BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१३ - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक  २०२५-२६ साठी महापालिका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, या सार्वत्रिक निवडणूकीत ३१ पॅनलमध्ये बहुसदस्य पध्दतीने निवडणूक संपन्न होणार आहे. या निवडणूकीसाठी १५४८ मतदान केंद्रांवर आणि ३८२ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी १०१३ मतदान केंद्रे तळ मजल्यावर, ९ मतदान केंद्रे पहिला मजल्यावर, ४७१ मतदान केंद्रे पार्टीशन स्वरुपात, ५५ मंडपात असणार आहेत. महापालिका क्षेत्रात एकुण १४,२५,०८६ इतकी मतदारांची संख्या असून, त्यापैकी एकुण ७,४५,६६४ पुरुष मतदार, एकुण ६,७८,८७० स्त्री मतदार व इतर मतदारांची संख्या ५५२ इतकी आहे. 

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी (निवडणूक निर्णय अधिकारी २ व ४ ची मतमोजणी एका ठिकाणी) होणार असून, त्यांची माहिती खालील प्रमाणे..

१. निवडणूक निर्णय अधिकारी - १ यांचेकडील पॅनल क्रमांक – २, ३ व ४ ची मतमोजणी बिर्ला वन्य, केडीएमटी इमारत, तळ मजला, शहाड (पश्चिम).

२. निवडणूक निर्णय अधिकारी - २ यांचेकडील पॅनल क्रमांक – १, ५, ६ व १० ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

३. निवडणूक निर्णय अधिकारी - ३ यांचेकडील पॅनल क्रमांक – ७, ८ व ९ ची मतमोजणी प्रभाग क्षेत्र ३/क चे कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र,‍ आधारवाडी, कल्याण (‍पश्चिम).

४. निवडणूक निर्णय अधिकारी - ४ यांचेकडील पॅनल क्रमांक – ११, १२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).

५. निवडणूक निर्णय अधिकारी - ५ यांचेकडील पॅनल क्रमांक – १३, १४, १५ व १६ ची मतमोजणी साकेत कॉलेज, १०० फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, काटेमानिवली, कल्याण (पूर्व).

६. निवडणूक निर्णय अधिकारी - ६ यांचेकडील पॅनल क्रमांक – २०, २६, २७ व २८ ची मतमोजणी आयईएस पाटकर विद्यालय, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या स्टील्ट हॉलमध्ये.

७. निवडणूक निर्णय अधिकारी - ७ यांचेकडील पॅनल क्रमांक – २१, २२, २३ व २५ ची मतमोजणी कडोंमपा शाळा क्र. २०, रेती बंदर रोड, मोठा गांव, डोंबिवली (पश्चिम).

८. निवडणूक निर्णय अधिकारी - ८ यांचेकडील पॅनल क्रमांक – २९ व ३० ची मतमोजणी धनजी नानजी चौधरी विद्यालय हॉल, पहिला मजला, नांदीवली, डोंबिवली (पूर्व).

९. निवडणूक निर्णय अधिकारी - ९ यांचेकडील पॅनल क्रमांक – १७, १९ व ३१ ची मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).

शिवसेना-महायुतीच्या पाठीशी नेहमीच दिवेकर भक्कमपणे उभे - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

विशेष प्रतिनिधी

दिवा - “शिवसेना-महायुतीच्या नेहमीच दिवेकर पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत जे काम करण्याचे वचन दिले ते पूर्ण केले आहे. दिवा शहराचा कायापालट करून, तुम्हाला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. भविष्यात दिवा ते सीएसटी लोकल सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, दिव्यातील विविध विकासकामे सुरू असून, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे शिवसेना महायुतीचेच आहेत, त्यामुळे पुढील काळात दिवा शहराचा अधिक आणि वेगाने विकास होईल", असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेने प्रतिपादन केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिव्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिव्याच्या कायापालटाचा उल्लेख करत आगामी काळात 'दिवा ते सीएसटी' विशेष लोकल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिवा शहरात गेल्या दहा वर्षांत झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा देण्यात आला. दिवा-शीळ मार्गाचे काँक्रीटीकरण, दिवा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांसाठी वाढविण्यात आलेल्या सुविधा, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत दिवा येथील स्थानकाचे सुरू असलेले काम, क्लस्टर पुनर्विकास योजना, भुयारी गटारी योजना, आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, महापालिकेच्या शाळांचा विकास, प्रशस्त पोलिस स्टेशन, डम्पिंग ग्राउंड हटविण्याचा निर्णय आणि आरोग्य सुविधांमधील सुधारणा यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

