BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पालिकेचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा अभाव? दिवा स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर..

विशेष प्रतिनिधी

दिवा : दिवा शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पूर्वेकडील मधल्या ब्रिजजवळील प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळी कामावर जाणारे नागरिक तसेच स्थानिक रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे.

स्थानिक दुकानदारांच्या मते, या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, कचऱ्याचे ढीग वाढून अक्षरशः कचऱ्याचा डोंगर तयार झाला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरनीवर आहे.

या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी, तसेच रोज वसई, पनवेल आणि रोहा येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दररोज कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडकणार सिनेमा ‘धुरंधर-२'..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : गेले २१ दिवस 'धुरंधर-२' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. हा सिनेमा सर्वात कमी वेळात १००० कोटींचा नेट आकडा गाठणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला असून धुरंधर-२ ने जागतिक पातळीवर १६६० कोटींहून अधिक कलेक्शन केले असून भारतात त्याने १२०० कोटींचा गल्ला पार केला आहे. कित्येकांनी हा सिनेमा एकपेक्षा जास्त वेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. अशातच आता या फिल्मच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

धुरंधरचा पहिला भाग 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की दुसरा भागही याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मात्र, आदित्य धर यांनी या चित्रपटाचे डिजिटल हक्क ‘जिओ हॉटस्टार’ ला विकले आहेत.हा स्पाय थ्रिलर पाहण्यासाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

नुकतंच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, जिओ हॉटस्टार हा सिनेमा आयपीएल २०२६ संपल्यानंतर स्ट्रीम करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलची धामधूम सुरू असताना चित्रपटाच्या व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ नये, हा यामागचा विचार आहे. त्यामुळे, मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘धुरंधर-२’ ओटीटीवर धडक देण्याची दाट शक्यता आहे.

डॉक्टरांनी मुंबईत बसून केले ओमानमधील महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई - मुंबईतील 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' रुग्णालयाने जागतिक आरोग्य दिन २०२६ रोजी एक मोठे यश संपादन केले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर टी.बी. युवराजा यांनी मुंबईत बसून ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन केले. ही सीमापार रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया भारतातून पहिल्यांदाच करण्यात आल्याचे मानले जात आहे.

ही शस्त्रक्रिया प्रगत ‘मेडबॉट ट्युमाई’ रोबोटिक प्रणाली आणि रिअल-टाइम कनेक्टिव्हिटीद्वारे करण्यात आली. डॉक्टरांनी दूर बसून संपूर्ण ऑपरेशन नियंत्रित केले आणि यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण केली. कोकिलाबेन रुग्णालयातील यूरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे संचालक डॉ. टी.बी. युवराजा म्हणाले की, आरोग्यसेवेत हा एक मोठा बदल आहे. त्यांच्या मते, आता रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी दुसऱ्या देशात जाण्याची गरज भासणार नाही, तर डॉक्टरच तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांपर्यंत पोहोचू शकतील.

उच्च न्यायालयाचे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या तपासणीचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएम (EVM) ची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत.

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदे सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. “हा एक ऐतिहासिक आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील निकालाचा संदर्भ देत नसीम खान म्हणाले की, “या निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ टक्के ईव्हीएममधील- म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT मधील - ‘बर्न झालेली मेमरी’ (burnt memory) किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.”

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, EVM उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत केवळ ‘निदान चाचणी’ (diagnostic check) करण्यास परवानगी दिली जाईल.

काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये EVM आणि ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (VVPAT) युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘INDIA’ विरोधी आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी EVM च्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली.

नाशिकच्या मल्टी नॅशनल आयटी कंपनीत धर्मांतरासाठी महिलांचे लैंगिक शोषण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नाशिक : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण सुरू असतानाच नाशिकच्याच एका अत्यंत नामांकित मल्टी नॅशनल आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, छळ आणि धर्मांतरणचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ गुन्हे दाखल झाले असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यात जे काही आरोप करण्यात आले आहेत ते अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

