BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अनिल आय हॉस्पिटलच्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.११:  ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटल' च्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे उद्घाटन आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या नव्या अत्याधुनिक आय क्लिनिकचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 
यावेळी श्री. परणाद  मोकाशी, श्री. जितेंद्र भोईर, श्री. शैलेन्द्र भोईर तसेच श्री. भाई पानवडीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली पश्चिम येथील 'अनिल आय हॉस्पिटल' ची ही सहावी नवीन शाखा नागरिकांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक मोठी पर्वणी ठरली असून, आता अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार अशा सर्व सुविधा घराजवळ उपलब्ध होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या दीर्घकालीन आणि समाजोपयोगी नेत्रसेवेचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी डोंबिवलीकरांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी व विश्वासाबद्दल मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, “डोंबिवलीकरांच्या विश्वासामुळेच आज आम्ही सातत्याने सेवा विस्तार करू शकलो आहोत. दर्जेदार, आधुनिक व रुग्णकेंद्रित नेत्रसेवा भविष्यातही आमच्या कडून अखंडपणे सुरू राहील, याची आम्ही खात्री देतो.”
अनिल आय हॉस्पिटल हे विश्वास, अनुभव आणि आधुनिक नेत्रसेवेचे प्रतीक असून डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांसाठी उच्च दर्जाची आय केअर अधिक सुलभ होणार असून, ही शाखा नेत्रसेवेत एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डोंबिवली पाश्चिमेकडील प्रभाग क्र.२५ मधील मनसे पुरस्कृत उमेदवार शैलेश, मनीषा, पूजा धात्रक यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा नागरिकांनी केला संकल्प..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २५ (अ) मधून सौ. मनीषा शैलेश धात्रक २५ (ब) मधून पूजा शैलेश धात्रक व २५ (क) मधून शैलेश रमेशचंद्र धात्रक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदान मागत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ते संवाद साधत आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. 

शैलेश रमेशचंद्र धात्रक व मनीषा धात्रक हे कुटुंब गेली अनेक वर्ष या प्रभागाचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, गटारे, नाले सफाई, मुबलक  पिण्याचे पाणी या सुविधा नागरिकांना नियमित दिल्या आहेत तसेच इतर सामाजिक कामे देखील केलेली आहेत व विकासकामांची गंगा प्रभागात वाहत आहे. मनीषा शैलेश धात्रक यांनी सांगितले की प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेले अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कल्याण-डोंबिवलीला आनंदी शहर करायचं आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली परिसरात विविध प्रकल्प राबविले जात असून अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरांना आनंदी शहर बनवायचं असल्याचे सांगत कोणी कितीही करूद्या दावेदारी महायुतीच राखणार कल्याणची सुभेदारी असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर आयोजित विजय संकल्प सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील आदींसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर पहिला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकी नंतर आता महापालिका निवडणुकीत चौकार षटकार मारायचा आहे. विरोधकांचा सुपडा साफ करायचा आहे. ६० हुन अधिक नगरसेवक निवडून येऊन विजयाची नांदी सुरू झाली आहे. काही लोकं फक्त टीका टिपण्णी करतात, दुसऱ्यांचा आधार घेऊन काही लोकं मला बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत. आपल्यावर कितीही टीका झाली आरोप झाले तरी या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. 

काहींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. घरी बसून सरकार चालवता येत नाही.  लोकांणा सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. काही लोकं मुंबईकडेच लक्ष लावून बसले आहेत. काहींचा डोळा मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीवर असून आमचा डोळा मुंबईच्या विकासावर आहे. निवडणूक आली की मुंबईतील मराठी माणूस विरोधकांना आठवतो.   
कल्याण हे मुंबईचे शॉकऍपजोबजर आहे. मुंबईचा भार हे उपनगर सांभाळत आहेत. पाच वर्षात कल्याण हे आघाडीचे शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कल्याण-डोंबिवली धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केल्या जातीलअडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. सर्वसामान्याचा विकास, शहरांचा विकास झाला पाहिजे यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामे केली जात आहेत. 

कल्याण ऐतिहासिक नगरी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात येथून झाली त्याचे स्मारक केलं आहे. ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट. लोकांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मी प्रतिपादन करतो.रखडलेले पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिव्यातील साबे गावात महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार..

