BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये रौप्य महोत्सवी वर्षा अंतर्गत 'जे एम एफ रौप्य पुरस्कार' प्रदान तसेच 'रेडियो जे एम एफ ध्वनी ८८.४' चे उद्घाटन व 'जे एम एफ' रौप्य प्रवास' स्मरणिका सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली दि.२३ - जान्हवी मल्टी फाउंडेशन (जे एम एफ) शिक्षण संस्थेमध्ये दिनांक १९ ते २४ जानेवरी पर्यंत सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रति काला घोडा मोहोत्सव तसेच शाळा, महाविद्यालयांचे 'प्रेरणोत्सव वार्षिक स्नेह संमेलन' मोठ्या जल्लोषात पार पडला. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण झाली त्या अनुषंगाने वर्षभर विविध कार्यक्रम करून 'रौप्य महोत्सव' साजरा केला गेला.
"जुनं तेच सोनं" या उक्ती प्रमाणे पुन्हा एकदा नव्याने 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये वसंत पंचमीच्या मुहूर्तावर "जे एम एफ ध्वनी ८८.४" या रेडिओ स्टेशन चे उद्घाटन "जे एम एफ रौप्य प्रवास" स्मरणिका प्रकाशित  करण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री.परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे त्याच बरोबर संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर त्याच बरोबर हे कार्य तडीस नेण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले श्री. कुमार दुपटे व इतर पदाधिकारी व या योजनेसाठी कार्यरत असलेले सदस्य यांच्या हस्ते "जे एम एफ ध्वनी ८८.४" चे उद्घाटन करण्यात आले. 'जे एम एफ' संस्थेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला तो म्हणजे शंभर शहरांमध्ये प्रसारित  होणारा "जे एम एफ ध्वनी ८८.४" रेडिओ चॅनल म्हणजे सर्व सामान्य लोकांना 'जे एम एफ' परिवारातील सदस्य म्हणून जोडला जाणारा दुवाच असलयाचे उद्गार संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे यांनी काढले. चोवीस तास सुरू असलेल्या 'जे एम एफ ध्वनी' मध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरूच राहतील. शाळेच्या गोंगाटामधे किलबिल करणारी ही मुले "जे एम एफ ध्वनी ८८.४" च्या माध्यमातून गाण्याचा, गोष्टीचा, नाटकाचा, 'किलबिल' कार्यक्रम करण्यास सज्ज आहेत असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. लहानापासून ते वृध्द व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आनंद देणारे श्राव्य माध्यम म्हणजे रेडिओ. म्हणूनच संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव यांच्या संकल्पनेतून "जे एम एफ ध्वनी ८८.४" ची संकल्पना साकारली गेली.
दिनांक २३ जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय मंचावर "जे एम एफ रौप्यगौरव पुरस्कार" वितरण सोहळा पार पडला. स्मरणिके साठी संतोष पवार व निमा बृजेश यांचे फार मोठे योगदान ठरले. 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेसाठी केलेले उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची पोचपावती म्हणून शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले निवडक सदस्यांना "रौप्यगौरव पुरस्कार स्मृतिचिन्ह" प्रदान करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी संस्थेच्या रजत महोत्सवी निवडक सदस्यांना पुरस्कार प्रदान केला. दिलेल्या कामाची जबाबदारी आणि पूर्तता केलेल्या कामाची दखल घेतली जाणे हाच खरंतर मोठा पुरस्कार आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते निवडक सदस्यांना रौप्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याच बरोबर 'जे एम एफ' मधील सर्व कौटुंबिक सदस्यांना देखील रजत महोत्सवी भेटवस्तू देण्यात आली.
पुरस्कार हा केवळ पुरस्कार नसून आपण केलेल्या कार्याची पोचपावती आहे, आणि ही पोचपावती जपून ठेवून येणाऱ्या अनेक वर्षात मोठ्या उत्साहात आणि परिश्रमाने कार्य करत राहणे  म्हणजे हा प्राप्त झालेला पुरस्कार एक प्रकारचे स्फूर्तीदायी आणि शक्ती वर्धक औषधचं आहे, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटले व पुरस्कारकर्त्यांचे अभिनंदन केले.
'जे एम एफ' रौप्य गौरव पुरस्कार मिळाला म्हणून इथेच न थांबता एक पाऊल पुढे टाकताना इतरांनाही आपल्या बरोबरीने पुढे घेऊन चला आणि 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे नाव अजून उज्वल करा असे सांगत सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. नृत्य, गायन, नाटिका या कार्यक्रमाचे सादरीकरण करून आणि भोजनाचा आस्वाद घेऊन 'जे एम एफ' संस्थेचा रजत महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला.

