BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

सोनसाखळी लंपास करणाऱ्या चोरट्यास कोलशेवाडी पोलीसांकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - सोनसाखळी लंपास करणाऱ्या एका चोरट्यास कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. प्रितम जाधव असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून  कोलशेवाडी पोलीसांनी ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशवाडी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेजवळ फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन एका इसमाने खेचून तो कल्याण रेल्वे ट्रॅक च्या दिशेने पळून गेला असल्याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रितम जाधवला अटक केली. आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची चेन हस्तगत केली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पो. निरी प्रशासन खबाजी नाईक यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि. संदिप भालेराव, पोहवा. वाघ, जाधव, कदम, पोशि. सोनवणे, इंगळे यांनी केली आहे.

केमिस्ट असोसिएशन मार्फत मुदत बाह्य व न वापरलेल्या औषधांचे होणार संकलन - श्री. जगन्नाथ (अप्पा) शिंदे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण येथे अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्या हस्ते 'पर्यावरण वाचवूया - औषधांचा गैरवापर टाळुया ! या संकल्पनेतून मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेल्या औषधांचे संकलन व त्यांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिता टेक बँक या कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी 'शपथ घेऊ या, मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांनी होणारी पर्यावरण हानी टाळू या' असे सांगितले. गुरुवार १० तारखेला कल्याण येथील केमिस्ट भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल ट्रक स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन द्वारे नुकतेच मे २०२५ मध्ये सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना एक्सपायर तसेच न वापरलेल्या औषधांचे शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिताचे परिपत्रक आणि विस्तृत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्यासोबत केमिस्ट असोसिएशनच्या सहभागातून पर्यावरणाला तसेच समाज, आरोग्याला घातक ठरणाऱ्या एक्सपायर व शिल्लक औषधींच्या शास्त्रीय विल्हेवाट करणे विषयीच्या मार्गदर्शक तत्वानुसार 'महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन' हे प्रत्येक केमिस्ट सभासदाकडे ग्रीन ड्रॉप बॉक्सची सोय ग्राहकांकरता करणार असल्याचे जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.

कल्याण शहरात सुमारे ८०० व ठाणे जिल्ह्यात जवळपास ५००० औषध विक्रेत्यांचे मेडिकल दुकाने आहेत. मुदतबाह्य औषधामुळे प्रदूषण होऊन, मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. प्रत्येक मेडिकलमध्ये मुदतबाह्य औषध साठवणुकीसाठीची सोय केली आहे. सदर कार्यक्रमाला ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष देशमुख, सचिव व पदाधिकारी तसेच अनेक लेखांमध्ये ग्राहकांची जनजागृती करणाऱ्या प्राध्यापिका मंजिरी घरत, सागर कुलकर्णी उपस्थित होते.

शिंदे गटाने सुचवीला महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला, अजितदादांची अडचण होणार ?

प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुंबई : प्रताप सरनाईक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी महापौरपदाच्या निवडीविषयीही भाष्य केले आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एकूण २९ महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. चव्हाण यांच्या याच विधानावर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते प्रताप सरनाईक यांनी महायुतीत महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला समोर आणला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नव्या विधानानंतर आता अजितदादांची अडचण होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा महापौर..

प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या निवडणुका आणि महापौरपद यावर भाष्य केले आहे. हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता. तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिलं पाहिजे. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाला महापौरपद मिळाला पाहिजे ही महायुतीची सूत्रे असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली हे सरकार उत्तम काम करत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

महायुतीत प्रतिनिधीत्त्व कसे दिले जाते ?

आम्ही आगामी निवडणुका महायुतीतच लढवणार आहोत. हे ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती, पूर्वीपासून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून येत होते, त्या पक्षाचा महापौर, द्वितीय स्थानावर ज्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला उपमहापौरपद तसेच तृतीय स्थानावर असलेल्या पक्षाला स्थायी समितीचे अध्यक्षपद, अशा प्रकारचे महायुतीत वाटप केले जाते, अशी माहितीही त्यांनी दिली.

तीन नेते जो निर्णय घेतील ते..

मात्र शेवटी आम्ही किती काहीही बोललो तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे, असेही सरनाईक म्हणाले. तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांनी मला फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही वावरत आहात. तुमच्या कार्यपद्धती योग्य प्रकारे होती की नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे मतही सरनाईक यांनी मांडले.

