BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

'जे एम एफ' शिक्षण संस्था व ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत परिसंवादाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 कोपर - डोंबिवलीतील कोपर येथील 'जे एम एफ' शिक्षण संस्था व ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात हिरोशिमा अणूबाँब मृत्यूमुखी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. भारताची युवा पिढी ही भारताचे उज्वल भविष्य आहे आणि म्हणूनच या युवा पिढीला सामाजिक आणि वैयक्तिक काही बंधने आणि जबाबदाऱ्या देखील आहेत. म्हणुनच 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी नशा मुक्त भारत या परिसंवादाचे आयोजन मधुबन वातानुकूलित दालनात आयोजित केले होते.
'नशा मुक्त भारत..एक पाऊल पुढे..'  ह्या नाजूक विषयाची हाताळणी करताना परिसंवादाचे वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अनेक उदाहरणे संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितले. आम्ल पदार्थ, दारूचे व्यसन ह्या समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टी जर समूळ नष्ट करायच्या असतील तर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा पिढीने एकत्रित येऊन शपथ घ्यायला हवी की आजचा आणि उद्याचा भारत हा नशा मुक्त भारत करूनच आपण दाखवू.
नशा म्हणजेच व्यसन. व्यसन हे शिकण्याचे असावे, वाचनाचे असावे, व्यक्तीने व्यासंग असावे परंतु व्यसनिक नसावे. व्यासंग तुम्हाला घडवतो तर व्यसन तुम्हाला रसातळाला नेतो, आणि हाच फरक ओळखून युवा पिढीने नशा करण्यापासून लांब रहावे ह्याचे उदाहरण देताना प्रसिद्ध सिने अभिनेता संजय दत्त, गायक हनी सिंग हे कधी काळी व्यसनाच्या आहारी गेले होते त्यातून त्यांना बाहेर पडताना भोगावा लागलेला त्रास आणि नशा मुक्त झाल्यावर कळलेला जीवनाचा अर्थ याचा सारासार विचार केला असता नशा मुक्त भारत घडविण्यासाठी कितीतरी गोष्टींना सामोरे जावे लागते असे सांगत वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या परिसंवादामध्ये नमूद केले की आताची पिढी ज्याला जेन झी म्हणून संबोधिले जाते त्याच पिढीने नशा मुक्त भारत घडवावा अशी अपेक्षा आहे.
🤔परिसंवादाच्या अखेरच्या टप्प्यात शाळा महाविद्यालयाच्या अनेक मुलांनी प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली तसेच शपत घेतली तर वंदे मातरम् महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत हा विषय घेऊन पथनाट्य सादर केले. परिसंवादाला शाळा महाविद्यालयाचे मिळून पाचशे विद्यार्थी हजर होते.

कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५ हजार कोटींची रक्कम जमा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
मुंबई : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आज योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून, ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे. एवढीच सहज आणि सोपी प्रक्रिया असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी अथवा प्रलंबित बाबी असतील, त्या संबंधित पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून द्यावे, त्या सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. विविध बँकांकडून सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला असून, ६ ऑगस्ट २०२६ अखेर १२.१० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याची माहिती सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती -

अमरावती विभागात १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १,३७२.१७ कोटींचा लाभ,

नाशिक विभाग - १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपये,

छत्रपती संभाजीनगर विभाग - १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांना ९३२.६१ कोटी रुपये,

पुणे विभाग - १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये,

नागपूर विभाग - ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये,

कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटीं रुपयांचा लाभ.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेत स्काऊट आणि गाईडचा एकदिवशीय माहिती वर्ग संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर - दिनांक २४ जुलै २०२६ शुक्रवार रोजी सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत 'जेएमएफ'चे जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज मधील ५०१ हॉलमध्ये स्काऊट आणि गाईड ठाणे जिल्ह्यातर्फे एकदिवशीय *माहिती वर्ग (बिगीनर्स कोर्स )* घेण्यात आला. त्याकरिता संस्थेच्या सचिव डॉ.सौ.प्रेरणा राजकुमार कोल्हे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
तसेच मार्गदर्शन करण्यासाठी ALT सुरेश लोहार सर, ठाणे जिल्हा संघटक-स्काऊट श्री.संदिप भुसिंगे सर, जिल्हा संघटक-गाईड सौ. हेमांगी पाटील मॅडम, डोंबिवली स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक जगताप सर, उपाध्यक्ष श्री.एकनाथ चौधरी सर, सचिव श्री.जगदीश उगले सर, माजी अध्यक्ष श्री. सुनिल भावसार सर, सल्लागार श्री.सूर्यवंशी सर तसेच विविध शाळा, कॉलेज मधून २५ ते ३० स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन उपस्थित होते.
 या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल सरांचे विशेष आभार मानण्यात आले.