लव्ह जिहाद पाठोपाठ हा नवा कॉर्पोरेट जिहादचा काही प्रकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटी (SIT) ची देखील स्थापना करण्यात आली आहे. लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तो नाशिक मधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत. या कंपनीत जे सुरू होतं, त्यामुळे राज्यभरात कॉर्पोरेट जिहादची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई नाका परिसरात ही मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीतल्या एचआर मॅनेजरकडून धर्मांतरासाठी जबरदस्तीसाठी केली जात होती. नमाज पठण करायला लावलं जायचं, मांसाहारी जेवण खायला लावायचं, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोललं जात होतं, मुलींना लज्जास्पद वागणूक दिली जायची, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जायचा, यापैकी पीडित महिला १८ ते २६ वयोगटातल्या आहेत. २०२२ पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांत एका फोनवर हजर होणार फिरते रुग्णालय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. १०८ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करताच या रुग्णवाहिका रुग्णांच्या दारात हजर होतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर असो वा दुर्गम गाव, प्रत्येक ठिकाणी गरजूंना रुग्णवाहिकेची सेवा वेळेत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे. या रुग्णवाहिका केवळ वाहन नसून ते एक ‘फिरते रुग्णालय’ असेल. या प्रकल्पासाठी ‘सुमित एसएसजी’ आणि ‘पिनाकल इंडस्ट्रीज’ ने हातमिळवणी केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रासाठी १७५६ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यामध्ये ऑक्सिजन यंत्रणा, प्रथमोपचाराची आधुनिक साधने आणि रुग्णांना ने-आण करण्यासाठी आरामदायी व्यवस्था असेल. रुग्णवाहिकांचे आतील रचना ही विशिष्ट पद्धतीने बनविण्यात आली आहे. यामुळे रुग्णवाहिकेतील स्वच्छता राखणे सोपे जाईल आणि संसर्ग पसरणार नाही.

शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 
   
मुंबई : ‘शाळा सोडल्याचा दाखला’ हा वयाचा निर्णायक पुरावा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला असून त्याच आधारे पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला. २५ वर्षीय तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तथापि, दोघांमध्ये प्रेमसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने हा निर्णय देत आरोपीला जामिनाचा दिलासा दिला. वसईतील वाळीव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली.

आरोपी तरुण हा २५ वर्षांचा होता तर मुलगी १५ वर्षांची होती. त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने आपल्या बहिणीची ओळख करून देण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरी नेले. तेथे पीडित मुलीला फ्लॅटमध्ये डांबून ठेवले आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने या संदर्भात जबाब दिल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी जयेश पारधी याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याने ऍड. अर्जुन कदम यांच्यामार्फत जामीनासाठी उच्च न्यायालयात अपिल केले होते.

केंद्रीय मंत्रिडळाची महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढेल, ज्यापैकी २७३ जागा महिलांसाठी राखीव असतील. १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, त्यामध्ये हे सुधारणा विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरक्षणानंतर उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागांमध्ये सर्वाधिक ४० जागांची वाढ होऊन एकूण जागा  ८० वरून १२० होणार आहेत. महाराष्ट्रात महिलांसाठी २४ जागा राखीव ठेवल्या जातील, ज्यामुळे लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होतील.

संसदीय मंजुरी मिळाल्यानंतर, हा कायदा ३१ मार्च २०२९ रोजी लागू होईल. तो प्रथम त्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभावी होईल. प्रस्तावानुसार, आरक्षण उभ्या तत्त्वावर लागू केले जाईल, म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही महिलांचा वाटा निश्चित केला जाईल.

बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. एकूण ५३ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी तीस उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर आता इथे एकूण २३ उमेदवार रिंगणात असून त्यात बहुतांश अपक्ष उमेदवार रिंगणात राहिले असून त्यामुळे महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीबाबत आज सकाळपासून राज्यात राजकीय विविध घडामोडी आणि ट्विस्ट पाहायला मिळाले. महाराष्ट्राची सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार घेतली असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बारामतीतून उमेदवारी माघारी घेतली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम, २०२९ ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल असे सपकाळ यावेळी म्हणाले.

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत, आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे ज. ए. इ.चे प. रा. विद्यालय, भिवंडी येथील एनसीसी /आरएसपी अधिकारी  निलेश शंकर नरवडे यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या श्री. नरवडे यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच एनसीसी आणि रस्ता सुरक्षा अभियान (आर एस पी) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत लक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील आहेर यांनी त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.