विशेष प्रतिनिधी

दिवा : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र.२९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी आमदार निरंजन डावखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रभाग क्र.२९ मधील २९ (अ) मधून अर्चना पाटील, २९ (ब) मधून वेदिका पाटील आणि २९ (क) मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच प्रभाग क्र.२९ मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

'अनिल आय हॉस्पिटल' चे डोंबिवली पश्चिम येथे सहाव्या शाखेचे दि.११ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नेत्रसेवेत गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह सेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' आता डोंबिवली पश्चिम येथे आपल्या सहाव्या शाखेचे उद्घाटन करत आहे. हे नवीन अत्याधुनिक आय क्लीनिक ११ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
सन १९७२ साली सुरू झालेला 'अनिल आय हॉस्पिटल'चा प्रवास आज ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (पूर्व), डोंबिवली (पश्चिम), ठाणे, कल्याण, निळजे पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये विस्तारला असून हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार  यांसारख्या सर्व सुविधा आता घराजवळ उपलब्ध होणार आहेत. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण  यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार असून, श्री पर्नाद मोकाशी सह डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “डोंबिवलीकरांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच आम्ही सातत्याने पुढे वाटचाल करू शकलो. दर्जेदार व प्रगत नेत्रसेवा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. लवकरच ठाणे येथे आमची सातवी शाखा सुरू होणार आहे.” डोंबिवली पश्चिम येथील ही नवीन शाखा परिसरातील नागरिकांसाठी आय केअर च्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
दिनांक: ११ जानेवारी २०२६
वेळ: ११ ते २
पत्ता: अनिल आय हॉस्पिटल, तळमजला, घनश्याम कॉम्प्लेक्स, डीएनएस बँक जवळ, एमजी रोड डोंबिवली (पश्चिम)
संपर्क :
अनिल आय हॉस्पिटल
+91 99252 35969

मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती..

विशेष प्रतिनिधी

दिवा : मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २७ व २८ येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मतदानाबाबत जनजागृती मोहिम आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

दिवा स्टेशन (पूर्व) येथील एस.एम.जी विद्यालय येथे मतदान जनजागृती प्रतिज्ञा व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “मतदान हा हक्क आणि कर्तव्य आहे”, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करूया” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक धादवे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच स्वीप पथक प्रमुख सचिन विलास वायदंडे (पथक क्र. २७ व २८) यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र मुंडे, गिरीश शेलार (केंद्र समन्वयक – १५), शिवा सांगळे, निवृत्ती जाधव व स्वीप पथकातील सदस्य उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गुन्हे शाखा घटक -३ कल्याणच्या पथकाने गुन्ह्यातील गेले ३ वर्षांपासुन २ फरार आरोपींचा शोध घेवुन सापळा रचत घेतले ताब्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
डोंबिवली - दिनांक ७ जानेवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४११/२०१६ भा.द.वि. कलम ३२४, ३४ या गुन्ह्यातील आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, राहणार: पुतळाबाई चाळ, अशोकनगर वालधुनी, कल्याण पुर्व, व २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे, राहणार: वरील प्रमाणे हे वेळावेळी त्यांचा ठाव ठिकाणा बदलुन  राहत असून ते सापडत नसल्याने आरोपींना हजर करण्याकरीता मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग पहिले न्यायालय,कल्याण यांनी दि. १७/०१/२०२३ रोजी जाहिरनामा काढलेला होता. सदर आरोपी अद्याप सापडत नसल्याने त्यांचा कसोशीने शोध घेवुन सदर दोन्हीही आरोपी हे काल्हेर भिवंडी येथे राहत असल्याबाबत पोशि.गोरक्ष शेकडे यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा,घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहा. पोलीस उप निरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा. विजय जिरे, विलास कडु, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, गुरुनाथ जरग, गणेश हरणे, पांडुरंग भांगरे, सचिन भालेराव, सतीश सोनवणे यांनी काल्हेर गांव हल्दीराम गोडऊनच्या मागे, सीजी पार्क बिल्डींगजवळ भिवंडी येथे सापळा रचुन फरारी आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

मा. कल्याण कोर्टाने जाहीरनामा प्रसिद्ध करून सदर दोन्ही आरोपी हे फरार घोषित करून शोधण्याचे व समक्ष हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, सदर आरोपी हे दोन्ही सख्खे भाऊ असून एका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मा. कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते.

