मुंबई - शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा पुरुषार्थ होय. बाळासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरं नाव. बाळासाहेब म्हणजे मराठी जनमानसाचा बुलंद आवाज. आज बाळासाहेब जरी देहाने आमच्यात नसले, तरी त्यांची परखड व जहाल हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले आहेत. अन् तेच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळेच हिंदू हृदयातलं त्यांचं अढळ स्थान कुठलीही राजकीय महाशक्ती हलवू शकली नाही व शकणार नाही. मराठी जनमानसावर अधिराज्य गाजविणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची मराठी अस्मितेची सोनेरी झालर असलेली संघटना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. आज शिवसेनेचा ५९ वां वर्धापन दिन साजरा होत आहे, याचा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मोठा अभिमान आहे.
महत्वाचे म्हणजे मराठी माणूस अन् त्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' या मराठमोळ्या संघटनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या अस्मितेला व स्वाभिमानाला जपण्यासाठी बाळासाहेबांच्या जहाल अन् खंबीर नेतृत्वाखाली उदयास आलेल्या शिवसेनेने ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण करण्याचा संकल्प केला. आजही राज्यातील महायुतीचे सरकार ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण या धोरणाशी एवं हिंदुत्वाच्या भगव्या विचाराशी प्रामाणिक असून महायुती सरकार याला बांधील आहे.
बाळासाहेबांनी तब्बल अर्धशतक एकहाती शिवसेना संघटना आपल्या पद्धतीने चालविणे,
हे देशातील एकमेव उदाहरण असल्याचं सार्वमत आहे. बाळासाहेबांसारखे 'लोकनायक' हे सदैव आपल्या विचाराने जिवंत असतात व ते समाजालाही जिवंत ठेवतात. वास्तवात शिवसैनिकांनी बाळासाहेबांना विश्वास दिला, अन् त्यांनी शिवसैनिकांवर विश्वास ठेवला. शिवसेनेचा विस्तार राज्यभर होण्यासाठी बाळासाहेब हे साऱ्या जीवनात चंदनासारखे झिजले. शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांची कवचकुंडलेच. हिंदूहृदयात अढळ स्थान प्राप्त करणारे बाळासाहेब हे राजकारण, समाजकारण, संगीत, नाट्य, व्यंगचित्रकार, वक्तृत्व, संपादक, लेखक असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्व.प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठं योगदान दिलं, त्यांचा सामाजिक वारसा पुढे बाळासाहेबांनी समर्थपणे चालवून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो वा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचा लढा असो, यासाठी बाळासाहेबांनी प्रखर लढा देऊन शिवसेनेची उपयुक्तता सिद्ध केली.
यास्तव शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय बाळासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा !
मराठी भूमिपुत्रांच्या मुला-मुलींना रोजगाराचे-स्वयंरोजगारचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना रेल्वे, बँका अन् केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, या उद्देशाने बाळासाहेबांनी स्वतंत्र अशा 'लोकाधिकार समिती' ची निर्मिती केली होती. तिच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार असलेल्या मराठी मुलं-मुलींना त्यांच्या आवडीच्या नोकऱ्या मिळू लागल्या. कधी कधी तर लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढावं लागलं. वास्तवात लोकाधिकार समितीच्या लढाऊ बाण्यामुळे हजारों मराठी भूमिपुत्रांच्या मुला-मुलींना गुणवत्तेनुसार नोकऱ्या मिळून त्यांचे संसार थाटले आहेत. खरं तर, लोकाधिकार समितीच्या सामाजिक कार्याला राज्यात तोड नाही असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
आधी मार्मिक व त्यानंतर सामना ची मुहूर्तमेढ करून मराठी हक्कांच्या प्राप्तीसाठी जहाल संपादकीय लेखन अन् व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृतता निर्माण केली. तर दुसऱ्या बाजूने या द्वय आयुधांनी तत्कालिन सत्ताधारी पक्षाची व त्यांच्या नेत्यांची झोप उडवली. बाळासाहेबांच्या उक्ती व कृतीत एक प्रकारचा करिश्मा होता, असे आजही लोक म्हणतात. त्यांच्या विजयादशमीनिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यातले जहाल व प्रखर शैलीतील भाषण ऐकण्यासाठी मुंबई, ठाणेसह राज्यातील शिवसेनेचे चाहते दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यांच्या नेतृत्व, कर्तुत्व अन् वक्तृत्वाचा जनमानसावर मोठा पगडा होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून बाळकडू घेऊन मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेला मोठं करण्यात बाळासाहेबांना स्व. मीनाताईंची मोलाची साथ लाभली. बाळासाहेबांना सुख-दुःखात मोलाची साथ देत, त्यांनी बाळासाहेबांची सावली बनून त्यांना मानसिक बळ दिलं. मातृतुल्य मीनाताईंनी आपली मुलं अन् शिवसैनिक यात कधीच दूजाभाव केला नाही. खरं तर,
मीनाताई ह्या शिवसैनिकांना आपल्या मुलासारखं वागवत असत. त्यांनाही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
महाविकास आघाडी सरकारचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे अडीच वर्षाच्या कार्यकाळात केवळ अडीच दिवसच मंत्रालयात गेले. परिणामी शिवसेनेच्या आमदारांना यांच्या मतदारातील लोकोपयोगी कामांसाठी निधी मिळण्यात अक्षम्य दिरंगाई होत होती. इतकेच नव्हे तर, वर्षा निवासस्थानी देखील तासनतास प्रतिक्षा करूनही शिवसेनेच्या आमदारांना भेटी नाकारल्या जात होत्या.