लक्ष्मी शैक्षणिक संस्था सन २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करते. यावर्षी आदर्श मराठी शाळा, इंग्रजी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयाजवळ, मुंबई-३२ येथे पार पडणार असून, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल प. रा. विद्यालय भिवंडीचे शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रदीप राका, मुख्याध्यापिका सौ. नंदा कोंगे, तसेच महाराष्ट्र राज्य 'मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' ग्रुपचे प्रमुख व आर एस पी विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, 'दैनिक स्वराज्य तोरण' चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, 'निर्भया फाऊंडेशन इंडिया' चे अध्यक्ष मनोज बर्डे, जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे, कला अध्यापक आर एस पी अधिकारी शिक्षक संदिप पाटील, मंगेश भामरे, विभागीय समन्वय अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह शिक्षकवृंद व मित्रपरिवाराकडून निलेश नरवडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील १२०० शिक्षकांना अनिल बोरनारे यांच्याकडून अखेर न्याय; डीसीपीएस योजनेचे परिपत्रक जाहीर.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण -  मुंबई महानगरपालिकेतील माध्यमिक शाळांमधील १२०० शिक्षकांना शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला असून शिक्षकांच्या डिसिपीएस योजनेचे परिपत्रक मुंबई मनपा ने निर्गमित केले आहे मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये २४९ माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा या अनुदानित व २०० शाळा या विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते व विनाअनुदानित शाळा या मनपा स्वखर्चाने चालवते. सदर शाळांमध्ये जवळपास १५०० शिक्षक कार्यरत असून सन २००८ पासून सदर सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत. गेल्या १८ वर्षांपासून आर्थिक कल्याणकारी लाभांपासून वंचित आहेत. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, मृत्यू उपदान, कुटुंब पेन्शन योजना यांसारख्या मूलभूत योजनांपासून वंचित होते.सदर शिक्षकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. 

DC-। योजना सन २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे DC-1 ही पेन्शन योजना लागू आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार मधून १०% रक्कम कपात करणे व तेवढीच रक्कम सरकारकडून ऍड करून सदर रक्कम DCPS च्या खात्यांमध्ये टाकली जाते, परंतु सदर कर्मचारी सेवेत कायम होऊन १४ वर्षे झाली परंतु  मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांचे DCPS चे खातेच उघडले गेले नव्हते. या शिक्षकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा देखील केलेला होता पण फक्त तुमचे काम सुरू आहे एवढेच आश्वासन शिक्षकांना मिळत होते. अखेर मुंबई मनपातील शिक्षकांनी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे धाव घेतली. 

बोरनारे यांनी लागलीच ९ ऑक्टोबर २०२५ रोजी याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीला अनिल बोरनारे यांच्यासमवेत मुंबई मनपा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र लिंबकर, अशोक गर्जे, रोहित कुलकर्णी, यशवंत पवार, चंद्रकांत घोडेराव, विक्रांत गायकवाड, धर्मेंद्र तिवारी, अंबादास माने तसेच शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत या प्रकरणाची फाईल प्रमुख लेखापाल वित्त यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आली होती. त्यानंतर अनिल बोरनारे यांनी नवनियुक्त महापौर तसेच आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक निर्गमित करून बाराशे शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

डोंबिवलीतील सारंग गाव येथे जेपीएल स्पर्धा उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - डोंबिवलीतील सारंग गाव येथे आयोजित करण्यात आलेली 'जेपीएल २०२६- जवळेथर प्रीमियर लीग' ही क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत गावातील १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेत कोणताही वाद किंवा गैरप्रकार न होता सामने शांततेत पार पडले.

या स्पर्धेला माजी परिवहन सभापती व माजी नगरसेवक संजय पावशे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांनी ५००० रुपयांची देणगी तसेच खेळाडूंना १००० रुपयांचे रोख बक्षीस देत मार्गदर्शन केले. ही स्पर्धा गावातील एकी, मैत्री आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. 'टायगर ११' च्या सर्व सदस्यांनी मैदानाची तयारी, खेळाडूंची व्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत आणि संपूर्ण नियोजन अत्यंत व्यवस्थित पार पाडले.

स्पर्धेत गांगो रवळनाथ क्रिकेट संघ (जवळेथर), टायगर ११ बॉईज, युवराज मोरे क्रीडा सामाजिक विकास फाउंडेशन, रचना फायटर, रविंद्र ११ धावडे वाडी (जवळेथर) आणि स्व. दिनेश मोरे स्मृती या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेते संघ म्हणून गांगो रवळनाथ क्रिकेट संघ (जवळेथर) आणि युवराज मोरे क्रीडा सामाजिक विकास फाउंडेशन यांनी बाजी मारली.

स्पर्धेतील सर्व सामने 'VMD Sports Live'  या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले, त्यामुळे गावाबाहेरील क्रिकेटप्रेमींनाही स्पर्धेचा आनंद घेता आला. या उपक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, देणगीदार आणि प्रायोजक यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यांच्या पाठबळामुळेच स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील सयाजी मोरे (नगरसेवक), प्रकाश भोईर (माजी नगरसेवक), संजय पावशे (माजी नगरसेवक), ज्योती पवन पाटील (नगरसेविका), सुजय विचारे (युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप), योगेंद्र भोईर (शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष) आणि कुंदन रामाणे (जाणता राजा मंडळ अध्यक्ष) उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष विशाल धावडे, उपाध्यक्ष प्रतीक धावडे, सचिव महेंद्र धावडे, खजिनदार जितेंद्र धावडे आणि उपखजिनदार अक्षय धावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच रोशन मोरे, शुभम केगडे, विशाल मोरे, विराज चव्हाण, दिनेश मोरे आणि टायगर ११ च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बिल्डरच्या घशात रस्त्याची जागा घालण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी मंजूर रस्ता वळवल्यामुळे उबाठा गटाचे पालिकेविरोधात आमरण उपोषण..