डोंबिवलीतील सायली चव्हाण यांना थेट सहाय्यक संचालक पदाची घवघवीत यशप्राप्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मानपाडा रोड येथील श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सायली सौरभ चव्हाण या कन्येने जिद्द, चिकाटी आणि अथक चार वर्षांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर थेट सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (अधिकारी वर्ग–१) या प्रतिष्ठित पदाला गवसणी घातली आहे.
सायली चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामागे मोलाची साथ देणाऱ्या आई- वडिलांसह सासरकडील कुटुंबीयांचाही यावेळी आवर्जून गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत सायली चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला सुरज मराठे, ज्योती मराठे, विवेक खामकर, हर्षल मोरे, संजय निकते, दीपाली पाटील, अक्षय सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सायली चव्हाण यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सायली चव्हाण यांचे हे यश डोंबिवलीसह संपूर्ण परिसरातील तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरणारे आहे.

ठाण्यात घराणेशाहीला नकार, तर दिवा, डोबिंवलीत पाठींबा कसा ?


विशेष प्रतिनिधी

दिवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलांना ठाण्यात तिकीट नाकारले पण त्याचवेळी दिव्यात माजी उपमहापौर रमाकांत मढवींच्या मुलीला तर डोबिंवलीत आमदार मोरेंच्या मुलाला कसे तिकिट दिले गेले. यावर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. 
  
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ठाण्यातील खासदार, आमदार यांच्या मुलांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिंदे सेनेत नाराजीची लाट उसळली आहे. पण तेच उलट दिवा, डोंबिवलीत जल्लोष पहायला मिळाला. 

ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण तेव्हाच दिव्यातील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांची मुलगी साक्षी मढवी हिला दुसऱ्या दोन टर्म असलेल्या नगरसेविकेची तिकिट दिली गेली. तर डोंबिवलीतील आमदार राजेश मोरे यांच्या हर्षल मोरे याला तिकिट दिले गेले. शिंदेंचा ठाण्यात वेगळा न्याय आणि दिवा, डोंबिवलीत वेगळा न्याय का?असा सवाल नागरिक विचारत आहेत. सर्वांना समान न्याय मिळावा असे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये सद्य सवयी व भविष्यकाळातले जीवन "प्रेझेंट हॅबिट्स ऍण्ड फ्युचर लाईफ" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - व्याख्यानाचे वक्ते व 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे प्रेरणादायी विचार  श्रोत्यांना कायमच उस्फुर्त करत असतात. आपली व्याख्यानमाला सुरू करताना डॉ राजकुमार कोल्हे म्हणाले की, नवीन दिवस म्हणजे मिळणारी नवीन संधी असते, प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या अंगात असणाऱ्या चांगल्या वाईट सवयींचा गुलाम असतो, अंगभूत असणाऱ्या चांगल्या सवयी नेहमीच भविष्यकाळातील जीवन सुसह्य करून टाकतात तर वाईट सवयी ह्या भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा पाठलाग करत राहतात. प्रथमतः वेळेचे नियोजन आणि वेळेची किंमत असणे हेच  खरे यशाचे गमक आहे. पैसा आणि वेळ या गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य दिले तर अनेक  सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील, यासाठी योगा करणे,  आवडीचे खेळ खेळणे या चांगल्या सवयी जर लावून घेतल्या तर भविष्यकाळातील जीवन तुम्ही आनंदाने आणि आत्मविश्वास पूर्वक जगू शकाल. स्वतः बरोबरच इतरांचाही आदर करण्याची कला आणि सवय सर्व जन माणसात असावी हे सांगताना डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले की भारतातील प्रत्येक स्त्री ही पूजनीय, वंदनीय, महाराणी आहे म्हणूनच आमच्या भारतीय संस्कृती मधे स्त्रियांशी हस्तांदोलन न करता आम्ही हात जोडून नमस्कार करून स्त्री चा आदर करतो. 
आपल्या कामाशी, कर्तव्याशी प्रामाणिक राहा, असे सांगत जे आर. डी. टाटा यांचे उदाहरण दिले. भूतकाळ हा मनाचा पुसटसा आरसा असतो तर भविष्यकाळ हा मनाचा,  विचारांचा स्पष्ट दिसणारा चकाकणारा  आरसा असतो म्हणूनच भविष्यातील जीवन सुकर करण्याकरिता अंगभूत वाईट सवयींचा निचरा करा व चांगल्या सवयी वृद्धिंगत करून भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवा असेही वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
मधुबन वातानुकूलित दालनात उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी मनात रेंगाळत असलेले अनेक प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच चांगल्या सवयी व वाईट सवयी कोऱ्या कागदावर लिहून वाईट सवयी चा कागद अग्निकुंड मधे टाकून येणाऱ्या नवीन वर्षांची सुरुवात ही फक्त आणि फक्त चांगल्या सवयीनी करायची असा प्रण देखील घेतला. अंगातील आळस जाऊन उत्साह येण्यासाठी सर्व उपस्थितांनी हलके फुलके नृत्य सादर केले. अध्यक्ष डॉ. राजकुमार, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मनात  ठरवलेल्या संकल्पाने आणि आनंदाने येणारे २०२६ हे वर्ष सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारे ठरो अशा सदिच्छा दिल्या.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचा दबदबा निर्माण करत राज्यातील ८ महापालिकांमध्ये २२ उमेदवार बिनविरोध; भाजप आघाडीवर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवड झाले असून त्यांच्या विजयाची औपचारीकता बाकी आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात येथे भाजपच्या ५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने ९ उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील ८ महापालिकेत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच १२ उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळवलं आहे. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे, एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहे. दरम्यान, अद्यापही उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही ठिकाणी उद्या वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं.