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या ३८ वर्षांच्या निरंतर सेवेला नागरिकांचा सलाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली शहरात गेल्या ३८ वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची ३८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिक तसेच त्यांचे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी त्यांच्या उपस्थित मान्यवर व रुग्णांसमोर त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यालय प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री. प्रकाश माने यांनी  डॉ. ढाके यांच्या सेवाभावी वृत्ती, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता आणि कमी खर्चात दर्जेदार उपचार देण्याच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी श्री. प्रकाश माने यांनी सांगितले की, "वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रदीप ढाके." गेल्या ३८ वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना योग्य उपचार व आरोग्याविषयी मार्गदर्शन करून समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रदीप ढाके आणि कुटुंबीयांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि डॉक्टरांच्या मार्फत अशीच निरंतर समाजसेवा करण्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. 
या शुभप्रसंगी शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा समन्वयक तथा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री. विजय देशमुख साहेब, शिवसेनेच्या डोंबिवली शहर उपसंघटक सौ. प्रतीक्षा प्रकाश माने, टिळक नगर सुयोग गल्लीतील हरी मुकुंद सोसायटीचे पदाधिकारी श्री. महाजन साहेब, श्री. महापदी साहेब, डोंबिवलीतील ज्येष्ठ समाजसेविका माननीय श्रीमती मालती ताई साटम, कल्याण रोडवरील एकरूप सहकार मित्रमंडळाचे पदाधिकारी, तसेच डॉक्टर प्रदीप ढाके यांच्या आरोग्य विषयक कार्याला दिवस-रात्र हातभार लावणारे यामध्ये त्यांचा स्टाफ श्री. रघुनाथ कांबळे, सौ. प्रियांका गायकर, सौ. मनीषा गरुड, सौ. सोनल पिस्ते, दर्शन सोनावणे, नागेश पवार, पुनम जाधव तसेच उपचारासाठी व काही खास कार्यक्रमासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आनंदाने उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत अवतरली संताची मांदियाळी.. अवघी दुमदुमली पंढरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर -  देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, पंढरपूर मध्ये लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले असतानाच 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी,पालक उपस्थित राहून विठ्ठलाच्या नामघोषात दंग झाले.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांचे 'जे एम एफ' मंडपम मधे आगमन झाले, त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व बाल वारकरी विद्यार्थी एकत्र आले. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरती करण्यात आली. बाल वारकऱ्यांनी तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव, अशा अनेक संतांच्या वेशभूषा करून आलेले विद्यार्थी म्हणजे साक्षात संतांची मांदियाळीच अवतरली आहे असे भासत होते.
ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या हृदयात भक्ताचा वास आहे त्याच प्रमाणे आपल्या हृदयात देखील विठ्ठलाचा वास आहे पण त्यापेक्षाही माणुसकीचा ठेवा असणे अधिक गरजेचे आहे, आज लाखो वारकरी अनवाणी पायाने पंढरपूरला चालत जात आहेत त्यांची सेवा करणे किंवा "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.." असे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, त्याच भक्तीभावाने सेवा केली तर त्यांच्याच रूपाने विठ्ठल तुम्हाला तिथेच भेटणार आहे असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले तर अप्रतीम वेशभूषा करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या स्वतःलाच विसरून जात आहोत, म्हणून स्वतःला शोधण्यासाठी अध्यात्माचा मार्ग हा सुलभ आहे, ज्याप्रमाणे भक्त पुंडलिकाने स्वतःला स्वतःमध्ये शोधून त्याच्या भक्तीने पांडुरंगाला प्रसन्न करून घेतले तसे तुम्ही देखील अंतर्मनात असलेल्या प्रश्नांना अध्यात्माच्या आधारे सोडवून त्या परमात्म्याला जवळ करा आणि आनंदी रहा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी दशेत असलेले बालरूप हे निरागस रूप असते, म्हणुनच आज विठ्ठल रुक्मीणी, साधू संतांच्या वेशभूषा मधे आलेले हे विद्यार्थी म्हणजे साक्षात पांडुरंग रुक्मिणचे अंशच दिसत आहेत असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटले.

संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी  व विद्यार्थ्यांच्या तबल्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांनी अभंग सादर केला तर सर्व शिक्षकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावले थिरकली. दिंडी सोहळ्यामध्ये माऊलींची पालखी हे मोठे आकर्षण होते सर्वच जण उत्साहात ब्रह्मनादात सहभागी झाले होते. शिशु विहारच्या बालकांनी पांडुरंगाची गाणी गाऊन रिंगण सोहळा केला. " याची देही याची डोळा पाहिला माऊलींचा सोहळा ".. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भक्ती भावाने सेवा करून आषाढी एकादशीचा सोहळा पार पाडला तर नितेश मेस्त्री यांनी पांडुरंगाचे चित्र रेखाटन केले व नरेश पिसाट यांनी सजावट केली. अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सौ.मयुरी खोब्रागडे, यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे  फोटो व्हिडीओ काढण्याची ची जबाबदारी अखिल नायडू, जय लखारा, निखील शिंदे, तांडुलकर, त्यांच्या चमूने पार पाडली.

बेकायदा औषध विक्री दिसल्यास त्वरित तक्रार करा; एफडीए चा टोल-फ्री क्रमांक जाहीर..

प्रतनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात बेकायदा औषध विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू ठेवली आहे. विनापरवाना औषध व सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या १५ ठिकाणी छापे टाकून २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींप्रकरणी ८ ठिकाणी कारवाई करत २.२७ लाखांची औषधे जप्त करण्यात आली, तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांवरही मोठी कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा विक्रीची माहिती तात्काळ एफडीए च्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

केडीएमसीचा तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी भव्य ‘किन्नर महोत्सव २०२६' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर ऍड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने काल दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या 'किन्नर महोत्सव २०२६' या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. 
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, डॉ. सान्वी जेठवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे  आभार मानले.

यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, डॉ. सान्वी जेठवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.