दिवा शहराचा बदल अधोरेखित करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी दिवा केवळ गाव स्वरूपात होता. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि रेल्वे स्थानकाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून उतरावे लागायचे. आज दिवा स्थानकाचा कायापालट झाला असून सुरक्षितता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.”  दिवा शहरात मोठ्या गृहसंकुलांचा विस्तार होत असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ येथे मंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदाहरण देत, भविष्यात दिवा शहरातही असे प्रकल्प उभारले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवा स्थानकावर फास्ट व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. भविष्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही दिव्यात थांबतील, तसेच दिवा-सीएसटी विशेष लोकल सुरू होणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा स्किल सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा ते सात महिन्यांत ते सुरू होणार आहे. भविष्यात दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवा शहरात आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अग्निशमन केंद्र, पोलिस स्टेशन, तलाव सुशोभीकरण, परिवहन सेवा आणि महापालिकेच्या शाळा उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प मंजूर झाल्याने, भविष्यात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पूर्णतः सुटणार असल्याचेही सांगण्यात आले.

दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ चे शिवसेना-भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, आदेश भगत, दिपाली भगत, स्नेहा पाटील, प्रभाग क्रमांक २८ मधील रमाकांत मढवी, साक्षी मढवी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे तसेच प्रभाग क्रमांक २९ चे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील, अर्चना पाटील आणि वेदिका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी शिवसेना-महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.

सभेच्या शेवटी १५ जानेवारी रोजी धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. “काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे महायुतीचेच आहे. पुढील काळात दिवा शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्लस्टर पुनर्विकास योजनेचे सर्वेक्षण ९५% पूर्ण, लवकरच काम सुरू होणार

क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ही योजना म्हणजे केवळ घर नव्हे, तर सर्वांगीण विकास आहे. धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात एकाचवेळी १३ क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत. दिवा शहरातही ९५ टक्के सर्वे पूर्ण झाला असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.”

आम्ही दहा वर्षांत दिलेला शब्द पाळला - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

"प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष लोकांसमोर येतात. मुंबईच उदाहरणं, आज मराठीच्या नावावर एकत्र आलेले आहेत, पण २५ वर्षांत काय केलं ते त्यांनी सांगितलेलं नाही. उलट पुढे काय करणार ते सांगण्यासाठी लोकांच्या समोर जात आहेत. पण आम्ही १० वर्षांत दिलेला शब्द पाळला आहे, हे अभिमानाने सांगतो” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.

'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा १० व ११ जानेवारी रोजी संपन्न झाला असून डोंबिवली व परिसरातील ३५ शाळांमधील ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोळ हे मुख्य अतिथी म्हणून लाभले, तर RPSF १२वी बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्री. दाहाके आणि इन्स्पेक्टर दिनेश कुमार यांनी मान्यवर म्हणून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रायोजक Galaxy IEC India Pvt Ltd चे संचालक रोटेरियन विजय अव्हाड, Union Bank चे DBM अतुल शिंदे तसेच स्वच्छता भागीदार Sumeet Elkoplast तर्फे श्री. सानू वर्गीज यांनीही कार्यक्रमाला आपली उपस्थिती देऊन उपक्रमाला बळ दिले.
RPSF ग्राउंडवर ऍथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉर, कानविंदे हॉलमध्ये बॅडमिंटन (व्हेन्यू पार्टनर : नॅशनल यूथ ऑर्गनायझेशन), डोंबिवली स्पोर्ट्स अरेना टर्फवर फुटबॉल आणि रोटरी भवन येथे बुद्धिबळ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय क्लब अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई आणि प्रोजेक्ट चेअरमन विवेक गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २१ जानेवारी रोजी रोटरी भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.११ : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मेळावा आज सकाळी ११ वाजता दिवा–आगासन रोडवरील दळवीनगर मैदानात उत्साहात पार पडला. या प्रवेशामध्ये मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच शाखा अध्यक्ष अशा विविध पदांवरील कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवसेनेच्या धोरणांवर विश्वास ठेवत आणि महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात “शिवसेना जिंदाबाद”, “महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

