BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

स्वातंत्र्य दिनी डोंबिवलीत फडकणार ३५ हजार चौरस फुटांचा विश्वविक्रमी तिरंगा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ, देशाच्या गौरवाचा झेंडा महाराष्ट्रात उंचावण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीत ऐतिहासिक आणि 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वीचा तिरंगा रॅलीचा विश्वविक्रम २१ हजार चौरस फुटांचा होता; मात्र यंदा कल्याण लोकसभेत ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा फडकवून आधीचा विक्रम मोडीत काढला जाणार आहे. त्याची विश्वविक्रम म्हणून अधिकृत नोंद होणार आहे. शनिवार, १५ ऑगस्टला सकाळी सात वाजता रॅली आयोजित केली आहे. रॅलीचा प्रारंभ ७:३० वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून होईल. समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ होणार आहे असे सांगण्यात आले.

भरती परिक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई दि १२ : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त सूचना या बैठकीत केल्या. 

वर्षा निवासस्थानी आज विशेषत्वाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत राहणार असून राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा त्यात समावेश असेल. या समितीने प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्याआधारावर राज्यासाठीचे समग्र धोरण ठरेल.

अलिकडेच केंद्र सरकारने पेपरफूट आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत एक कायदा केला आहे. महाराष्ट्राचाही स्वतंत्र कायदा आहेच. तथापि संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणार्‍या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरुम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. या विविध परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही समन्वय भूमिका, इतर विविध देशांमधील परीक्षा पद्धती, विद्यमान प्रक्रिया आणि त्यातील विविध संभाव्य सुधारणा अशा अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्था व ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत परिसंवादाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 कोपर - डोंबिवलीतील कोपर येथील 'जे एम एफ' शिक्षण संस्था व ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात हिरोशिमा अणूबाँब मृत्यूमुखी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. भारताची युवा पिढी ही भारताचे उज्वल भविष्य आहे आणि म्हणूनच या युवा पिढीला सामाजिक आणि वैयक्तिक काही बंधने आणि जबाबदाऱ्या देखील आहेत. म्हणुनच 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नशा मुक्त भारत या परिसंवादाचे आयोजन मधुबन वातानुकूलित दालनात आयोजित केले होते.
'नशा मुक्त भारत..एक पाऊल पुढे..'  ह्या नाजूक विषयाची हाताळणी करताना परिसंवादाचे वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अनेक उदाहरणे संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितले. आम्ल पदार्थ, दारूचे व्यसन ह्या समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टी जर समूळ नष्ट करायच्या असतील तर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा पिढीने एकत्रित येऊन शपथ घ्यायला हवी की आजचा आणि उद्याचा भारत हा नशा मुक्त भारत करूनच आपण दाखवू.
नशा म्हणजेच व्यसन. व्यसन हे शिकण्याचे असावे, वाचनाचे असावे, व्यक्तीने व्यासंग असावे परंतु व्यसनिक नसावे. व्यासंग तुम्हाला घडवतो तर व्यसन तुम्हाला रसातळाला नेतो, आणि हाच फरक ओळखून युवा पिढीने नशा करण्यापासून लांब रहावे ह्याचे उदाहरण देताना प्रसिद्ध सिने अभिनेता संजय दत्त, गायक हनी सिंग हे कधी काळी व्यसनाच्या आहारी गेले होते त्यातून त्यांना बाहेर पडताना भोगावा लागलेला त्रास आणि नशा मुक्त झाल्यावर कळलेला जीवनाचा अर्थ याचा सारासार विचार केला असता नशा मुक्त भारत घडविण्यासाठी कितीतरी गोष्टींना सामोरे जावे लागते असे सांगत वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या परिसंवादामध्ये नमूद केले की आताची पिढी ज्याला जेन झी म्हणून संबोधिले जाते त्याच पिढीने नशा मुक्त भारत घडवावा अशी अपेक्षा आहे.
🤔परिसंवादाच्या अखेरच्या टप्प्यात शाळा महाविद्यालयाच्या अनेक मुलांनी प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच शपत घेतली तर वंदे मातरम् महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत हा विषय घेऊन पथनाट्य सादर केले. परिसंवादाला शाळा महाविद्यालयाचे मिळून पाचशे विद्यार्थी हजर होते.

कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५ हजार कोटींची रक्कम जमा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
मुंबई : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आज योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून, ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे. एवढीच सहज आणि सोपी प्रक्रिया असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी अथवा प्रलंबित बाबी असतील, त्या संबंधित पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून द्यावे, त्या सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. विविध बँकांकडून सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला असून, ६ ऑगस्ट २०२६ अखेर १२.१० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याची माहिती सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती -

अमरावती विभागात १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १,३७२.१७ कोटींचा लाभ,

नाशिक विभाग - १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपये,

छत्रपती संभाजीनगर विभाग - १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांना ९३२.६१ कोटी रुपये,

पुणे विभाग - १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये,

नागपूर विभाग - ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये,

कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटीं रुपयांचा लाभ.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेत स्काऊट आणि गाईडचा एकदिवशीय माहिती वर्ग संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर - दिनांक २४ जुलै २०२६ शुक्रवार रोजी सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत 'जेएमएफ'चे जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज मधील ५०१ हॉलमध्ये स्काऊट आणि गाईड ठाणे जिल्ह्यातर्फे एकदिवशीय *माहिती वर्ग (बिगीनर्स कोर्स )* घेण्यात आला. त्याकरिता संस्थेच्या सचिव डॉ.सौ.प्रेरणा राजकुमार कोल्हे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
तसेच मार्गदर्शन करण्यासाठी ALT सुरेश लोहार सर, ठाणे जिल्हा संघटक-स्काऊट श्री.संदिप भुसिंगे सर, जिल्हा संघटक-गाईड सौ. हेमांगी पाटील मॅडम, डोंबिवली स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक जगताप सर, उपाध्यक्ष श्री.एकनाथ चौधरी सर, सचिव श्री.जगदीश उगले सर, माजी अध्यक्ष श्री. सुनिल भावसार सर, सल्लागार श्री.सूर्यवंशी सर तसेच विविध शाळा, कॉलेज मधून २५ ते ३० स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन उपस्थित होते.
 या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल सरांचे विशेष आभार मानण्यात आले.

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या ३८ वर्षांच्या निरंतर सेवेला नागरिकांचा सलाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली शहरात गेल्या ३८ वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची ३८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिक तसेच त्यांचे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी त्यांच्या उपस्थित मान्यवर व रुग्णांसमोर त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यालय प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री. प्रकाश माने यांनी  डॉ. ढाके यांच्या सेवाभावी वृत्ती, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता आणि कमी खर्चात दर्जेदार उपचार देण्याच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी श्री. प्रकाश माने यांनी सांगितले की, "वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रदीप ढाके." गेल्या ३८ वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना योग्य उपचार व आरोग्याविषयी मार्गदर्शन करून समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रदीप ढाके आणि कुटुंबीयांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि डॉक्टरांच्या मार्फत अशीच निरंतर समाजसेवा करण्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. 
या शुभप्रसंगी शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा समन्वयक तथा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री. विजय देशमुख साहेब, शिवसेनेच्या डोंबिवली शहर उपसंघटक सौ. प्रतीक्षा प्रकाश माने, टिळक नगर सुयोग गल्लीतील हरी मुकुंद सोसायटीचे पदाधिकारी श्री. महाजन साहेब, श्री. महापदी साहेब, डोंबिवलीतील ज्येष्ठ समाजसेविका माननीय श्रीमती मालती ताई साटम, कल्याण रोडवरील एकरूप सहकार मित्रमंडळाचे पदाधिकारी, तसेच डॉक्टर प्रदीप ढाके यांच्या आरोग्य विषयक कार्याला दिवस-रात्र हातभार लावणारे यामध्ये त्यांचा स्टाफ श्री. रघुनाथ कांबळे, सौ. प्रियांका गायकर, सौ. मनीषा गरुड, सौ. सोनल पिस्ते, दर्शन सोनावणे, नागेश पवार, पुनम जाधव तसेच उपचारासाठी व काही खास कार्यक्रमासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आनंदाने उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत अवतरली संताची मांदियाळी.. अवघी दुमदुमली पंढरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर -  देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, पंढरपूर मध्ये लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले असतानाच 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी,पालक उपस्थित राहून विठ्ठलाच्या नामघोषात दंग झाले.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांचे 'जे एम एफ' मंडपम मधे आगमन झाले, त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व बाल वारकरी विद्यार्थी एकत्र आले. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरती करण्यात आली. बाल वारकऱ्यांनी तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव, अशा अनेक संतांच्या वेशभूषा करून आलेले विद्यार्थी म्हणजे साक्षात संतांची मांदियाळीच अवतरली आहे असे भासत होते.
ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या हृदयात भक्ताचा वास आहे त्याच प्रमाणे आपल्या हृदयात देखील विठ्ठलाचा वास आहे पण त्यापेक्षाही माणुसकीचा ठेवा असणे अधिक गरजेचे आहे, आज लाखो वारकरी अनवाणी पायाने पंढरपूरला चालत जात आहेत त्यांची सेवा करणे किंवा "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.." असे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, त्याच भक्तीभावाने सेवा केली तर त्यांच्याच रूपाने विठ्ठल तुम्हाला तिथेच भेटणार आहे असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले तर अप्रतीम वेशभूषा करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या स्वतःलाच विसरून जात आहोत, म्हणून स्वतःला शोधण्यासाठी अध्यात्माचा मार्ग हा सुलभ आहे, ज्याप्रमाणे भक्त पुंडलिकाने स्वतःला स्वतःमध्ये शोधून त्याच्या भक्तीने पांडुरंगाला प्रसन्न करून घेतले तसे तुम्ही देखील अंतर्मनात असलेल्या प्रश्नांना अध्यात्माच्या आधारे सोडवून त्या परमात्म्याला जवळ करा आणि आनंदी रहा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी दशेत असलेले बालरूप हे निरागस रूप असते, म्हणुनच आज विठ्ठल रुक्मीणी, साधू संतांच्या वेशभूषा मधे आलेले हे विद्यार्थी म्हणजे साक्षात पांडुरंग रुक्मिणचे अंशच दिसत आहेत असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटले.

संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी  व विद्यार्थ्यांच्या तबल्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांनी अभंग सादर केला तर सर्व शिक्षकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावले थिरकली. दिंडी सोहळ्यामध्ये माऊलींची पालखी हे मोठे आकर्षण होते सर्वच जण उत्साहात ब्रह्मनादात सहभागी झाले होते. शिशु विहारच्या बालकांनी पांडुरंगाची गाणी गाऊन रिंगण सोहळा केला. " याची देही याची डोळा पाहिला माऊलींचा सोहळा ".. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भक्ती भावाने सेवा करून आषाढी एकादशीचा सोहळा पार पाडला तर नितेश मेस्त्री यांनी पांडुरंगाचे चित्र रेखाटन केले व नरेश पिसाट यांनी सजावट केली. अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सौ.मयुरी खोब्रागडे, यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे  फोटो व्हिडीओ काढण्याची ची जबाबदारी अखिल नायडू, जय लखारा, निखील शिंदे, तांडुलकर, त्यांच्या चमूने पार पाडली.

बेकायदा औषध विक्री दिसल्यास त्वरित तक्रार करा; एफडीए चा टोल-फ्री क्रमांक जाहीर..

प्रतनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात बेकायदा औषध विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू ठेवली आहे. विनापरवाना औषध व सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या १५ ठिकाणी छापे टाकून २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींप्रकरणी ८ ठिकाणी कारवाई करत २.२७ लाखांची औषधे जप्त करण्यात आली, तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांवरही मोठी कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा विक्रीची माहिती तात्काळ एफडीए च्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

केडीएमसीचा तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी भव्य ‘किन्नर महोत्सव २०२६' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर ऍड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने काल दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या 'किन्नर महोत्सव २०२६' या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. 
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, डॉ. सान्वी जेठवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे  आभार मानले.

यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, डॉ. सान्वी जेठवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

पलावा शहरात प्रथमच 'अनिल आय हॉस्पिटल' मध्ये अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्षाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

काटई पलावा – पलावा शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 'अनिल आय हॉस्पिटल' येथे अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्ष (Eye OT) चे उद्घाटन माननीय श्री. राजू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
पलावा परिसरातील हा पहिलाच सुसज्ज नेत्र शस्त्रक्रिया कक्ष असून, आता मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना तसेच इतर नेत्रविकारांवरील शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पलावा व परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
'अनिल आय हॉस्पिटल'मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अनुभवी नेत्रतज्ज्ञ आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित, अचूक आणि गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णकेंद्रित सेवा, अत्याधुनिक उपचारपद्धती आणि परवडणारी आरोग्यसेवा हे रुग्णालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय श्री. राजू पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पलावा परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. त्यांनी आरोग्यसेवेत अशा आधुनिक सुविधा उभारणाऱ्या अनिल आय हॉस्पिटलच्या कार्याचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने डॉ. अनघा अनिल हेरूर यांनी सांगितले की,_"पलावा आणि परिसरातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घराजवळच जागतिक दर्जाची, सुरक्षित आणि विश्वासार्ह नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्ष (Eye OT) मुळे रुग्णांना अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील."_
उद्घाटन समारंभास मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि रुग्णालयाचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्क:
अनिल आय हॉस्पिटल
पलावा , डोंबिवली (पूर्व)
मो.: 8652001781

जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई; उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याणचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण, ता. २ जुलै : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत देण्यात आली होती.

