BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिव्यातील 'रोटरी क्लब'तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : 'रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे' यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काल सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिव्यातील हनुमान मंदिर, दातिवली गाव येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण २५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष, किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख, आदित्य पाटील आणि सचिव स्वप्नील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व सहकार्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मागासवर्गीयांच्या अंत्यसंस्कारात आडकाठी आणणाऱ्यांची आता खैर नाही; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर सरकारचे कडक कारवाईचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पुरोगामी राज्य आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आजही ग्रामीण भागात मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब आपल्या लोकशाहीसाठी आणि माणुसकीसाठी अत्यंत क्लेशदायक आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार श्री. अमित गोरखे यांनी विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास होणारा विरोध हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी म्हटलं आहे. 
तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधले

पुरोगामी महाराष्ट्रात मरणानंतरही सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही लोकशाहीसाठी क्लेशदायक बाब असून, अशा घटना घडल्यास संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस पाटलांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास होणाऱ्या विरोधाबाबत आमदार गोरखे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी प्रशासकीय अनास्था आणि सामाजिक विषमतेवर प्रखर प्रहार केला.

संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली

तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या राज्यात आजही अनेक गावांमध्ये मागासवर्गीयांना सार्वजनिक स्मशानभूमीत प्रवेश नाकारला जातो. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून किंवा नदीपात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. हे रोखण्यासाठी 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना अजामीनपात्र अटक झालीच पाहिजे. 

आमदार गोरखे यांची भूमिका :

१. प्रशासकीय जबाबदारी व निलंबन: ज्या गावांमध्ये स्मशानभूमीअभावी प्रेताची विटंबना होईल किंवा अंत्यसंस्कार रोखले जातील, त्या भागातील तहसीलदार, सरपंच, पोलीस पाटील आणि गटविकास अधिकारी (BDO) यांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर 'कर्तव्यात कसूर' केल्याप्रकरणी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.

२. अजामीनपात्र गुन्हे: अंत्यसंस्काराला विरोध करणे हा केवळ सामाजिक वाद नसून तो अमानवीय अत्याचार आहे. अशा घटनांत सहभागी असणाऱ्यांवर 'ॲट्रॉसिटी' (SC-ST Act) अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अजामीनपात्र अटक करण्यात यावी.

३. राज्यस्तरीय हेल्पलाइन व टास्क फोर्स: अशा संवेदनशील घटनांची तक्रार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र 'राज्यस्तरीय हेल्पलाइन' सुरू करावी. तक्रार प्राप्त होताच पुढील २ तासांच्या आत पोलीस संरक्षण देऊन अंत्यविधी सन्मानाने पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात यावी.

सामाजिक न्याय मंत्र्यांचे उत्तर :

आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, जिथे मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी नाही, तिथे गायरान जमिनीतून स्मशानभूमीसाठी जागा देण्याचा सरकारचा प्राधान्याने प्रयत्न राहील. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून आवश्यक निधी दिला जाईल. जे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यामध्ये अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीबाबतही तसे निर्बंध घातले जातील. या चर्चेत आमदार अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी देखील सहभाग नोंदवून या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. सरकारकडे मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आमदार अमित गोरखे यांनी मांडलेली ही परखड भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि मरणानंतर सन्मानाने निरोप घेण्याचा अधिकार दिला आहे. ग्रामीण भागात आजही मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीला होणारा विरोध हा अमानवीय अत्याचार आहे. ज्या गावात अंत्यसंस्कार रोखले जातील, तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे, ही माझी ठाम मागणी आहे. मरणोत्तर विटंबना थांबवण्यासाठी आणि दोषींना अजामीनपात्र कोठडी मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच आहे asebआमदार अमित गोरखे म्हणाले.

कल्याण लोकसभा खासदार आणि कडोंमपा महापौर यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात गुरुवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. याचसमवेत नेत्रदीपक अशी आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी यांनी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थीत होते.