मोतीराम दळवी, उपशहर अध्यक्ष मनसे, दिलिप गायकर, विभाग अध्यक्ष मनसे,कुशाल पाटील, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, अर्पित पोळ, वैष्णव दळवी, विदयार्थी सेना विभाग अध्यक्ष मनसे, नितिन आदवडे शाखा प्रमुख मनसे, विकी भगत शाखा प्रमुख मनसे, विशाल भिडे, निखिल पाटील, वेदांत दळवी, विशाल शिंदे, दुर्वेश दळवी, राहुल नाईक, संदिप शिंदे, सचिन गायकर, कौस्तुभ गायकर, चित्रा दळवी महिला आघाडी, चैतन्या दळवी, चैताली दळवी, ममता शिंदे, दिक्षा माने, जागृती जोशी इत्यादींनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत दिवा परिसरात शिवसेना–महायुतीची ताकद आणखी मजबूत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या मेळाव्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

मतदान यंत्रणा पूर्ण तयारीत असून दि. १५ जानेवारी रोजी मतदान करून नागरिकांनी बजवावा आपला मतदानाचा अधिकार - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - गुरुवार दि.१५ जानेवारी २०२६ रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी आज मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेसमयी केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे समन्वय अधिकारी बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकुण १५४८ मतदान केंद्र असून, एकुण ९ ठिकाणी स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ ते ९ यांच्या अधिनस्त असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी होणार आहे. महापालिकेने मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रदर्शित केलेली आहे. तसेच एकुण ११८२ मतदान केंद्रस्त‍रीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत वोटर स्लिप चे वितरण करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी पूर्णपणे सज्ज असून, या निवडणूकीसाठी एकुण १७०  झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ सीयु आणि उमेदवारांच्या संख्येनुसार बीयु उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, मतदान केंद्रामध्ये नागरीकांना आपले मोबाईल फोन नेण्यास मनाई आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी मतदान व मतमोजणी दिवशी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची/बंदोबस्ताची माहिती विषद केली. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी, मतदानाचे दिवशी व मतमोजणीचे दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहील अशीही माहिती त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.

अनिल आय हॉस्पिटलच्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.११:  ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटल' च्या डोंबिवली पश्चिम येथील सहाव्या शाखेचे उद्घाटन आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या नव्या अत्याधुनिक आय क्लिनिकचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 
यावेळी श्री. परणाद  मोकाशी, श्री. जितेंद्र भोईर, श्री. शैलेन्द्र भोईर तसेच श्री. भाई पानवडीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली पश्चिम येथील 'अनिल आय हॉस्पिटल' ची ही सहावी नवीन शाखा नागरिकांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक मोठी पर्वणी ठरली असून, आता अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार अशा सर्व सुविधा घराजवळ उपलब्ध होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या दीर्घकालीन आणि समाजोपयोगी नेत्रसेवेचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी डोंबिवलीकरांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी व विश्वासाबद्दल मनापासून आभार मानले. त्या म्हणाल्या, “डोंबिवलीकरांच्या विश्वासामुळेच आज आम्ही सातत्याने सेवा विस्तार करू शकलो आहोत. दर्जेदार, आधुनिक व रुग्णकेंद्रित नेत्रसेवा भविष्यातही आमच्या कडून अखंडपणे सुरू राहील, याची आम्ही खात्री देतो.”
अनिल आय हॉस्पिटल हे विश्वास, अनुभव आणि आधुनिक नेत्रसेवेचे प्रतीक असून डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांसाठी उच्च दर्जाची आय केअर अधिक सुलभ होणार असून, ही शाखा नेत्रसेवेत एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डोंबिवली पाश्चिमेकडील प्रभाग क्र.२५ मधील मनसे पुरस्कृत उमेदवार शैलेश, मनीषा, पूजा धात्रक यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा नागरिकांनी केला संकल्प..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २५ (अ) मधून सौ. मनीषा शैलेश धात्रक २५ (ब) मधून पूजा शैलेश धात्रक व २५ (क) मधून शैलेश रमेशचंद्र धात्रक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदान मागत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ते संवाद साधत आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. 

