BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

केमिस्ट असोसिएशन मार्फत मुदत बाह्य व न वापरलेल्या औषधांचे होणार संकलन - श्री. जगन्नाथ (अप्पा) शिंदे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण येथे अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्या हस्ते 'पर्यावरण वाचवूया - औषधांचा गैरवापर टाळुया ! या संकल्पनेतून मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेल्या औषधांचे संकलन व त्यांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिता टेक बँक या कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी 'शपथ घेऊ या, मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांनी होणारी पर्यावरण हानी टाळू या' असे सांगितले. गुरुवार १० तारखेला कल्याण येथील केमिस्ट भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल ट्रक स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन द्वारे नुकतेच मे २०२५ मध्ये सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना एक्सपायर तसेच न वापरलेल्या औषधांचे शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिताचे परिपत्रक आणि विस्तृत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्यासोबत केमिस्ट असोसिएशनच्या सहभागातून पर्यावरणाला तसेच समाज, आरोग्याला घातक ठरणाऱ्या एक्सपायर व शिल्लक औषधींच्या शास्त्रीय विल्हेवाट करणे विषयीच्या मार्गदर्शक तत्वानुसार 'महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन' हे प्रत्येक केमिस्ट सभासदाकडे ग्रीन ड्रॉप बॉक्सची सोय ग्राहकांकरता करणार असल्याचे जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.

कल्याण शहरात सुमारे ८०० व ठाणे जिल्ह्यात जवळपास ५००० औषध विक्रेत्यांचे मेडिकल दुकाने आहेत. मुदतबाह्य औषधामुळे प्रदूषण होऊन, मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. प्रत्येक मेडिकलमध्ये मुदतबाह्य औषध साठवणुकीसाठीची सोय केली आहे. सदर कार्यक्रमाला ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष देशमुख, सचिव व पदाधिकारी तसेच अनेक लेखांमध्ये ग्राहकांची जनजागृती करणाऱ्या प्राध्यापिका मंजिरी घरत, सागर कुलकर्णी उपस्थित होते.

शिंदे गटाने सुचवीला महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला, अजितदादांची अडचण होणार ?

प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुंबई : प्रताप सरनाईक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी महापौरपदाच्या निवडीविषयीही भाष्य केले आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एकूण २९ महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. चव्हाण यांच्या याच विधानावर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते प्रताप सरनाईक यांनी महायुतीत महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला समोर आणला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नव्या विधानानंतर आता अजितदादांची अडचण होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा महापौर..

प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या निवडणुका आणि महापौरपद यावर भाष्य केले आहे. हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता. तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिलं पाहिजे. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाला महापौरपद मिळाला पाहिजे ही महायुतीची सूत्रे असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली हे सरकार उत्तम काम करत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

महायुतीत प्रतिनिधीत्त्व कसे दिले जाते ?

आम्ही आगामी निवडणुका महायुतीतच लढवणार आहोत. हे ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती, पूर्वीपासून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून येत होते, त्या पक्षाचा महापौर, द्वितीय स्थानावर ज्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला उपमहापौरपद तसेच तृतीय स्थानावर असलेल्या पक्षाला स्थायी समितीचे अध्यक्षपद, अशा प्रकारचे महायुतीत वाटप केले जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.

तीन नेते जो निर्णय घेतील ते..

मात्र शेवटी आम्ही किती काहीही बोललो तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे, असेही सरनाईक म्हणाले. तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांनी मला फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही वावरत आहात. तुमच्या कार्यपद्धती योग्य प्रकारे होती की नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे मतही सरनाईक यांनी मांडले.

ड्रग्स तस्करीवर प्रताप सरनाईक काय म्हणाले ?

गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर हे मराठीच्या मुद्द्यामुळे चर्चेत आहे. याच मीरा भाईंदरमधील ड्रग्स तस्करीवरही सरनाईक यांनी भाष्य केले. मीरा-भाईंदर शहर काही प्रयोगशाळा नाहीये. इकडे ड्रग्स माफिया घुसलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय चाललेला आहे. काही लोकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरसुद्धा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. आरोपीसह 58 पुड्या ड्रग्स पोलीस स्टेशनला नेऊन देण्यात आल्या. त्यानंतरही त्या पुड्यांसह आरोपीला पोलिसांनी सोडून दिलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा असे तीन पक्ष आहेत. मुंबईत भाजपा आणि शिवसेनेची ताकद आहे. असे असताना मुंबईत ज्याचे जास्त नगरसेवक किंवा ज्याचा अगोदर महापौर होतो, त्याचाच महापौर असा फॉर्म्यूला ठरला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१४ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गमित्राने बलात्कार करून तिला गरोदर करत झाला फरार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

भिवंडी : वर्गात शिकणाऱ्या मित्रानेच १४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याने पीडिता २ महिन्यांची गरोदर राहिल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वर्गमित्र नराधमाने पळ काढला आहे.

एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय वर्गमित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे अल्पवयीन पीडिता दोन महिन्याची गरोदर राहिल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून १४ वर्षीय वर्गमित्रावर अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी प्रसार माध्यमांना दिली.

घरी कोणी नसताना मैत्रिणीवर केला बलात्कार

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी भिवंडी तालुक्यातील अंजूर गाव परिसरात कुटुंबासह राहत आहे. तर तिचा १४  वर्षीय वर्गमित्र याच गावात कुटुंबासह राहत असून दोघंही गावाजवळ असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहेत. दोघात मैत्री असल्यानं एकमेकांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं. त्यातच मे महिन्यात शाळेला सुट्टी असताना तसेच घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मित्राने पीडित विद्यार्थिनीला बहाण्यानं आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर पीडितेवर वर्गमित्राने बलात्कार केला. दरम्यान पीडित विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचार सुरू असताना पीडित विद्यार्थिनी दोन महिन्याची गरोदर असल्याचं समोर आल्याने तिच्या कुटुंबाला धक्काच बसला.

