BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

केडीएमसीत ५१ वारसांना नोकरीची संधी देत महापौरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या ५१ वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती आदेशांचे वितरण आज महापौर दालनात करण्यात आले. महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सहा. आयुक्त सुषमा मांडगे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे तसेच पालिका सदस्य वरुण पाटील, गणेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

नियुक्ती पत्र देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या स्वच्छता व विकासासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा द्यावी, असे मार्गदर्शन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.

महापालिकेकडून गेल्या वर्षभरात एकूण २३२ वारसांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून, वारसा हक्कासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन वेळा मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

ज्युपिटर हॉस्पिटल कडून डोंबिवलीत ५०० बेड्सचे बहुविशेषज्ञ रुग्णालय सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी : ज्युपिटर हॉस्पिटल तर्फे डोंबिवली येथे ५०० बेड्सचे अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालय रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज झाले असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील प्रगत आरोग्यसेवा सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (केडीएमसी), उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवेची दीर्घकाळापासून गरज भासू लागली होती. या भागातील रुग्णांना गंभीर उपचारांसाठी ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागत असल्याची अडचण लक्षात घेऊन 'ज्युपिटर हॉस्पिटल'ने डोंबिवली येथे ५०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे रुग्णालय सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे पूर्ण-सुविधायुक्त केंद्र असेल. नवजात शिशूंच्या जन्मापासून ते अवयव प्रत्यारोपण आणि कर्करोग उपचारांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध असतील. समाजातील सर्व घटकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याचा यामागील उद्देश आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या रुग्णालयात आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग (क्रिटिकल केअर) आणि प्रगत डायग्नॉस्टिक सुविधा उपलब्ध असतील. तसेच हे रुग्णालय  (आय जी बी सी) च्या सर्वोच्च पर्यावरणीय मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे.

डॉ. अजय ठक्कर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ज्युपिटर हॉस्पिटल, म्हणाले, “मोठ्या भारतीय शहरांमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी कोणालाही ४५ मिनिटांपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये. आमची दृष्टी नेहमीच सर्वसमावेशक आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा रुग्णांच्या जवळ उपलब्ध करून देण्याची राहिली आहे. डोंबिवलीतील ५०० बेड्सच्या रुग्णालयाचे उद्घाटन हे वाढत्या समुदायांसाठी प्रगत आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा विस्तारण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.”

डॉ. अंकित ठक्कर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटल, यांनी सांगितले,“भारतीय संस्कृतीत रुग्णाच्या कुटुंबाची भूमिका त्याच्या उपचार प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असते, याची आम्हाला जाणीव आहे. आमची रुग्णालये केवळ रुग्णांच्या नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीय आणि काळजीवाहूंच्याही गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच उत्तम आरोग्यसेवेचा अनुभव मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

गुन्हे प्रकाटीकरण तसेच गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण पोलीस प्रथम क्रमांकावर..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - आयुक्त आशुतोष डुंबेरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्ह्यांचा तपास आणि शोध घेत गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण पोलीस परिमंडल-३ ने नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाच्या संख्येत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी केवळ अभिमानाची नाही तर पोलीस विभागाच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या वर्षात ३,००० हून अधिक गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करण्यात आली आहे.

कल्याण विभाग परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या ही केवळ आकडेवारी नाही तर जनतेचे रक्षण करण्याच्या पोलीसांच्या दृढनिश्चयाचा आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा पुरावा आहे.
सार्वजनिक सुरक्षिततेचा निर्धार

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम, धाडसी कारवाई आणि दिवसरात्र शिस्तबद्ध तपासातून हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले की, पोलीसांची तत्परता, समर्पण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे आणि नागरिकांचा सुरक्षेवरील विश्वास आणखी दृढ करते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपच्या रितू तावडे तर उप महापौर पदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा बिनविरोध शिक्कामोर्तब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून, अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम ३७ (१) अन्वये महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत म्हणजे शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षांकडून रितू राजेश तावडे आणि संजय शंकर घाडी यांचे क्रमशः महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची तर उप महापौर पदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामकाज सांभाळले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोन्हे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे व उप महापौर संजय घाडी यांचे पुष्पगुच्छ प्रदान करुन अभिनंदन केले.