विशेष प्रतिनिधी

कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्व कोळसेवाडी परिसरात बिल्डरच्या फायद्यासाठी कित्येक वर्ष जुना दळण वळणाचा व मंजूर झालेला रस्ता वळवण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही वळवलेला रस्ता थांबवण्यासाठी, पालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण कोळसेवाडी येथील भैरव टी- हाऊसच्या शेजारी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पालिका प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पालिका प्रशासन नेमकं कोणासाठी काम करत आहे? जनतेच्या सेवेसाठी का शासनाच्या जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
"शिवाजी कॉलनी ते भैरव टी- हाऊस ते म्हसोबा चौक" पर्यंत काँक्रीटचा रस्ता खासदार निधीतून मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी जुनी जनता सहकारी बँक ते भैरव टी-स्टॉल या सुमारे १५० ते २०० मीटर अंतराच्या मंजूर जुन्या रस्त्याचे काम करण्याऐवजी तो रस्ता बिल्डरच्या फायद्यासाठी वळवून जुनी जनता बँक ते जॉली टेलर असा रस्ता बांधण्यात आला आहे.

याचदरम्यान, वहिवाटीचा रस्ता बंद करून नव्या जागी रस्ता वळवून तो बांधण्याची प्रक्रिया महानगरपालिका अधिनियम व नगररचना कायद्याच्या तरतुदींना बगल देत केली जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे. सार्वजनिक रस्ता बंद किंवा स्थलांतरित करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया केली गेलेली नाही.

जॉली टेलर ते जनता बँक दरम्यान नव्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या नव्या रस्त्याच्या निर्मितीनंतर विद्यमान रस्ता बंद करून त्या जागेचा समावेश शेजारील विकासकाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

म्हसोबा चौक ते भैरव टी-हाऊस हा सुमारे १८ मीटर रुंदीचा मंजूर विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता असल्याची माहिती समोर येत असताना, प्रत्यक्षात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामध्ये रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी झाल्याचे तसेच आवश्यक फुटपाथ व गटारांची कामे करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मंजूर डी.पी. आराखड्याचे उल्लंघन होत असल्याची शक्यता वर्तवली जात असून आवश्यक त्या प्रकरणांमध्ये राज्य शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात अशा कोणत्याही प्रक्रियेचा पारदर्शकपणे अवलंब करण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ नागरिकांच्या वापरात असलेला हा रस्ता अचानक बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने, या मार्गावर उपजीविका करणाऱ्या अनेक लघु व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचाही भंग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मूळ डी.पी. रस्त्यामध्ये फेरफार करून एका विकासकाच्या फायद्यासाठी रस्ता वळवण्यात आला असून, यात काही संबंधित पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे काल उपोषण करण्याचा निर्णय प्रकाश घन‌श्याम जाधव (उपशहरप्रमुख), ऋतू कांचन रसाळ (कक्ष शहर संघटक), नितिन मोलुल, संगिता गांधी, गणपत घुगे, वैभव घाडगे, अमित हरिश्चंद्र उगले, अर्जुन कणसे, अक्षता पवार (गटप्रमुख), गितांजली परशुराम आंबे, भारती सांबुख, अनंत केशव ब्रिद, अशोक सावंत, रमेश काचाई मेहर, अरुण उगले, राम शिंदे (उपशहर प्रमुख), गांधी (विभागप्रमुख), भारती (कार्यप्रमुख) यांनी घेतला आहे.

नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा करून रस्त्याचे बांधकाम सुरू - सचिन घुटे, नगररचना विभाग

कल्याण पूर्वेकडील म्हसोबा चौक ते भैरव टी-हाऊस पर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाबाबत विचारले असता, कल्याणचे शहर नियोजक, सचिन घुटे यांनी सांगितले की, रस्त्यासाठी मंजूर नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा करण्यात आल्या असून त्यानुसार रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावेळी आमरण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या गुलवे यांनी आरोप केला की, त्या रस्त्याचे बांधकाम मंजूर आणि खुणा केलेल्या नकाशाप्रमाणे केले जात नाही असे सचिन घुटे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सांगितले की, नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा आमच्या विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पण त्या रस्त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, त्यामुळे या प्रकरणी फक्त तेच कोणतीही माहिती देऊ शकतात.