शैलेश रमेशचंद्र धात्रक व मनीषा धात्रक हे कुटुंब गेली अनेक वर्ष या प्रभागाचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, गटारे, नाले सफाई, मुबलक  पिण्याचे पाणी या सुविधा नागरिकांना नियमित दिल्या आहेत तसेच इतर सामाजिक कामे देखील केलेली आहेत व विकासकामांची गंगा प्रभागात वाहत आहे. मनीषा शैलेश धात्रक यांनी सांगितले की प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेले अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कल्याण-डोंबिवलीला आनंदी शहर करायचं आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली परिसरात विविध प्रकल्प राबविले जात असून अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरांना आनंदी शहर बनवायचं असल्याचे सांगत कोणी कितीही करूद्या दावेदारी महायुतीच राखणार कल्याणची सुभेदारी असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर आयोजित विजय संकल्प सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील आदींसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर पहिला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकी नंतर आता महापालिका निवडणुकीत चौकार षटकार मारायचा आहे. विरोधकांचा सुपडा साफ करायचा आहे. ६० हुन अधिक नगरसेवक निवडून येऊन विजयाची नांदी सुरू झाली आहे. काही लोकं फक्त टीका टिपण्णी करतात, दुसऱ्यांचा आधार घेऊन काही लोकं मला बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत. आपल्यावर कितीही टीका झाली आरोप झाले तरी या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. 

काहींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. घरी बसून सरकार चालवता येत नाही.  लोकांणा सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. काही लोकं मुंबईकडेच लक्ष लावून बसले आहेत. काहींचा डोळा मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीवर असून आमचा डोळा मुंबईच्या विकासावर आहे. निवडणूक आली की मुंबईतील मराठी माणूस विरोधकांना आठवतो.   
कल्याण हे मुंबईचे शॉकऍपजोबजर आहे. मुंबईचा भार हे उपनगर सांभाळत आहेत. पाच वर्षात कल्याण हे आघाडीचे शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कल्याण-डोंबिवली धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केल्या जातीलअडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. सर्वसामान्याचा विकास, शहरांचा विकास झाला पाहिजे यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामे केली जात आहेत. 

कल्याण ऐतिहासिक नगरी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात येथून झाली त्याचे स्मारक केलं आहे. ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट. लोकांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मी प्रतिपादन करतो.रखडलेले पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिव्यातील साबे गावात महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार..

विशेष प्रतिनिधी

दिवा : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र.२९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी आमदार निरंजन डावखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रभाग क्र.२९ मधील २९ (अ) मधून अर्चना पाटील, २९ (ब) मधून वेदिका पाटील आणि २९ (क) मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच प्रभाग क्र.२९ मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