दिव्यातील साबे गावामध्ये सीलबंद पाण्याच्या जारमध्ये साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. ५ मार्च :- दिव्यातील साबेगाव परिसरात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या सीलबंद पाण्याच्या जारमध्ये चक्क साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साबेगाव परिसरातील एका कुटुंबाने घरगुती वापरासाठी २० लिटरचा सीलबंद पाण्याचा जार विकत घेतला होता. जार पारदर्शक असल्यामुळे वापरण्यापूर्वी तो पाहताना त्यामध्ये साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दिवा परिसरात वर्षभर पाणीटंचाई असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर २० लिटरच्या जारमधील ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘आरओ (RO) वॉटर’वर अवलंबून असतात. मात्र या घटनेमुळे स्थानिक पाणी शुद्धीकरण केंद्रांच्या (RO प्लांट) स्वच्छतेबाबत आणि त्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीलबंद जारमध्ये साप कसा गेला ?याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणी बिनपरवानगी आणि नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये जारच्या आत साप स्पष्टपणे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचे जार वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरपोच येणारे जार स्वीकारण्यापूर्वी ते स्वच्छ आहेत का, त्यामध्ये कोणताही कचरा किंवा जीवजंतू नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच जार पारदर्शक असल्यामुळे तो उजेडात तपासून मगच सील उघडावे, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेता शक्य असल्यास पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिवा आणि आसपासच्या परिसरातील सर्व पाणी शुद्धीकरण केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.०३ मार्च - दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय 'प्रभास कराटे स्पोर्ट एकॅडमी' यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेसाठी विविध शहरांमधून अनेक संघ आणि स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि दिवा शहराच्या नावलौकिकात भर घातली. विजेत्या स्पर्धकांना गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ पदके तसेच विविध सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १ ते ५ क्रमांकाच्या संघांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक विजेते संघ:
 प्रथम पारितोषिक – चंचल स्पोर्ट्स, नाशिक (आनंद रोकडे सर), द्वितीय पारितोषिक – प्रभास कराटे स्पोर्ट्स एकॅडमी, दिवा (प्रशांत कसबे सर, भारती कसबे मॅडम), तृतीय पारितोषिक – वॉरिअर स्पोर्ट कराटे असोसिएशन, गवंडी (प्रदीप ओव्हाळ सर), चतुर्थ पारितोषिक – थापा सर यांचा संघ, पंचम पारितोषिक – उमा मॅडम, टिटवाळा यांचा संघ

स्पर्धेचे पंच म्हणून युनायटेड मार्शल आर्ट एकॅडमी इंडियाचे ग्रँडमास्टर रवींद्र केणी सर (सायन), ना. सी. मुलानी सर (ठाणे) आणि कोरी सर (कल्याण) यांनी कुशल नेतृत्व करत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. आयोजन व नियोजनात दिवा शहरातील समाजसेवक प्रविण उतेकर, आकाश विचारे, आयु. जयसिंग कांबळे, सतीश निकम, आयु. विश्वास भालेराव, विशाल मन्ना डे, संगीता उतेकर, पार्वती आनंदा कसबे, मनीषा सुरेश लांडगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धांचे आयोजन करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे दिवा शहरातील भावी पिढी सक्षम, आत्मविश्वासू आणि शिस्तबद्ध बनवणे हेच असल्याचे प्रशांत कसबे व भारती कसबे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे दिवा शहरात क्रीडा क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्व असलेले 'आट्या पाट्या' खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर ; नवीन पिढी खेळापासून दूर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उरण - होळी जवळ आली कि सर्वांना आठवण होते ती आट्या पाट्या खेळाची. प्राचीन काळापासून चालत आलेल्या व भारतीय परंपरेतील आट्या पाट्या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र सध्याच्या २१व्या युगातील जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात हा खेळ मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यात पूर्वी मोठया उत्साहात व आनंदाने खेळल्या जाणारे सण आता उरण मध्ये एक दोन ठिकाणे सोडली तर कुठेही खेळले जात नाही. पूर्वी उरण तालुक्यात हा खेळ होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून जिथे होळी पेटवली जाते त्या ठिकाणी खेळला जात होता. आता मात्र नवीन पिढीला हा खेळ माहित नसल्याने तसेच मैदानी खेळापासून आजची लहान मुले हळूहळू दूर जात असल्याने सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या खेळाला राजाश्रय होता म्हणून हा खेळ टिकून राहिला. आता मात्र या खेळाला शासकीय अनुदान व सहकार्यावर अवलंबून राहावे लागते.भारतीय संस्कृतीतील या खेळाला नव संजीवनी प्राप्त करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात या खेळाचे सर्वत्र आयोजन केल्यास, जनजागृती केल्यास निश्चितच या खेळाला चांगले दिवस येतील.
उरण शहरामध्ये 'श्री शीतळा देवी मंदिर', देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्या पाट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. पूर्वी होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा. आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो. आट्यापाट्या हा महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये (किलिथट्टू नावाने) लोकप्रिय असलेला, शारीरिक चपळाई व धोरणात्मक कौशल्याचा प्राचीन भारतीय मैदानी खेळ आहे. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात, एका संघाला सूरपाटी व इतर नऊ आडव्या पाट्यांतून (गाळ्यांतून) बचाव करत, प्रतिस्पर्ध्यांच्या अडथळ्यांना हुलकावणी देऊन शेवटच्या लोणपाटीपर्यंत पोहोचायचे असते.
आट्यापाट्या खेळाची सविस्तर माहिती :

मैदान आणि रचना:-  
हा खेळ सपाट मैदानात खेळला जातो. शहरात मैदानात हा खेळ खेळला जातो. यात मध्यभागी एक लांब रेषा (मृदंगपाटी किंवा सूरपाटी) असते आणि तिला छेदून ९ आडव्या पाट्या (कप्पे) असतात. खेळाच्या सुरुवातीच्या पाटीला 'चांभारपाटी' तर शेवटच्या पाटीला 'लोणपाटी' म्हणतात. 