बालिका गर्भवती असल्याचं कळताच मुलगा फरार

पीडितेच्या कुटुंबानं ११ जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचं कथन करताच १४ वर्षीय वर्गमित्रावर भारतीय न्याय संहिता कलम 64 (2) (उ ) 65 (1) सह पोक्सो कायद्याचं कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबने यांच्याशी संपर्क साधला असता, "पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून १४  वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलगा फरार झाला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश महादावाड करीत आहेत," असं त्यांनी यावेळी सांगितले.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजने मध्ये सावळा गोंधळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र सरकार तर्फे महिलांची आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून २१ ते ६० या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी २८ जून २०२४ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनातील १२,७२,६५२ लाभार्थी अपात्र ठरल्याने तसेच या योजनातील सगळेच व्यवहार अधांतरी असल्याने आणि राज्य सरकार याबाबत कोणतीही पारदर्शकता अवलंबत नसल्याने या संपुर्ण योजनेचे लेखापरिक्षण करण्याची मागणी नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्याचे महालेखापाल (वाणिज्य) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णय २८ जून २०२४ नुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे संनियंत्रण आणि आढावा घेण्याकरीता राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली होती. परंतु, शासनाने ३ जुलै २०२४ रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हास्तर समितीवर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांना अध्यक्ष करुन संबंधित जिल्ह्याचे मंत्री यांना सह अध्यक्ष करण्यात आले तर सदर समितीचे अध्यक्ष असलेले संबंधित जिल्हाधिकारी यांना सदस्य सचिव बनविण्यात आले. म्हणजेच लाभार्थींच्या निवडीला अंतिम मंजुरी देण्याचे सक्षम अधिकार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हातात देण्यात आले. या सुधारित शासन निर्णयानुसार लाभार्थ्याची यादी मंजुर करण्याचे अधिकार प्रशासनाकडे न ठेवता ते सरकारी मंत्र्यांच्या हातात आल्याने या योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असल्याची शक्यता आहे. संबंधित जिल्हा पालकमंत्री आणि जिल्ह्याचे मंत्री यांनी मंजुर केलेल्या लाभार्थींच्या पात्रतेची कोणतीही  शहानिशा न करता १४ ऑगस्ट २०२४ रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला आणि आजतागायत तो नियमीत देण्यात येत आहे. शासनाच्या संबंधित शासन निर्णय आणि सुधारित शासन निर्णय यांचे अवलोकन केले असता त्यामध्ये लाभार्थ्याची अंतिम यादी राजकीय हस्तक्षेपाने मंजुर झाली असल्याने त्यात मोठा घोळ झाला असण्याची शक्यता असल्याने आपण माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये २३ जानेवारी २०२५ रोजी संबंधित योजनेच्या नस्तीचे परिक्षण, लाभार्थ्याची यादी, मंत्रिमंडळाने मंजुर केलेल्या इतिवृत्ताची प्रत आणि जिल्हानिहाय लाभार्थ्याची संख्या उपलब्ध करुन देण्याबाबत माहिती मागितली असता त्याबाबत मला जनमाहिती अधिकारी, महिला आणि बालविकास विभाग यांनी आजतागायत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आपण केंद्रिय माहिती अधिकार अधिनियम २००५, नियम ५(२) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी, महिला आणि बालविकास विभाग यांच्याकडे १८ मार्च २०२५ रोजी अपिल दाखल केले.मात्र, दाखल केलेल्या अर्जावर आजतागायत कोणतीही सुनावणी आणि उत्तर मला महिला आणि बालविकास विभागाने न दिल्याने आपण केंद्रिय माहिती अधिकार अधिनियम २००५, नियम १९(३) अन्वये द्वितीय अपिल राज्य मुख्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई खंडपीठ, यांच्या १३ मे २०२५ रोजी दाखल केले आहे. ३ जून २०२५ रोजी वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार‘ लाडकी बहिण' योजनेत आत्तापर्यंत एकुण १२,७२,६५२ लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. जर जून २०२४ ते मे २०२५ पर्यंत या अपात्र लाभार्थ्याना प्रत्येकी १५०० रुपये प्रतिमाह देण्यात आले असतील तर त्यांना आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींचे वाटप राज्य सरकारने डोळे झाकून केले आहे. सदर पैसा जनतेचा असून त्याचे वाटप चुकीच्या पध्दतीने होत असल्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेतील लाभार्थ्यांची पुर्णतः चौकशी होणे गरजेचे असून, त्यासाठी लेखापरिक्षण होणे महत्वाचे आहे, असे संतोष जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे आत्ता कोणत्या वर्षाच्या सुनावण्या सुरु आहेत, याबाबत माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत २१ मे २०२५ रोजी माहिती मागितली असता सद्यस्थितीत राज्य माहिती आयोगाकडे सन २०२१-२२ या वर्षाच्या द्वितीय अपिलावर सुनावणी सुरु असल्याचे कळविले आहे. याचा अर्थ मी दाखल केलेल्या द्वितीय अपिलांवर २०२७-२८ पुर्वी सुनावणी होणे शक्य नाही आणि त्यामुळे  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण'  या योजनेतील अनियमितता बाहेर येणे शक्य नाही. माहिती अधिकार अधिनियमांतर्गत २१ मे २०२५ रोजी प्रधान सचिव अर्थविभाग, यांच्याकडे सन २०२३-२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद करण्यात आली होती, या योजनेसाठी कोणकोणत्या विभागाचा निधी अनुदान वाटपासाठी वळविण्यात आला याची माहिती मागितली असता, जनमाहिती अधिकारी वित्त विभाग यांनी माझा अर्ज जनमाहिती अधिकारी, महिला आणि बालविकास विभाग, मंत्रालय यांच्याकडे हस्तांतरीत केल्याचे मला ३ जून २०२५ रोजी कळविले आहे. या योजनेचे पुरस्कर्ते महिला आणि बालविकास विभाग याबाबत कोणतीही माहिती जनतेला देऊ इच्छित नाही. राज्य माहिती आयोगाकडे केलेली द्वितीय अपिले सन २०२७-२८ पुर्वी सुनावणीसाठी येणे कठिण आहे. या मोठ्या कालावधीत शासनाचा निधी म्हणजेच जनतेचा पैसा वारेमाप अपात्र लाभार्थ्यावर उधळला जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत १२,७२,६५२ लाभार्थी अपात्र ठरल्याचे वर्तमानपत्रांतील वृत्तावरुन दिसत आहे. सदर आकडा प्राप्तिकर विवरण पत्राशी लाभार्थ्यांची पडताळणी केल्यास कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतील सगळेच व्यवहार अधांतरी असल्याने आणि राज्य सरकार या योजनेबाबत कोणतीही पारदर्शकता अवलंबवत नसल्याने संपुर्ण योजनेचे लेखापरिक्षण राज्याचे महालेखापाल (वाणिज्य), यांचेमार्फत होणे गरजेचे असल्याने व्यापक जनहितार्थ आणि राज्याचे भविष्यातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी  सदर योजनेचे विशेष लेखापरिक्षण तातडीने हाती घ्यावे आणि यातील आर्थिक अनियमीततेला वाचा फोडावी, अशी विनंती निवेदनात संतोष जाधव यांनी राज्याचे महालेखापाल (वाणिज्य), यांना केली आहे.

अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच, युनिट-५ ठाणेकडुन जेरबंद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे : कासारवडवली पी.स्टे.गुन्हा नोंद कांक ६५५/२०२५ कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-५, वागळे, ठाणे कडुन करण्यात येत होता. नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले बाबत कळवा पोलीस स्टेशनं येथे गुन्हा नोंद क्रमांक ५९२/२०२५ कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर गुन्ह्याचा राखोल तपास करण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सपोनि. शरद पाटील, सपोउनि. राजेंद्र चौधरी, पोना. बंडगर, तेजस ठाणेकर, पोशि. यश यादव, असे एक पथक तयार केले. सदर पथकाने नमुद मयत अल्पवयीन मुलगी दि.०४/०७/२०२५ रोजी रहात्या घरातुन निघुन गेली त्यावेळेपासुन सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी केली असता सदर मुलगी ही घरातुन निघुन ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टॅण्ड येथे असल्याचे दिसुन आले, त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता सदरची अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसुन गेल्याचे दिसून आले. सदर माहितीच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रीक तपासामध्ये रिक्षा चालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचे आढळुन आले. त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेवुन रिक्षाचालक समाधान अर्जुन सुर्यवंशी, (वय: ४० वर्षे), व्यवसाय: ऑटो रिक्षा चालक, राहणार: सुखशांती चाळ, आंबेडकर पुतळ्याच्या जवळ, लोकमान्यनगर, पाडा नं. ३, ठाणे पश्चिम याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निषन्न झाल्याने त्यास दि.१०/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कासारवडवली पोलीस स्टेशनं कडुन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ.पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त शोध-१ (गुन्हे) श्री. शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, शरद पाटील, पोउपनिरी तुषार माने, स.पो.उप.निरी. चौधरी, पो.हवा. निकम, शिंदे, कार्ले, रावते, पालांडे, काटकर, पाटील, जाधव, मपोहवा. गिते, महाले, पो.ना. गार्डे, बंडगर, ठाणेकर, पो.शि. शेडगे, शिकारे, यादव या पथकाने यशस्वीपणे केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'गुरू शिष्य' परंपरा जपणारी "गुरूपौर्णिमा" भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिविली : गुरू पौर्णिमा म्हणजे आषाढ शुक्ल व्यास पौर्णिमा. गुरू वीण कोण दाखवी वाट.. अशा गुरुंचा वरदहस्त शिष्यावर असणे म्हणजे त्रिभुवनात संजीवनी मिळाल्यासारखे आहे. दिनांक १० जुलै, गुरुवार रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा, वंदे मातरम विद्यामंदिर, कनिष्ठ व पदवी महाविद्यालय तसेच नागपूर
 (दावसा) स्थित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा इथे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून मोठ्या उत्साहात गुरु पौर्णिमा साजरी केली. योगायोग असा की गुरुवार हा गुरूंचाच वार असून "गुरु पौर्णिमा" देखील याच दिवशी संपन्न झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी यांनी महर्षी वेद व्यास व सरस्वती पूजन करून  कार्यक्रमांना सुरुवात केली. इयत्ता आठवी मधील विभूती धसाडे या विद्यार्थिनीने आपल्या गायनतून गुरू वंदना सादर केली. संपूर्णतः कार्यक्रमाची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी उचलून घेतली होती. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व शिक्षकांचे शाळेच्या प्रवेशद्वारात त्यांचे पाय धुवून पाद्य पूजन केले, औक्षण करून व फुलांचा वर्षाव करत मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये वाजत गाजत सर्वांचे स्वागत केले. 
अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांना व्यासपीठावर स्थानापन्न करून स्वतः विद्यार्थांनी हस्त कलेने बनवलेले मुकुट मान्यवर आणि सर्व शिक्षकांच्या मस्तकावर परिधान केले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली "गुरु हमारे मन मंदिर मे.. गुरु हमारे प्यार" हे गुरु गीत सादर करून सर्व शिक्षकांना मानवंदना दिली. त्यानंतर नाट्य व नृत्य शिक्षक प्रमोद पगारे, अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु द्रोणाचार्य व एकलव्य हे नाटक नृत्य सादर केले. तर प्रांजल मिश्रा आणि अर्णव अंबिके या विद्यार्थ्यांनी गुरू शिष्य कथा सांगितली. शिशु विहारच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांचे पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन  फुले वाहून, ओवाळून त्यांच्या पाऊलांची पूजा केली. वंदे मातरम महाविद्यालयात सौ. खुशबू दुबे, प्रमोद गुप्ता व प्राचार्य डॉ. नाडर, उपप्राचार्या वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व विद्यार्थी काव्या कट्टी, श्लोक साळवी,  अनुज तिवारी, शिव श्याम यादव यांनी पुढाकार घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य अलपेश खोब्रागडे उपप्राचार्य चौधरी व विद्यार्थी सोबत आंचल पटवा, सोफिया, अवनीश पटवर्धन, पार्थ चोणकर यांनी भाग घेवून गुरुपौर्णिमा साजरी केली. 
जे एम एफ संस्थेचे २०२५ हे वर्ष 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. त्याच अनुषंगाने गुरू पौर्णिमा निमित्त जे एम एफ संस्थेची इमारत रांगोळ्या, फुलांनी सजवण्यात आली. शाळेतील इयत्ता नववी, दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेला हा कार्यक्रम पाहून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे भारावून गेले. व सर्वांचे मनापासून कौतुक केले.
सर्व प्रथम आपला आत्मा हा आपला गुरू आहे, गुरू हा कधीही वाईट मार्ग दाखवत नाही, म्हणून आपले मन, आपला आत्मा आपल्याला कधीही वाईट मार्गावर जाऊ देण्यास प्रतिबंध करत असतो म्हणून तो आपला गुरू आहे, आपले आई वडील हे प्रथम आपले गुरू आहेत, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक सजीव हा आपला गुरू असतो, कारण प्रत्येकाकडून काही ना काही आपण शिकतच असतो आणि त्यातूनच बोध घेत असतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले, आयुष्यामध्ये चढ उतार करत असतानाच यश अपयशाचे चटके, टक्के टोणपे खात असताना जो हात हातात घेऊन आपल्याला दिलासा देतो तो  गुरुंचा हात म्हणजे आपले गुरू होय. केवळ शिकवणे , शिकणे म्हणजे गुरू नाही तर येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव हा देखील आपला गुरु आहे, असे संस्थापकानी आपल्या भाषणात नमूद केले.
ब्रह्मांड रचिता ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती मधील स्वतः दत्त गुरु महाराजांनी चोवीस गुरु केले होते. मुंगीला देखील त्यांनी गुरु मानले, सर्व सजीवांमध्ये मुंगी हा असा जीव आहे की तो कधीही झोपत नाही, अविरतपणे आणि चिकाटीने कार्य करणे हे मुंगीचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच दत्त गुरुंनी मुंगीला आपले गुरू मानले, अशी गुरु शिष्यांची बरीच उदाहरणे देऊन सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना गोष्ट देखील सांगितली व गुरू पौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या. 
सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व फळ देऊन गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन इयत्ता दहावी मधील इव्हा शॉ व सार्थक भाईंबीड या विद्यार्थ्यांनी केले तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान दिले.

एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालात टेकऑफनंतर दोन्ही इंजिन बंद असल्याचा धक्कादायक खुलासा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद : अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या एएआयबीच्या चौकशी अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवाल याने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले? अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. अपघाताच्या महिन्याभरानंतर आलेल्या या चौकशी अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार, टेकऑफ झाल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन काही सेकंदात बंद पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल प्राथमिक आहे. सध्या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे, असेही तपास अहवालात म्हटले आहे.

एएआयबी ने १५ पानांचा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, विमानाने सकाळी ०८:०८ वाजता १८० नॉट्सची कमाल इंडिकेटेड एअरस्पीड घेतली होती. त्यानंतर लगेचच, इंजिन-१ आणि इंजिन-२ चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनांना इंधन पाठवतात) ते ‘रन’ वरून ‘कटऑफ’ परिस्थितीत गेले. फक्त एका सेंकदात हे घडले. त्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले. त्यानंतर दोन्ही इंजिन एन१ व एन२ रोटेशन स्पीड वेगाने निकामी झाले.

अपघातात २६० जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन लंडन जाण्यासाठी टेकऑफ घेतले होते. विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात मेडिकल कॉलेजच्या हॉस्टल परिसरात क्रॅश झाले. या अपघातात विमानातील २४१ जणांसह २६०  जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक व्यक्ती वाचला. विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनडाचा नागरिक तर ७ पोर्तुगाल नागरिक होते.

राज्य सरकारच्या अन्यायकारक कारवाढी विरोधात 'आहार' संघटनेची सोमवारी महाराष्ट्र बंद ची हाक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे : दोनच दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी 'भारत बंद' ची हाक दिली होती, आणि आता त्यानंतर येत्या १४ जुलैला म्हणजेच सोमवारी 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली आहे. हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलैला 'महाराष्ट्र बंद' ची हाक दिली आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच 'आहार' संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत.

यामुळे राज्याच्या महसुलावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 'आहार' संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'महाराष्ट्र बंद' बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. १४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंद ! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे ! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड कारवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील. दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली. परवाना शुल्क १५ टक्के वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६० टक्केची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. 'हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो. चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया आता पुरे झाले ! असेही या संघटनेने म्हटले आहे. 

राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढीच्या धोरणाविरोधात इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात 'आहार' संघटनेने १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान या आंदोलनांतर्गत राज्यभरातील २० हजार हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 'महाराष्ट्र बंद' चा सर्वाधिक प्रभाव मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील प्रमुख शहरी भागांमध्ये जाणवणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारने जर याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही संघटनेने दिला आहे.