देशभरातील निवडक लोकप्रतिनिधींच्या यादीत ‘पिंपरी-चिंचवड’चा सन्मान; कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  ‘कॉमनवेल्थ संसदीय संघटना वेस्ट झोन–७’ तर्फे गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. दिनांक ८ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेत देशातील निवडक आणि अभ्यासू आमदारांनाच पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आमदार अमित गोरखे यांना या परिषदेच्या ‘मुख्य पूर्ण अधिवेशनात’ आपले विचार मांडण्याची अत्यंत महत्त्वाची संधी देण्यात आली आहे, ही बाब त्यांच्या नेतृत्वगुणांची व धोरणात्मक दृष्टीकोनाची राष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे स्पष्ट करते.

राष्ट्रीय दिग्गजांची मांदियाळी या परिषदेला देशाचे सर्वोच्च संसदीय नेतृत्व उपस्थित राहणार आहे. यात प्रामुख्याने:
श्री. ओम बिर्ला – माननीय लोकसभा अध्यक्ष
डॉ. प्रमोद सावंत – माननीय मुख्यमंत्री, गोवा
डॉ. गणेश गावंकर – अध्यक्ष, गोवा विधानसभा
श्री. हरिवंश नारायण सिंह – उपसभापती, राज्यसभा
ऍड. राहुल नार्वेकर – अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
प्रा. राम शिंदे – सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद
श्री.शंकरभाई चौधरी – अध्यक्ष, गुजरात विधानसभा
श्री. पुसापती अशोक गजपती राजू – माननीय राज्यपाल, गोवा राज्य 
श्री. माविन गोडिन्हो – मंत्री, गोवा राज्य 
श्री. जोशुआ पीटर डीसूझा – उपाध्यक्ष, गोवा विधानसभा

परिषदेमधील सत्रे – धोरणात्मक दिशादर्शक चर्चा मुख्य
पूर्ण अधिवेशनाच्या पहिल्या भागात ‘विकसित भारत २०४७ साध्य करण्यात युवा विधिमंडळ सदस्यांची भूमिका’ या अत्यंत महत्त्वपूर्ण सत्रात आमदार अमित गोरखे महाराष्ट्राचा विकासदृष्टिकोन, युवा नेतृत्वाची जबाबदारी आणि धोरणात्मक दिशा प्रभावीपणे मांडणार आहेत. दुसऱ्या भागात ‘व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि किनारी संपर्क या क्षेत्रांतील वेस्ट झोन–७ ची प्राधान्ये’ हा विषय आहे. तसेच परिषदे दरम्यान विविध विषयांवर चर्चासत्रे, संवाद सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरराज्य समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आहे. ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणे, तसेच युवा नेतृत्वाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी ठोस धोरणात्मक विचार मांडणे, ही माझी प्राथमिकता असेल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

आमदार अमित गोरखे राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल
आमदार अमित गोरखे यांची या परिषदेसाठी झालेली निवड ही त्यांच्या प्रभावी कामगिरीची, जनाधाराची आणि नेतृत्वक्षमतेची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल मानली जात आहे. अत्यंत मर्यादित आमदारांमधून निवड होणे आणि त्यातही मुख्य अधिवेशनात विचार मांडण्याची संधी मिळणे, हे महत्वाचे आहे. 

पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण
या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे होणार असून, स्थानिक प्रश्नांना व्यापक स्तरावर मांडण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जात असल्याचेही यावरून स्पष्ट होते. आमदार अमित गोरखे यांची या परिषदेसाठी झालेली निवड ही पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरत असून, राज्याचा आवाज देशाच्या धोरणात्मक चर्चांमध्ये अधिक ठामपणे पोहोचवण्यास निश्चितच हातभार लावणारी ठरणार आहे.

कल्याण व शहापूर येथील ८० व ६० वर्षीय रुग्णांवर किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे उच्च जोखमीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, ०७ एप्रिल : 'किम्स हॉस्पिटल्स', ठाणे यांनी कल्याण व शहापूर येथील अनुक्रमे ८० व ६० वर्षीय अशा दोन रुग्णांवरील गुंतागुंतीच्या व उच्च-जोखमीच्या हृदयविकार प्रकरणांवर यशस्वी उपचार करून गंभीर आजार व अनेक सहव्याधी (co-morbidities) असलेल्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यातील आपले वैद्यकीय कौशल्य सिद्ध केले आहे.