खेळाडू आणि संघ:- 
प्रत्येक संघात साधारणपणे ९ खेळाडू असतात. खेळामध्ये दोन संघ असतात. एक 'पाटी धरणारा' (Defending) आणि दुसरा 'खेळणारा' (Attacking)   असे दोन संघ असतात. एक संघ बचावाच्या भूमिकेत तर दुसरा संघ आक्रमणाच्या भूमिकेत असतो.

खेळाचे नियम आणि उद्देश:- 
बचाव (Defending) भूमिकेत असलेले  खेळाडू फक्त उभ्या रेषेवर (सूरपाटी) पाय ठेवून दोन्ही बाजूंना उड्या मारून किंवा धावून अटॅकिंग खेळाडूंना आडव्या पाट्या ओलांडण्यापासून रोखतात.
आक्रमण (Attacking) च्या भूमिकेत असणारे, खेळणारे खेळाडू हुलकावणी देऊन, वेगाने धावत एक-एक पाटी पार करून लोणपाटीपर्यंत जातात. एक एक चौकोन पार करत पुढे जातात व शेवटी आपले उद्दिष्टे साध्य करतात.

बाद (Out):-  जर पाटी धरणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्या खेळाडूला स्पर्श (Touch) केला, तर तो खेळाडू बाद होतो. त्यामुळे अत्यंत एकाग्रतेने हा खेळ खेळला जातो.

गुण:-  जो खेळाडू नऊही पाट्या पार करून लोणपाटीपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा सुरक्षित माघारी फिरतो, त्या संघाला गुण मिळतात.

फायदे:-  या खेळामुळे मुलांमध्ये चपळता, वेग, निर्णयक्षमता आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या खेळामुळे शरीराचा विशिष्ट व्यायाम तर होतोच शिवाय एकाग्रता सुद्धा वाढीस लागते. मनोरंजन आणि व्यायामाव्यतिरिक्त, हा खेळ वैयक्तिक वेगवानपणा आणि सामूहिक संघ कामगिरीचे उत्तम संयोजन आहे.

इतिहास:-  हा खेळ अत्यंत प्राचीन असून महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित आहे. हा खेळ मुख्यत्वे भारतातील काही ग्रामीण भागात, विशेषतः होळी किंवा इतर सणांच्या वेळी अत्यंत उत्साहाने खेळला जातो. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला, आट्या-पाट्या हा एक प्राचीन क्रीडा खेळ आहे ज्यामध्ये गुंतागुंतीचे नियम आहेत. तामिळनाडूमधील किलिथट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रदेशातून उगम पावलेला हा खेळ बऱ्याच काळापासून धोरणात्मक विचारसरणी आणि शारीरिक चपळतेची चाचणी म्हणून ओळखला जातो. हा खेळ राष्ट्रीय व्यासपीठावर तामिळ ओळख वाढवतो. महाराष्ट्रात आट्या पट्या म्हणून हा खेळ ओळखला जातो. महाराष्ट्रात हा खेळ पूर्वी 'भांडणाचा खेळ' म्हणून प्रसिद्ध होता. प्रत्येक राज्यात व देशात या खेळाला वेगवेगळे नाव आहेत. गुजरात राज्यात आटा पाता, खरो पाट, लुणी पाट, तामिळनाडू मध्ये किलीथट्टू, धटूतुकडा, उप्पू कोडू, उप्पू पटाई, बंगाल मध्ये डोरिया बांध, महाराष्ट्र मध्ये सुरपट्या, आत्या पत्या, आट्या पाट्या, सारगरी, सरमणी, पंजाब मध्ये लोणापती, सुरपती चिक्का, यूरोप मध्ये ढोंगाचा खेळ, अतिरेक्यांचा पाठलाग या नावाने हा खेळ परिचित आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे गौरवास्पद सादरीकरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - "माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll" संत ज्ञानेश्वर पासून ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अलौकिक दर्जा प्राप्त करून ती समृद्ध केली  आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थांतर्गत 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या गौरवात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथ हेच आपले गुरू आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वागत गीत गाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मराठी शिक्षिकांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी गाऊन त्याचा अर्थ देखील सांगितला. आजच्या दिवशी सर्व मुले मुली हे साहित्यिक, कवयित्री च्या वेशभूषेमधे आली होती. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मराठी शिक्षिका सौ. मानसी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सांग सांग भोलानाथ' हे बालगीत सादर केले तर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारुड सादर केले. तर दुपारच्या सत्रात सौ.वर्षा पवार, सौ.स्वाती सोनवणे या मराठी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी  मराठी नाटक, नृत्य, गायन सादर केले. कविता वाचन ,  मराठी म्हणी यांची जणू आज मेजवानीच होती. नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व नितेश मेस्त्री यांनी देखील विद्यार्थांना दिग्दर्शन केले.
   