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

उल्हासनगर - गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून त्यांची प्रशंसा होतं आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बदलापुर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ०१/०७/२०२५ रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुह्याचा तपास गुन्हे शाखा घटक-४ कार्यालयाकडुन करण्यात येत असतांना पोहवा. गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमीदाराकडून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रोशन बाळा जाधव हा बंद असलेल्या 'अमर डाय कंपनी' जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर-१ येथे फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने उल्हासनगर क्राईम ब्रांच युनिट-४ चे पोलीस अधिकारी व पथकाने कारवाई करून आरोपी रोशन बाळा जाधव (वय: ३४ वर्षे), राहणार हनुमान मंदिर जवळ, निळजेगाव, कल्याण फाटा, डोंबिवली पुर्व, जि. ठाणे यास ताब्यात घेतले व बदलापुर पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामधील सोन्या, चांदीचे दागिणे, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असुन खालील नमुद प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) बदलापुर पश्चिम पो.स्टे.गु.र.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे
२) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.र.नं. ३९१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१ (३),३०५ प्रमाणे
३) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३५७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे 
४) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३७०/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे
५) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.२२९/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५)प्रमाणे 
६) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३७१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(१), ३०५ प्रमाणे
७) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि. नं.३०७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे
८) शिवाजीनगर पो.स्टे.गु.रजि.नं. ४७८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(ए) प्रमाणे

तरी गुन्हे शाखा घटक-४ उल्हासनगर यांनी परिमंडळ-४, उल्हासनगर यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ०८ गुन्हे आरोपी रोशन बाळा जाधव यास अटक करून उघडकीस आणले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीने चोरी केलेले १८९.१७ ग्रॅम वजनाचे १५,१३,३६०/- रू. किंमतीचे  सोन्याचे दागिने व १०,०००/- रू. किंमतीचे चांदीचे दागिणे, ८०,०००/- रू. किंमतीचे दोन लॅपटॉप, ५०,०००/-   
रू. किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि गुन्हयात चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी ३,२८,०००/- रू. रोख रक्कम असा एकुण १९,८१,३६०/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, अमरसिंह जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सपोनि. श्रीरंग गोसावी, पोहवा. गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोना. कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोशि. संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले नेमणूक गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत प्रथमच संपन्न झाला महापालिका आयुक्तांचा जनता दरबार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्यांचे जलद गतीने निराकरण व्हावे, या दृष्टीकोनातून दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. आता डोंबिवलीतील नागरीकांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना देखील जनता दरबारात समक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्तांसमोर मांडता याव्यात यासाठी प्रथमच आयुक्तांच्या जनता दरबाराचे आयोजन डोंबिवली (पूर्व) येथील पी.पी चेंबर्स येथे 'फ' प्रभाग कार्यालयाच्या इमारतीत काल दुपारी करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७५ ते ८० नागरीकांनी जनता दरबारास उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्त व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सदर समस्यांवर चर्चा करुन त्यांचे त्वरीत निराकरण करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना सक्त सुचना देण्यात आल्या असून असे बांधकाम होताना दिसले तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत, महापालिका रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या “नॅशनल क्वालिटी अश्यूरन्स स्टँडर्ड” व “कायाकल्प” या प्रकल्पा अंतर्गत/सेवांतर्गत नागरी आरोग्य केंद्रे व महापालिका रुग्णालये यांच्या कार्यप्रणालीबाबत कालबध्द नियोजन करण्यात येत आहे आणि येत्या कालावधीत अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी योवळी पत्रकारांशी बोलताना दिली.

जनता दरबार संपन्न झाल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच इतर अधिकाऱ्यांसमवेत थेट चालत डोंबिवली स्थानक परिसराची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्याकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली - मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर ठिकाणी मिळून आलेल्या आरोपीकडून एकुण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे २.१२ कोटी रकमेपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करून गु.र.नं ७८७/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मी कलम ८ (क), २१(क) २२(क) मध्ये त्यास अटक केलेली आहे. सदरचा आफ्रिकन देशातील परदेशीय नागरीक आरोपी नामे इसा बकायोका (वय: ३७ वर्षे) मुळ राहणार आयवोरी कोस्ट याच्याकडून एकूण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
यापुर्वी दिनाक २७/०६/२०२५ रोजी गु.र.नं ७३१/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनीव्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१(क) २२(क) अन्वये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एमडी) पकडण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपीचा शोध येत असताना वरील माहीती मिळाल्याने यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या गु.र.नं ७३१/२०२५ मधील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख याच्या कडुन बँगलोर येथील चोरीची गाडी एम.डी सह ताब्यात घेण्यात आलेली आहे.

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत काही गोपनीय माहीती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण तसेचं मानपाडा पोलीस ठाणे यांच्या दुरध्वनी कमांक (०२५१)२४७०१०४ यावर संपर्क साधावा. माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