८ महापालिकेतील भाजपचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध

१. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी
२. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड २६ (क) मधून भाजपच्या आसावरी नवरे
३. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड २६ (ब) भाजपच्या रंजना पेणकर
४. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (ब) मधून भाजपच्या ज्योती पाटील
५. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २७ (अ) मधून भाजपच्या मंदा पाटील
६. धुळे - वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले
७. धुळे - प्रभाग ६ (ब) मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
८. धुळे - प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले
९. पनवेल - वॉर्ड क्र १८ (ब) मधून भाजपचे नितिन पाटील
१०. भिवंडी - प्रभाग १७ (अ) मधून भाजपचे सुमित पाटील
११. जळगाव - प्रभाग १२ (ब) मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे
१२. पिंपरी-चिंचवड - भोसरी प्रभाग ६ मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध 

२ महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध

१. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (अ) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे
२. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (ब) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे
३. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (क) मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या वृषाली जोशी
४. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २८ (अ) मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोरे
५. जळगाव - प्रभाग १८ (अ) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे
६. जळगाव - प्रभाग क्रमांक ९ (अ) मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी बिनविरोध
७. जळगाव - प्रभाग ९ (ब) मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध 

अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार बिनविरोध

१. अहिल्यानगर - प्रभाग ८ (ड) मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे
२. अहिल्यानगर - प्रभाग क्रमांक १४ (अ) मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे 

मालेगावमध्ये एक बिनविरोध

१. मालेगाव - वॉर्ड ६ (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

संरक्षण क्षेत्रासाठी ७९ हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देत संरक्षण क्षेत्रासाठी ७९,००० कोटी रुपये रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार नसून, भारतीय संरक्षण कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन संरक्षण खरेदी नियमावलीनुसार (DPM), एकूण खरेदीमध्ये २५ टक्के आरक्षण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) ठेवण्यात आले आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या कंपन्यांचे भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल. सरकारी कंपन्या मुख्य कंत्राटदार असतील, तर खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स सुटे भाग पुरवण्याचे काम करतील.

या मंजुरीमध्ये भूदल, नौदल आणि वायुसेनेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे:

भूदल : पिनाका रॉकेट प्रणालीसाठी लांब पल्ल्याची मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, ‘लॉइटर म्युनिशन्स’ (Loiter Munition) आणि ड्रोनविरोधी यंत्रणा.

वायुसेना : ‘अस्त्र मार्क-II’ (Astra Mk-II) क्षेपणास्त्रे, तेजस विमानासाठी ‘फुल मिशन सिम्युलेटर’ आणि ‘स्पाइस-1000’ मार्गदर्शक किट्स.

नौदल : बंदरातील कामांसाठी ‘बोलार्ड पुल टग्स’ आणि हाय-फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर रेडिओ संच.

