BREAKING NEWS
latest
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाकडून चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - सध्याच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनीही अधिक दक्षता घेण्याची गरज आजच्या चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आली, राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यामार्फत आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिकांचे कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी, विद्युत कंत्राटदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

भलेही आज सुरक्षेची अनेक उपकरणे आणि माध्यमे उपलब्ध झाली असली तरी विजेशी संबंधित कोणतेही काम करताना विद्युत कर्मचाऱ्यांनी खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यकच आहे. कारण लहान लहान गोष्टींमधूनच मोठमोठ्या घटना आणि अपघात घडत असल्याचे या चर्चासत्रात सांगण्यात आले.
आताच्या काळामध्ये घराच्या इंटिरिअरकडे जितके लक्ष दिले जाते तितकेच घरातील वायरिंगकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी अधोरेखित करण्यात आला. तर विद्युत वाहिनीचे काम करताना कितीही जुने आणि जाणते कर्मचारी अधिकारी असलात तरीही शॉक हा तुम्हाला सांगून लागत नाही. त्यामुळे काम करताना आपण सतत खबरदारी आणि दक्षता बाळगणे ही अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

यासोबतच वीज मीटर फेजिंग आणि मुख्य वायरिंग, घरापासून मीटरपर्यंत येणारी वायर, काम करताना घ्यायची काळजी, पॅनलवर काम करताना घ्यायची काळजी, कोणती उपकरणे वापरावी, शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग, इमारतीमधील फायर फायटर यंत्रणेचे पॅनल, त्याची तपासणी, आरसीसीबी उपकरणाची गरज, एफआरएलएसएच केबलचे महत्त्व, आर्थिंग, अशा अनेक लहान मोठ्या मुद्द्यांवर महाराष्ट्र शासनाचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे, जाधव यांच्यासह इतर तज्ञ व्यक्तींकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच वीज वापर आणि  सुरक्षिततेबाबत भारत सरकारने नव्याने लागू केलेला सेंट्रल इलेक्ट्रिकल ऍक्ट' आणि त्यातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. 
या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे माजी संचालक टी. शंकर नारायण, महाराष्ट्राचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे यांच्यासह यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील वीज दरामध्ये होणार १० टक्के कपात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई - महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महागाईने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी वीज ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून राज्यातील वीज दरामध्ये १० टक्क्यांनी कपात होणार आहे. विशेष म्हणजे, ही फक्त सुरुवात असून, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महावितरणने दाखल केलेल्या एका विशेष याचिकेवर बुधवारी (२५ जून २०२५) हा निर्णय दिला. या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत याला राज्याच्या इतिहासातील ‘प्रथमच’ घडलेली घटना म्हटले आहे. यापूर्वी वीज दरवाढीच्या याचिका सादर केल्या जात होत्या, मात्र पहिल्यांदाच महावितरणने एमएसईडीसीएल (MSEDCL) वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.

राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.

कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
कल्याण : कल्याण पश्चिम येथे आज भर दुपारी अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. पण, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे. या भागात अजहर मणियार या रिक्षाचालकाचं घर आहे. त्याचा अडीच वर्षांचा मुलगा फजल घराच्या बाहेर उभा होता. फजलची आई घरात स्वयंपाक करत होती. तो मुलगा घराच्या दारात उभा होता. तितक्यात एका व्यक्तीने त्या मुलाला जवळ घेतले. आरोपीनं मुलाला जबरदस्तीनं घेतल्यानं मुलगा जोरात रडू लागला. मुलाचे रडणे ऐकून परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेलं.

मुलाला घेऊन जाणारी व्यक्ती नवीन दिसल्याने लोकांना संशय आला. त्यांनी आरोपीची विचारणा केली. त्याला उत्तर देता आले नाही. लोकांना पाहून तो घाबरला. त्यावेळी आरोपी मुलगा चोरण्यासाठी आल्याचे लोकांच्या लक्षात आलं. काही जणांनी त्याला मारहण केली. त्यानंतर त्याला बाजारपेठ पोलीसांच्या हवाली केले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बाबासाहेब डुकले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव पूरीमणी आहे. तो सोलापूरमधील शास्त्रीनगर भागात राहतो. त्याच्याकडं सोलापूरचं तिकीट आढळून आलं अशी माहिती मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचला पहिला भारतीय अंतराळवीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
फ्लोरिडा - भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आज, म्हणजे २६ जून रोजी दुपारी ४:०० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. पूर्वी त्यांचा आगमन वेळ ४:३० वाजता होता. म्हणजेच हे अंतराळवीर वेळेच्या ३० मिनिटे आधी अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्याआधी, मिशन क्रूने अंतराळयानातून लाईव्ह संभाषण केले. यामध्ये शुभांशूने म्हटले होते "अंतराळातून नमस्कार! माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत येथे येऊन मी खूप उत्साहित आहे". ते म्हणाले, “जेव्हा आम्हाला व्हॅक्यूममध्ये सोडण्यात आले, तेव्हा मला फारसे बरे वाटत नव्हते. मी खूप झोपलो. मी इथे लहान मुलासारखा शिकत आहे.. अंतराळात कसे चालायचे आणि कसे खायचे".  ऍक्सियम मिशन ४ अंतर्गत, सर्व अंतराळवीर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता आयएसएसकडे रवाना झाले. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे मिशन ६ वेळा पुढे ढकलण्यात आले.

अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इसरो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. ४१ वर्षांपूर्वी, राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.

शुभांशूचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरेल. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. हे २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. भारतात अंतराळवीरांना गगनयात्री म्हणतात. त्याचप्रमाणे, रशियामध्ये त्यांना कॉसमोनॉट्स म्हणतात आणि चीनमध्ये त्यांना तायकोनॉट्स म्हणतात.

एमजीए फाउंडेशन आयोजित इनडोअर क्रिकेट स्पर्धा २९ जून ला मुंबईत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे 'मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन' आणि 'महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन' यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील 'सन्‍टेक टर्फ' येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दोन टर्फवर खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यांचे ४-४ चे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ गटातील इतर तीन संघांविरुद्ध राऊंड-रॉबिन फॉरमॅटने सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर उपांत्य विजेते संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येऊन विजेतेपदासाठी लढतील.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड, कोटक बँक, होम स्क्वेअर प्रॉपर्टीज एलएलपी, वेल्थ अँड बियॉन्ड, चाणक्य एंटरप्रायझेस, महावीर मल्टिस्पेशालिटी क्लिनिक यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांनी प्रायोजकत्व आणि सहकार्य दिले आहे असे एमजीए फाउंडेशनचे अधिकृत प्रतिनिधी मनीष अग्रवाल व स्नेहा पाटील यांनी या स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रु २१,०००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रु ११,०००/-  व चषक एमजीए फाउंडेशनतर्फे देऊन गौरवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व सहभागी संघांना रु. ५,०००/- चे व्हाऊचर देऊन गौरवण्यात येणार आहे. 
या स्पर्धेत टीडीएस किंगस, टॅक्स टायटंस, आयटीआर वॉरीअर्स, रिटर्न मेकर्स, ऑडीट आर्मी, मनी मास्टर्स, जीएसटी ग्लॅडीएटर्स, इगल लेजर्स हे संघ सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची राज्य खो-खो पंच परीक्षा २९ जूनला..

प्रतिनिधी - अवधुत सावंत

मुंबई - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने या वर्षी राज्य खो-खो पंच परीक्षा दि २९ जून  रोजी सकाळी १०:०० वाजता  आयोजित केली आहे. महाराष्ट्रात एकाच वेळी विविध जिल्ह्यांमध्ये  परीक्षा होणार आहे. संपूर्ण राज्यात जवळ जवळ १५ केंद्रावर हि परीक्षा होणार असून ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे त्या जिल्ह्यात पंच वर्ग होत आहेत.  हि राज्य पंच परीक्षा मुंबई, पुणे, बीड, सिंधुदुर्ग, नांदेड, धुळे, ठाणे, नंदुरबार, पालघर, सोलापूर, जालना, सांगली, लातूर व अहिल्यानगर येथे पार पडणार आहे असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.   

मुंबई जिल्ह्यात हि परीक्षा बीपीएड कॉलेज, वडाळा येथे दि २९ जून  रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता होणार असून अधिक माहितीसाठी मुंबई खो-खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा (98306 91616) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. तसेच इतर संबंधित जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आव्हान कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी केले आहे.

मद्यधुंद अवस्थेत तेलंगणात महिलेने रेल्वे ट्रॅकवर चालवली कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
तेलंगणा - तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात, मद्यधुंद अवस्थेत एका ३४ वर्षीय महिलेने तिची गाडी रेल्वे रुळावर आणली. यामुळे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. १०-१५ गाड्या थांबवाव्या लागल्या किंवा वळवाव्या लागल्या. शंकरपल्लीजवळ घडलेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिला रेल्वे ट्रॅकवर किआ सोनेट कार चालवत असल्याचे दिसून येते. महिलेने रेल्वे ट्रॅकवरून सुमारे ८ किमी गाडी चालवली, ज्यामुळे अनेक रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक, रेल्वे कर्मचारी आणि पोलिस महिलेला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जमावाने तिला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तिचे हात बांधले आहेत. महिलेने असे का केले आणि तिची मानसिक स्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेल्वेचे अनेक कर्मचारी आणि पोलिस गाडीच्या मागे धावले. मोठ्या कष्टाने त्यांना गाडी थांबवण्यात यश आले. महिलेला गाडीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे २० जणांची मदत घ्यावी लागली. ती अजिबात सहकार्य करत नव्हती. रेल्वे पोलिस अधीक्षक चंदना दीप्ती म्हणाल्या की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही महिला अलिकडेपर्यंत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. ती खूप आक्रमकपणे वागत होती. असे दिसून आले की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती.