भारतामध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असून एकूण मृत्यूंपैकी सुमारे २८% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. दरवर्षी अंदाजे २ लाख बालकांमध्ये तसेच लाखो प्रौढांमध्ये गंभीर हृदयविकाराचे निदान होते. मात्र प्रगत अवस्थेतील हृदयरोग असलेल्या रुग्णांपैकी केवळ काहींनाच वेळेत शस्त्रक्रियेची संधी मिळते, ज्यामुळे उपचारांमध्ये मोठी दरी असल्याचे दिसून येते.

पहिले प्रकरण:
कल्याण येथील रहिवासी नामदेव देशमुख (वय: ८० वर्षे ) यांची सुरुवातीला दोन्ही गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी (B/L TKR) तपासणी सुरू होती. शस्त्रक्रियेपूर्व हृदय तपासणी दरम्यान डॉक्टरांना एओर्टिक व्हॉल्वमध्ये गंभीर अरुंदता तसेच कोरोनरी धमन्यांमध्ये पाच गंभीर ब्लॉकेज आढळले, ज्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास असल्याने शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता.

या गुंतागुंतीच्या परिस्थितीत किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस टीमने एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट सोबत पाच कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट्सची संयुक्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम राहिली. आयसीयूमध्ये स्थिर स्थिती, दुसऱ्या दिवशी हालचाल सुरू झाली आणि अवघ्या पाच दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

दुसरे प्रकरण:
शहापूर येथील वासुदेव हांबीर (वय: ६० वर्षे ) यांना १४ वर्षांपूर्वी छातीला झालेल्या दुखापतीमुळे दीर्घकालीन गुंतागुंत निर्माण झाली होती. मागील दोन वर्षांपासून त्यांना वाढता श्वास लागणे, पाय व पोट सुजणे तसेच दीर्घकाळ सूज राहिल्यामुळे जखमा (अल्सर) होण्याचा त्रास होत होता.

सविस्तर तपासणीत यकृत सिरोसिस,अ‍ॅसाइटिस, पोर्टल हायपरटेन्शन, स्प्लेनोमेगली, दोन्ही पायांतील व्हेरिकोज वेन्स तसेच अत्यंत कॅल्सिफाइड (“दगडासारखा कठीण”) पेरिकार्डियमसह कन्स्ट्रिक्टिव पेरिकार्डायटिस अशा अनेक गंभीर समस्या आढळल्या. या शस्त्रक्रियेत मृत्यूचा धोका सुमारे ५०% इतका होता.

अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असूनही किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. रुग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, तिसऱ्या दिवशी चालण्यास सुरुवात झाली आणि सहाव्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले.

डॉ. बी.सी. कलमठ, संचालक व विभागप्रमुख – कार्डियाक सायन्सेस विभाग, म्हणाले, “या प्रकरणांमधून शस्त्रक्रियेपूर्व सखोल तपासणी आणि प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होते. गंभीर हृदयविकार आणि इतर आजार असलेल्या रुग्णांमध्येही योग्य कौशल्य, सुविधा आणि क्लिनिकल प्रोटोकॉलच्या मदतीने यशस्वी परिणाम साध्य होऊ शकतात.”

डॉ. सौम्य शेखर जेनासमंत, सल्लागार कार्डिओथोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन, म्हणाले, “ही दोन्ही प्रकरणे अत्यंत गुंतागुंतीची होती आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन, अचूकता व बहुविभागीय (multidisciplinary) दृष्टिकोन आवश्यक होता. अनेक सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ व उच्च- जोखमीच्या रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक असते, मात्र योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आणि समन्वित उपचार पद्धतीमुळे सकारात्मक परिणाम साधता आले.”

सौरभ गुप्ता, प्रादेशिक संचालक, किम्स हॉस्पिटल्स, म्हणाले, “किम्स हॉस्पिटल्समध्ये आम्ही अत्यंत गंभीर रुग्णांनाही प्रगत हृदय उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. या यशस्वी उपचारांमुळे क्लिनिकल उत्कृष्टता, रुग्णकेंद्रित सेवा आणि अत्यंत अचूक व सुरक्षित पद्धतीने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याची आमची क्षमता अधोरेखित होते.”

ही प्रकरणे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांमध्ये हृदयरोगांचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करतात. हृदयरोगांचे वाढते प्रमाण आणि गुंतागुंत लक्षात घेता, एकात्मिक व प्रगत वैद्यकीय उपचार पद्धती जीवनमान सुधारण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यावश्यक ठरत आहेत.