मराठी भाषा ही मराठी माणसाचा आत्मा आहे. आजच्या स्पर्धायुक्त जगात माणूस नाविन्याचा ध्यास घेत पुढे जाण्याच्या शोधात आहे तर एआय (AI) सारख्या अत्याधुनिक प्रणीलाचा वापर करून टीकून राहण्याचा प्रयत्न करतो आहे, असे जरी सर्व असले तरी मराठी माणूस शेवटी मराठी विचारामधूनच आपल्या  बुद्धिमत्तेला वाव देतो, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. "आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहाराचा निघाला" शेवटी आहे काय अन् नाही काय.. ही स्वरचित कविता संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी वाचून दाखवून त्याचा अर्थ देखील सांगितला.

ज्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे अशा सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे ह्या   दरवेळीच नवनवीन मराठी काव्य लिखाण करीत असतात आजच्या दिवशी देखील त्यांनी  स्वरचित काव्य पंक्तींचे वाचन करून कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली अर्पण केली. प्रत्येक मैलावर मराठी भाषेची उच्चार पद्धती म्हणजेच भाषेचा लहेजा बदलत जातो, असे असले तरी आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या भावनांचा अर्थ हा एकच असतो जो आपल्या हृदयापर्यंत भिडतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला रसाळ वाणी संबोधून अमृतापेक्षाही गोड आहे असे १५ व्या शतकातच लिहून ठेवले आहे. असेही सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने मराठी अभिमान गीत गाऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा केला तर विद्यार्थ्यांनी शुद्ध मराठी भाषेतून सूत्रसंचलन केले. संगीत शिक्षका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमांची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाची सजावट श्री.नरेश पिसाट यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिवा शहरातील आगासन येथे उभारला जाणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असून, दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी देखील पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पुतळा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामासाठीची २ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली आहे. यामुळे येत्या १ मे रोजी आगासन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक वारसा, संवर्धन अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मतदारसंघातील प्राचीन मंदिर परिसरांचा विकास करण्यासमवेतच महापुरुषांचा सन्मान राखत त्यांची स्मारके देखील मतदारसंघात उभारण्यात येत आहे. याच पद्धतीने खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे ही मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दिवा शहरात ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांकडून केली जात होती. तर यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. यासर्वांच्या मागणीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या राज्याच्या नगरविकास विभागाकडे पुतळा उभारणीसाठीच्या निधीची मागणी केली. या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर आता राज्याच्या नगरविकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. येत्या १ मे रोजी आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सांस्कृतिक अभिमानाच्या प्रतिका समवेतच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश देणारा ठरेल. तर आगासन रोड परिसरातील या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिवा शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पांसाठी निधी मिळवून दिला असून, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे.

डोंबिवली-ठाणे बस सेवेला हिरवा कंदील; नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना, नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन महानगरपालिका (केडीएमसी) विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर दि. ४ मार्च २०२६ पासून डोंबिवली मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे डोंबिवलीकरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यायी प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार असून लोकल रेल्वेवरील ताण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. 

नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासनाला याची तातडीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, डोंबिवलीचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी देखील या विषयात सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. ही सेवा पुढील काळात नियमित स्वरूपात सुरू ठेवण्यासाठी आणि अधिक बस फेऱ्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

महापालिकेचा क्रीडा उपक्रम यशस्वी राबवत कल्याण-डोंबिवलीमध्ये दिव्यांग क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत दिव्यांग खेळाडूंचा गौरव करत दिव्यांग मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांचे पालकांनी त्यांना सर्व स्पर्धांसाठी संधी द्यावी असे प्रतिपादन महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत स्व. नाना फडके मैदान कल्याण (पश्चिम) येथे समाज कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटनासमयी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. स्पर्धेत सहभागी खेळाडुंचे कौतुक करताना माझ्यासाठी कोणी दिव्यांग नाही तर सर्वजण सर्वसामान्य आणि सक्षम  नागरिक आहेत असे सांगत त्यांनी दिव्यांग बांधवांचा गौरव केला. 