सिबीएसई बोर्डाचा दहावीच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. या संदर्भातील निर्णय आज (२५ जून) सीबीएसई घेतला आहे. त्यामुळे २०२६ पासून दहावीचे विद्यार्थी वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहेत.

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारा हा बदल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या निर्णयानुसार २०२६ पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षेला बसता येणार आहे. या निर्णयामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी, हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

मिशन Axiom-4 साठी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात रवाना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

फ्लोरीडा - भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी झेप घेतली. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०१ वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. २८ तास ५० मिनिटांच्या प्रवासानंतर ते ISS वर पोहोचले. ही मोहीम भारतासाठी ऐतिहासिक ठरली कारण राकेश शर्मा यांच्या १९८४ च्या प्रवासानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आणि ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या सोबत अमेरिकेच्या पेगी व्हिटसन (मिशन कमांडर), पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे देखील सहभागी होते.

या १४ दिवसांच्या मोहिमेत शुक्ला विविध वैज्ञानिक प्रयोग करत आहेत. यात सूक्ष्म गुरुत्वात शैवाळींची वाढ, मानवी मूत्रातील नायट्रोजनचा पुनर्वापर, बीज अंकुरण, स्नायूंच्या पेशींचा अभ्यास, आणि अंतराळातील संगणक प्रणालींचा वापर यांचा समावेश आहे. हे प्रयोग भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. मोहिमेच्या सुरुवातीला शुक्ला यांनी देशवासीयांना उद्देशून एक भावनिक संदेश दिला, “७.५ किमी/सेकंद वेगाने पृथ्वीभोवती फिरताना, खांद्यावरचा तिरंगा मला १४० कोटी भारतीयांची आठवण करून देतो. ही यात्रा माझी नाही, आपल्या सर्वांची आहे. जय हिंद!”

शुक्ला यांनी अंतराळात काही खास गोष्टीही सोबत नेल्या - गाजर हलवा, आमरस, मूग डाळ हलवा आणि ‘जॉय’ नावाचा एक छोटा पांढरा हंस खेळणं, जे सूक्ष्म गुरुत्व दर्शवण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या या यशामुळे लखनऊमधील त्यांचे कुटुंब अत्यंत आनंदित आहे. त्यांच्या आईने अभिमानाने सांगितले की, “माझा मुलगा देशाचं गौरव आहे.” Axiom-4 ही मोहीम केवळ एक वैज्ञानिक प्रयत्न नाही, तर भारताच्या आत्मनिर्भर अंतराळ स्वप्नांची सुरुवात आहे. ही मोहीम ISRO, NASA आणि Axiom Space यांच्यातील सहकार्याचे प्रतीक असून, भारताच्या गगनयान कार्यक्रमासाठीही एक दिशादर्शक ठरणार आहे.

सावत्र भावानेच काढला भावाचाच काटा; कल्याण मधील नालिंबी खून प्रकरणाचा झाला उलगडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण तालुक्यातील नालिंबी गावच्या जंगलात आढळलेल्या शिरविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, सावत्र भावानेच संपत्तीच्या वादातून भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