गुंतवणूकदारांच्या रडारवर असलेले शेअर्स बाजारातील तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेसच्या मते, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा खालील कंपन्यांना होऊ शकतो:

१. हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL): तेजस सिम्युलेटर आणि अस्त्र क्षेपणास्त्र एकत्रीकरणासाठी प्रमुख कंपनी.

२. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BHEL): रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि संप्रेषण उपकरणांसाठी मोठी संधी.

३. भारत डायनॅमिक्स (BDL): अस्त्र आणि पिनाका रॉकेट निर्मितीमध्ये या कंपनीचा मोठा वाटा असेल.

४. झेन टेक्नॉलॉजीज (Zen Tech): सिम्युलेटर आणि ड्रोन शोध यंत्रणेसाठी ही कंपनी चर्चेत आहे.

५. माझगाव डॉक आणि कोचीन शिपयार्ड: नौदलाच्या जहाजांच्या उपकरणांसाठी या कंपन्यांना फायदा मिळेल.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे चार उमेदवार बिनविरोध विजयी..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे शिवसेनेचे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील यांदेखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा महापौर शतप्रतिशत बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे.  या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तसेच प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे ही बिनविरोध निवडून आले आहेत. चारही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या चारही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. 

शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चारही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. 

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.

३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त पुरावे नोंदवण्यात आले आहेत.

विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याची कार्यवाही पुन्हा गती धरली आहे. यामुळे या प्रकरणातील न्यायलयीन प्रक्रियेत पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा झाला असून, आरोपींविरुद्ध पुरावे अधिक तपासल्या जाणार आहेत. विशेष टाडा न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रम देण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये अचानक बेछूट गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर या मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधी शैलेश हळदणकर एका चकमकीत जखमी झाला होता आणि तातडीने पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास, काही लोक ‘हळदणकरला भेटायचंय’ म्हणत वॉर्डात घुसले. क्षणभरात त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढल्या आणि हळदणकर तसेच त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात हळदणकर आणि दोन्ही पोलीस जागीच ठार झाले.त्यावेळी पोलिसांनी या घटनेची न्यायालयात माहिती दिली होती. ही घटना मुंबईतील गुन्हेगारी आणि हिंसात्मक इतिहासातील एक भयानक आणि थरारक घटना म्हणून आजही लक्षात ठेवली जाते.

सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही सल्लागार सूचना सोमवारी जारी केली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने मंगळवारी अहवाल जारी करून सांगितले की, सल्लागार सूचनेत इंटरनेट प्लॅटफॉर्मना आयटी कायद्याच्या संदर्भात त्यांच्या अनुपालन फ्रेमवर्कची समीक्षा करण्यास सांगितले आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया इंटरमीडियरीसह इतर इंटरमीडियरींना आठवण करून दिली जाते की ते आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत कायदेशीररित्या बांधील आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्याद्वारे अपलोड, प्रकाशित, होस्ट, शेअर किंवा प्रसारित केलेल्या तृतीय-पक्ष माहितीच्या संदर्भात जबाबदारीतून सूट मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.

पीटीआयच्या अहवालानुसार, या तरतुदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करतात. यात असे म्हटले आहे की वापरकर्त्याने अशी कोणतीही माहिती आणि सामग्री होस्ट, प्रदर्शित, अपलोड, सुधारित, प्रकाशित, प्रसारित, संग्रहित, अद्यतनित किंवा सामायिक करू नये जी अश्लील, पोर्नोग्राफिक, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित, मुलांसाठी हानिकारक किंवा बेकायदेशीर असेल.

बेतवडे गावकऱ्यांचा 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या विरोधात आंदोलनाचा इशारा..