परिवहन विभागाने कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD. या संस्थेची HSRP बसविण्यासाठी नियुक्ती केली असून, वाहनधारकांनी <https://hsrpmhzone2.in> या पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्यावी.
परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार १ जुलै २०२६ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, ३० जून २०२६ पर्यंत HSRP बसविण्यासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) नूतनीकरण, वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/उतरविणे, दुय्यम आरसी, ना-हरकत प्रमाणपत्र (NOC), वाहनातील बदल यांसह विविध वाहनविषयक सेवा HSRP बसविल्याशिवाय उपलब्ध होणार नाहीत. तसेच वायुवेग पथकाने जप्त केलेली वाहनेही HSRP बसविल्यानंतरच सोडण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

वाहनधारकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी तातडीने HSRP बसवून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी केले आहे.

मोठागाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्याची आमदार राजेश मोरे यांची कल्याण-डोंबिवली आयुक्तांकडे मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा-वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) बांधकामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाला गती द्यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन केली.
संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाण पुलाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन सादर करून निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या.

मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठागाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाबही समोर येत आहे.

स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंजुरी मिळूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता, संबंधित कामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले.

मोठागाव रेल्वे उड्डाणपूल साकार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा  डोंबिविलीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

दिव्यात मृतदेह नेण्यासाठी रस्ता बंद, बिल्डरांच्या कथित दादागिरीविरोधात नागरिकांचा संताप..

विशेष प्रतिनिधी

दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे," अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलीसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार. राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला. पोलीस प्रशासनास कळवले, दिवा प्रभाग समिती यांनाही कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्येक वर्षापासून हिच परिस्थिती आहे. कोण बोलणार ? गुंडागर्दी, हुकूमशाही सुरू आहे. माणुसकी जिवंत राहिली नाही. कायद्याचा धाक राहिला नाही. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा अशी मी दिवा वासियांतर्फे मागणी करत आहे.

कारखाने आणि व्यावसायिक कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पेट्रोल पंपावरून इंधन खरेदीस बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : केंद्र सरकारने इंधनाच्या वितरणाबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. आता मोठ्या ग्राहकांना केवळ मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या ठिकाणांहूनच इंधन खरेदी करावे लागेल. कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना किरकोळ विक्री केंद्रातून इंधन मिळणार नाही. त्याचबरोबर सामान्य ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त २०० लीटर डिझेलच खरेदी करू शकतील. हे डिझेल पुन्हा विकण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

देशाच्या काही भागांमध्ये किरकोळ पंपांवर अचानक वाढलेली असामान्य विक्री लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही बंदी सुरुवातीला ९० दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांसाठी इंधनाची कमतरता भासणार नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाने ‘मोटर स्पिरिट ऍण्ड हाय स्पीड डिझेल (टेम्पररी रेग्युलेशन ऑफ सप्लाय थ्रू रिटेल आउटलेट्स) ऑर्डर, २०२६’ जारी केला आहे. यानुसार, आता कोणतीही फॅक्टरी, व्यावसायिक संस्था किंवा मोठ्या संस्था सामान्य गाड्यांसाठी असलेल्या पेट्रोल पंपावरून डिझेल-पेट्रोल खरेदी करू शकणार नाहीत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या ग्राहक पंपावरून किंवा निश्चित केलेल्या बल्क सप्लाय चॅनेलद्वारेच इंधन घ्यावे लागेल.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशाच्या काही भागांमध्ये किरकोळ पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची विक्री अचानक खूप वाढली होती. तपासात असे समोर आले की किरकोळ आणि घाऊक किमतींमध्ये मोठा फरक असल्यामुळे कारखाने आणि व्यावसायिक वापरकर्त्यांनी घाऊक इंधन मागवणे बंद केले आणि ते थेट सामान्य पेट्रोल पंपांवरून गाड्या पाठवून इंधन खरेदी करू लागले. यामुळे सामान्य जनतेसाठी इंधनाच्या तुटवड्याचा धोका निर्माण होत होता.

पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटत संघर्ष संपला आणि महादेव भक्तांचा विजय झाला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०८ -  "महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. ही सर्व जमीन आता पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
    
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार एयलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, माजी कॅबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, पिंपळेश्वर मंदिराचे विश्वस्त (ट्रस्टी) स्थानिक नगरसेवक अर्जुन पाटील, गजानन पाटील असे सर्व नगरसेवक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिरामध्ये विधीवत महापूजा करण्यात आली. याप्रसंगी भक्त मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सहकार्यामुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले आहे. मात्र, आम्ही सर्व जण केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. त्यामुळे या यश प्राप्तीचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते. हे पुण्यकर्म करण्याची संधी महादेवाने आम्हांस दिली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करून घेतले, याबद्दल मी मंत्रिमंडळाच्या वतीने महादेवाचे आभार मानतो. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, तोच सुवर्ण इतिहास पिंपळेश्वर महादेवाला पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन या ठिकाणी करणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरीनाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पिंपळेश्वर महादेव मंदिराची सुरुवाती पासून आत्तापर्यंत ची संपूर्ण माहिती आपल्या भाषणातून दिली, यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेच्या 'जन गण मन' विद्यालयाचा एसएससी २०२५-२६ मध्ये पुन्हा १००% निकाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली कोपर : 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' शिक्षण संस्थेच्या 'जन गण मन' विद्यामंदिर स्कूलने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय १००% निकाल मिळवत शैक्षणिक उत्कृष्टतेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.

स्थापनेपासूनच शाळेने सातत्याने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपली असून, दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली संस्थेची बांधिलकी यामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर शाळेचे नाव उज्ज्वल केले. यावर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
निहार मोनल प्रवीण बागडे – ८९.४०%
आयुष मनीषा सुरज पांचाळ – ८८.८०%
नंदिनी रीना बसंत सिंग – ८७.८०%
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना डॉ. राजकुमार एम कोल्हे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. आत्मविश्वास, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर जीवनात अधिक मोठी उद्दिष्टे गाठण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे, संस्थेच्या सचिव, यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शाळेच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

शाळेच्या या यशामागे प्रभारी मुख्याध्यापक अलपेश खोब्रागडे आणि तेजावती कोटीयन यांचे मोलाचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभले असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले. तसेच शिक्षिका मंजुषा चौधरी, मीना वटकर, सीमा यादव, मृणाल विरकूड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. पालक, हितचिंतक आणि नागरिकांकडून शाळेच्या व्यवस्थापनाचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामुळे जन गण मन विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेल्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. २२ एप्रिल - भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले.

या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे आणि ऊर्जावान नेतृत्व असल्याचे नमूद केले. आपल्या मनोगतात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणारा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. केंद्र व राज्य सरकारने तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचवले जातील. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले सक्षम आणि प्रभावी युवाशक्तीचे संघटन उभारणे, हेच या यात्रेचे मुख्य ध्येय आहे.”

‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’ हा संदेश देणारी ही यात्रा राज्यातील युवकांना एकत्र आणत त्यांना विकास, नवकल्पना आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडण्याचे कार्य करणार आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, युवकांमध्ये जागर निर्माण करून त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस व भाजयुमो प्रदेश प्रभारी सुनील राणे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

डोंबिवलीतील होली एंजल्स शाळेचा १००% यशाचा विक्रम करत सीबीएसईच्या शालान्त परीक्षेच्या निकालात सलग उत्तम कामगिरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली येथील होली एंजल्स स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई दहावी परीक्षा २०२६ मध्ये सलग २० व्या वर्षी १००% निकालाचा मानाचा तुरा रोवला आहे.
बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या या निकालात एकूण १५७ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत जय तुषार भारंबे (९७.२०%) याने प्रथम क्रमांक, दक्ष गणेश पाटील (९७.००%) याने द्वितीय क्रमांक, तर प्रणील उमेश म्हात्रे (९६.००%) आणि ऍन्जेलिन रिचर्ड नेय्यन (९६.००%) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. 
विषयानुसारही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, इंग्रजी आणि मराठी विषयांमध्ये प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष उल्लेखनीय यश मिळवले आहे. ऍन्जेलिन नेय्यन, अद्वैत मेनन आणि अयान आंजर्लेकर शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ओमेन डेव्हिड, प्राचार्य बिजॉय ओमेन, खजिनदार लीला ओमन यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.