२९ मे २०२५ रोजी सकाळी नालिंबी ते अंबरनाथ रस्त्यालगत असलेल्या निर्जन जंगलात एका अनोळखी पुरुषाचा शीर विरहित मृतदेह आढळला होता. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस पाटील संगीता शिंदे यांच्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या अमानुष खुनाच्या तपासासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. घटना स्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचे तांत्रिक प्रयत्न, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटना स्थळाजवळ संशयास्पदरीत्या आढळलेली कार. तपासणीअंती ही कार सलमान महंमद गौरी अन्सारी (वय: २५ वर्षे, रा. मांडा, टिटवाळा) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सलमानला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने थरकाप उडवणारी कबुली दिली. मृत इसम त्याचाच सावत्र भाऊ फैसल अन्सारी (वय: २९ वर्षे) असून, संपत्तीच्या वादातूनच त्याचा खून केला, आणि पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केले. या खुनाच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' चा 'रौप्य महोत्सवी वर्ष २०२५-२०२६' सोहळा उल्हासात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली कोपर येथील 'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' ची शैक्षणिक भरारी आकाश झेप घेत आहे. गेली २५ वर्षे सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सोहळा दिनांक २३ जून रोजी साजरा करण्यात आला. 'जे एम एफ' संस्थेचा रजत महोत्सव, जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचा अठरावा स्थापना दिवस तसेच जन गण मन विद्यामंदिर शाळेचा दहावा स्थापना दिवस व वंदे मातरम महाविद्यालयाचा सत्रावा उत्सव मोठ्या उत्साहात मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. रांगोळ्या, फुलांनी दिव्यांनी शाळा सजवली होती.
 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन  व स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे अष्टप्रधान मंडळ व संस्थापित सहकारी यांनी आपल्या भाषणात संस्थेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. गेली पंधरा ते पंचवीस वर्षे संस्थेशी जुळलेली नाळ ही खऱ्या अर्थाने कौटुंबिक सुखाची झालर आहे आणि हेच सर्वांचे भावनिक नाते आहे, असे सर्वांनीच आपल्या भाषणात नमूद केले.
रौप्य महोत्सव दिना निमित्त संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते सर्वांना चांदीच्या गणपतीची प्रतिमा भेट देण्यात आली. सर्वस्व आणि सत्ता याचा मोह सर्वांनाच असतो. परंतु नशीबा बरोबरच प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती सत्ता उभी करणे म्हणजेच मिळालेल्या यशाची फळे चाखण्यासारखे आहे. २५ वर्षाचा प्रवास सोपा नव्हता, अथक परिश्रम, जिद्द, नकारात्मकतेला सकारात्मक रित्या बदलून केलेला प्रवास म्हणजेच आकाशाकडे झेपावणारी ही 'जे एम एफ' संस्था होय, आणि त्या अंतर्गत सक्रिय असलेल्या शाळा आणि महाविद्यालये नागपूर (दावसा) मधील इंग्रजी शाळा म्हणजेच ही यशाची पोच पावती आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये असताना, दोन हजार साली केलेली कल्पना म्हणजे एक छोटसं लावलेलं शिक्षणाचं रोपटेच म्हणावे लागेल, आणि ती कल्पना साकार होत असताना  त्याची वेल हळूहळू पसरत मुंबई सारख्या राजधानीत पसरला व त्याचा महाकाय असा गुरु शिष्याचं नाते निर्माण करणारा वटवृक्ष तयार झाला. सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचा विसर पडता येणार नाही पण त्यामुळेच अभिमानाने आणि गर्वाने आम्ही तुम्ही सांगू शकतो की, होय ही आमचीच 'जे एम एफ' संस्था आहे. असे उद्गार सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले.
संस्थापकानी लिहिलेल्या जन गण मन शाळेचे गाणे हजारो मुलांनी गाऊन संस्थेला, शाळेला मानवंदना दिली, त्याच बरोबर नाटक, नृत्य, प्रदर्शित करून सर्वांनाच आनंद दिला. पंचवीस वर्षाच्या प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली. शाळेच्या प्रांगणात लावण्यासाठी रोपटे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लिरा आणि श्रुतिका यांनी केले तर स्वागतपर भाषण अद्वैत या विद्यार्थ्याने केले. केक कापून संस्थेचा रजत महोत्सव साजरा केला तर सर्व मुलांना आवडीच्या जेम्स गोळ्या चे पाकिट देण्यात आली. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी ‘आठवले’ घराण्याचा कवी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईत रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात सात रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला खरं सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र यांनी कविता सादर केली.

फडणवीसांनी सादर केलेली कविता

तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो
नसे ना का अर्थ, अनर्थ तर नसतो
अरे तुम्ही काय कविता कराल
पण, आणि, किंवा, परंतु,
अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे,
कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरुन गेली पाहिजे.

मुंबईतील नामांकित शाळेत वाटण्यात आली पंजाबी भाषेची पुस्तके..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : केंद्र सरकारकडून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या भूमिकेबाबत राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आज मुंबईतील एका नामांकित शाळेत पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली आहेत. यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पुस्तके परत घेण्याची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार अशी ठाम भूमिका मनसे आहे. मुंबईच्या भांडुप परिसरात असलेल्या गुरुनानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली शाळेला धडक. अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तके परत घेण्यात येणार याचे आश्वासन देण्यात आले. शाळेच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी राज्यातील मराठी शाळांममध्ये हिंदीची सक्ती नको असं रोखठोक मत व्यक्त केले. जर हिंदी सक्ती केल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला. राज ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. भांडुपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्री करणा-या दुकानात जाऊन पहिली ते चौथीपर्यंतचे हिंदीचे पुस्तकं विक्रीसाठी आल्यास त्याची विक्री करू नका असा इशारा दिलाय. त्यानंतरही हिंदींच्या पुस्तकाची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तक जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे डोंबिवलीत वाढीव कराची बिले जाळून आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न राबविण्याकरिता घर करामध्ये ३०० रुपयाची मोठी वाढ केली आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेकडील शिवसेना शाखा येथे आज सोमवारी आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाने वाढवलेली कर बिलं थेट नागरिकांच्या दारात पोहोचवली आहेत. या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून कर बिल जाळण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्यासह जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, महिला विधानसभा संघटिका सुप्रिया चव्हाण, महिला शहर संघटिका अक्षरा पाटेल प्रियंका विचारे, उपशहर प्रमुख संजय पाटील, शाम चौगुले, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, उपविभाग प्रमुख भावेश पवार, शाखाप्रमुख सचिन जोशी, आकाश पाटील, राजेश पाटील, मंगेश सरमाळकर, सुरज पवार इत्यादी पदाधिकारी सोबत महिला आघाडी आणि युवासैनिक तसेच अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जर ही करवाढ मागे घेतली नाही, तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी म्हात्रे यांनी दिला.