सदरची यशस्वी कामगिरी ही ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाचे श्री. संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ कल्याणचे श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त डोबिवली विभागाचे श्री. सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, सपोनि सागर चव्हाण, अजय कुंभार, पोहवा. पाटील, माळी, राठोड, पोशी. आडे, गरुड, झांझुर्णे, चौधर यांच्या पथकाने केलेली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये अवघे गर्जले पंढरपूर, विठू नामाच्या घोषाचे दुमदुमले सूर..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अहोभाग्यच म्हणावे लागेल की आज देवशयनी एकादशी, शुक्ल आषाढ यादिवशी विद्यार्थ्यांच्या रूपात साक्षात पांडुरंग रुक्मिणीच जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये अवतरले होते. मोठ्या संख्येने वारकरी होऊन आलेले जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचे आणि विद्यामंदिराचे विद्यार्थी संत मंडळीची मांदियाळीच जणू अवतरली होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे व इतर मान्यवरांनी विठल रखुमाई आणि पालखी मधील संत ज्ञानेश्वरांची विधीवत पूजा करून पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. सर्वच मुलांनी विठूचा गजर करत, टाळ मृदूंगाचा घोष करत पालखी प्रस्थान सोहळ्यांमध्ये सामील झाले.  
इयत्ता तिसरी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी.. हा अभंग सादर केला. त्याच बरोबर शिशुविहार व पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य शिक्षिका दीपाली सोलकर व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा संपन्न केला तर नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार नाटक छोट्या बाळ गोपाळ यांनी सादर केले. 
विठ्ठलाचे बाह्यरुपी वर्णन करताना संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, विठ्ठल हा रंगाने सावळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, कानामध्ये मकर कुंडले आहेत असे  विठ्ठलाचे सात्विक रूप बघताना आपला अहंपणा अलगद निसटून जातो तर अंतर्रूप पाहताना निस्सिम त्यागाची भावना जाणवते, आणि आज असे हे सावळे, सुंदर, मनोहर  वाटणारे तुमचे रूप बघून साक्षात बालरूपातले विठ्ठल 'जे एम एफ' मंडप्पम मध्ये अवतरले आहेत असेच वाटत आहे. असे उद्गार काढून सर्वांना देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
देवशयनी एकादशी म्हणजेच आजपासून पांडुरंग चार महिने निद्रावस्थेत जातात, त्यावेळी पुढचे आठ महिने इतर देवगण संसाराचा कारभार चालवतात, हेच एक उत्तम उदाहरण तुमच्या सर्वांसाठी आहे की आपण आपल्या शाळेचा, आपल्या वर्गाचा एक भाग आहोत, वर्गप्रतिनिधी उपस्थित नसला तरी ती तुम्हा सर्वाची जबाबदारी आहे की वर्गाला शिस्तबद्ध ठेवणे आणि सहकार्य करणे. आज ही संतांची मांदियाळी बघून खऱ्या अर्थाने पांडुरंग आपल्या भेटीसाठी आला आहे असे जाणवत आहे, असे उद्गार संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री.नरेश पिसाट, श्री.अवधूत देसाई, श्री.विठ्ठल कोल्हे यांनी हुबेहूब विट्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती उभी केली, व समोरच तुळशी वृंदावन देखील तयार केले. 

"याची देही, याची डोळा पाहिला माऊलींचा रिंगण सोहळा.."


विठ्ठलाच्या नामघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात, फुगड्या खेळत माऊलींचा पालखी सोहळा संपन्न झाला. प्रसाद सेवन करून पुन्हा एकदा सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा नामघोष करून सोहळ्याची सांगता झाली.

पुढील ५ वर्षांत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ₹२५,००० कोटींची गुंतवणूक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर यांच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचा आणि शेतकरी बांधवांच्या मुक्कामाचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर. येथे शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणी कृषी क्षेत्रात विकसित होत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन, नव्या शेती पद्धती तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. शेतीतील विविध यशस्वी प्रयोग, फलोत्पादन पद्धती, उत्पादन वाढविण्यासाठीचे संशोधन, माती परीक्षणापासून ते कापणीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गावांमध्ये संपूर्ण कृषी व्यवस्थापन करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून होत आहे. दरवर्षी ₹५००० कोटीप्रमाणे, पुढील 5 वर्षांत ₹२५,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक कृषी क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी बांधवांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीचे काम सुरू झाले असून, या योजनेत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गावांतील बहुद्देशीय सोसायट्यांना १८ प्रकारचे व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. 

या प्रसंगी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वारकरी सेवेचे नवे ‘बेंचमार्क’ राज्य शासनाकडून प्रस्थापित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाद्वारे आयोजित ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाचा समारोप करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तसेच नद्यांवर प्रेम करायला शिकवले आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य आपण करत आहोत. दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यभरातून वारकरी, देहभान हरपून भगवान विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरात येतात. वर्षानुवर्षे आवश्यक अश्या स्वच्छतेच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे वारी मार्गावर आणि पंढरपूर शहरात वारीनंतर कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत असे. २०१८ साली या समस्येच्या अनुषंगाने ‘निर्मल वारी’ उपक्रम सुरु करण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून पालखींच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शौचालयांची व्यवस्था राज्य शासनाने केली. त्यामुळे यावर्षी आपली वारी अधिक स्वच्छ, म्हणजेच ‘निर्मल’ झालेली आहे. स्वच्छतेत वाढ झाल्याने महिला वारकऱ्यांची संख्या देखील वाढलेली दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास आणि आरोग्य विभागाच्या सर्व संबंधितांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचे तसेच राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सेवेच्या उपक्रमाचेही मुख्यमंत्री यांनी कौतुक केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते

यंदाचा आषाढी एकादशीला डिजिटल वारीचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दि ६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर डिजीटल वारी मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीयावरील व्हॉट्सऍप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, X (ट्वीटर) व वेबसाईट या सोशल मिडीया चॅनल चे क्युआर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. या कार्यक्रमास मराठी सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरख मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर हे देखील उपस्थित होते.

'जन गण मन' कॉन्व्हेन्ट शाळा, दावसा येथे दहावी, बारावी नंतर विद्यार्थांना करियर मार्गदर्शन व कौतुक सोहळ्याचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

