेदी विक्री करणाऱ्या, अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या तसेच इतर अवैध धंदे करणाऱ्या जास्तीत जास्त इसमांविरुध्द सक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळवीत असताना दि. ३०/०८/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, खंडणी विरोधी पथक (गुन्हे शाखा), ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, "दि. ३०/०८/२०२५ रोजी पहाटेच्या सुमरास इसम नामे आकाश व त्याचे दोन मित्र अक्षय व बिट्टू हे कल्याण स्टेशन परिसरात अग्नीशस्त्र व काडतुसे कोणाला तरी विक्री करण्याकरिता येणार आहेत.

सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन कुंभार यांनी कल्याण रेल्वेस्टेशन परिसरात सापळा रचला असता १) अक्षय नथनी सहानी (वय: २० वर्षे), व्यवसाय: शिक्षण, राहणार, उत्तर दिल्ली, २) बिट्टू धरमविरसिंग गौर (वय: २६ वर्षे), राहणार उत्तर प्रदेश, ३) आकाश दुर्गाप्रसाद वर्मा (वय: २३ वर्षे), राहणार सेंट्रल दिल्ली, हे त्यांच्या ताब्यात २ देशी बनावटीचे पिस्टल, २ देशी कट्टे, ८ जिवंत काडतुसे असा एकूण १,८२,५००/- रू. किंमतीचा मुददेमाल अवैधरित्या विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या विनापरवाना आपल्या कब्जात बाळगुन मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हददीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असल्याबाबत काढलेल्या आदेशाचा भंग करीत असताना सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक, पोलीस स्टेशन, कल्याण येथे गुन्हा रजि.नंबर I९५२/२०२५ शस्त्र अधिनीयम १९५९ चे कलम ३, २५ सह, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५, सह भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सदर गुन्ह्यात लागलीच अटक करण्यात आली आहे. सदर आरोपिंची  दि. ०४/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस रिमांड कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुभाष तावडे, खंडणी विरोधी पथक (गुन्हे शाखा) ठाणे शहर करीत आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त शोध -२, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वपोनि. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, पोउनि. सचिन कुंभार, सुभाष तावडे, पोहवा. शैलेश शिंदे, आशिष ठाकुर, संजय राठोड, राजाराम पाटील, अभिजीत गायकवाड, सचिन जाधव, पोना. सुमित मधाळे, रविंद्र संभाजी हासे, चापोहवा. भगवान हिवरे, मपोहवा. शितल पावसकर, पोहवा. सतिश सपकाळे, पोशि. विनोद ढाकणे, तानाजी पाटील, संतोष वायकर, अरविंद शेजवळ यांनी केली आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याकडून रूट मार्च..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राखण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज दुपारी भव्य रूट मार्च काढण्यात आला.

सायंकाळी ५.०० ते ६.३० या वेळेत झालेल्या या रूट मार्चमध्ये कोपर ब्रिज चौकी - जोंधळे चौक - दीनदयाळ चौक - दीनदयाळ रोड - सम्राट चौक - नाना शंकर शेठ पथ - गोपी चौक - गुप्ते रोड - मच्छी मार्केट - स्टेशन रोड - कोपर ब्रिज चौकी असा विस्तृत मार्ग समाविष्ट होता. या रूट मार्चसाठी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तसेच बाहेरील बंदोबस्ताचे मिळून १० अधिकारी, ३४ पुरुष अंमलदार, १५ महिला अंमलदार व १६ होमगार्ड सहभागी झाले होते.

या रूट मार्चचे नेतृत्व विष्णुनगर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी केले तर संपूर्ण रूट मार्चदरम्यान पोलीस निरीक्षक (गुन्हे) गहिनीनाथ गमे यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळात शहरातील शांतता, सुसंवाद आणि सुरक्षिततेचे वातावरण टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे आंतरवाली सराटी चे नेते मनोज जरांगे पाटील दि. २९ रोजी मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर त्यांनी निर्णायक आंदोलनाची सुरुवात केली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू झाले असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई पोलीसांनी सांगितले की, “मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या निषेधासाठी आणखी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ते उद्या आणखी एक दिवस आझाद मैदानावर त्यांचे निषेध सुरू ठेवू शकतात.”

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आधी केवळ एका दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी वाढीव मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. या काळात सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “२६ ऑगस्टपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य करायला हव्या होत्या. आता वेळ संपली आहे. जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आम्ही सरकार उलथवून टाकण्याची ताकद दाखवू.” त्यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने यापूर्वी मराठा-कुणबी नोंदींचा अभ्यास सुरू केला होता. सुमारे ५८ लाख जुन्या नोंदी तपासल्या गेल्या असून, त्यातून काही समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरांगे यांच्या मते, ही प्रक्रिया अत्यंत संथ असून, मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे.
मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या, तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. हे सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे, मराठ्यांच्या मुलांना वाईट वागणूक मिळत आहे असंही ते म्हणाले. मराठ्यांची मुलं माज आणि मस्ती घेऊन आले नाहीत तर मोठ्या वेदना घेऊन मुंबईत आले आहेत, त्याची सरकारने जाण ठेवावी असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.

मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं असून त्यांना आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे. त्यानंतर मनोज जरागेंनी सरकारला आरक्षण देण्याचं आवाहन केलं. या सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याची पोरं आयुष्यभर विसरणार नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.

गणेश भक्ताकडून लालबागच्या राजाला अमेरिकन डॉलर्सचा हार अर्पण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली. राजाला अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तू या नेहमीच एक उत्सुकतेचा विषय ठरतो. या वर्षी चर्चा आहे ती अमेरिकन डॉलरच्या हाराची. गणेशाला देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी नवसापोटी मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. पहिल्याच दिवशी ४६ लाख रुपयांची रोकड जमा झाली असून दानपेटीत कोट्यावधीचे सोने-चांदी व परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. त्यात विशेष म्हणजे भाविकाकडून आलेला अमेरिकन डॉलर्सचा हार.

बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी दानपेट्यांतील नोटांची मोजणी करत असून त्यात ₹ १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांसह परदेशी नोटाही आढळल्या. लालबागच्या राजाला भाविकांकडून मिळालेल्या दानामध्ये दोन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मोदक, सोन्याची पावपले, हार, मुकुट, अंगठ्या, नाणी, सोन्याचे गणपती तसेच एक किलो वजनाची चांदीची वीट, चांदीचे मोदक, गणपती, मुकुटं, हार, पाळणे, समया आणि फुलघरे यांचा समावेश आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची रोकड आणि अगदी क्रिकेट बॅटसुद्धा दानपेटीत मिळाली आहे असे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

मतदान प्रक्रियेतील ११ कागदपत्रांमध्ये आधार कार्डचाही समावेश होणार असल्याचा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : आधार कार्डसंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राहुल गांधी यांनी बिहारमधील मतदार यादीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून वगळल्याबद्दल आव्हान देणारे बिहारचे मतदार निवासस्थानाचा पुरावा म्हणून आधार सादर करू शकतात, असं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सरकारने जारी केलेले ओळखपत्र इतर ११ कागदपत्रांच्या यादीत जोडण्याचे निर्देश दिले. मतदार यादीच्या 'विशेष सघन पुनरावृत्ती'ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, पुनर्समावेशासाठी अर्ज त्या ११ पैकी एका किंवा आधारसह सादर केले जाऊ शकतात.

न्यायालयाने बिहारमधील राजकीय पक्षांसाठी काही कठोर टिप्पण्यादेखील केल्या आहेत. अनेकांनी पारंपारिकपणे मतदान करणाऱ्यांना 'मताधिकारापासून वंचित' ठेवण्यासाठी केलेल्या सुधारणांना विरोध केला आहे, त्यांनी ६५ लाखांहून अधिक वगळलेल्या मतदारांना मदत का केली नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली आहे. "राजकीय पक्ष त्यांचे काम करत नाहीत," अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली. आक्षेप वैयक्तिक राजकारण्यांनी, म्हणजेच खासदार आणि आमदारांनी नोंदवला नसू पक्षांनी नोंदवला असल्याचं यावेळी कोर्टाने म्हटलं. "तुमचे बीएलए (बूथ-स्तरीय एजंट) काय करत आहेत ? राजकीय पक्षांनी मतदारांना मदत करावी," अशी सूचनाही कोर्टाने केली.

बिहार एसआयआर (SIR) प्रकरणी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, एसआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गोंधळ घालणाऱ्या राजकीय पक्षांनी आतापर्यंत आयोगाच्या टीमसमोर एकही आक्षेप नोंदवलेला नाही. तर राजकीय पक्षांकडे १.६१ लाख बूथ लेव्हल एजंट आहेत. एक बीएलए एका दिवसात १० पर्यंत आक्षेप किंवा सूचना पडताळून पाहू शकतो आणि सादर करू शकतो. त्याला कोणतीही अडचण किंवा वेळेची कमतरता नाही. तर १ ऑगस्टनंतर २.६३ लाख नवीन मतदारांनी मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी करत म्हटले की, राजकीय पक्षांची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे. न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त केल्यानंतर ते काय करत आहेत आणि लोक आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये इतके अंतर का आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, राजकीय पक्षांनी मतदारांना मदत करण्यासाठी पुढे यावे.

निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर अनेक महत्त्वाचे युक्तिवाद सादर केले. गेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला ६५ लाख लोकांची यादी जाहीर करण्यास सांगितलं होते ज्यांची नावे मसुदा मतदार यादीत समाविष्ट केलेली नाहीत. आयोगाला त्यांची नावे मसुदा यादीत समाविष्ट न करण्याचे कारणही यादीत नमूद करावे लागले. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे आणि मसुदा मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या सुमारे ६५ लाख लोकांची बूथनिहाय यादी वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत खडकपाडा पोलीसांनी विशाखापट्टनम जंगलातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - कल्याणच्या खडकपाडा पोलीसांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत अंमली पदार्थाच रॅकेट चालवणाऱ्या तस्करांचा भांडाफोड केला. विशाखापट्टनमच्या जंगलात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे या जिगरबाज कारवाईत एकूण १३ तस्करांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून वॉकी टॉकी, पाच विविध वाहने आणि लाखोंचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबिवली गावातून एका ड्रग पेडलरला दहा ग्रॅम गांजासह अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असत कल्याण, पुणे आणि कोल्हापूर असा तपास करत पोलीस पथक थेट विशाखापट्टनमच्या जंगलात स्थानिक पोलीसांच्या मदतीनं पोहोचले. त्यावेळी हे तस्कर जंगलात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने वॉकी टॉकीचा उपयोग करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

लाखोंचा अंमली पदार्थाचा साठा जप्त

आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी आतापर्यंत या अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात १३ आरोपींना अटक केली आहे. बाबर उस्मान शेख (वय: २७ वर्षे), गुफरान शेख (वय: २९ वर्षे), सुनील राठोड (वय: २५ वर्षे), आझाद अब्दुल शेख (वय: ५५ वर्षे), रेश्मा अल्लाउद्दीन शेख (वय: ४४ वर्षे), शुभम उर्फ सोन्या भंडारी (वय: २६ वर्षे), सोनू हबीब सय्यद (वय: २४ वर्षे), आसिफ शेख (वय: २५ वर्षे), प्रथमेश नलावडे (वय: २३ वर्षे), रितेश पांडुरंग गायकवाड (वय:२१ वर्षे) ,अंबादास नवनाथ खामकर (वय: २५ वर्षे), आकाश बाळू भिताडे (वय: २८ वर्षे) आणि योगेश दत्तात्रय जोध (वय: ३४ वर्षे) अशी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील बहुतांश आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

७० लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अटक तस्करांकडून पोलीस पथकानं ११५ किलो ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती ठाणे जिल्हा पोलीस अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. त्याची बाजारात किंमत सुमारे २८ लाख ७५ हजार रुपये आहे. यासह एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, वॉकी टॉकीचे दोन संच, दोन मोटार कार, एक ऑटोरिक्षा, एक बुलेट आणि दुचाकी आणि काही रोख रक्कम असा एकूण ७० लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या पोलीसांनी सदर कारवाईत घेतला सहभाग - अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ -३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे पथकाचे मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक संभाजी नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, संदीप भालेराव, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार सदाशिव देवरे, राजू लोखंडे, संदीप भोईर, योगेश बुधकर, निसार पिंजारी, पोलीस शिपाई सुरज खंडागळे, अनिल खरसान, राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले आणि सुरेश खंडाळे या पोलीस पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून नवजात अर्भकास कचऱ्यात टाकणाऱ्या आरोपीला अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावे भागात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकले गेले होते. अत्यंत हृदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे. गुन्ह्यातील एका १९ वर्षीय युवकाला खडकपाडा पोलीसांनी अटक केली असून १७ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून गु.र.नं. ६७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४(२),(एम),९३,३(५), बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ४,८,१२ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासानुसार आरोपी रोहित प्रदीप पांडे (वय: १९ वर्षे) राहणार: बारावे, त्याने अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पीडित मुलीसोबत मागील दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले, त्यात ती गर्भवती राहिली. सदर मुलीने नवजात मुलीला जन्म दिला. अर्भकाचा जन्मानंतर कोणताही पुरावा मागे न ठेवता, ते अर्भक रात्रभरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले, ज्यामुळे बाळाचा जीव धोक्यात आला. कल्याण, आंबिवली व शहाड परिसरात तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासणीद्वारे पीडित व आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुढील तपासा दरम्यान आरोपी रोहित पांडे यांस १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, तसेच खडकपाडा पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, सतीश पाटील, उपनिरीक्षक भूषण देवरे, व तपास पथकाच्या इतर अंमलदारांनी केला. ही घटना केवळ कायद्याचा भंग करणारी नसून सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.