पासपोर्टसाठी महिलांना पतीच्या सहीची गरज नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे. पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आतापर्यंत महिलांना पासपोर्टसाठी अर्ज करताना कागदपत्रांवर पतीच्या सहीची आवश्यकता असे. मात्र, आता मद्रास उच्च न्यायालयाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय देताना जाहीर केले आहे की, पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे यामुळे घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे.

रेवती नावाच्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. रेवती यांचे २०२३ मध्ये लग्न झाले होते, परंतु त्यांचा घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे. त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला, परंतु प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (आरपीओ) फॉर्म-जे मध्ये पतीच्या स्वाक्षरीची आवश्यकता असल्याचे कारण देत अर्जावर प्रक्रिया करण्यास नकार दिला. याविरोधात रेवती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी सुनावणीदरम्यान तीव्र टिप्पणी करताना म्हटले की, पती-पत्नीमधील संबंध बिघडले असताना पतीची स्वाक्षरी घेण्यास भाग पाडणे म्हणजे महिलेला अशक्य गोष्ट करण्यास सांगण्यासारखे आहे. “पासपोर्टसाठी पतीच्या परवानगीचा आग्रह धरणे हे स्त्रीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समाजाला शोभत नाही. ही प्रथा पुरुष वर्चस्ववादाशिवाय दुसरे काही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. आरपीओचा हा आग्रह विवाहित महिलांना पतीची मालमत्ता मानणाऱ्या मानसिकतेचे द्योतक आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. न्यायमूर्तींनी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला रेवती यांच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे आणि इतर अटी पूर्ण झाल्यास चार आठवड्यांत पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश दिले.

'DGCA' ने एअर इंडियाच्या ३ अधिकाऱ्यांना केले निलंबीत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या भीषण अपघातानंतर विविध स्तरांवर याबाबत चौकशी सुरु आहे. याबाबत DGCA ने आज एअर इंडियाला ३ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीजीसीएने पायलटला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिका आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यास सांगितले आहे. काढून टाकण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनाशी संबंधित पायल अरोरा यांचा समावेश आहे.

काल जारी केलेल्या आदेशात DGCA एअर इंडियाला तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ टेकऑफ नंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले, ज्यामध्ये प्रवाशांसह एकूण २७० लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी डीजीसीएचा आदेश स्वीकारला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे.

निलंबीत अधिकाऱ्यांविरुद्ध ३ आरोप

नियमांविरुद्ध क्रू पेअरिंग केल्याबद्दल ३ आरोप आहेत
अनिवार्य उड्डाण अनुभव आणि परवाना नियमांचे उल्लंघन..

वेळापत्रक प्रोटोकॉलचे पालन न करणे..

एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तात्काळ काढून टाकावे. या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ आंतर-शिस्तबद्ध कारवाई सुरू करावी. १० दिवसांच्या आत डीजीसीएला कळवावे.

दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांची नॉन-ऑपरेशनल पोस्टवर बदली करावी आणि त्यांना कोणत्याही उड्डाण सुरक्षा किंवा क्रू अनुपालनाशी संबंधित पदांवर काम करण्याची परवानगी देऊ नये. भविष्यात क्रू शेड्युलिंग, परवाना किंवा उड्डाण वेळेशी संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. ज्यामध्ये दंड, परवाना निलंबन किंवा ऑपरेटर परवानगी रद्द करणे समाविष्ट असू शकते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : संगीत आणि योग दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत. आणि योगायोग हाच की दोन्ही जागतिक दिवस हे एकाच दिवशी म्हणजेच २१ जून रोजीच साजरे केले जातात. 'जे एम एफ' शिक्षण संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय, वंदे मातरम् पदवी महाविद्यालय मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात शिशु विहार ते पदवी पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांनी जागतिक योग दिवस साजरा केला. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, इतर पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे डॉ.निखिल शासने, डॉ.दिलीप मनोत, योग संचालक श्रीपाल मेहता, रंजना निकम यांनी सरस्वती व योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग प्रदर्शनास सुरुवात केली. नियमित योग करणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आपले शरीर हे परमेश्वराने आपल्याला दिलेली संपत्ती आहे, ही संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक योगा करणे आवश्यक आहे, केवळ आजच्या एका दिवशीच योगा करून स्वास्थ टिकणार नाही तर रोजच वेळ काढून योगा करणे हे फायद्याचे आहे, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपस्थित योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्व सांगून सर्व विद्यार्थी, शिक्षकांना योगाचे धडे दिले.
जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गायन, वादन सादर केले. भावनिक, शारीरिक, आणि मानसिक आरोग्यासाठी "संगीतोपचार"  पद्धत किती महत्वपूर्ण ठरते, तर संगीतामधले सात सूर घेऊन आपले आयुष्य संगीतमय होऊन जाते आणि हाच जगण्याचा निखळ आनंद म्हणजेच सप्तसुरांची गुंफण होय, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर डॉ.निखिल शासने यांनी संगीतोपचार पद्धतीने योगा कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक  संगीताच्या तालावर  दाखवले व सर्व विद्यार्थी शिक्षकांनी देखील नृत्य करून आनंद घेतला. शारीरिक प्रशिक्षक श्री.रमेश वागे, सौ.वैशाली शिंदे यांनी देखील योगा प्रात्यक्षिके करून दाखवली. मनावरचा आणि शारीरिक ताण हलका करण्यासाठी रोज योगा करणे आणि संगीत ऐकणे, गुणगुणने या सारखे शक्तिवर्धक औषध कुठेच नाही असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उपचार पद्धतीमध्ये नमूद केले. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये उत्साहात योगा आणि संगीत दिवस पार पडला.

हिंदुत्वाचा विचार जपणं.. हीच खरी बाळासाहेबांना मानवंदना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा पुरुषार्थ होय. बाळासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरं नाव. बाळासाहेब म्हणजे मराठी जनमानसाचा बुलंद आवाज. आज बाळासाहेब जरी देहाने आमच्यात नसले, तरी त्यांची परखड व जहाल हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले आहेत. अन् तेच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळेच हिंदू हृदयातलं त्यांचं अढळ स्थान कुठलीही राजकीय महाशक्ती हलवू शकली नाही व शकणार नाही. मराठी जनमानसावर अधिराज्य गाजविणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची मराठी अस्मितेची सोनेरी झालर असलेली संघटना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. आज शिवसेनेचा ५९ वां वर्धापन दिन साजरा होत आहे, याचा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मोठा अभिमान आहे.

महत्वाचे म्हणजे मराठी माणूस अन् त्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' या मराठमोळ्या संघटनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या अस्मितेला व स्वाभिमानाला जपण्यासाठी बाळासाहेबांच्या जहाल अन् खंबीर नेतृत्वाखाली उदयास आलेल्या शिवसेनेने ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण करण्याचा संकल्प केला. आजही राज्यातील महायुतीचे सरकार ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण या धोरणाशी एवं हिंदुत्वाच्या भगव्या विचाराशी प्रामाणिक असून महायुती सरकार याला बांधील आहे.

बाळासाहेबांनी तब्बल अर्धशतक एकहाती शिवसेना संघटना आपल्या पद्धतीने चालविणे,
हे देशातील एकमेव उदाहरण असल्याचं सार्वमत आहे. बाळासाहेबांसारखे 'लोकनायक' हे सदैव आपल्या विचाराने जिवंत असतात व ते समाजालाही जिवंत ठेवतात. वास्तवात शिवसैनिकांनी बाळासाहेबांना विश्वास दिला, अन् त्यांनी शिवसैनिकांवर विश्वास ठेवला. शिवसेनेचा विस्तार राज्यभर होण्यासाठी बाळासाहेब हे साऱ्या जीवनात चंदनासारखे झिजले. शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांची कवचकुंडलेच. हिंदूहृदयात अढळ स्थान प्राप्त करणारे बाळासाहेब हे राजकारण, समाजकारण, संगीत, नाट्य, व्यंगचित्रकार, वक्तृत्व, संपादक, लेखक असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्व.प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठं योगदान दिलं, त्यांचा सामाजिक वारसा पुढे बाळासाहेबांनी समर्थपणे चालवून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो वा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचा लढा असो, यासाठी बाळासाहेबांनी प्रखर लढा देऊन शिवसेनेची उपयुक्तता सिद्ध केली.

यास्तव शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय बाळासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा !

मराठी भूमिपुत्रांच्या मुला-मुलींना रोजगाराचे-स्वयंरोजगारचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना रेल्वे, बँका अन् केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, या उद्देशाने बाळासाहेबांनी स्वतंत्र अशा 'लोकाधिकार समिती' ची निर्मिती केली होती. तिच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार असलेल्या मराठी मुलं-मुलींना त्यांच्या आवडीच्या नोकऱ्या मिळू लागल्या. कधी कधी तर  लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढावं लागलं. वास्तवात लोकाधिकार समितीच्या लढाऊ बाण्यामुळे हजारों मराठी भूमिपुत्रांच्या मुला-मुलींना गुणवत्तेनुसार नोकऱ्या मिळून त्यांचे संसार थाटले आहेत. खरं तर, लोकाधिकार समितीच्या सामाजिक कार्याला राज्यात तोड नाही असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

आधी मार्मिक व त्यानंतर सामना ची मुहूर्तमेढ करून मराठी हक्कांच्या प्राप्तीसाठी जहाल संपादकीय लेखन अन् व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृतता निर्माण केली. तर दुसऱ्या बाजूने या द्वय आयुधांनी तत्कालिन सत्ताधारी पक्षाची व त्यांच्या नेत्यांची झोप उडवली. बाळासाहेबांच्या उक्ती व कृतीत एक प्रकारचा करिश्मा होता, असे आजही लोक म्हणतात. त्यांच्या विजयादशमीनिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यातले जहाल व प्रखर शैलीतील भाषण ऐकण्यासाठी मुंबई, ठाणेसह राज्यातील शिवसेनेचे चाहते दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यांच्या नेतृत्व, कर्तुत्व अन् वक्तृत्वाचा जनमानसावर मोठा पगडा होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून बाळकडू घेऊन मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेला मोठं करण्यात बाळासाहेबांना स्व. मीनाताईंची मोलाची साथ लाभली. बाळासाहेबांना सुख-दुःखात मोलाची साथ देत, त्यांनी बाळासाहेबांची सावली बनून त्यांना मानसिक बळ दिलं. मातृतुल्य मीनाताईंनी आपली मुलं अन् शिवसैनिक यात कधीच दूजाभाव केला नाही. खरं तर,
मीनाताई ह्या शिवसैनिकांना आपल्या मुलासारखं वागवत असत. त्यांनाही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !

महाविकास आघाडी सरकारचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे अडीच वर्षाच्या कार्यकाळात केवळ अडीच दिवसच मंत्रालयात गेले. परिणामी शिवसेनेच्या आमदारांना यांच्या मतदारातील लोकोपयोगी कामांसाठी निधी मिळण्यात अक्षम्य दिरंगाई होत होती. इतकेच नव्हे तर, वर्षा निवासस्थानी देखील तासनतास प्रतिक्षा करूनही शिवसेनेच्या आमदारांना भेटी नाकारल्या जात होत्या. 

मला नगर विकासमंत्री असूनही बुद्धीपुरस्सर भेटीसाठी डावलले जात होते. त्यामुळे लोकोपयोगी योजनांना व अन्य कामांच्या निधीला मंजुरी मिळणे दुरापास्त होऊ लागले होते. त्यामुळे विविध मतदारसंघातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांचा विश्वास डळमळू लागला होता. महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भगव्या विचाराला तिलांजली देऊन उद्धवजी, आदित्य व त्यांचे बोटावर मोजण्याइतके समर्थक आमदार काँग्रेसच्या दावणीला पूर्णतः बांधले गेले होते. अल्पसंख्यांकांची मते मिळविण्याकडे तसेच त्यांच्या आमदारांचा पाठिंबा मिळवून पुढील काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही पण एक कुटीर खेळी होती.

इतकेच नव्हे तर, नगरविकास विभागाच्या महत्वपूर्ण कामांसंदर्भात तसेच मुंबई महानगर महापालिका संबंधीच्या काही खास बैठकांमध्ये मला दूर ठेऊन ना.आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एकतर्फी निर्णय घेतले जाऊ लागले होते. वास्तवात आदित्य ठाकरेंचे प्रभुत्व वाढविण्यासाठी ही दुष्ट राजकीय खेळी खेळली जात होती. त्यामुळे माझे समर्थक मंत्री, आमदार, पदाधिकारी व निष्ठावान शिवसैनिक यांच्यात असंतोषाची ठिणगी पडण्याची वेळ जवळ येत असल्याचे प्रतिबिंबित होत होते. आपल्या मतदारसंघातील लोकांना आता कसं तोंड दाखवायचं हा प्रश्नही त्यांच्या मनाला खात होता. या सर्व नकारात्मक गोष्टींची परिणिती म्हणजे शिवसेनेतील आमदार, मंत्री व पदाधिकारी माझ्यापुढे वारंवार आपली व्यथा मांडू लागले होते. असेच वातावरण राहिले तर, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आपलं निवडून येणं अवघड होईल, या विचाराने नाराज आमदार मला काहीतरी कठोर पाऊल उचला, अन्यथा खूप उशीर होईल, असे वारंवार सांगत होते, विनवण्या करत होते.