पॅनल क्र. २१ मधून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना म्हात्रे यांनी केला विकास कामांचा शुभारंभ..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली, दि.१० फेब्रुवारी –  भारतीय जनता पार्टीची पॅनल क्र. २१ मधून उमेदवारी मिळवत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांनी विकास कामांना जोरदार सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २१ मधून त्या विजय मिळवत निवडून आलेल्या आहेत. १५ जानेवारी ला मतदान १६ जानेवारी निकाल लागला आणि लगेच कामाला सुरुवात करत, जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी खरी उतरेन, असे म्हणत त्यांनी निवडणुकीनंतर कोणत्याही पर्यटन स्थळी फिरायला जाण्याऐवजी जनतेची काम करण्यास पसंती देत कामाला सुरुवात केली.

पहिलं काम त्यांनी जनतेच्या सुविधेसाठी एक ऍम्बुलन्स स्वखर्चातून चालू केली आहे. शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयामध्ये हृदयविकारावर कोणताही उपचार नसल्यामुळे अशा रुग्णांना शिवाजी हॉस्पिटल कळवा किंवा परळ ला केईएम सारख्या ठिकाणी उपचारासाठी न्यावं लागतं. इतका लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्या पेशंटच्या जीवाला दगा फटका न होता तो सुरक्षित रुग्णालयापर्यंत पोहोचावा यासाठी, कार्डियाक ॲम्बुलन्स ही खूप गरजेची असते म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रभागासाठी सुरू केली आहे. 

रुग्णांना उपचार हे आपल्या इथे डोंबिवली मधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्व नगरसेवकांच्या मदतीने सर्वच सर्जरी केल्या जातील याचा प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच "सुभाष रोड" चे डोंबिवली स्टेशन पासून नवापाडा चौक पर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. गटार असेल त्यावरील चेंबर, रोडच्या बाजूला असलेले पादचारी रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू केले आहेत. 

पाण्याच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून गणेश घाट येथील, २.५० लक्ष मिली लिटर जलकुंभाचे काम ८०% पूर्ण झाले, पुढील चार ते पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन लवकरच या जलकुंभामुळे डोंबिवली पश्चिमेतील जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र तोपर्यंत डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांच्या स्वखर्चातून ज्या ठिकाणी जुन्या विहिरी आहेत त्या विहिरी स्वच्छ करून त्या विहिरीतील पाणी नागरिकांना वापरासाठी पुरवण्यात येत आहे.

कसारा जलद लोकलचा दिवा थांबा रद्द करण्याची प्रवासी संघटनेची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कसारा जलद लोकलचा दिवा स्थानकातील थांबा रद्द करावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या सर्व लोकलला दिवा स्थानकात थांबा दिल्याने अधिक प्रमाणात गर्दी होत आहे. दिवा, ठाणे स्थानकात उतरण्याचा दरवाजा एकाच दिशेला येत असल्याने प्रवाशात भांडणे होत आहेत.

संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी ही मागणी करत सांगितले की, प्रवाशांमध्ये अशा घटना वाढत असून, आता त्या शाब्दिक बाचाबाची, हाणामारीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. नव्याने येणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, दिव्यांग, महिलांना ठाणे स्थानकात उतरणे आणि चढणे अत्यंत कठीण आणि जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. भविष्यात ही स्थिती अशीच राहिली तर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होऊन उद्रेक होईल.
कळवा-मुंब्रा मार्गावर गेले सर्वाधिक बळी

डोंबिवली-कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सर्वाधिक लोकलमधील प्रवासात बळी गेले आहे. दोन्ही स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी पारसिक स्थानक पुन्हा सुरू करा, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सिद्धेश देसाई यांनी केली आहे. त्यांनी नव्या ठाणे स्थानकापेक्षा पारसिक स्थानक व्हावे असे म्हटले आहे.