या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापालिका सचिव किशोर शेळके, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच पालिका सदस्य, सदस्या व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्यांगाना सक्षम बनविण्याचा आपला प्रयत्न असून क्रिडा स्पर्धा ही देखील एक ट्रीटमेंट थेरेपी आहे, यासाठी पालकांनी मुलांना विविध ऍक्टीव्हिटीमध्ये घालावे. महापालिका अशा उपक्रमांमधून दिव्यांग व्यक्तींना नक्कीच प्रोत्साहन देत राहील असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपले मनोगतात काढले. 
स्व.नाना फडके मैदानात आज दिव्यांग बांधवांसाठी कॅरम, गोळाफेक, बुध्दीबळ, व्हिलचेअर रेसिंग, नेमबाजी, १०० मीटर धावणे (कर्णबधिर आणि मुकबधिर व्यक्तींसाठी), बादलीत चेंडू टाकणे (गतीमंद व्यक्तीसांठी), इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धांमध्ये दिव्यांग बांधवांनी मोठया प्रमाणत सहभाग नोंदवून आपल्या कौशल्य व जिद्दीचे दर्शन घडविले. या स्पर्धांच्या आयोजनामुळे दिव्यांग बांधवामध्ये आत्मविश्वास वाढून समाजामध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मजदूर संघटनेच्या माध्यमातून नाका कामगारांना 'सुरक्षा संच' (सेफ्टी किट) चे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील लेवा भवन सभागृहात नाका कामगारांना शासन योजनेंतर्गत गृहोपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच, सुरक्षा संच (सेफ्टी कीट) ज्या कामगार कार्यालयात ऑनलाईन नोंदणी झालेल्या आहेत, त्या कामगारांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, प्रसिद्ध कलाकार अक्षदा दास, समाजसेवक समीर जगे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, रिपाइंचे माणिक उघडे, मीना साळवे, समाधान तायडे, दिलखुश माळी, शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव, रेश्मा चिकटे, संघटनेचे सहखजिनदार रामचंद्र वाघ, संघटनेचे केंद्रीय कमिटी सदस्य रामेश्वर शेजूळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोंदणीकृत नाका कामगारांना गृहउपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच देण्यात येते. परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे म्हणाले की, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नेहमीच नाका कामगारांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. संघटनेच्या प्रयत्नात यश येत असून आजवर अनेक नाका कामगारांना याचा लाभ मिळाला आहे.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 'इंडोनेशिया' शिष्टमंडळाचे नेतृत्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळा-मधीला सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवि-ण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप मध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून इंडोनेशिया दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ते करणार आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगातील पातळीवर मांडत होते. या मोहिमेत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत युएई, सिएरा लियोन, लायबेरिया आणि डी आर काँगो या देशांना भेट देत भारताची ठाम भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या संयमी, अभ्यासू आणि ठाम मांडणीमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी मिळाल्याचे मानले गेले. यापूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि वाहतूक प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टीव्ही वाढविणे, मेट्रो व रेल्वे प्रकल्पांना गती देणे, तसेच मतदारसंघातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.

युवा खासदार म्हणून संसदेतील सक्रिय उपस्थिती, विकासाभिमुख भूमिका आणि आंतरराष्ट्रीय विषयावरील अभ्यासू मांडणी यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 'पार्लेमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'च्या माध्यमातून भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हून अधिक देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री यांना थेट निवेदन देत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

आरोग्य सेवांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले असून, पालिकेच्या रुग्णालयांत सर्दी-खोकल्यापलीकडे उपचार मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच पालिका शाळांचा दर्जा घसरल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, गटारांची दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काही कर्मचारी गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे, तर राजकीय पाठबळ असलेले कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे आयुक्तांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, केडीएमसीमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक प्रतिमेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लक्ष्मण हजारे, दिलीप मगर या नागरिकांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.

'युजीसी' (UGC) कडून बनावट विद्यापीठांची यादी जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एआय (AI) परिषदेत नोएडातील गलगोटीया या खाजगी विद्यापीठाने चीनी बनावटीचा रोबो कुत्रा आपणच तयार केल्याची मल्लीनाथी केल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यापीठाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी जगभर यामुळे भारताची बदनामी झाली आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक चिंतीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युजीसी (UGC) कडून देशभरातील बनावट विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे. युजीसी (UGC) देशातील १२ राज्यांमध्ये पसरलेल्या ३२ बनावट विद्यापीठांची ओळख पटवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या २ वर्षांत अशा अनधिकृत संस्थांची संख्या २० वरून थेट ३२ वर पोहोचली आहे. या संस्थांना पदवी देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रवेशाचा हंगाम जवळ येत असल्याने, विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यापीठात नाव नोंदवण्यापूर्वी 'यूजीसी' (UGC) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या संस्थेची मान्यता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकट्या दिल्लीत १२ बनावट विद्यापीठे सुरू आहेत. यामध्ये ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍण्ड फिजिकल हेल्थ सायन्सेस’, ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’ आणि ‘विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी’ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील काही संस्था तर सरकारी नियामक कार्यालयांच्या अगदी जवळ कार्यरत आहेत.