सारांश, बाळासाहेबांची शिवसेना व त्यांचे हिंदुत्व अबाधित ठेवण्यासाठी  माझ्या नेतृत्वाला होकार देऊन अखेर सर्वानुमते हा *'उठाव'* झाला अन् आज बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार व भगवी पताका हाती घेऊन आम्ही सर्वांनी एकमताने *'बाळासाहेबांची शिवसेना'* स्थापन केली. आज बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या दिमाखाने व पूर्णक्षमतेने हिंदुत्वाचा भगवा विचार अंगिकारून यशस्वी आगेकूच करत आहे, याचा आम्हा सच्च्या व निष्ठावान शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.

वास्तविक पहाता, शिवसेनेची उभारणी करणाऱ्या वंदनीय बाळासाहेबांना सत्तेच्या खुर्चीचा कधीच मोह झाला नाही. शिवसेना हा एक विचार आहे, त्यामुळे त्यांच्यात सत्तेची लालसा निर्माण झालीच नाही. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला व त्यानंतर काळानुरूप हिंदुत्वाच्या रक्षणासाठी राजकीय वाटचाल करून राजकारणातून समाजकारण करण्यास कटिबद्ध झाले. बाळासाहेबांचा पूर्वापारापासूनच मराठी माणसावर दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मोल होतं. वजन होते. ताकद होती. हे पाहून जुन्या काळातील बीजेपीच्या जाणकार नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांशी जवळीक साधून लोकसभा-विधानसभा निवडणुकांत मोठा विजय संपादन केला अन् त्या पार्श्वभूमीवर बीजेपीने शिवसेनेला कृतज्ञतेच्या भावनेतून मोठ्या भावाचा दर्जा दिला होता. हा जिवाभावाचा *'दर्जा'* अन् *'हिंदुत्व'* बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आजीमाजी मंत्री, खासदार-आमदार, पदाधिकारी, शिवसैनिक अर्थातच आम्ही सर्वजण एकसंध होऊन तनमनधनाने जिवापलिकडे जपू, हे या मंगलमय दिनी मी अभिवचन देतो. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र!

✍️ लेखक - एकनाथ गंगुबाई संभाजीराव शिंदे
(उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)

डॉ. सर्वेश सावंत यांच्या कडून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - शिक्षण हीच खरी समृद्धी आहे, हे जाणूनच हा मोफत वह्या वाटपाचा उपक्रम दरवर्षी भारतीय जनता पार्टी ही गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असते. भाजपाचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. 

डोंबिवली पश्चिमेकडील सखाराम कॉप्लेसजवळील भाजपा जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जनसंपर्क कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवीन वह्या पाहून लहान मुलांनाही आनंद झाला. यावेळी डॉ. सर्वेश सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणात मागे राहू न देता पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल तसेच गरीब विद्यार्थी जरी असला तरी त्याला आवश्यक शालेय साहित्य मिळावे हा त्यामागील उद्देश आहे.

रविंद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा भाजपा प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, उबाठा माजी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिक शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश झाले. यावेळी डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील केदार, बाळासाहेब सानप, विजय साने, प्रशांत जाधव, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बने आदी उपस्थित होते. माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. 

यावेळी बावनकुळे म्हणाले की, भाजपामध्ये प्रत्येक प्रवेश हा विकासाकरिता होत असतो. कोणत्याही अपेक्षा न ठेवता केवळ नाशिकच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपाला साथ दिली आहे. नाशिक जिल्हा परिवर्तनासाठी हे प्रवेश अत्यंत महत्वाचे आहेत. प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीने आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला ५१ टक्क्यांच्यावर मते मिळवून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवेश केलेल्या प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उद्या किंवा परवा हा पक्षप्रवेश होणार होता मात्र आजचा मंगळवारचा दिवस शुभ असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी आज हा पक्षप्रवेश ठेवला असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, प्रवेश केलेल्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक परिवाराप्रमाणे काम करायचे आहे. आपला पक्ष मोठा करणे त्याचा प्रसार करणे म्हणजे पक्षाप्रति प्रामाणिक असणे असते. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत अबकी बार १०० पार चे लक्ष्य असणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आणणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने भाजपा उमेदवार निवडणून देणे हे उद्दिष्ट असणार आहे असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 
यावेळी बडगुजर म्हणाले की १८ वर्ष काम करूनही उबाठा गटात माझा अनादर झाल्याने मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपला अनादर करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवून देऊ असे बबनराव घोलप यांनी सांगितले. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नाशिकचे माजी नगरसेवक अशोक सातभाई, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, शीतल भामरे, माजी सभागृह नेते दिलीप दातीर तसेच यावल तालुक्यातील (जिल्हा जळगाव) प्रभाकर सोनावणे, विनोदकुमार पाटील, आर.जी.पाटील, अनील पाटील, आरती पाटील, लताबाई पाटील आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या मनसेचे अश्वीन जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरचे भगवान पवार, उद्योजक मनोज पवार आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.