माणकोली उड्डाण पुलावर 'रेस' लावणाऱ्यांना विष्णूनगर पोलीसांचा मोठा दणका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील माणकोली-मोठागाव ठाकुर्ली उड्डाणपुलावर रेस लावून स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना विष्णूनगर पोलीसांनी मंगळवारी चांगलाच दणका दिला. मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितांकडून दंड वसूल करून पुन्हा असे प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पीयूष म्हात्रे (२१), वेदांत सावंत (१८), प्रदीप ढाकणे (२१) या वाहनचालकांसह रेसिंगचा व्हिडिओ तयार करणारे विशाल विश्वकर्मा (२१), कृष्णा विश्वकर्मा (१९) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्रामवर मैत्री करून संबंधितांनी कार, जीप रेसिंसाठी व्हॉट्सऍपवर एक ग्रुप तयार केला होता. त्या सर्वांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

भाजप नगरसेवकाची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

माणकोली उड्डाणपुलावर सुरू असलेल्या जीवघेण्या रेसिंग स्टंटबाजी प्रकरणी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने थेट ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे तक्रार केली होती.

विष्णूनगर पोलीसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना दंड ठोठावत तंबी दिली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे यांचे पथक आणि डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे पथक यांनी ही कारवाई केली.

कोपरमधील विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून अपघाती मृत्यू..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.१० फेब्रुवारी - बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीतील कोपर येथे राहणारा सोहम सचिन कठरे हा विद्यार्थी बारावीची परीक्षा देण्यासाठी कळवा येथील मनिषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जाणार होता. यासाठी तो कोपरहून कळव्याला जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होता.

दरम्यान, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमधून पडून सोहमचा अपघाती मृत्यू झाला. लोकलमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विकास कामे मिळविण्यासाठी केडीएमसीच्या नव्या महापौरांना ठेकादारांचा गराडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारी पार पडली. नव्या महापौर पदी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल चौधरी या विराजमान झाल्या. महापौर झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच कामकाज सुरु केले. त्यांनी कामकाज सुरु केल्यापासून त्यांना ठेकेदारांनी गराडा घातला आहे. विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग सुरु झाली आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहेत, अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येते. 

महापालिकेच्या निवडणूक २०१५ साली झाली होती. त्या वेळच्या सदस्यांची मुदत २०२० साली संपुष्टात आली. निवडणुकीची मुदत संपली तेव्हा कोरोना महामारी सुरु होती. त्यामुळे राज्यात कोणत्याही महापालिकेत निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूकही झाली नाही. गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीत आयुक्तांच्या अधिकारात विकास कामांना मंजूरी दिली गेली. आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन कोरोना काळात आरोग्य सोयी सुविधांकरीता लागणारी खरेदी असो किंवा अन्य विकास कामे यांना मंजूरी दिली गेली.

त्यामुळे त्यावर राजकीय पदाधिकारी यांचा वचक नव्हता. गेल्या पाच वर्षात ठेकेदारांना कामे मिळाली. मात्र त्यांना कामे देण्याचा अथवा नाकारण्याचा सर्वस्वी अधिकार हा आयुक्तांचा होता. गेली पाच वर्षे ठेकेदारांवर प्रशासनाचे नियंत्रण कामे वाटपाच्या बाबतीत होते. आत्ता निवडणूक होताच कामे होतील अशा ठेकेदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे कामे मिळविण्याकरीता ठेकेदारांनी नवनिर्वाचित महापौराना गराडा घातला आहे. ठेकेदारांचा राबता महापौरांच्या केबीनमध्ये वाढला आहे. विकास कामे पदरात पाडून घेण्यासाठी महापाैरांच्या दालनात काही मंडळी जास्त प्रमाणात ये-जा करीत आहेत. महापालिकेती ठेकेदारी ही काही विशिष्ट ठेकेदारांच्या हाती आहे. त्यांच्याशिवाय अन्य ठेकेदारांचा पत्ता हालत नाही. त्यांना कामेही मिळत नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊनच महापौरांनी या संदर्भातील निर्णय घेणे अपेक्षित आहेत. त्यातही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे विकास कामांची कंत्राटं घेण्यासाठी आघाडीवर असतील हे विरोधकांनाही चांगलेच ठाऊक आहे.

एसटीच्या ताफ्यात लवकरच राजमाता जिजाऊ बस..

प्रतिनिधी:अवधुत सावंत

मुंबई - शिवशाही, शिवनेरीनंतर आता एसटीची 'राजमाता जिजाऊ' बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ही नवीन बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागू नये यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी नव्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभ्या राहिलेल्या राजमाता जिजाऊ या प्रेरणास्थान आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या या नव्या बसेसना 'राजमाता जिजाऊ' असे नामकरण करण्यात आले आहे.

सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसची आसन क्षमता ४० इतकी आहे. मात्र, नवीन 'राजमाता जिजाऊ' बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसून प्रवास करू शकतील. यामुळे अतिगर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करणाऱ्या अतिरिक्त १५ प्रवाशांना आता बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. दोन शहरांमधील मुख्य मार्गांवर ही सेवा प्राधान्याने सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे.

या नवीन बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतील. या बस भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत तयार करण्यात आल्या असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. केवळ नावच नाही, तर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बस प्रवाशांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यापासून प्रवाशांना या नवीन आणि आरामदायी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतही पुन्हा देवेंद्र - रविंद्र यांचं वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.०९ : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा पटकाविण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि महाराष्ट्र विकस आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हीच राजकारणातील आजची जोडी नं. १ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाच्या बळावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा मिळविण्याची अनोखी हॅटट्रिक प्राप्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणूका, त्यानंतर जानेवारीत झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि या फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत देवेंद्र आणि रविंद्र या राजकीय पॉवरफुल जोडीने अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती, स्थानिक पातळीवरील पक्षासोबत राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वय अशा विविध माध्यमातून भाजपाला उच्च दर्जाची सक्षम पक्ष यंत्रणा उभारली. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला शीर्षस्थ नेतृत्वाचा वरदहस्त लाभला आणि धाकही जाणवला. याचा सकारात्मक परिणाम होऊन पक्षाने अनेक ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक विजय नोंदवले. या यशाचे मुख्य शिल्पकार देवेंद्र फडणवीस तर सूत्रधार रविंद्र चव्हाण हे आहेत हे निर्विवादपणे म्हणावे लागेल.

रविंद्र चव्हाण यांना निवडणूक सिद्ध नेता म्हणून ओळखले जाते. ते जमिनीवर वावरणारे आणि कार्यकर्त्यात रमणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत अत्यावश्यक असणारे साम, दाम, दंड, भेद वापरताना विचारधारेच्या धाग्याने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडणारे असे त्यांचे नेतृत्त्व आहे म्हणूनच दिल्ली आणि नागपूर दोन्ही सत्ताकेंद्रांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्याच बरोबर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आणि सहकार्य कायम मिळतच असते.

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.०९ - कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी "पत्रकार विकास योजना" राबवण्या बाबत "क्रांतिकारी पत्रकार संघाच्या" वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.

तसेच पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक 'पत्रकार विकास योजना' राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःचं घर आहे त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या. 
शासनाने पत्रकारांसाठी राबविलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबुत राहण्यासाठी ही वस्तुथिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले. 

यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष - गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव - प्रमोद तांबे, पत्रकार - राजू काऊटकर, दीपक इंगळे यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण उपमहापौर राहुल दामले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.

माजी आमदार सुभाष भोईर यांनी दोस्ती गृहसंकुलात कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजनाचा दिलेला शब्द पूर्ण केला..

विशेष प्रतिनिधी

दिवा : शिळफाटा येथील प्लॅनेट नॉर्थ दोस्ती गृहसंकुलात शेकडो नागरिक वास्तव्यास असून परिसरात 'दोस्ती फाउंडेशन' शाळाही आहे. मात्र गृहसंकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना धूळ आणि खड्यांचा त्रास सहन करावा लागत होता.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या प्रचारादरम्यान नागरिकांनी ही समस्या माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी मुंब्रा-पनवेल मुख्य रस्त्यापासून दोस्ती गृहसंकुलापर्यंत रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते.
निवडणूक संपल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता करत माजी आमदार सुभाष भोईर यांनी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ३५० मीटर लांबीचा कॉंक्रिट रस्ता मंजूर करून घेतला. या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यामुळे गृहसंकुलातील रहिवासी व शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच परिसरातील वाहतूक व दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार आहेत.

