BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या ३८ वर्षांच्या निरंतर सेवेला नागरिकांचा सलाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली शहरात गेल्या ३८ वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची ३८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रातील नागरिक तसेच त्यांचे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी त्यांच्या उपस्थित मान्यवर व रुग्णांसमोर त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यालय प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री. प्रकाश माने यांनी  डॉ. ढाके यांच्या सेवाभावी वृत्ती, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता आणि कमी खर्चात दर्जेदार उपचार देण्याच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी श्री. प्रकाश माने यांनी सांगितले की, "वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रदीप ढाके." गेल्या ३८ वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना योग्य उपचार व आरोग्याविषयी मार्गदर्शन करून समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रदीप ढाके आणि कुटुंबीयांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि डॉक्टरांच्या मार्फत अशीच निरंतर समाजसेवा करण्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. 
या शुभप्रसंगी शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा समन्वयक तथा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री. विजय देशमुख साहेब, शिवसेनेच्या डोंबिवली शहर उपसंघटक सौ. प्रतीक्षा प्रकाश माने, टिळक नगर सुयोग गल्लीतील हरी मुकुंद सोसायटीचे पदाधिकारी श्री. महाजन साहेब, श्री. महापदी साहेब, डोंबिवलीतील ज्येष्ठ समाजसेविका माननीय श्रीमती मालती ताई साटम, कल्याण रोडवरील एकरूप सहकार मित्रमंडळाचे पदाधिकारी, तसेच डॉक्टर प्रदीप ढाके यांच्या आरोग्य विषयक कार्याला दिवस-रात्र हातभार लावणारे यामध्ये त्यांचा स्टाफ श्री. रघुनाथ कांबळे, सौ. प्रियांका गायकर, सौ. मनीषा गरुड, सौ. सोनल पिस्ते, दर्शन सोनावणे, नागेश पवार, पुनम जाधव तसेच उपचारासाठी व काही खास कार्यक्रमासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आनंदाने उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत अवतरली संताची मांदियाळी.. अवघी दुमदुमली पंढरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर -  देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, पंढरपूर मध्ये लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले असतानाच 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी,पालक उपस्थित राहून विठ्ठलाच्या नामघोषात दंग झाले.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांचे 'जे एम एफ' मंडपम मधे आगमन झाले, त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व बाल वारकरी विद्यार्थी एकत्र आले. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरती करण्यात आली. बाल वारकऱ्यांनी तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव, अशा अनेक संतांच्या वेशभूषा करून आलेले विद्यार्थी म्हणजे साक्षात संतांची मांदियाळीच अवतरली आहे असे भासत होते.
ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या हृदयात भक्ताचा वास आहे त्याच प्रमाणे आपल्या हृदयात देखील विठ्ठलाचा वास आहे पण त्यापेक्षाही माणुसकीचा ठेवा असणे अधिक गरजेचे आहे, आज लाखो वारकरी अनवाणी पायाने पंढरपूरला चालत जात आहेत त्यांची सेवा करणे किंवा "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.." असे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, त्याच भक्तीभावाने सेवा केली तर त्यांच्याच रूपाने विठ्ठल तुम्हाला तिथेच भेटणार आहे असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले तर अप्रतीम वेशभूषा करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या स्वतःलाच विसरून जात आहोत, म्हणून स्वतःला शोधण्यासाठी अध्यात्माचा मार्ग हा सुलभ आहे, ज्याप्रमाणे भक्त पुंडलिकाने स्वतःला स्वतःमध्ये शोधून त्याच्या भक्तीने पांडुरंगाला प्रसन्न करून घेतले तसे तुम्ही देखील अंतर्मनात असलेल्या प्रश्नांना अध्यात्माच्या आधारे सोडवून त्या परमात्म्याला जवळ करा आणि आनंदी रहा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी दशेत असलेले बालरूप हे निरागस रूप असते, म्हणुनच आज विठ्ठल रुक्मीणी, साधू संतांच्या वेशभूषा मधे आलेले हे विद्यार्थी म्हणजे साक्षात पांडुरंग रुक्मिणचे अंशच दिसत आहेत असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटले.

संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी  व विद्यार्थ्यांच्या तबल्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांनी अभंग सादर केला तर सर्व शिक्षकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावले थिरकली. दिंडी सोहळ्यामध्ये माऊलींची पालखी हे मोठे आकर्षण होते सर्वच जण उत्साहात ब्रह्मनादात सहभागी झाले होते. शिशु विहारच्या बालकांनी पांडुरंगाची गाणी गाऊन रिंगण सोहळा केला. " याची देही याची डोळा पाहिला माऊलींचा सोहळा ".. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भक्ती भावाने सेवा करून आषाढी एकादशीचा सोहळा पार पाडला तर नितेश मेस्त्री यांनी पांडुरंगाचे चित्र रेखाटन केले व नरेश पिसाट यांनी सजावट केली. अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सौ.मयुरी खोब्रागडे, यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे  फोटो व्हिडीओ काढण्याची ची जबाबदारी अखिल नायडू, जय लखारा, निखील शिंदे, तांडुलकर, त्यांच्या चमूने पार पाडली.

बेकायदा औषध विक्री दिसल्यास त्वरित तक्रार करा; एफडीए चा टोल-फ्री क्रमांक जाहीर..

प्रतनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात बेकायदा औषध विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू ठेवली आहे. विनापरवाना औषध व सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या १५ ठिकाणी छापे टाकून २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींप्रकरणी ८ ठिकाणी कारवाई करत २.२७ लाखांची औषधे जप्त करण्यात आली, तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांवरही मोठी कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा विक्रीची माहिती तात्काळ एफडीए च्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

केडीएमसीचा तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी भव्य ‘किन्नर महोत्सव २०२६' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर ऍड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने काल दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या 'किन्नर महोत्सव २०२६' या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. 
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, डॉ. सान्वी जेठवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे  आभार मानले.

यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, डॉ. सान्वी जेठवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

पलावा शहरात प्रथमच 'अनिल आय हॉस्पिटल' मध्ये अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्षाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

काटई पलावा – पलावा शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 'अनिल आय हॉस्पिटल' येथे अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्ष (Eye OT) चे उद्घाटन माननीय श्री. राजू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
पलावा परिसरातील हा पहिलाच सुसज्ज नेत्र शस्त्रक्रिया कक्ष असून, आता मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना तसेच इतर नेत्रविकारांवरील शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पलावा व परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
'अनिल आय हॉस्पिटल'मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अनुभवी नेत्रतज्ज्ञ आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित, अचूक आणि गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णकेंद्रित सेवा, अत्याधुनिक उपचारपद्धती आणि परवडणारी आरोग्यसेवा हे रुग्णालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय श्री. राजू पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पलावा परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. त्यांनी आरोग्यसेवेत अशा आधुनिक सुविधा उभारणाऱ्या अनिल आय हॉस्पिटलच्या कार्याचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने डॉ. अनघा अनिल हेरूर यांनी सांगितले की,_"पलावा आणि परिसरातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घराजवळच जागतिक दर्जाची, सुरक्षित आणि विश्वासार्ह नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया कक्ष (Eye OT) मुळे रुग्णांना अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील."_
उद्घाटन समारंभास मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि रुग्णालयाचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपर्क:
अनिल आय हॉस्पिटल
पलावा , डोंबिवली (पूर्व)
मो.: 8652001781

जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई; उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याणचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण, ता. २ जुलै : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत देण्यात आली होती.

परिवहन विभागाने कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD. या संस्थेची HSRP बसविण्यासाठी नियुक्ती केली असून, वाहनधारकांनी <https://hsrpmhzone2.in> या पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्यावी.
परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार १ जुलै २०२६ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, ३० जून २०२६ पर्यंत HSRP बसविण्यासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) नूतनीकरण, वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/उतरविणे, दुय्यम आरसी, ना-हरकत प्रमाणपत्र (NOC), वाहनातील बदल यांसह विविध वाहनविषयक सेवा HSRP बसविल्याशिवाय उपलब्ध होणार नाहीत. तसेच वायुवेग पथकाने जप्त केलेली वाहनेही HSRP बसविल्यानंतरच सोडण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

वाहनधारकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी तातडीने HSRP बसवून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी केले आहे.

मोठागाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्याची आमदार राजेश मोरे यांची कल्याण-डोंबिवली आयुक्तांकडे मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा-वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) बांधकामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाला गती द्यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन केली.
संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाण पुलाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन सादर करून निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या.

मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठागाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाबही समोर येत आहे.

स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंजुरी मिळूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता, संबंधित कामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले.

मोठागाव रेल्वे उड्डाणपूल साकार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा  डोंबिविलीकरांकडून व्यक्त केली जात आहे.