'अनिल आय हॉस्पिटल' चे डोंबिवली पश्चिम येथे सहाव्या शाखेचे दि.११ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नेत्रसेवेत गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह सेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' आता डोंबिवली पश्चिम येथे आपल्या सहाव्या शाखेचे उद्घाटन करत आहे. हे नवीन अत्याधुनिक आय क्लीनिक ११ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
सन १९७२ साली सुरू झालेला 'अनिल आय हॉस्पिटल'चा प्रवास आज ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (पूर्व), डोंबिवली (पश्चिम), ठाणे, कल्याण, निळजे पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये विस्तारला असून हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार  यांसारख्या सर्व सुविधा आता घराजवळ उपलब्ध होणार आहेत. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण  यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार असून, श्री पर्नाद मोकाशी सह डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “डोंबिवलीकरांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच आम्ही सातत्याने पुढे वाटचाल करू शकलो. दर्जेदार व प्रगत नेत्रसेवा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. लवकरच ठाणे येथे आमची सातवी शाखा सुरू होणार आहे.” डोंबिवली पश्चिम येथील ही नवीन शाखा परिसरातील नागरिकांसाठी आय केअर च्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
दिनांक: ११ जानेवारी २०२६
वेळ: ११ ते २
पत्ता: अनिल आय हॉस्पिटल, तळमजला, घनश्याम कॉम्प्लेक्स, डीएनएस बँक जवळ, एमजी रोड डोंबिवली (पश्चिम)
संपर्क :
अनिल आय हॉस्पिटल
+91 99252 35969

मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती..

विशेष प्रतिनिधी

दिवा : मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २७ व २८ येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मतदानाबाबत जनजागृती मोहिम आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

दिवा स्टेशन (पूर्व) येथील एस.एम.जी विद्यालय येथे मतदान जनजागृती प्रतिज्ञा व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “मतदान हा हक्क आणि कर्तव्य आहे”, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करूया” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक धादवे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच स्वीप पथक प्रमुख सचिन विलास वायदंडे (पथक क्र. २७ व २८) यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र मुंडे, गिरीश शेलार (केंद्र समन्वयक – १५), शिवा सांगळे, निवृत्ती जाधव व स्वीप पथकातील सदस्य उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गुन्हे शाखा घटक -३ कल्याणच्या पथकाने गुन्ह्यातील गेले ३ वर्षांपासुन २ फरार आरोपींचा शोध घेवुन सापळा रचत घेतले ताब्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
डोंबिवली - दिनांक ७ जानेवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४११/२०१६ भा.द.वि. कलम ३२४, ३४ या गुन्ह्यातील आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, राहणार: पुतळाबाई चाळ, अशोकनगर वालधुनी, कल्याण पुर्व, व २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे, राहणार: वरील प्रमाणे हे वेळावेळी त्यांचा ठाव ठिकाणा बदलुन  राहत असून ते सापडत नसल्याने आरोपींना हजर करण्याकरीता मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग पहिले न्यायालय,कल्याण यांनी दि. १७/०१/२०२३ रोजी जाहिरनामा काढलेला होता. सदर आरोपी अद्याप सापडत नसल्याने त्यांचा कसोशीने शोध घेवुन सदर दोन्हीही आरोपी हे काल्हेर भिवंडी येथे राहत असल्याबाबत पोशि.गोरक्ष शेकडे यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा,घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहा. पोलीस उप निरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा. विजय जिरे, विलास कडु, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, गुरुनाथ जरग, गणेश हरणे, पांडुरंग भांगरे, सचिन भालेराव, सतीश सोनवणे यांनी काल्हेर गांव हल्दीराम गोडऊनच्या मागे, सीजी पार्क बिल्डींगजवळ भिवंडी येथे सापळा रचुन फरारी आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

मा. कल्याण कोर्टाने जाहीरनामा प्रसिद्ध करून सदर दोन्ही आरोपी हे फरार घोषित करून शोधण्याचे व समक्ष हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, सदर आरोपी हे दोन्ही सख्खे भाऊ असून एका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मा. कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते.