सदर प्रसंगी सुमित सुभाष भोईर, आरिफ शेख, जावेद शेख, शमशुनिषा हुसेन, फईम शेख, हनीफ पठाण, ऍड तन्वीर, ऍड मुफ्ती, अनवर कच्छी, दोस्ती गृहसंकुलातील, रुबी, एल्मोर, जेड, एमराल्ड सोसायटीचे सर्व अध्यक्ष, सेक्रटरी, सदस्य व नागरिक, दोस्ती ग्रुपचे वरिष्ठ अभियंता श्रीपत, सुधीर चव्हाण उपस्थित होते.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची फेडरेशनच्या ‘नॅशनल प्रेसिडेंट’ पदी निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : आज अनेक घरातील मुलांच स्वप्न असतं की आपण ही क्रिकेटर व्हाव, मात्र प्रत्येकालाच 'आयपीएल, टेस्ट मॅच' किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचता येत नाही. अशा अनेक तरुणांसाठी टेनिस क्रिकेट हे करिअर घडवणारं प्रभावी माध्यम ठरू शकतं. या फेडरेशनच्या माध्यमातून सर्व सामान्य घरातील मुलालाही खेळात स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी मिळू शकते,” असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची फेडरेशनच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पदी अधिकृत निवड झाल्याचे देखील जाहीर करण्यात आले. देशभरात वेगाने लोकप्रिय होत असलेल्या टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध आणि अधिकृत व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) ची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला देशभरातील फेडरेशनचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी, स्पर्धा आयोजक, संघ मालक, माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भारतातील टेनिस क्रिकेटच्या भविष्यातील वाटचालीचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला. निवडीनंतर बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळले जाते. अनेक मोठ्या स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा स्वतःला क्रिकेटर म्हणून घडवू शकतो. जे खेळाडू प्रोफेशनल पातळीवर क्रिकेट खेळू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे एक स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ आहे.” ते पुढे म्हणाले, "गोविंदा-दहीहंडी सारख्या पारंपरिक खेळालाही ‘प्रो-गोविंदा’च्या माध्यमातून व्यावसायिक दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. जो खेळ केवळ वर्षातून एकदाच खेळला जायचा, त्यालाही व्यासपीठ, ओळख आणि मान्यता मिळवून देण्यात आली. त्याचप्रमाणे कबड्डी आज ‘प्रो-कबड्डी’च्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. म्हणजेच प्रत्येक खेळाला प्राधान्य देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे. टेनिस क्रिकेट हे आधीपासूनच वेगळ्या उंचीवर असून, त्याला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम स्वरूप देण्यासाठी फेडरेशन सातत्याने प्रयत्न करेल.”

फेडरेशनच्या माध्यमातून दरवर्षी १२५ ते १५० स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, सुमारे ४० ते ४५ लाख खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या स्पर्धांची एकूण बक्षीस रक्कम अंदाजे ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजक आणि फेडरेशन काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टेनिस क्रिकेटसाठी राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध व्यासपीठ

टेनिस क्रिकेटमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ आणि वाढती आर्थिक गुंतवणूक यामुळे या खेळाकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कोणत्याही अधिकृत नियंत्रण यंत्रणेअभावी काही ठिकाणी गैरप्रकार आणि अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर देशभरातील स्पर्धा आयोजक, अनुभवी खेळाडू, प्रायोजक आणि संघ मालक एकत्र येऊन 'टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया'ची स्थापना करण्यात आली. फेडरेशनची सुरुवात २०२२ मध्ये झाली असून, ऑगस्ट २०२५ मध्ये कंपनी ऍक्ट सेक्शन ८ अंतर्गत 'बीसीसीआय'च्या धर्तीवर फेडरेशनची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील प्रतिनिधी फेडरेशनमध्ये सहभागी आहेत. येत्या काळात इतर राज्यांमध्येही फेडरेशनचा विस्तार करण्यात येणार आहे. टेनिस क्रिकेटला शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप देत, अनेक तरुणांच्या क्रिकेटर होण्याच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा निर्धार या पहिल्याच सभेमध्ये व्यक्त करण्यात आला.

दिवा येथील 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'चा वार्षिक क्रीडा दिन जल्लोषात साजरा..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. ६ फेब्रुवारी – दिवा येथील 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'चा वार्षिक क्रीडा दिन रुणवाल माय सिटी, डोंबिवली येथील प्रशस्त फुटबॉल मैदानावर दोन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात शाळेतील बालवाडीपासून माध्यमिक विभागापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. क्रीडा दिनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली ऊर्जा, कौशल्ये व क्रीडावृत्ती यांचे प्रभावी दर्शन घडले.

या क्रीडा महोत्सवाला दोन दिवस मान्यवर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून मारुती गायकवाड (मुख्य अधिकारी, कुळगाव– बदलापूर महानगरपालिका) यांची उपस्थिती लाभली. तर दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पगार (पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि क्रीडाभावना अधिक दृढ झाली.