यूजीसी (UGC) ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही अनेक बोगस संस्था सक्रिय आहेत. यामध्ये प्रयागचे ‘गांधी हिंदी विद्यापीठ’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ यांचा समावेश आहे. या यादीत आता हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचीही भर पडली आहे. महाराष्ट्रातही काही संस्थांना बोगस घोषित करण्यात आले असून कर्नाटकच्या बेंगळुरूमधील ‘ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी’ बाबत विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ढोल ताशांच्या गजरात रंगला शिवजयंती उत्सव सोहळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) -  'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' अशा घोषवाक्याने अंगातील रक्त सळसळते तीच तरुणाई म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा मराठी माणूस. दिनांक १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी मिळालेले एक सोनेरी पान आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये देखील वन्दे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे, नगरसेवक विश्वनाथ राणे, पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी कार्यकर्ते यांनी पालखी मधून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पालखी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच आरती ओवाळून व फुलांचा वर्षाव करत 'जे एम एफ' मंडपम मध्ये विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या नादात पालखीचे आगमन केले. 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषात सारा आसमंत दुमदुमून गेला. 'जे एम एफ' संस्थेची आठ मजली इमारत एखाद्या किल्ल्याप्रमाणे सजवली होती.
सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मराठमोळा वेष परिधान करून आले होते त्यामुळे 'जे एम एफ' च्या आवराला  खरोखरच शिवनेरी किल्ल्याचे स्वरूप आले होते. शिवाजी महाराजांची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून "झुलवा पाळणा" गाणे म्हणत सर्वांनी पाळणा झुलवला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा बाणा आहे, 'शिवाजी जन्मावा, पण दुसऱ्याच्या घरात'..अशी म्हण आहे पण प्रत्येक आईला वाटत असते आपला मुलगा शिवबा असावा, जिजाबाईने शिवबा ला शिवाजी केले आणि त्यांच्या पराक्रमाने मावळ्यांनी शिवाजीला शिवाजी महाराज केले, शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करून आहेत पण केवळ मनात असून चालणार नाही तर ते आचरणात आणणे देखील महत्त्वाचे आहे, त्यांच्या सारखे कामाप्रती एकनिष्ठ, न्यायप्रिय, आदरणीय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  समर्थ रामदास स्वामींनी 'निश्चयाचा महामेरू,l बहुत जनांसी आधारु'lअखंड स्थितीचा निर्धारू,l श्रीमंत योगी lअशी त्यांना उपाधी दिली गेली आहे तसेच आपण देखील  त्यांच्या सारखीच निश्चयाने, निर्णयाने वागणूक ठेवा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित तरुणाईला सांगितले.
जिजाबाई होत्या म्हणून आज शिवाजी घडला, दादोजी कोंडदेव सारखे गुरु त्यांना लाभले तर जीवास जीव देणारे सखा मित्र मावळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले, आणि इतिहास घडला. त्यांच्या सारखेच तुम्ही देखील संकटांना सामोरे जाण्याचे साहस दाखवा आणि तुमचा इतिहास घडवा असे  सांगून संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी तरुणाईला प्रेरित केले.
   गेले एक महिन्यापासून शिवजयंतीच्या तयारीला झटलेले वैभव मंडल, पराग सुतार, यश बडेकर, साहिल सिंग, साई कुडतडकर, किमया म्हात्रे, वेदिका राजदेव, सार्थक गवळी, वैभव पाचकर , शुभम शिंदे, राकेश प्रधान, सूर्यावसंथरा, मयांक कोठारी, तन्वी गुरव, निधी अमीन, तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय असे शेकडो व नामनिर्देशित केलेल्या  या सर्व होतकरू विद्यार्थांनी मनापासून शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची तयारी करून मोठ्या उत्साहात आणि शिवगर्जनेत शिवजयंती साजरी केली.

मायभूमी ग्राम विकास संस्थेमार्फत शिवणे येथे वॉलनट स्कूल चे सुरक्षित-असुरक्षित स्पर्श जनजागृती सत्र..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवणे - 'मायभूमी ग्राम विकास संस्था' यांच्या पुढाकारातून वॉलनट स्कूलच्या सहकार्याने शिवणे येथे इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांसाठी “सुरक्षित व असुरक्षित स्पर्श” या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. बालसुरक्षेबाबत लहान वयातच जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना स्वसंरक्षणाची मूलभूत कौशल्ये देणे हा मायभूमी ग्राम विकास संस्थेचा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.