डोंबिवलीतील सायली चव्हाण यांना थेट सहाय्यक संचालक पदाची घवघवीत यशप्राप्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मानपाडा रोड येथील श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सायली सौरभ चव्हाण या कन्येने जिद्द, चिकाटी आणि अथक चार वर्षांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर थेट सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (अधिकारी वर्ग–१) या प्रतिष्ठित पदाला गवसणी घातली आहे.
सायली चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामागे मोलाची साथ देणाऱ्या आई- वडिलांसह सासरकडील कुटुंबीयांचाही यावेळी आवर्जून गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत सायली चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला सुरज मराठे, ज्योती मराठे, विवेक खामकर, हर्षल मोरे, संजय निकते, दीपाली पाटील, अक्षय सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सायली चव्हाण यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सायली चव्हाण यांचे हे यश डोंबिवलीसह संपूर्ण परिसरातील तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरणारे आहे.

ठाण्यात घराणेशाहीला नकार, तर दिवा, डोबिंवलीत पाठींबा कसा ?


विशेष प्रतिनिधी

दिवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलांना ठाण्यात तिकीट नाकारले पण त्याचवेळी दिव्यात माजी उपमहापौर रमाकांत मढवींच्या मुलीला तर डोबिंवलीत आमदार मोरेंच्या मुलाला कसे तिकिट दिले गेले. यावर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. 
  
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ठाण्यातील खासदार, आमदार यांच्या मुलांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिंदे सेनेत नाराजीची लाट उसळली आहे. पण तेच उलट दिवा, डोंबिवलीत जल्लोष पहायला मिळाला. 

ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण तेव्हाच दिव्यातील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांची मुलगी साक्षी मढवी हिला दुसऱ्या दोन टर्म असलेल्या नगरसेविकेची तिकिट दिली गेली. तर डोंबिवलीतील आमदार राजेश मोरे यांच्या हर्षल मोरे याला तिकिट दिले गेले. शिंदेंचा ठाण्यात वेगळा न्याय आणि दिवा, डोंबिवलीत वेगळा न्याय का?असा सवाल नागरिक विचारत आहेत. सर्वांना समान न्याय मिळावा असे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये सद्य सवयी व भविष्यकाळातले जीवन "प्रेझेंट हॅबिट्स ऍण्ड फ्युचर लाईफ" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - व्याख्यानाचे वक्ते व 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे प्रेरणादायी विचार  श्रोत्यांना कायमच उस्फुर्त करत असतात. आपली व्याख्यानमाला सुरू करताना डॉ राजकुमार कोल्हे म्हणाले की, नवीन दिवस म्हणजे मिळणारी नवीन संधी असते, प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या अंगात असणाऱ्या चांगल्या वाईट सवयींचा गुलाम असतो, अंगभूत असणाऱ्या चांगल्या सवयी नेहमीच भविष्यकाळातील जीवन सुसह्य करून टाकतात तर वाईट सवयी ह्या भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा पाठलाग करत राहतात. प्रथमतः वेळेचे नियोजन आणि वेळेची किंमत असणे हेच  खरे यशाचे गमक आहे. पैसा आणि वेळ या गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य दिले तर अनेक  सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील, यासाठी योगा करणे,  आवडीचे खेळ खेळणे या चांगल्या सवयी जर लावून घेतल्या तर भविष्यकाळातील जीवन तुम्ही आनंदाने आणि आत्मविश्वास पूर्वक जगू शकाल. स्वतः बरोबरच इतरांचाही आदर करण्याची कला आणि सवय सर्व जन माणसात असावी हे सांगताना डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले की भारतातील प्रत्येक स्त्री ही पूजनीय, वंदनीय, महाराणी आहे म्हणूनच आमच्या भारतीय संस्कृती मधे स्त्रियांशी हस्तांदोलन न करता आम्ही हात जोडून नमस्कार करून स्त्री चा आदर करतो. 
आपल्या कामाशी, कर्तव्याशी प्रामाणिक राहा, असे सांगत जे आर. डी. टाटा यांचे उदाहरण दिले. भूतकाळ हा मनाचा पुसटसा आरसा असतो तर भविष्यकाळ हा मनाचा,  विचारांचा स्पष्ट दिसणारा चकाकणारा  आरसा असतो म्हणूनच भविष्यातील जीवन सुकर करण्याकरिता अंगभूत वाईट सवयींचा निचरा करा व चांगल्या सवयी वृद्धिंगत करून भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवा असेही वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
मधुबन वातानुकूलित दालनात उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी मनात रेंगाळत असलेले अनेक प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच चांगल्या सवयी व वाईट सवयी कोऱ्या कागदावर लिहून वाईट सवयी चा कागद अग्निकुंड मधे टाकून येणाऱ्या नवीन वर्षांची सुरुवात ही फक्त आणि फक्त चांगल्या सवयीनी करायची असा प्रण देखील घेतला. अंगातील आळस जाऊन उत्साह येण्यासाठी सर्व उपस्थितांनी हलके फुलके नृत्य सादर केले. अध्यक्ष डॉ. राजकुमार, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मनात  ठरवलेल्या संकल्पाने आणि आनंदाने येणारे २०२६ हे वर्ष सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारे ठरो अशा सदिच्छा दिल्या.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचा दबदबा निर्माण करत राज्यातील ८ महापालिकांमध्ये २२ उमेदवार बिनविरोध; भाजप आघाडीवर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवड झाले असून त्यांच्या विजयाची औपचारीकता बाकी आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात येथे भाजपच्या ५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने ९ उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील ८ महापालिकेत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच १२ उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळवलं आहे. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे, एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहे. दरम्यान, अद्यापही उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही ठिकाणी उद्या वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं.