यावेळी शाळेचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र दळवी, प्राचार्या ज्योत्स्ना सोनी तसेच 'दक्ष पोलीस टाईम्स' वृत्तपत्राचे संपादक किरण सावंत यांचीही मान्यवर म्हणून उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना क्रीडा व शिक्षण यांचा समतोल साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा दिनाच्या निमित्ताने विविध वयोगटांसाठी धावण्याच्या शर्यती, मैदानी खेळ व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, सहकार्य, संघभावना आणि स्पर्धात्मकतेची सकारात्मक भावना विकसित झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व स्पर्धा शिस्तबद्ध व सुरक्षितपणे पार पडल्या. हा वार्षिक क्रीडा दिन अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले. 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'ने अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली.

दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी डोंबिवली वाहतूक शाखा तर्फे विशेष बाईक राईडची सुविधा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेदरम्यानचा प्रवास सुकर व्हावा आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागू नये, यासाठी डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाचे प्रभारी आयुक्त श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष बाईक रायडर्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
परीक्षार्थी विद्यार्थी जर कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले, तर त्यांना तात्काळ मदत मिळून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक 8655654184 देण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधताच संबंधित भागातील वाहतूक बाईक रायडर्स विद्यार्थ्यांना त्यांचं ठिकाणाहून थेट परीक्षा केंद्रावर सोडणार आहेत.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रॅफिक रायडर्स संपूर्ण ठाणे शहरात कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी वेळेच्या ताणातून दिलासा मिळणार असून, पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.

माजी नगरसेवक संजय पावशे यांनी सामाजिक बांधिलकी जपत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरमध्ये केला हळदी- कुंकू समारंभ उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ५ फेब्रुवारी - माजी नगरसेवक संजय पावशे यांच्या शिवसेना शाखा कार्यालय, प्रभाग क्रमांक ६५ कोपरगाव अंतर्गत कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हळदी- कुंकू कार्यक्रमांतर्गत महिलांना वाण म्हणून सुमारे ५ हजार पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रभागातील वृद्ध नागरिकांनाही बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना भगवा फेटा ही बांधण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. एकत्र येत सणासुदीचा उत्साह साजरा करण्याची संधी मिळाल्याने महिलांनी आयोजकांचे आभार मानले. सामाजिक उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ४ फेब्रुवारी : कल्याण लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक कार्यक्रमात त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य तसेच यशस्वी आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी महादेवाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात भक्तीमय व सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळाले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी तसेच भाविक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी जपात सहभाग घेत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