या सत्राचे मार्गदर्शन मायभूमी ग्राम विकास संस्थेचे उपाध्यक्ष, प्रशिक्षक व बालहक्क कार्यकर्ते श्री. प्रमोद पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा करत “माझे शरीर माझे आहे” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश प्रभावीपणे दिला. शरीरातील खाजगी अवयव कोणते, त्यांना कोणालाही स्पर्श करू द्यायचा नाही आणि आपणही कोणाच्या खाजगी अवयवाला स्पर्श करायचा नाही, हे त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट केले. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श आणि गोंधळात टाकणारा स्पर्श यातील फरक उदाहरणांसह समजावून सांगत मुलांना संभाव्य धोक्यांविषयी सजग राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांना अस्वस्थ किंवा धोकादायक परिस्थितीत “NO” म्हणणे, त्वरित त्या ठिकाणाहून दूर जाणे "GO" आणि विश्वासातील मोठ्या व्यक्तीला सांगणे "TELL" या तीन महत्त्वपूर्ण कृतींबाबत माहिती देण्यात आली. तसेच “सुरक्षित वर्तुळ” या संकल्पनेद्वारे मुलांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तींची ओळख करून देत मदत कशी घ्यायची याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मायभूमी ग्राम विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये बाललैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटनांविषयी आवश्यक जागरूकता निर्माण होत असून, सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श ओळखण्याची क्षमता वाढत आहे. या सत्रानंतर मुले घरी पालकांशी संवाद साधतील, ज्यामुळे पालकांनाही या विषयाचे गांभीर्य समजून कुटुंब पातळीवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास चालना मिळेल. मुलं आणि पालक दोघांमध्येही विश्वास, संवाद आणि सजगता वाढवणे हे मायभूमी ग्राम विकास संस्थेचे मुख्य ध्येय आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष अस्मिता रेपे,  उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव संतोष रेपे, सदस्य अंकुश रेपे व काजल पाटील काम करत आहेत.

या सत्राला शाळेचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. मुख्याध्यापिका राजश्री व्यंकटेश, मुख्य प्रशासक श्वेता मोहोळ, उपमुख्याध्यापिका अमृता दशपूत्रे व शिक्षकवर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृती कार्यक्रमांसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सत्र अधिक प्रभावी बनवले.

मायभूमी ग्राम विकास संस्था भविष्यातही बालसुरक्षा, बालहक्क आणि कुटुंब सक्षमीकरण या विषयांवर सातत्याने कार्य करत राहणार असून समाजात सुरक्षित आणि सशक्त बालपण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू; अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २० फेब्रुवारी – दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय: ३७ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपअभियंता दीपक पांडे (३०) आणि ठेकेदार राहुल पांचाळ (३३) या दोघांविरोधात मृताचे बंधू भंवरलाल रावल याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकाच्या होम फलाट वरील तिकीट काऊंटर बाहेरील भागात २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.१० च्या सुमारास अर्थिंगसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना खंगाराम रावल यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे राहणारे खंगाराम हे खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.

खंगाराम यांच्या मृत्यूप्रकरणी दीपक पांडे आणि राहुल पांचाळ या दोघांनी खंगाराम यांना कोणतेही सेफ्टी उपकरण न पुरविल्यामुळे हयगय व निष्काळजीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे.

मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रयत्नांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदार संघाला मुंबई आणि नवी मुंबई या शहरांशी जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेे यांच्या प्रयत्नांना आता आणखी एक यश आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ऐतिहासीक प्रकल्पाची घोषणा केली आहे.

 कल्याण-डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. कल्याण फाटावरून ही मेट्रो दहीसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६- २७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घेतला.

यावेळी त्यांनी पलावा . उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गा पर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, काटई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका

ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण – मानपाडा – काटई नाका – कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन-१२-9शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे.

निळजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे– बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे. 

मेट्रो १२ अ ची स्थानके

या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे. प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव.

संरचनात्मक संकल्पना

या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे. मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण– राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (इंटिग्रेटड सिंगल पायर) संकल्पना वापरली जाणार आहे.(फ्लायओव्हरचा सुपर- स्ट्रक्चर वगळून).