८ महापालिकेतील भाजपचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध

१. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी
२. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड २६ (क) मधून भाजपच्या आसावरी नवरे
३. कल्याण-डोंबिवली - वॉर्ड २६ (ब) भाजपच्या रंजना पेणकर
४. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (ब) मधून भाजपच्या ज्योती पाटील
५. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २७ (अ) मधून भाजपच्या मंदा पाटील
६. धुळे - वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले
७. धुळे - प्रभाग ६ (ब) मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
८. धुळे - प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले
९. पनवेल - वॉर्ड क्र १८ (ब) मधून भाजपचे नितिन पाटील
१०. भिवंडी - प्रभाग १७ (अ) मधून भाजपचे सुमित पाटील
११. जळगाव - प्रभाग १२ (ब) मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे
१२. पिंपरी-चिंचवड - भोसरी प्रभाग ६ मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध 

२ महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध

१. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (अ) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे
२. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (ब) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे
३. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २४ (क) मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या वृषाली जोशी
४. कल्याण-डोंबिवली - प्रभाग २८ (अ) मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोरे
५. जळगाव - प्रभाग १८ (अ) मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे
६. जळगाव - प्रभाग क्रमांक ९ (अ) मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी बिनविरोध
७. जळगाव - प्रभाग ९ (ब) मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध 

अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार बिनविरोध

१. अहिल्यानगर - प्रभाग ८ (ड) मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे
२. अहिल्यानगर - प्रभाग क्रमांक १४ (अ) मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे 

मालेगावमध्ये एक बिनविरोध

१. मालेगाव - वॉर्ड ६ (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

संरक्षण क्षेत्रासाठी ७९ हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देत संरक्षण क्षेत्रासाठी ७९,००० कोटी रुपये रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार नसून, भारतीय संरक्षण कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन संरक्षण खरेदी नियमावलीनुसार (DPM), एकूण खरेदीमध्ये २५ टक्के आरक्षण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) ठेवण्यात आले आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या कंपन्यांचे भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल. सरकारी कंपन्या मुख्य कंत्राटदार असतील, तर खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स सुटे भाग पुरवण्याचे काम करतील.

या मंजुरीमध्ये भूदल, नौदल आणि वायुसेनेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे:

भूदल : पिनाका रॉकेट प्रणालीसाठी लांब पल्ल्याची मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, ‘लॉइटर म्युनिशन्स’ (Loiter Munition) आणि ड्रोनविरोधी यंत्रणा.