ठाकरेंची साथ सोडणाऱ्या महिला नेत्याच्या गळ्यातच महापौर पदाची माळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२२ : मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाला आरक्षण जाहीर झालं आहे. यानंतर आता भाजपच्या काही महिला नगरसेवकांचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. ठाकरे गटाला केवळ ६५ जागांवर यश मिळालं. तर भाजपला ८९ जागांवर यश मिळालं. भाजप हा मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा मुंबईतील क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत २९  जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबई महायुतीला ११६  जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतसाठी ११४ जागांची आवश्यकता होती. पण महायुतीला त्यापेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. पण तरीही महापौर पदाच्या सोडत पर्यंत भाजप आणि शिवसेनेला धाकधूक होती. कारण महापौर पदाची सोडत ही एसटी प्रवर्गासाठी असती तर सत्ताधारी पक्षांचे त्या प्रवर्गातील उमेदवार जिंकून आलेले नाहीत. केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे एसटी प्रवर्गातील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आणि ठाकरेंच्या शिलेदाराच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगली होती.

यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या महिला नेत्याच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. खरंतर भाजपकडे तब्बल ४९ महिला नगरसेविका जिंकून आल्या आहेत. यापैकी अनेक महिला नगरसेवकांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. तसेच महापौर पदाची सोडत ही सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमधील राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शितल गंभीर, योगिता सुनील कोळी यांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आहे. पण असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेत एकेकाळी काम केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचंदेखील नाव मुंबईच्या महापौर पदासाठी चर्चेत आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काही महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. पण त्यांचा फेब्रुवारी २०२४ मध्ये निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत. स्वत: तेजस्वी घोसाळकर या दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून गेल्या आहेत. तसेच पतीच्या निधननंतर मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली होती.

तेजस्वी घोसाळकर हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला होता. पण काही दिवसांनी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेजस्वी घोसाळकर या दहीसर येथील वॉर्ड क्रमांक २ येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय अनुभव पाहता भाजपकडून त्यांची मुंबई महापालिकेच्या महापौर पदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. असं असलं तरी भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला तर वेगळ्याच चर्चेत नसलेल्या चेहऱ्यालाही महापौर पदाची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.

दिव्यात आशेची किरणे उगवत ठाणे महापौरपदासाठी दिपक जाधव यांचे नाव आघाडीवर..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२२ जानेवारी – ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जाती (एस सी) साठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक २८ मधील एस सी आरक्षित जागेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक दिपक जाधव यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिपक जाधव हे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापालिकेतील अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कामकाजामुळे ते पक्षातील विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवा–शीळ विभागातून शिवसेनेचे १० तर भाजपचा १ नगरसेवक निवडून आल्याने या विभागात शिवसेना भक्कम स्थितीत असल्याचे चित्र आहे. दिव्यातील २७,२८ आणि २९ हे प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातात. 

दरम्यान, अनुभवी नगरसेवक दिपक जाधव यांची ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यास दिवा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व नागरी समस्यांवर प्रभावी निर्णय घेणारे नेतृत्व दिव्याला मिळावे, अशी दिव्यातील नागरिकांची इच्छा आहे.

महापौरपदाचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून होणार असला, तरी सध्याच्या घडीला दिपक जाधव यांचे नाव जोरदार चर्चेत असून, त्यांच्या संभाव्य निवडीकडे दिवा परिसराचे लक्ष लागले आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक १८/०१/२०२६ रोजी ०५.५६ वाजताच्या सुमारास साई पान शॉप समोर, फुटपाथवर, इंन्टरसिटी मॉलचे बाजुला, वागळे इस्टेट ठाणे (पश्चिम) येथे विधीसंघर्षित बालक नामे अबक राहणार: मु.खजुरिहा कला, तहसिल: रामनगर राजापुर, जिल्हा: चित्रकुट, रहेपुरा पोलीस ठाणा, राज्य: उत्तर प्रदेश हा दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकुण २,१४,०००/- रु किंमतीचा माल अवैधरित्या विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या विनापरवाना हत्यारे कब्जात बाळगुन ठेवले असतांना सापडल्याने त्या  विधीसंघर्षित बालक नामे अबक याचेविरुध्द वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक, ठाणे हे  करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, मा.श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, मा. श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२. गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, पोहवा. ठाकूर, शिंदे, जाधव, गायकवाड, पोशि. शेजवळ, मपोशि. भोसले यानी केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये साकारला गेला 'प्रतिकृती काला घोडा' महोत्सव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२० - कला आणि संस्कृतीचा संगम असणारे शहर म्हणजे मुंबई. सर्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकारांना वाव मिळवून देणारा 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन दर वर्षी मुंबई येथे होत असते. त्याचीच प्रतिकृती डोंबिवली शहरांमधील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये दिनांक २० जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय प्रांगणात 'काला घोडा महोत्सव' मोठ्या दिमाखदार रीतीने पार पडला.
 एक आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणारी 'जे एम एफ' संस्था म्हणजे उभरत्या कलाकारांना कलेचे दालन उघडून देणारे प्रवेशद्वारच होय. दिनांक १९ जानेवारी रोजी 'जे एम एफ' रोजगार मेळाव्याचे (जॉब मेळा) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ३३ कंपन्या व ३५० च्या वर उमेदवार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या संकल्पनेतून 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सरस्वती, नटराज व गणेश पूजन करून व पाहुण्यांचे स्वागत करून संस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या व कलाकार श्रीमती बॉस्की मॅडम यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले.
'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील अनेक विध्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीने अनेक प्रकारचे प्रकल्प   हस्तकलेने बनवून आणले होते तर हस्तकलेने रेखाटलेले चित्रफलक (कॅनव्हास पेंटिंग) हे काला घोडा महोत्सवाचे खास आकर्षण होते .  त्याच बरोबर हस्तकलेने तयार केलेला काला घोडा देखील संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा करण्यात आला होता.संपूर्ण महोत्सव हा चल चित्राने साजरा होत होता. 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळेमधील इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी  कु. अर्णव डोंगरे सुबक रित्या गणपती बाप्पाचे चित्र रेखाटत होता तर मूर्तिकार मग्न होऊन मूर्ती घडवण्याचे कार्य करत होते, हातावर मेहंदी काढणे, चित्र काढून त्यामध्ये रंग भरण्यात सगळे कलाकार मग्न झाले होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती बॉस्की मॅडम यांनी देखील संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे चित्र रेखाटले .
कलात्मक शिक्षिका दीपा तांबे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, अभिषेक देसाई, नरेश पिसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व मुलांनी काला घोडा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेऊन नाविन्य पूर्वक प्रकल्प बनवले. संपूर्ण ब्रह्मा रंगतालय प्रांगण हे विविध कलात्मक साहित्याने भरून गेले होते. ब्रह्मा रंगतालयाच्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी आणि उभरते कलाकार गायक शिक्षक नितेश मेस्त्री यांनी नाट्यसंगीत सादर करून इयत्ता चौथी मधील व जाई या विद्यार्थिनीने नाट्य संगीतावर आपल्या कथक नृत्यातून गणेश वंदना सादर केली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक सादर केले. तसेच पदवी महाविद्यालय चे प्रोफेसर श्री.योगेश शिरसाट यांनी वासुदेवाचे रूप धारण करून "वासुदेव आला".. हे नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता तिसरी चौथी मधील विद्यार्थ्यांनी गायन करून आपली कला सादर केली तर इयत्ता सातवी मधील कार्तिक या विद्यार्थ्याने उत्कृष्ट तबला वाजवून सर्व उपस्थितांना आनंद दिला. सौ.कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षिकानी काव्य वाचन सादर केले.
'जन गण मन' शाळा व्यतिरिक्त डोंबिवली मधील अनेक बाहेरच्या शाळांनी या महोत्सवाला हजेरी लावून आनंद घेतला. कला ही माणसाला जिवंत ठेवते तर कलाकार हा आपल्या कलेतून इतरांना जिवंत ठेवतो असे सांगत असतानाच, अंगी कला असणारा माणूसच केवळ जगण्याची कला साध्य करू शकतो, असे सांगत संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे पुढे म्हणाले की, कलाकार हा नेहमी पैशापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा भुकेलेला असतो, कोणत्याही कलाकाराला मनापासून दाद मिळाली की ती दाद त्याच्या मध्ये असलेल्या अंतर्गत भावने पर्यंत  पोहचते, आणि त्याची कला तप्त सोन्या प्रमाणे निखारते. खरोखरच अभिमान वाटतो की आज हे कलादालन केवळ एकाच कलेने भरलेले नाही तर यामध्ये असंख्य कलांचा संगम आहे. हस्तकला, चित्रकला, तैलचित्र, रांगोळ्या, मेहंदी सारख्या या कलांचा संगम म्हणजे कलाकारांना दिलेली मानवंदनाचं होय असेही उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सहभागी कलाकारांना पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
'काला घोडा'  हे जरी महोत्सवाचे नाव असले तरी आमच्या शाळेतील मुलांची घौडदौड ही एखाद्या चेतक घोड्याप्रमाणेच आहे, आणि म्हणूनच नवनवीन प्रकल्प सादर करताना उत्साह आणि आनंद हा द्विगुणित होत असतो असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. सर्व उपस्थितांनी रेलचेल असणाऱ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. खजिनदार जान्हवी कोल्हे, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काला घोडा प्रदर्शनाला भेट देऊन मनोमन आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौं. श्रेया कुलकर्णी व प्रो.एकनाथ चौधरी यांनी केले तर वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दिव्यातील पूर्वेकडील मध्य रेल्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवावे अशी प्रवाशांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत असून दिवा शहराची ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती पूर्वेला आहे. असे असूनही या स्थानकातील पूर्वेचे तिकीटघर रात्री नऊ वाजता बंद होत असल्याने त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेला जावे लागते.