नागपूर - इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कोणते क्षेत्र निवडावे यासाठी गोंधळून न जाता योग्य मार्गदर्शन लाभण्यासाठी 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शन शिबिर जन गण मन कॉन्व्हेन्ट, दावसा, ता. नरखेड शाळेमध्ये आयोजित केले होते.
'जान्हवीज मल्टी फाऊंडेशन' शिक्षण संस्थेचे हे वर्ष म्हणजे मुंबई आणि नागपूर (दावसा) येथे कार्यरत असलेल्या संस्थेचे 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, शाळेचे व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, मुख्याध्यापक श्री. भजन सर, तसेच उपस्थित पाहुणे डॉ. कैलाश कडू, प्राचार्य दिलीप फीसके, डॉ. मारोतराव कोल्हे, श्रीमती सुभद्रा रेंगे, श्री. युवराज कोल्हे, सौ. छाया घाटोळे, सौ. कल्पना कळंबे, श्री. राकेश भांगे त्याच बरोबर २०० पेक्षा जास्त दहावी बारावी चे उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन  व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक मुलगा अथवा मुलगी जन्मजातचं वेगवेगळे गुण आत्मसात करून जन्माला आलेला असतो, जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे  अंगभूत असलेले हे गुण प्रगल्भ होऊ लागतात व आवड निवड ठरवू लागतात, सांगण्याचा उद्देश हाच की , तुमच्या मध्ये असलेले गुण हे आता विखुरले गेले आहेत त्यामुळे दहावी बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून देखील कोणत्या गुणवत्ते आधारे पुढे काय करायचे हा प्रश्न कायमच मनात सलत राहतो, त्यासाठी जसे हिऱ्याला पैलू पाडणारा उत्तम कारागीर मिळाला की त्याची चकाकी जगभर झळकते, तसेच उत्तम मार्गदर्शक लाभला की विद्यार्थ्यांचे भवितव्य चकाकते असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सगळेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील,वैज्ञानिक नाहीत बनू शकत, पण म्हणून खजील न होता त्या पदव्यांसारखे इतर अभ्यासक्रम देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत व ते तुम्ही करू शकता. प्रयत्न करत असताना आपल्या बुद्धिमत्तेला झेपेल असेच क्षेत्र निवडा असेही डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले.
     
एखादी गोष्ट अचूकपणे करायची आहे आणि ती मी करूनच दाखवणार हा ध्यास विद्यार्थी दशेत कायमच असला पाहिजे, परंतु मनावर आणि बुद्धीवर ताण न येऊ देता शांतपणे मार्ग काढत आपल्या योग्य विचारांच्या दिशेने जा, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सांगून दिलासा दिला तसेच डॉ. कडू यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी करियर विषयी मनात रेंगाळत असलेले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले, व त्यांनी देखील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन योग्य ती समाधानकारक उत्तरे दिली. मागील १२ वर्षा पासुन अशा प्रकारचा कौतुक सोहळा मुंबई पासून दावसा पर्यंत आयोजन करून 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' शिक्षण संस्था 'रौप्य महोत्सव' साजरा करत आहे. 
त्याच बरोबर इतर शाळेतून देखील सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षक व उत्कृष्ट मुख्याध्यापक निवडून त्यांनाही शाल, श्रीफळ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून, वंदे मातरम् म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तुफान गर्दीत मराठीचा एल्गार करत अखेर ठाकरे बंधू आले एकत्र..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
मुंबई : राज्यातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करत सरकारने तो निर्णय मागे घेतल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजय मेळावा घेतला. या मेळाव्याचे निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर दोघे एकत्र आले. मुंबईतील वरळीतील डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. दोघांनीही विजय मेळाव्यातून सरकारवर घणाघात केला. त्यांनी भविष्यातही एकत्र राहण्याचे संकेत दिल्याने मनसैनिक आणि उबाठा सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी या मेळाव्यासाठी वरळी डोम सभागृह पूर्ण क्षमतेने भरून गेले होते. जागा नसल्याने अनेक कार्यकर्त्यांना बाहेर थांबावे लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या मराठीप्रेमींनी तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी सभागृहात हजेरी लावली होती. या मेळाव्याला विविध पक्ष आणि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, तसेच कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांची उपस्थिती होती. मात्र, या मेळाव्यात काँग्रेसचा एकही आमदार, खासदार किंवा प्रमुख नेते हजर नव्हते.
या मेळाव्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. वरळीतील ब्रास बँड पथकाच्या सादरीकरणातून वातावरण भारावून गेले होते. सन्माननीय उद्धव ठाकरे असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. तिथले संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पण पावसामुळे जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा कार्यक्रम इथे घ्यावा लागला. मी एका मुलाखतीतही स्पष्टपणे सांगितले होते की कोणत्याही भांडणापेक्षा, मतभेदांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे अनेकांना जमले नाही, जे बाळासाहेबांनाही साधता आले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना  जमले. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता फक्त ‘मराठी’ या अजेंड्यासमोर ठेवून पार पडत आहे. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्या-वाकड्या नजरेने पाहू नये. हिंदीचा मुद्दा नव्हता. पण तो कुठून तरी अचानक आला. लहान मुलांनी हिंदी शिकावी, यासाठी सरकारकडून सक्ती केली जात आहे. कुणालाही विचारले जात नाही, शिक्षणतज्ज्ञांचंचे मत घेतले जात नाही. केवळ बहुमताच्या जोरावर सरकार निर्णय लादते. पण लक्षात ठेवा सत्ता तुमच्याकडे विधान भवनात आहे, रस्त्यावर मात्र आमच्याकडे सत्ता आहे.

उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमच्यातला (राज आणि उद्धव) आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्र राहणार आहोत. हे पाहून अनेक बुवा-महाराज व्यस्त झाले आहेत. कुणी लिंबू कापत आहे, कुणी टाचण्या मारत आहे, तर कुणी अंगारे-धुपारे करत गावाकडे गेला आहे. रेडेही कापत असतील. पण त्यांना सांगतो या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला आणि आज आम्ही त्यांच्या वारसदार म्हणून तुमच्या पुढे उभे आहोत. हिंदी सक्ती तुमच्या सात पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही .आज भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसाठी आज सर्वांनी वज्रमुठ दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणतात मराठीसाठी आंदोलन करणे म्हणजे गुंडगिरी आहे. आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी असेल, तर तुमच्या दरबारात न्याय मिळवण्यासाठी ही गुंडगिरीच करू. कारण, आजपर्यंत तुम्ही आम्हाला वापरून फेकले, पण आता आम्ही तुम्हाला फेकून देणार आहोत.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय वाढवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षकांसाठी प्रथमच झाली शिक्षण परिषद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी प्रथमच शिक्षण परिषदेचे आयोजन कल्याण मधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवादही साधला.

“महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले महापालिका शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन!”

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निपुण भारत कार्यक्रम राबवला जात आहे, ज्यामध्ये महापालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा पायाभूत बौध्दीक स्तर वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची विनोबा भावे ऍपच्या माध्यमातून मराठी - इंग्रजी आणि गणित विषयाची चाचणी घेण्यात आली आहे. त्याद्वारे महापालिका शाळांतील विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत ते निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील ३ महिन्यांमध्ये महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करून अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रारंभिक चाचणीमध्ये समोर आलेल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर शिक्षकांना माहिती करून देणे, आवश्यक ते नियोजन करणे आणि ३ महिन्यात महापालिका शाळांतील हे सर्व विद्यार्थी अंतिम टप्प्यापर्यंत कसे पोहोचतील याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. ज्यामध्ये महापालिका शाळांचे सर्व शिक्षक, सनियंत्रण अधिकारी, मार्गदर्शन करण्यासाठी काही शिक्षण अभ्यासकही सहभागी झाले होते.

महापालिकेकडून आता विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि महापालिका शिक्षकांची शिक्षण परिषद ही दर महिना घेण्यात येणार आहे. जेणेकरून शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासह त्याची परिणामकारकताही समोर येईल आणि महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थी हे पायाभूत चाचणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतील. याची दखल न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या सर्व उपक्रमांमागील अंतिम ध्येय असल्याचा निर्वाळा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना दिला. तसेच ही काही अवघड गोष्ट नसून आपल्या महापालिका शाळांमधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात असा विश्वासही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. या शिक्षण परिषदेला महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उप-आयुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे तसेच विनोबा भावे ऍपचे भैरव गायकवाड उपस्थित होते.

डोंबिवलीतील निळजे येथील कटाई-पलावा पुलाचे उदघाट्न संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, ४ जुलै - अनेक वर्षे कल्याण-शीळ मार्गावरून वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाश्यांची वाहतूक कोडीतून काहीशी मुक्ती होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून औपचारिकरीत्या निळज्यातील काटई-पलावा पुलाचे उदघाटन केले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी फित कापून अधिकृतरित्या पुलाचे उदघाट्न झाल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निळजे काटई-पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करतो असे सांगत विरोधकांना टोलाही लगावला. गेले दहा वर्षे ज्यांनी काम करायला पाहिजे होते त्यांनी काहीही काम केले नाही. मात्र शिवसेना जे बोलते ते काम करते असेही सांगितले. कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून येथून वाहतूक करणाऱ्यांसाठी हा रस्ता डोकेदुखीचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे या मार्गावरील पलावा जंक्शन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती.

या पुलाबाबत मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठवला होता. याच पुलाच्या कामावरून ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तसेच या दोघांनी पलावा पुलाच्या ठिकाणी मोर्चे  काढून आंदोलनही केले होते. परंतु आता हा पुल नागरिकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला आहे. आता पलावा एक्सपिरिया मॉल येथे वाहतूक कोंडी होणार नाही. वाहन चालकांना रखडावं लागणार नाही. यापूर्वी पलावा पुलाचं काम कधी पूर्ण होईल? असा प्रश्न विचारला जात होता त्यातून आता सुटका झाली आहे. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे कामावरून घरी येणारी लोकं वेळेत घरी पोहोचतील. पण सत्ताधारी महायुतीने या पलावा पुलाचे उदघाट्न करताना गोपनीयता का ठेवली असेही विचारले जात आहे. शिवसेना कोणतेही काम गाजावाजा करून करते त्याला यावेळी फाटा देण्यात आला आहे.

निळजे काटई पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी, लताताई पाटील, सदानंद थरवळ, राजेश कदम, महेश पाटील, बंडू पाटील, अर्जुन पाटील, दत्ता वझे, संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, रणजित जोशी, भरत भोईर, सतीश मोडक यांच्यासह असंख्य  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

टिटवाळा : पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘पुढारी’ दैनिकाचे प्रतिनिधी अजय शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी'च्या तिघा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात  या कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला पहिलाच गुन्हा ठरला आहे. महाराष्ट्रात या कायद्याअंतर्गत साधारणत: ३६ गुन्हे नोंद आहेत.

दि.१८ जून २०२५ रोजी, शेलार यांनी प्रकाशित केलेल्या “सरकारी मातीची खासगी विक्री” या बातमीने प्रशासनात खळबळ माजवली होती. त्यानंतर संदीप नाईक या इसमाने २७ जून रोजी फेसबुक लाईव्ह करून आपल्या सहकार्यांसमवेत शेलार यांना “अजय शेलार पुन्हा आमच्या बातम्या लावशील तर समजून घे,आमच्या बातम्या करशील तर लक्षात ठेव" अशी थेट धमकी दिली, तसेच समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.

या संपूर्ण प्रकारामुळे शेलार यांचे प्राण धोक्यात आले असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यालाच आव्हान उभे राहिले होते. शेलार यांनी यासंदर्भात टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’चे राज्य संघटक मंत्री संदीप नाईक, राजेंद्र जाधव व अनंता कोल्हे  हे तिघे प्रमुख पदाधिकारी आरोपी आहेत. या प्रकरणाची माहिती गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही देण्यात आली आहे.

या तक्रारीला दिलेल्या गंभीर प्रतिसादामुळे आता इतर पत्रकारांमध्येही एक विश्वास निर्माण झाला आहे की, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदा आता प्रत्यक्षात उभा राहत आहे. हा गुन्हा केवळ एका पत्रकाराचा लढा नाही, तर ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या हल्ल्याला दिलेली सडेतोड प्रतिक्रिया आहे. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न केंद्रस्थानी येणार हे निश्चित झाले आहे.