केडीएमसीच्या 'स्थायी समिती' सभापती पदी शिवसेना- भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, तर 'शिक्षण समिती' सभापती पदी अभिजीत थरवळ आणि 'महिला व बाल कल्याण समिती'च्या सभापती पदी सारिका जाधव यांची निवड जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ६ एप्रिल – कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या 'स्थायी समिती' सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, तर 'पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती'च्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि 'महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समिती'च्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या सारिका सतीश जाधव या उमेदवारांनी दि.०२ एप्रिल २०२६  रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांचेकडे दाखल केली होती. या तीनही समितींच्या सभापती पदासाठी केवळ एक-एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने, आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवन्न शेट्टी यांस 'स्थायी समिती' सभापती म्हणून, तर अभिजीत सुजाता सदानंद थरवळ यांस 'शिक्षण समिती' सभापती म्हणून आणि सारिका सतीश जाधव यांस 'महिला व बाल कल्याण समिती'च्या सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण, संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते. आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच पालिका सदस्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन होता. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. 'सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष' हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. 

त्यांनी पुढे लिहिले की, विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत रुजलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा विशाल वटवृक्ष आज ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ६ एप्रिल १९८० रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने संपूर्ण देशभर विस्तारले आहे.

”राष्ट्र प्रथम’ मंत्रासह भाजपाचा विस्तार – पक्षाच्या ४७ व्या वर्षात प्रवेशानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया”

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की,  भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भाजयुमोचा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा मला जाणवतं की जसे विचारधारेने एक एक कार्यकर्ते घडवले आणि त्याचप्रमाणे असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवले. जेव्हा नेहरू-गांधींची अल्पसंख्याक-केंद्रित समाजवादी विचारसरणी आणि साम्यवादी चळवळींचा जागतिक प्रभाव होता, त्या काळात जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य पण वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धैर्य डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी दाखवले. त्यांची दूरदृष्टी आजही आमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
भाजपच्या या प्रवासात अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान

वैचारिक पाया आणि नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या भाजपच्या या प्रवासात अनेक ऋषितुल्य नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र भाजपाचाच विचार करायचा झाला तर १९८० मध्ये उत्तमराव पाटील यांनी पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचा पाया रचला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला गावागावात नेले आणि बहुजन व ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. १९९५ मध्ये काँग्रेसची सत्ता हटवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रा. ना.स. फरांदे यांनी पक्षाला वैचारिक बळ दिले, तर सूर्यभान वहाडणे पाटील यांनी शिस्तबद्ध नेतृत्वातून संघटना मजबूत केली. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकऱ्यांसाठी लढा देत पक्षाला शेतशिवारापर्यंत पोहोचवले. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सावरत संघटनेला नवी ऊर्जा दिली.

सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्काचा नवा अध्याय सुरू केला. २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी झेप घेतली आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून थेट मुख्यमंत्रीपदावर जाण्याचा अनोखा विक्रम घडला. त्यानंतर रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटना आणि सरकार यांच्यात उत्तम समन्वय साधत पक्षाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले.

जातीय राजकारणाला भाजपचे ठाम प्रत्युत्तर;

कधी ‘शेटजी-भटजी’ची पार्टी म्हणून टीका झालेल्या भाजपने ४६ वर्षांत महाराष्ट्रात ११ बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष दिले, जे जातीय राजकारण करणाऱ्यांना ठोस उत्तर आहे. आज एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सांभाळताना, मला अभिमान वाटतो की सामान्य कार्यकर्त्यापासून या पदापर्यंत पोहोचणे केवळ भाजपातच शक्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यश हे केवळ आकडे नसून जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार तळागाळात;

भाजप ही केवळ बॅनर आणि सभांची संघटना नसून विचारधारेवर उभे असलेले कार्यकर्ते हीच तिची खरी ताकद आहे. ‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला आहे. आम्हाला अनेकदा अँटी राष्ट्रवादी म्हटले जाते; पण देशाबद्दल अभिमान बाळगणे हा दोष असेल, तर तो आम्ही आनंदाने स्वीकारू. ‘राष्ट्र प्रथम’ही आमच्या विचारधारेची मूळ भूमिका आहे. काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करत भाजप एक ‘टेक-फ्रेंडली’ संघटना बनत आहे, ज्यामुळे बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांशी तात्काळ संपर्क साधणे शक्य झाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल;

भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे आणि त्यात महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करणे, यावर विशेष भर दिला जात आहे. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि गावपातळीवरील समस्या शासनापर्यंत नेणे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. हाच ‘अंत्योदय’चा खरा अर्थ आहे. जेव्हा प्रत्येक भाजप कार्यकर्ता या भावनेने काम करेल, तेव्हाच ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार होईल आणि विकसित महाराष्ट्राशिवाय ते शक्य नाही.