ड्रग्स तस्करीवर प्रताप सरनाईक काय म्हणाले ?

गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर हे मराठीच्या मुद्द्यामुळे चर्चेत आहे. याच मीरा भाईंदरमधील ड्रग्स तस्करीवरही सरनाईक यांनी भाष्य केले. मीरा-भाईंदर शहर काही प्रयोगशाळा नाहीये. इकडे ड्रग्स माफिया घुसलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय चाललेला आहे. काही लोकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरसुद्धा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. आरोपीसह 58 पुड्या ड्रग्स पोलीस स्टेशनला नेऊन देण्यात आल्या. त्यानंतरही त्या पुड्यांसह आरोपीला पोलिसांनी सोडून दिलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा असे तीन पक्ष आहेत. मुंबईत भाजपा आणि शिवसेनेची ताकद आहे. असे असताना मुंबईत ज्याचे जास्त नगरसेवक किंवा ज्याचा अगोदर महापौर होतो, त्याचाच महापौर असा फॉर्म्यूला ठरला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१४ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गमित्राने बलात्कार करून तिला गरोदर करत झाला फरार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

भिवंडी : वर्गात शिकणाऱ्या मित्रानेच १४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याने पीडिता २ महिन्यांची गरोदर राहिल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वर्गमित्र नराधमाने पळ काढला आहे.

एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय वर्गमित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे अल्पवयीन पीडिता दोन महिन्याची गरोदर राहिल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून १४ वर्षीय वर्गमित्रावर अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी प्रसार माध्यमांना दिली.

घरी कोणी नसताना मैत्रिणीवर केला बलात्कार

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी भिवंडी तालुक्यातील अंजूर गाव परिसरात कुटुंबासह राहत आहे. तर तिचा १४  वर्षीय वर्गमित्र याच गावात कुटुंबासह राहत असून दोघंही गावाजवळ असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहेत. दोघात मैत्री असल्यानं एकमेकांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं. त्यातच मे महिन्यात शाळेला सुट्टी असताना तसेच घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मित्राने पीडित विद्यार्थिनीला बहाण्यानं आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर पीडितेवर वर्गमित्राने बलात्कार केला. दरम्यान पीडित विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचार सुरू असताना पीडित विद्यार्थिनी दोन महिन्याची गरोदर असल्याचं समोर आल्याने तिच्या कुटुंबाला धक्काच बसला.