विशेष प्रतिनिधी

दिवा - बेतवडे गावातील ५० टक्के कुटुंबांची 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या मयुर शाह या विकासकाने फसवणूक केल्यामु‌ळे ग्रामस्थ संतंप्त झाले आहेत. त्याच्या शेतीच्या जमिनी कवडीमोलाने घेऊन तेथे टोलेजंग इमारत बांधूनही बेतवडे ग्रामस्थांचा मोबदला, फ्लॅट विकासकाने ठरलेली तारिख ओलांडूनही अजून दिलेली नाही. त्यामुळे आज बेतवडे ग्रामस्थ यांनी त्यासंबंधित माहिती पत्रकारांना देऊन विकासकाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बेतवडे हे दिवा शहरातील पूर्वेकडील एक गाव आहे. तेथे काही एकर उपजाऊ जमीन 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या मयुर शाह या विकासकाने शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या कडून कवडीमोलाने घेतली. त्या सर्व स्थानिकांबरोबर सागर गाला व सौरभ शाह यांनी व्यवहार केले. तेव्हा हे दोघे 'मॅरेथॉन रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड. मध्ये कार्यरत होते. या व्यक्ती वारंवार बिल्डर तर्फे हामी व आश्वासन देतो पण त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.    
तर बेतवडेच्या ग्रामस्थांनी 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' चे मयुर शाह याने (बेतवडे) येथे बांधकामांच्या संदर्भात फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. व्यक्तीने / कंपनीने ग्रामस्थांना (फसवणूकीचे तपशील - जसे की खोटी माहीती देणे, पैसे ठरवून व्यवहार पूर्ण न करणे, बनावट कागदपत्रे वापरणे, फ्लॅट न देणे वा त्याचे भाडे न देणे इ.) केल्याने त्या सर्वांना आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. अशी माहिती पत्रकारांना देऊन ते रितसर पोलीस, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्याबाबत निवेदना द्वारे दिली आहे. तसेच या विषयात पंधरा दिवसात कोणताही मार्ग न निघाल्यास ग्रामस्थ आणि शेतकरी आंदोलन करतील असा इशारा ही त्यावेळी दिला.

दिव्यातील ओमकार नगर नाले परिसरात नवजात मुलगी आढळल्याने खळबळ..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२५ डिसेंबर : दिवा येथील ओमकार नगर परिसरातील नाल्यात आज सकाळी एक नवजात मुलगी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांना जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता नाल्यात एक नवजात अर्भक असल्याचे दिसून आले.

ही बाब लक्षात येताच परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट नाल्यात उतरून त्या चिमुकलीला बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने तात्काळ बाळाला उपचारासाठी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सदर नवजात मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू आहेत.

या अमानुष कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नवजात बाळाला नाल्यात टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

'इसरो' ने प्रक्षेपित केला सर्वांत वजनदार उपग्रह..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
श्रीहरीकोटा, दि. २४ : इसरो ने आज हेवी-लिफ्ट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) प्रक्षेपित केला. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इसरोने अमेरिकेच्या ६ हजार १०० किलो वजनाच्या 'ब्लूबर्ड ब्लॉक -२' या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीत भारतीय प्रक्षेपकाने प्रक्षेपित केलेला हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. ५२ दिवसांच्या कालावधीत हे पहिलेच सलग LVM3 प्रक्षेपण मोहिमा देखील आहेत. हा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक सॅटेलाईट आहे, जो अंतराळातून थेट सामान्य स्मार्टफोनला हाय-स्पीड ब्रॉडबँड देईल. LVM3 ची ही सहावी ऑपरेशनल मिशन आहे आणि आजपर्यंतची सर्वात जड पेलोड आहे.

भारताच्या हेवी-लिफ्ट रॉकेट LVM3 ने आज सकाळी अमेरिकेच्या कम्युनिकेशन सॅटेलाईट – ब्लूबर्ड ब्लॉक-२ ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. ६१०० किलो वजनासह, हे रॉकेटने उचललेले सर्वात वजनदार पेलोड होते ज्याने त्याचे सहावे ऑपरेशनल फ्लाईट आणि तिसरे समर्पित व्यावसायिक मिशन पूर्ण केले. इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की LVM3 रॉकेटने नियोजित ५२० किमी कक्षेच्या तुलनेत ५१८.५ किमीची कक्षा गाठली. इसरोने सर्वात जड उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-२ ला LVM3 रॉकेटवर प्रक्षेपित केले