त्यावेळी आमदार राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक संजय पावशे, शाखा संघटक अपर्णा पावशे, प्रकाश म्हात्रे, प्रेमा म्हात्रे, सूरज राजन मराठे, पंढरीनाथ पाटील,  दिनेश शिवलकर, बालन मोरे, संतोष तळाशीकर, श्रीकांत कोर्ते, विजय दुधवडकर, स्वप्नील पाटील, सागर जेधे, केतकी पवार, अस्मिता खानविलकर, इंदिरा भोईर, उपजिल्हा संघटक, सुनील मालणकर, समस्त शिवसैनिक, महिला आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये २०२६ सालचे अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबीवर विचार विनिमयाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींची तरतूद करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या अर्थसंकल्प सादरीकरण मधे अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या तरतुदी सांगितल्या. त्याच अनुषंगाने  दिनांक २ फेब्रुवारी रोजी मधुबन वातानुकूलित दालनात 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील सहज सुलभ भाषेमध्ये  विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाची व्याख्या समजावून सांगितली. रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक आर्थिक व्यवहार होत राहतात. अगदी भाजीपाला घेण्यापासून ते सोने चांदी घेण्यापर्यंत व्यवहार सुरूच राहतात. हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे, अशी व्याख्यानाची सुरुवात करताना मुख्य वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींची तरतूद कशी करावी याबद्दल सांगितले. नवीन वर्षात नवीन पद्धतीने अर्थसंकल्प तयार केला जातो, फार पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळे तयार केले जायचे,  २०१७ सालापासून प्रत्येक वस्तूवर अथवा जागेवर जी एस टी कर लागू करण्यात आला. पैशाचे नियोजन कसे करावे, याबद्दल माहिती देताना वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की आज सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सद्य परिस्थितीत कुणाही व्यक्तीला सोने चांदी खरेदी करताना सारासार विचार करावा लागेल परंतु ज्या व्यक्तींनी खूप पूर्वी सोने चांदी घेऊन ठेवली आहे त्यांना सद्य स्थितीत ते विकून  चौपट पैसे मिळू शकतात म्हणजेच काय तर पैशाचे नियोजन अशा पद्धतीने करणे हे देखील फायद्याचे आणि गरजेचे ठरू शकते असेही वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या चर्चासत्रात  सांगितले.
भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. मंदिरे, मेळावे, सर्व नद्यांची आरती, उत्सव असे अनेक प्रकारची धार्मिक कार्ये भारतात होत असतात, अनेक परदेशी व्यक्तींना भारतीय संस्कृती बद्दल आकर्षण आणि आदर आहे म्हणून लाखो संख्येने पर्यटक भारतात येत असतात आणि त्यातूनच भारत सरकारला आर्थिक उत्पन्न प्राप्त होते, असे सांगताना पर्यटकांना गौतम बुद्धांबद्दल आदर वाटतो त्या कारणास्तव भारतात अनेक पर्यटक बुद्धिष्ठ मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात तसेच अयोध्या मधील राम मंदिर, असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत की ज्या मधून एक नवीन अर्थसंकल्प ची तरतूद होऊन जाते असेही सांगितले. सोळा टक्के उत्पन्न हे पशुपालन व्यवसायातून प्राप्त होते. त्याच बरोबर औषधी, पर्यटन, खेळ, प्रयोगशाळा, इत्यादी मधून आर्थिक उत्पन्न प्राप्त होते.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान बैठकीत देखील अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबीची तरतूद कशी करावी याबद्दल लिहून ठेवले गेले आहे असे वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले तर घरातली प्रत्येक गृहिणी  ही दैनंदिन अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींचे नियोजन करण्यात पुरुषांपेक्षाही सक्षम असते. एक रुपयाचे दहा रुपये कसे करता येईल याचा विचार करून आपणही नियोजनबद्ध दुप्पट उत्पन्न प्राप्त करू शकता असाही सल्ला डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला. भारतातील यशस्वी उद्योजक, व्यक्ती यांची उदाहरणे देऊन त्यांच्या जिद्दीने व विचारांनी आपणही मार्गदर्शन घेऊन यशस्वी रित्या आर्थिक उत्पन्न दुप्पट करू शकता असेही सांगितले.
 दोन तासाच्या सत्रामध्ये वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे सर यांनी अनेक संधी, मार्ग विध्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले. सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मिळून २५० ते ३०० श्रोते या  अर्थसंकल्प चर्चासत्रात उपस्थितीत होते. अनेकांनी वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे सर यांना प्रश्न विचारून आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन समर्थन करून घेतले.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ‘बालमेळा २०२६’ यशस्वीरित्या संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने GEI’s 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', डोंबिवली येथे नुकताच ‘बालमेळा २०२६’ या भव्य सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. डोंबिवली परिसरातील सुमारे २० शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या बालमेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चित्रकला, वक्तृत्व, निबंध लेखन, वादन, समूह गायन, समूह नृत्य व रोटरी हास्यजत्रा अशा विविध स्पर्धांचा या उपक्रमात समावेश होता.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-नियुक्त  श्रीजीत पूतन आणि  डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. विनेश नायर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ ३१ जानेवारी रोजी रोटरी भवन, डोंबिवली येथे पार पडला. यामध्ये सर्वोत्कृष्ट शाळा (विजेती) – 'ओंकार इंग्लिश मिडियम स्कूल' (सीबीएसई), सर्वोत्कृष्ट शाळा (उपविजेती) – GEI's 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', तर उत्कृष्ट सहभागासाठी विशेष पारितोषिक – 'डॉन बॉस्को स्कूल' यांना प्रदान करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अध्यक्ष रो. डॉ. संदीप घरत, सचिव रो. विनायक आगटे, प्रकल्प संचालक रो. संतोष प्रभुदेसाई, प्रोजेक्ट चेअरमन रो. धनश्री मोने,  रो. अशोक तिरुवसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.