बालिका गर्भवती असल्याचं कळताच मुलगा फरार

पीडितेच्या कुटुंबानं ११ जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचं कथन करताच १४ वर्षीय वर्गमित्रावर भारतीय न्याय संहिता कलम 64 (2) (उ ) 65 (1) सह पोक्सो कायद्याचं कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबने यांच्याशी संपर्क साधला असता, "पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून १४  वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलगा फरार झाला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश महादावाड करीत आहेत," असं त्यांनी यावेळी सांगितले.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजने मध्ये सावळा गोंधळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र सरकार तर्फे महिलांची आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून २१ ते ६० या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी २८ जून २०२४ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनातील १२,७२,६५२ लाभार्थी अपात्र ठरल्याने तसेच या योजनातील सगळेच व्यवहार अधांतरी असल्याने आणि राज्य सरकार याबाबत कोणतीही पारदर्शकता अवलंबत नसल्याने या संपुर्ण योजनेचे लेखापरिक्षण करण्याची मागणी नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्याचे महालेखापाल (वाणिज्य) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णय २८ जून २०२४ नुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे संनियंत्रण आणि आढावा घेण्याकरीता राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली होती. परंतु, शासनाने ३ जुलै २०२४ रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हास्तर समितीवर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांना अध्यक्ष करुन संबंधित जिल्ह्याचे मंत्री यांना सह अध्यक्ष करण्यात आले तर सदर समितीचे अध्यक्ष असलेले संबंधित जिल्हाधिकारी यांना सदस्य सचिव बनविण्यात आले. म्हणजेच लाभार्थींच्या निवडीला अंतिम मंजुरी देण्याचे सक्षम अधिकार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हातात देण्यात आले. या सुधारित शासन निर्णयानुसार लाभार्थ्याची यादी मंजुर करण्याचे अधिकार प्रशासनाकडे न ठेवता ते सरकारी मंत्र्यांच्या हातात आल्याने या योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असल्याची शक्यता आहे. संबंधित जिल्हा पालकमंत्री आणि जिल्ह्याचे मंत्री यांनी मंजुर केलेल्या लाभार्थींच्या पात्रतेची कोणतीही  शहानिशा न करता १४ ऑगस्ट २०२४ रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला आणि आजतागायत तो नियमीत देण्यात येत आहे. शासनाच्या संबंधित शासन निर्णय आणि सुधारित शासन निर्णय यांचे अवलोकन केले असता त्यामध्ये लाभार्थ्याची अंतिम यादी राजकीय हस्तक्षेपाने मंजुर झाली असल्याने त्यात मोठा घोळ झाला असण्याची शक्यता असल्याने आपण माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये २३ जानेवारी २०२५ रोजी संबंधित योजनेच्या नस्तीचे परिक्षण, लाभार्थ्याची यादी, मंत्रिमंडळाने मंजुर केलेल्या इतिवृत्ताची प्रत आणि जिल्हानिहाय लाभार्थ्याची संख्या उपलब्ध करुन देण्याबाबत माहिती मागितली असता त्याबाबत मला जनमाहिती अधिकारी, महिला आणि बालविकास विभाग यांनी आजतागायत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आपण केंद्रिय माहिती अधिकार अधिनियम २००५, नियम ५(२) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी, महिला आणि बालविकास विभाग यांच्याकडे १८ मार्च २०२५ रोजी अपिल दाखल केले.