कल्याण-डोंबिवलीकरांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे केडीएमसीकडून ४३१ कोटींची प्रॉपर्टी टॅक्सची विक्रमी वसुली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून नागरिकांनी यंदाही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल सुमारे ८६% विक्रमी कर वसुली पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

महापालिकेच्या महसुलाचा मुख्य आधार असलेल्या मालमत्ता करातून सन २०२५-२०२६ या वर्षासाठी सुमारे ₹५०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आयुक्त डॉ. अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोसावी तसेच उपआयुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी समन्वय साधत सातत्याने आढावा बैठका घेतल्या.

या प्रयत्नांचे फलित म्हणून मार्च अखेरपर्यंत ₹३३१.४१ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, “अभय योजना” राबवली नसतानाही नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे करवसुली वाढल्याचे केडीएमसीला गती मिळाल्याची प्रतिक्रिया कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनी वेळेवर कर भरण्याची जबाबदारी पार पाडल्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, २०२६-२०२७ या नवीन आर्थिक वर्षासाठी अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पर्यायाद्वारे कर भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर कराच्या माध्यमातून शहरामध्ये अधिकाधिक लोकाभिमुख सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा कल्याण-डोंबिवलीकरांनी केडीएमसी प्रशासनाकडून व्यक्त केली आहे.

दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर नागरी हक्क समितीचे प्रशासनाला पत्र देत तात्काळ कारवाईची मागणी..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. १ एप्रिल – दिवा परिसरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिवा-शिळ नागरी हक्क समितीने ठोस भूमिका घेतली असून यासंदर्भात सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना अधिकृत पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वेळी ऍड. रोहिदास मुंडे, माजी नगरसेवक हिरा पाटील, उबाठा शहर प्रमुख सचिन पाटील तसेच मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषय मांडला व प्रशासनाचे लक्ष वेधले.

समितीच्या निदर्शनास आले आहे की, दिवा भागात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बांधकामे सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समितीने आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे ही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच ही अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवून पाडण्यात यावीत.

दिवा शिळ नागरी हक्क समिती प्रशासनाला आवाहन करते की, नागरिकांच्या हितासाठी त्वरित व निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे दिवा शिळ नागरी हक्क समितीने म्हटले आहे.

पालिका अधिकाऱ्या महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉलवर सेटलमेंटसाठी मागितले 'शरीरसुख'..

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका वरिष्ठ लिपिकाने चक्क महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पीडित महिलेने दाद मागूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ लिपिक भूषण पाटील याचा वाद झाला होता. कामाच्या कारणावरून त्याने या महिलेला इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानित केले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यावेळी हा वाद मिटवला, मात्र भूषण पाटील एवढ्यावरच थांबला नाही. त्याने या वादाचा सूड घेण्यासाठी एक वेगळीच चाल खेळली.

काही दिवसांनंतर भूषण पाटील याने पीडित महिलेला व्हॉट्सअऍप कॉल केला. तुझ्यासह आणखी एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असल्याचे सांगून त्याने तिला घाबरवले. दुसऱ्या कर्मचाऱ्याने माझ्याशी सेटलमेंट केली आहे, त्यामुळे त्याची कारवाई मी थांबवली आहे, असा दावा त्याने केला. यानंतर त्याने पीडित महिलेला विचारले की, तू मला काय देशील? मला तुझ्याकडून शरीरसुख हवे आहे, अशी थेट मागणी त्याने फोनवरून केली.

महापालिका प्रशासनाची धक्कादायक भूमिका

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने तातडीने आपल्या वरिष्ठांकडे धाव घेत घडलेली घटना सांगितली. मात्र, इतका गंभीर आरोप असूनही महापालिका प्रशासनाने भूषण पाटील याच्यावर कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पीडित महिलेने अखेर मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलीसांनी या प्रकरणी भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

भूषण पाटीलचा वादग्रस्त इतिहास

विशेष म्हणजे भूषण पाटील हा अधिकारी यापूर्वीही वादात राहिला आहे. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाच घेताना पकडण्यात आले होते, त्यावेळी भूषण पाटील यालाही अटक झाली होती. या प्रकरणामुळे तो जवळपास २ वर्षे निलंबित होता. इतका गंभीर इतिहास असतानाही त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले आणि आता त्याने महिला कर्मचाऱ्यासोबत असे गैरवर्तन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.