इसरोची व्यावसायिक शाखा 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड'ने अमेरिकन कंपनी 'एएसटी स्पेस मोबाइल' सोबत करार केला होता. प्रक्षेपणानंतर १५ मिनिटांनंतर हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा केला जाईल आणि हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून कार्यान्वित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई दि.२५ :  नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. या उद्घाटनामुळे, नवी मुंबई देशासाठी आणि विकसित जगासाठी एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि असंख्य आव्हानांवर मात करून, हे महत्त्वाकांक्षी स्वप्न अखेरीस सत्यात उतरले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात, हे विमानतळ दररोज ३० विमानांची ये-जा (उड्डाणे आणि लँडिंग) हाताळेल, ज्यामुळे प्रवासी सेवांची औपचारिक सुरुवात होईल. अधिकृत सूत्रांनुसार, पहिल्याच दिवशी गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होतील.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००७ मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून, या प्रकल्पाने पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनाचे प्रश्न, पुनर्वसनाची आव्हाने, कायदेशीर अडथळे आणि तांत्रिक गुंतागुंत यांवर मात केली आहे. एका प्रदीर्घ आणि आव्हानात्मक प्रक्रियेनंतर, या विमानतळाचे पूर्ण होणे हे केवळ नवी मुंबईसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे असं सिंघल यावेळी म्हणाले.

नऊ कोटी प्रवाशांना वार्षिक हाताळण्याची क्षमता असलेल्या या नवीन विमानतळामुळे मुंबईतील प्रचंड गर्दीच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. मुंबई महानगर प्रदेशात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे असतील, ज्यामुळे हवाई प्रवास अधिक कार्यक्षम, सुलभ आणि भविष्यासाठी सज्ज होईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाजाच्या सुरुवातीमुळे उद्योग, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विमानतळाच्या आसपास एक मोठ्या प्रमाणावर ‘एरो सिटी’ची योजना आखण्यात आली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि नवी मुंबईच्या आर्थिक परिस्थितीत परिवर्तन घडेल.

एकंदरीत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हे केवळ हवाई सेवांची सुरुवात नसून, विकासाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आजपासून विमानांची उड्डाणे सुरू झाल्यामुळे, नवी मुंबईला राष्ट्रीय नकाशावर अधिक महत्त्व प्राप्त होईल आणि हे विमानतळ भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास विजय सिंघल यांनी यावेळी व्यक्त केला.

३९ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद खो-खोचा रणसंग्राम मुंबईत स्पर्धेची गटवारी जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर - १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित राज्यस्तरीय स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २४ किशोर व किशोरी संघ सहभाग नोंदवणार आहेत.
जेतेपदासाठी रंगणारी चुरस
किशोर गटात गतविजेते धाराशिव तर किशोरी गटात गतविजेते सोलापूर जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र सर्वच गटांत प्रचंड तगडे प्रतिस्पर्धी असल्याने यंदाची स्पर्धा अत्यंत चुरशीची व उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक सामन्यात वेग, चपळता आणि डावपेचांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन सोहळ्याची तयारी
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा.  मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ (भारतीय क्रीडा मंदिर), सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. उद्घाटनप्रसंगी शिवकुमार लाड (विश्वस्त, श्री समर्थ व्या. मंदिर), 'पेडणेकर ज्वेलर्स'चे आनंद पेडणेकर, प्रा. डॉ. जी. के. ढोकरट (प्राचार्य – बीपीसीए, शारीरिक शिक्षण महाविद्यालय), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, श्री समर्थ व्या. मंदिर व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  

राष्ट्रीय पातळीचे स्वप्न
या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून आगामी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

किशोर गट – गटवारी
'अ' गट – धाराशिव, बीड, जालना; 'ब' गट – ठाणे, पालघर, जळगाव; 'क' गट – पुणे, रायगड, लातूर; 'ड' गट – सातारा, मुंबई उपनगर, हिंगोली; 'इ' गट – सांगली, नंदुरबार, सिंधुदुर्ग; 'फ' गट – नाशिक, रत्नागिरी, धुळे; 'ग' गट – सोलापूर, मुंबई, परभणी; 'ह' गट – छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड.

किशोरी गट – गटवारी
'अ' गट – सोलापूर, रायगड, नंदुरबार; 'ब' गट – धाराशिव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग; 'क' गट – सांगली, छत्रपती संभाजीनगर, लातूर; 'ड' गट – पुणे, पालघर, जळगाव; 'इ' गट – ठाणे, धुळे, परभणी; 'फ' गट – सातारा, मुंबई, हिंगोली; 'ग' गट – नाशिक, मुंबई उपनगर, बीड; 'ह' गट – रत्नागिरी, जालना, नांदेड

ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खो-खो खेळाडूंसाठी कौशल्य, आत्मविश्वास आणि भविष्यातील यशाचा भक्कम पाया ठरणार असून मुंबईतील क्रीडाप्रेमींना चार दिवस अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार आहे.