मात्र, दाखल केलेल्या अर्जावर आजतागायत कोणतीही सुनावणी आणि उत्तर मला महिला आणि बालविकास विभागाने न दिल्याने आपण केंद्रिय माहिती अधिकार अधिनियम २००५, नियम १९(३) अन्वये द्वितीय अपिल राज्य मुख्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई खंडपीठ, यांच्या १३ मे २०२५ रोजी दाखल केले आहे. ३ जून २०२५ रोजी वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार‘ लाडकी बहिण' योजनेत आत्तापर्यंत एकुण १२,७२,६५२ लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. जर जून २०२४ ते मे २०२५ पर्यंत या अपात्र लाभार्थ्याना प्रत्येकी १५०० रुपये प्रतिमाह देण्यात आले असतील तर त्यांना आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींचे वाटप राज्य सरकारने डोळे झाकून केले आहे. सदर पैसा जनतेचा असून त्याचे वाटप चुकीच्या पध्दतीने होत असल्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेतील लाभार्थ्यांची पुर्णतः चौकशी होणे गरजेचे असून, त्यासाठी लेखापरिक्षण होणे महत्वाचे आहे, असे संतोष जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे आत्ता कोणत्या वर्षाच्या सुनावण्या सुरु आहेत, याबाबत माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत २१ मे २०२५ रोजी माहिती मागितली असता सद्यस्थितीत राज्य माहिती आयोगाकडे सन २०२१-२२ या वर्षाच्या द्वितीय अपिलावर सुनावणी सुरु असल्याचे कळविले आहे. याचा अर्थ मी दाखल केलेल्या द्वितीय अपिलांवर २०२७-२८ पुर्वी सुनावणी होणे शक्य नाही आणि त्यामुळे  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण'  या योजनेतील अनियमितता बाहेर येणे शक्य नाही. माहिती अधिकार अधिनियमांतर्गत २१ मे २०२५ रोजी प्रधान सचिव अर्थविभाग, यांच्याकडे सन २०२३-२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद करण्यात आली होती, या योजनेसाठी कोणकोणत्या विभागाचा निधी अनुदान वाटपासाठी वळविण्यात आला याची माहिती मागितली असता, जनमाहिती अधिकारी वित्त विभाग यांनी माझा अर्ज जनमाहिती अधिकारी, महिला आणि बालविकास विभाग, मंत्रालय यांच्याकडे हस्तांतरीत केल्याचे मला ३ जून २०२५ रोजी कळविले आहे. या योजनेचे पुरस्कर्ते महिला आणि बालविकास विभाग याबाबत कोणतीही माहिती जनतेला देऊ इच्छित नाही. राज्य माहिती आयोगाकडे केलेली द्वितीय अपिले सन २०२७-२८ पुर्वी सुनावणीसाठी येणे कठिण आहे. या मोठ्या कालावधीत शासनाचा निधी म्हणजेच जनतेचा पैसा वारेमाप अपात्र लाभार्थ्यावर उधळला जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत १२,७२,६५२ लाभार्थी अपात्र ठरल्याचे वर्तमानपत्रांतील वृत्तावरुन दिसत आहे. सदर आकडा प्राप्तिकर विवरण पत्राशी लाभार्थ्यांची पडताळणी केल्यास कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतील सगळेच व्यवहार अधांतरी असल्याने आणि राज्य सरकार या योजनेबाबत कोणतीही पारदर्शकता अवलंबवत नसल्याने संपुर्ण योजनेचे लेखापरिक्षण राज्याचे महालेखापाल (वाणिज्य), यांचेमार्फत होणे गरजेचे असल्याने व्यापक जनहितार्थ आणि राज्याचे भविष्यातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी  सदर योजनेचे विशेष लेखापरिक्षण तातडीने हाती घ्यावे आणि यातील आर्थिक अनियमीततेला वाचा फोडावी, अशी विनंती निवेदनात संतोष जाधव यांनी राज्याचे महालेखापाल (वाणिज्य), यांना केली आहे.

अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच, युनिट-५ ठाणेकडुन जेरबंद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे : कासारवडवली पी.स्टे.गुन्हा नोंद कांक ६५५/२०२५ कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-५, वागळे, ठाणे कडुन करण्यात येत होता. नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले बाबत कळवा पोलीस स्टेशनं येथे गुन्हा नोंद क्रमांक ५९२/२०२५ कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर गुन्ह्याचा राखोल तपास करण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सपोनि. शरद पाटील, सपोउनि. राजेंद्र चौधरी, पोना. बंडगर, तेजस ठाणेकर, पोशि. यश यादव, असे एक पथक तयार केले. सदर पथकाने नमुद मयत अल्पवयीन मुलगी दि.०४/०७/२०२५ रोजी रहात्या घरातुन निघुन गेली त्यावेळेपासुन सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी केली असता सदर मुलगी ही घरातुन निघुन ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टॅण्ड येथे असल्याचे दिसुन आले, त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता सदरची अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसुन गेल्याचे दिसून आले. सदर माहितीच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रीक तपासामध्ये रिक्षा चालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचे आढळुन आले. त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेवुन रिक्षाचालक समाधान अर्जुन सुर्यवंशी, (वय: ४० वर्षे), व्यवसाय: ऑटो रिक्षा चालक, राहणार: सुखशांती चाळ, आंबेडकर पुतळ्याच्या जवळ, लोकमान्यनगर, पाडा नं. ३, ठाणे पश्चिम याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निषन्न झाल्याने त्यास दि.१०/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कासारवडवली पोलीस स्टेशनं कडुन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ.पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त शोध-१ (गुन्हे) श्री. शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक-५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, शरद पाटील, पोउपनिरी तुषार माने, स.पो.उप.निरी. चौधरी, पो.हवा. निकम, शिंदे, कार्ले, रावते, पालांडे, काटकर, पाटील, जाधव, मपोहवा. गिते, महाले, पो.ना. गार्डे, बंडगर, ठाणेकर, पो.शि. शेडगे, शिकारे, यादव या पथकाने यशस्वीपणे केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'गुरू शिष्य' परंपरा जपणारी "गुरूपौर्णिमा" भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिविली : गुरू पौर्णिमा म्हणजे आषाढ शुक्ल व्यास पौर्णिमा. गुरू वीण कोण दाखवी वाट.. अशा गुरुंचा वरदहस्त शिष्यावर असणे म्हणजे त्रिभुवनात संजीवनी मिळाल्यासारखे आहे. दिनांक १० जुलै, गुरुवार रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा, वंदे मातरम विद्यामंदिर, कनिष्ठ व पदवी महाविद्यालय तसेच नागपूर
 (दावसा) स्थित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा इथे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून मोठ्या उत्साहात गुरु पौर्णिमा साजरी केली. योगायोग असा की गुरुवार हा गुरूंचाच वार असून "गुरु पौर्णिमा" देखील याच दिवशी संपन्न झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी यांनी महर्षी वेद व्यास व सरस्वती पूजन करून  कार्यक्रमांना सुरुवात केली. इयत्ता आठवी मधील विभूती धसाडे या विद्यार्थिनीने आपल्या गायनतून गुरू वंदना सादर केली. संपूर्णतः कार्यक्रमाची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी उचलून घेतली होती. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व शिक्षकांचे शाळेच्या प्रवेशद्वारात त्यांचे पाय धुवून पाद्य पूजन केले, औक्षण करून व फुलांचा वर्षाव करत मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये वाजत गाजत सर्वांचे स्वागत केले. 
अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांना व्यासपीठावर स्थानापन्न करून स्वतः विद्यार्थांनी हस्त कलेने बनवलेले मुकुट मान्यवर आणि सर्व शिक्षकांच्या मस्तकावर परिधान केले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली "गुरु हमारे मन मंदिर मे.. गुरु हमारे प्यार" हे गुरु गीत सादर करून सर्व शिक्षकांना मानवंदना दिली. त्यानंतर नाट्य व नृत्य शिक्षक प्रमोद पगारे, अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु द्रोणाचार्य व एकलव्य हे नाटक नृत्य सादर केले. तर प्रांजल मिश्रा आणि अर्णव अंबिके या विद्यार्थ्यांनी गुरू शिष्य कथा सांगितली. शिशु विहारच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांचे पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन  फुले वाहून, ओवाळून त्यांच्या पाऊलांची पूजा केली. वंदे मातरम महाविद्यालयात सौ. खुशबू दुबे, प्रमोद गुप्ता व प्राचार्य डॉ. नाडर, उपप्राचार्या वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व विद्यार्थी काव्या कट्टी, श्लोक साळवी,  अनुज तिवारी, शिव श्याम यादव यांनी पुढाकार घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य अलपेश खोब्रागडे उपप्राचार्य चौधरी व विद्यार्थी सोबत आंचल पटवा, सोफिया, अवनीश पटवर्धन, पार्थ चोणकर यांनी भाग घेवून गुरुपौर्णिमा साजरी केली. 
जे एम एफ संस्थेचे २०२५ हे वर्ष 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. त्याच अनुषंगाने गुरू पौर्णिमा निमित्त जे एम एफ संस्थेची इमारत रांगोळ्या, फुलांनी सजवण्यात आली. शाळेतील इयत्ता नववी, दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेला हा कार्यक्रम पाहून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे भारावून गेले. व सर्वांचे मनापासून कौतुक केले.
सर्व प्रथम आपला आत्मा हा आपला गुरू आहे, गुरू हा कधीही वाईट मार्ग दाखवत नाही, म्हणून आपले मन, आपला आत्मा आपल्याला कधीही वाईट मार्गावर जाऊ देण्यास प्रतिबंध करत असतो म्हणून तो आपला गुरू आहे, आपले आई वडील हे प्रथम आपले गुरू आहेत, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक सजीव हा आपला गुरू असतो, कारण प्रत्येकाकडून काही ना काही आपण शिकतच असतो आणि त्यातूनच बोध घेत असतो असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले, आयुष्यामध्ये चढ उतार करत असतानाच यश अपयशाचे चटके, टक्के टोणपे खात असताना जो हात हातात घेऊन आपल्याला दिलासा देतो तो  गुरुंचा हात म्हणजे आपले गुरू होय. केवळ शिकवणे , शिकणे म्हणजे गुरू नाही तर येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव हा देखील आपला गुरु आहे, असे संस्थापकानी आपल्या भाषणात नमूद केले.
ब्रह्मांड रचिता ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती मधील स्वतः दत्त गुरु महाराजांनी चोवीस गुरु केले होते. मुंगीला देखील त्यांनी गुरु मानले, सर्व सजीवांमध्ये मुंगी हा असा जीव आहे की तो कधीही झोपत नाही, अविरतपणे आणि चिकाटीने कार्य करणे हे मुंगीचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच दत्त गुरुंनी मुंगीला आपले गुरू मानले, अशी गुरु शिष्यांची बरीच उदाहरणे देऊन सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना गोष्ट देखील सांगितली व गुरू पौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या. 
सर्व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व फळ देऊन गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन इयत्ता दहावी मधील इव्हा शॉ व सार्थक भाईंबीड या विद्यार्थ्यांनी केले तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान दिले.