कल्याणफाटा ते राजनोली दरम्यान डबल डेकर उड्डाणपूल

कल्याण शीळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा (शिळफाटा) ते भिवंडीजवळी आग्रा महामार्गावरील राजनोली पर्यंतचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ठिकाणी डबर डेकर उन्नत मार्ग उभारणीसाठी एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. या चार पदरी डबल डेकर उन्नत मार्गावरून एकाच वेळी मेट्रो आणि रस्ते वाहतूक होणार आहे. कोणत्याही कोंडीशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागातले वर्दळीचे चौक टाळून या मार्गाने शिळफाटा ते थेट भिवंडी असा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ५ हजार ९०९.२१ कोटी इतका असून त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या उन्नत मार्गाची एकूण लांबी १९.४० किलोमीटर इतकी आहे. याची सुरूवात कल्याणफाटा (शिळफाटा जंक्शन) पासून होऊन कटई नाका, पत्री पूल, गोविंदवाडी बायपास मार्गे भिवंडीतील राजनोली जंक्शन येथे समाप्ती होईल. 

मेट्रो इंटीग्रेशन

या मार्गाचा समावेश ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५, कल्याण - तळोजा मेट्रो मार्ग १२ या दोघांशी होईल. तसेच कल्याण - तळोजा मेट्रो १२ अ या विस्तारीत मार्ग आणि कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ या प्रस्तावीत मेट्रो मार्गांशीही याचे समन्वय केले जाणार आहे. 

कसा असेल उन्नत मार्ग

या उन्नत मार्गामध्ये पहिल्या स्तरावर वाहनांसाठी रस्ता असणार आहे. तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गावर ८ ठिकाणी प्रवेश (इंट्री) आणि निर्गमन (एक्झिट) रस्ते (रॅम्प) प्रस्तावित आहेत. या मार्गात २ रेल्वे उड्डाणपूल (पलावा - दिवा पनवेल आणि पत्री पूल क्रॉसिंग) तसेच २ प्रमुख पूल, देसाई खाडी आणि उल्हास नदी (दुर्गाडी परिसर) प्रस्तावित आहेत.

शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार होणार बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण मोफत उपचारांची योजना अवघ्या अडीच वर्षांत मागे घेण्यात आली असून आरोग्य विभागाने उपचारांसाठी नवीन शुल्कदर लागू केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ओपीडी तपासणीपासून विविध तपासण्या, शस्त्रक्रिया, आयसीयू, डायलिसिस, रुग्णवाहिका आदी सेवांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. मात्र ही शुल्कवाढ फार नसून अगदी नाममात्र आणि सर्वांना परवडणारीच असल्याचे नवीन शुल्कांवरून दिसून येत आहे.

* नवीन निर्णयानुसार ओपीडी केसपेपर नोंदणीसाठी ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
* रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी दररोज १० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
* शहरी भागात ओपीडीसाठी १० रुपये शुल्क पूर्वीपासून असले तरी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी सेवा मोफत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

तपासण्यांच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. एमआरआय स्कॅनसाठी १६०० रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे दर १२०० रुपये होते. डोक्याच्या सीटी स्कॅनसाठी ३०० रुपये, तर मणका, मान आणि छातीच्या सीटी स्कॅनसाठी ४०० रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे. या तपासण्यांचे दर पूर्वी तुलनेने कमी होते. हिमोग्लोबिन, टीएलसी, डीएलसी, रक्तगट, लघवी तपासणीसह प्रत्येक रक्ततपासणीसाठी १५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
भूल देऊन करण्यात येणाऱ्या लहान व मोठ्या शस्त्रक्रियांसाठी ६० ते १६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी हे सर्व उपचार पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी पूर्णतः मोफत होते.

मात्र आता या सवलती कायम राहणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
* गंभीर रुग्णांसाठी आयसीयू सेवेसाठी दररोज १०० रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे शुल्क ५० रुपये होते.
प्रत्येक डायलिसिससाठी १५० रुपये शुल्क ठरवण्यात आले आहे.
* रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर ५ रुपये आकारले जाणार असून याआधी सरकारी रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध होती.
* प्रसूती सेवांबाबत पहिली प्रसूती मोफत राहणार आहे. मात्र दुसऱ्या प्रसूतीसाठी ५० रुपये आणि तिसऱ्या व पुढील प्रत्येक प्रसूतीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
* वातानुकूलित खोलीसाठी दररोज १५० रुपये, तर साधारण खोलीसाठी ७५ रुपये शुल्क असेल. मृतदेह एम्बाल्मिंगसाठी १५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ओपीडी व शस्त्रक्रिया मोफत असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिकारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कल्याण-डोंबिवलीत शिवजयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नवचर्चित महापालिका महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अति.आयुक्त हर्षल गायकवाड, अति.शहर अभियंता (विद्युत/यांत्रिकी) प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  महापौर हर्षाली विजय चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवलीतही राज्यगीताचे गायन करुन महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमहापौर राहुल दामले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या समयी उपस्थित उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर, भरत पवार, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या समयी महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्र.६८, धाकटे शहाड येथील शाळा क्र.३३ व उंबर्डे येथील शाळा क्र.१२ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.