मला नगर विकासमंत्री असूनही बुद्धीपुरस्सर भेटीसाठी डावलले जात होते. त्यामुळे लोकोपयोगी योजनांना व अन्य कामांच्या निधीला मंजुरी मिळणे दुरापास्त होऊ लागले होते. त्यामुळे विविध मतदारसंघातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांचा विश्वास डळमळू लागला होता. महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भगव्या विचाराला तिलांजली देऊन उद्धवजी, आदित्य व त्यांचे बोटावर मोजण्याइतके समर्थक आमदार काँग्रेसच्या दावणीला पूर्णतः बांधले गेले होते. अल्पसंख्यांकांची मते मिळविण्याकडे तसेच त्यांच्या आमदारांचा पाठिंबा मिळवून पुढील काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही पण एक कुटीर खेळी होती.
इतकेच नव्हे तर, नगरविकास विभागाच्या महत्वपूर्ण कामांसंदर्भात तसेच मुंबई महानगर महापालिका संबंधीच्या काही खास बैठकांमध्ये मला दूर ठेऊन ना.आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एकतर्फी निर्णय घेतले जाऊ लागले होते. वास्तवात आदित्य ठाकरेंचे प्रभुत्व वाढविण्यासाठी ही दुष्ट राजकीय खेळी खेळली जात होती. त्यामुळे माझे समर्थक मंत्री, आमदार, पदाधिकारी व निष्ठावान शिवसैनिक यांच्यात असंतोषाची ठिणगी पडण्याची वेळ जवळ येत असल्याचे प्रतिबिंबित होत होते. आपल्या मतदारसंघातील लोकांना आता कसं तोंड दाखवायचं हा प्रश्नही त्यांच्या मनाला खात होता. या सर्व नकारात्मक गोष्टींची परिणिती म्हणजे शिवसेनेतील आमदार, मंत्री व पदाधिकारी माझ्यापुढे वारंवार आपली व्यथा मांडू लागले होते. असेच वातावरण राहिले तर, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आपलं निवडून येणं अवघड होईल, या विचाराने नाराज आमदार मला काहीतरी कठोर पाऊल उचला, अन्यथा खूप उशीर होईल, असे वारंवार सांगत होते, विनवण्या करत होते.
सारांश, बाळासाहेबांची शिवसेना व त्यांचे हिंदुत्व अबाधित ठेवण्यासाठी माझ्या नेतृत्वाला होकार देऊन अखेर सर्वानुमते हा *'उठाव'* झाला अन् आज बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार व भगवी पताका हाती घेऊन आम्ही सर्वांनी एकमताने *'बाळासाहेबांची शिवसेना'* स्थापन केली. आज बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या दिमाखाने व पूर्णक्षमतेने हिंदुत्वाचा भगवा विचार अंगिकारून यशस्वी आगेकूच करत आहे, याचा आम्हा सच्च्या व निष्ठावान शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.
वास्तविक पहाता, शिवसेनेची उभारणी करणाऱ्या वंदनीय बाळासाहेबांना सत्तेच्या खुर्चीचा कधीच मोह झाला नाही. शिवसेना हा एक विचार आहे, त्यामुळे त्यांच्यात सत्तेची लालसा निर्माण झालीच नाही. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला व त्यानंतर काळानुरूप हिंदुत्वाच्या रक्षणासाठी राजकीय वाटचाल करून राजकारणातून समाजकारण करण्यास कटिबद्ध झाले. बाळासाहेबांचा पूर्वापारापासूनच मराठी माणसावर दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मोल होतं. वजन होते. ताकद होती. हे पाहून जुन्या काळातील बीजेपीच्या जाणकार नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांशी जवळीक साधून लोकसभा-विधानसभा निवडणुकांत मोठा विजय संपादन केला अन् त्या पार्श्वभूमीवर बीजेपीने शिवसेनेला कृतज्ञतेच्या भावनेतून मोठ्या भावाचा दर्जा दिला होता. हा जिवाभावाचा *'दर्जा'* अन् *'हिंदुत्व'* बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आजीमाजी मंत्री, खासदार-आमदार, पदाधिकारी, शिवसैनिक अर्थातच आम्ही सर्वजण एकसंध होऊन तनमनधनाने जिवापलिकडे जपू, हे या मंगलमय दिनी मी अभिवचन देतो. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र!
✍️ लेखक - एकनाथ गंगुबाई संभाजीराव शिंदे
(उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)