मात्र पश्चिमेला असणारे तिकीटघर हे मुंबई दिशेकडे असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते. यामुळे रात्रीच्या वेळेस विशेषतः महिलांना त्रास होत असल्याने पूर्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

मार्चपासून पत्रीपुलाच्या तिसऱ्या पुलावरून होणार वाहतुकीचा सुखकर प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : पत्रीपुलाच्या तिसऱ्या उड्डाणपुलावरून वाहतूक महिनाभर विलंबाने सुरू होणार असून जे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आता ते मार्चमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो पूल जानेवारी अखेर काम पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात खुला केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत, तांत्रिकदृष्ट्या ती कामे पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या पुलासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला होता, त्या पुलाचे ३६.६ आणि ४० मीटर अशा दोन भागात गर्डर टाकण्यात आले होते. पुलाची लांबी १०९ मीटर असून त्या पुलाची मागणी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खा. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीने त्यास मंजुरी दिली. नव्या पुलामुळे वाहतूककोंडी कमी होणार असून समांतर रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक होते. त्यानुसार आधीचा उड्डाणपूल तयार झाल्यावर तिसरा उड्डाणपूल होणे आवश्यक होते.

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात वसलंय दिवा शहर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

निवडणूक काळात व त्या आधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील १५ अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या.

दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देत सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केली आहे. ठोस कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर कल्याण मध्ये महापालिका निकालानंतर जीवघेणा हल्ला.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील कैलासनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. अंबादास कांबळे असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून जखमी अंबादास कांबळे यांना हल्ल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते अंबादास कांबळे यांना जीवघेणी मारहाण झाली. किरण पावशे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. किरण पावशे हा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

स्थानिक नागरिकांनी जखमी अंबादास कांबळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे निवडणूक निकालानंतरही राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी अंबादास कांबळे यांनी आरोप करताना म्हटलं की 'किरणने जातीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. निवडणुकीत शिंदे गटाचं काम केल्याने मारहाण केली. त्याने लोखंडी फायटरने एकट्यानेच मारहाण केली.

भाविकांच्या सेवेत आजपासून मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१८ : कल्याणमधील श्री मलंगगडावर आता भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर  सुरू झाली आहे. रविवारी भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या फ्युनिक्युलर सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणं अधिक सोपं, सुरक्षित आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कंपनीकडून भाविकांसाठी दोन दिवस ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री मलंगगड यात्रेच्या आधीच आता भाविकांच्या सेवेत फ्युनिक्युलर सेवा यंदा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठी सोय होणार आहे.

हा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली आणि अखेर यंदा २०२६ मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे.

मलंगगडावर, हाजी मंगलला कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. जाण्यासाठी अंदाजे २६०० पायऱ्या चढून वर गडावर जावं लागतं. हा गड चढण्यासाठी जवळपास २तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून सुरू झाल्याने हे २ तासांचं अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून जाता येईल. या सुविधेच्या देखरेखीसाठी ७० जण असून १२० जण यातून प्रवास करू शकतात, अशी माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सेवेला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. श्री मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मलंगगडावर जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागत असे, ज्यामुळे अनेक भाविकांना त्रास होत असे. आता या फ्युनिक्युलर सेवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही सहजपणे गडावर जाता येणार आहे. या सेवेमुळे मलंगगडावरील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

काय आहे फ्युनिक्युलर सेवा ?

फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे, ट्रॉली सारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे-पुढे अशा दोन गाड्या एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे.

या फ्युनिक्युलर सेवेसाठी पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकार्पणाच्या वेळी अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला शिंदे गटाचे खासदार आणि पदाधिकारी अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे भव्य स्वरूपात उद्‌घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.१८ - ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटलच्'या ठाणे शहरातील दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन आनंद भवन सोसायटी, भक्ती मंदिर रोड, तीन हात नाका, नेक्सा शोरूमच्या वर,  ठाणे येथे आज मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडले. या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाच्या  उद्‌घाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे लाडके लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवेचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री.निरंजन डावखरे यांनी देखील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात मा. श्री.नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणेकरांसाठी सुरू झालेल्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी ठाणे शहरातील नगरसेवक, नामवंत डॉक्टर, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ठाणे शहरासाठी सर्वोत्तम, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा देण्याचा आमचा संकल्प पुढेही तितक्याच निष्ठेने सुरू राहील.”
ठाणे येथील हे नवीन रुग्णालय 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवाविस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून, ठाणेकरांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक नवा विश्वास निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) आयोजित 'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड' समारोह संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित Vocational Excellence Award (व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड) कार्यक्रमाचे सुंदर आयोजन हे शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी रोटरी भवन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे हे निवृत्त माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी श्री. महेश झगडे हे होते. ह्या वर्षीचा पुरस्कार हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आला त्यात चित्रलेखा वैद्य (पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन), चारुदत्त कोलारकर (सामाजिक सेवा), अर्णव पटवर्धन (युवा पक्षीतज्ज्ञ) आणि सुधाश्री ट्रस्ट (सामाजिक कार्य) ह्यांना प्रदान करण्यात आला. शेला, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे प्रमुख स्वरूप होते. तसेच विशेष असा जीवन गौरव पुरस्कार हा श्री. जे के. साबू ह्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 
'व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड'' समारोहासाठी डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (ईस्ट) चे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, क्लब चे सचिव विनायक आगटे, प्रकल्प प्रमुख मानस पिंगळे, प्रकल्प संचालक दीपक नेरकर, माजी रोटरी जिल्हा प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, रोटरी सदस्य आरती बापट, संगीता पाखले, वीणा बेडेकर, शंतनू पुराणिक, पूनम यादव, वर्षा नेरकर राजन सावरे, सतीश अटकेकर, मंजिरी घरत, क्लब चे माजी अध्यक्ष कौस्तुभ कशेळकर, रघुनाथ लोटे, राधिका गुप्ते पुढील वर्षीचे अध्यक्ष अथर्व जोशी आणि इतर अनेक क्लब चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे रोटेरिअन विश्राम परांजपे ह्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १६ जानेवारी - महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारे सोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.

भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.

देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम "निवडणूक सिद्धता" म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे १८ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' ठाणे शहरात आपल्या दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन करत आहे. हे अत्याधुनिक नेत्ररुग्णालय १८ जानेवारी २०२६ रोजी ठाणे पश्चिम येथे सुरू होत आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून, मा. श्री. नरेश म्हस्के हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाणे व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित आहे.
पांचपाखाडी, भक्ती मंदिर रोड येथे सुरू होणाऱ्या या नव्या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा तसेच लेझर उपचार यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सन १९७२ साली सुरू झालेल्या अनिल आय हॉस्पिटलने आज डोंबिवली (पूर्व व पश्चिम), ठाणे, कल्याण, पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार केला असून, हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

याबाबत बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांनी दिलेल्या प्रेम व विश्वासामुळेच आम्ही ठाणे शहरात दुसरे रुग्णालय सुरू करत आहोत. दर्जेदार, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.” ठाणे शहरातील नागरिकांसाठी हे नवीन रुग्णालय नेत्रसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाची उपलब्धी ठरणार आहे.
कार्यक्रम तपशील
📅 दिनांक: १८ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी २
📍 पत्ता: अनिल आय हॉस्पिटल,
दुसरा मजला, भक्ती मंदिर रोड,
पंचपाखाडी, नेक्सा शोरूमच्या वर, ठाणे (पश्चिम)
संपर्क: ९९२५२३५९६९