वायुसेना : ‘अस्त्र मार्क-II’ (Astra Mk-II) क्षेपणास्त्रे, तेजस विमानासाठी ‘फुल मिशन सिम्युलेटर’ आणि ‘स्पाइस-1000’ मार्गदर्शक किट्स.

नौदल : बंदरातील कामांसाठी ‘बोलार्ड पुल टग्स’ आणि हाय-फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर रेडिओ संच.

गुंतवणूकदारांच्या रडारवर असलेले शेअर्स बाजारातील तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेसच्या मते, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा खालील कंपन्यांना होऊ शकतो:

१. हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL): तेजस सिम्युलेटर आणि अस्त्र क्षेपणास्त्र एकत्रीकरणासाठी प्रमुख कंपनी.

२. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BHEL): रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि संप्रेषण उपकरणांसाठी मोठी संधी.

३. भारत डायनॅमिक्स (BDL): अस्त्र आणि पिनाका रॉकेट निर्मितीमध्ये या कंपनीचा मोठा वाटा असेल.

४. झेन टेक्नॉलॉजीज (Zen Tech): सिम्युलेटर आणि ड्रोन शोध यंत्रणेसाठी ही कंपनी चर्चेत आहे.

५. माझगाव डॉक आणि कोचीन शिपयार्ड: नौदलाच्या जहाजांच्या उपकरणांसाठी या कंपन्यांना फायदा मिळेल.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे चार उमेदवार बिनविरोध विजयी..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे शिवसेनेचे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील यांदेखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा महापौर शतप्रतिशत बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे.  या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तसेच प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे ही बिनविरोध निवडून आले आहेत. चारही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या चारही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. 

शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चारही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. 

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.

३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त पुरावे नोंदवण्यात आले आहेत.

विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याची कार्यवाही पुन्हा गती धरली आहे. यामुळे या प्रकरणातील न्यायलयीन प्रक्रियेत पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा झाला असून, आरोपींविरुद्ध पुरावे अधिक तपासल्या जाणार आहेत. विशेष टाडा न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रम देण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये अचानक बेछूट गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर या मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधी शैलेश हळदणकर एका चकमकीत जखमी झाला होता आणि तातडीने पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास, काही लोक ‘हळदणकरला भेटायचंय’ म्हणत वॉर्डात घुसले. क्षणभरात त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढल्या आणि हळदणकर तसेच त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात हळदणकर आणि दोन्ही पोलीस जागीच ठार झाले.त्यावेळी पोलिसांनी या घटनेची न्यायालयात माहिती दिली होती. ही घटना मुंबईतील गुन्हेगारी आणि हिंसात्मक इतिहासातील एक भयानक आणि थरारक घटना म्हणून आजही लक्षात ठेवली जाते.

सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही सल्लागार सूचना सोमवारी जारी केली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने मंगळवारी अहवाल जारी करून सांगितले की, सल्लागार सूचनेत इंटरनेट प्लॅटफॉर्मना आयटी कायद्याच्या संदर्भात त्यांच्या अनुपालन फ्रेमवर्कची समीक्षा करण्यास सांगितले आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया इंटरमीडियरीसह इतर इंटरमीडियरींना आठवण करून दिली जाते की ते आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत कायदेशीररित्या बांधील आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्याद्वारे अपलोड, प्रकाशित, होस्ट, शेअर किंवा प्रसारित केलेल्या तृतीय-पक्ष माहितीच्या संदर्भात जबाबदारीतून सूट मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.

पीटीआयच्या अहवालानुसार, या तरतुदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करतात. यात असे म्हटले आहे की वापरकर्त्याने अशी कोणतीही माहिती आणि सामग्री होस्ट, प्रदर्शित, अपलोड, सुधारित, प्रकाशित, प्रसारित, संग्रहित, अद्यतनित किंवा सामायिक करू नये जी अश्लील, पोर्नोग्राफिक, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित, मुलांसाठी हानिकारक किंवा बेकायदेशीर असेल.