BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपच्या रितू तावडे तर उप महापौर पदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा बिनविरोध शिक्कामोर्तब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून, अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम ३७ (१) अन्वये महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत म्हणजे शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षांकडून रितू राजेश तावडे आणि संजय शंकर घाडी यांचे क्रमशः महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची तर उप महापौर पदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामकाज सांभाळले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोन्हे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे व उप महापौर संजय घाडी यांचे पुष्पगुच्छ प्रदान करुन अभिनंदन केले.

पॅनल क्र. २१ मधून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना म्हात्रे यांनी केला विकास कामांचा शुभारंभ..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली, दि.१० फेब्रुवारी –  भारतीय जनता पार्टीची पॅनल क्र. २१ मधून उमेदवारी मिळवत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांनी विकास कामांना जोरदार सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २१ मधून त्या विजय मिळवत निवडून आलेल्या आहेत. १५ जानेवारी ला मतदान १६ जानेवारी निकाल लागला आणि लगेच कामाला सुरुवात करत, जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी खरी उतरेन, असे म्हणत त्यांनी निवडणुकीनंतर कोणत्याही पर्यटन स्थळी फिरायला जाण्याऐवजी जनतेची काम करण्यास पसंती देत कामाला सुरुवात केली.

पहिलं काम त्यांनी जनतेच्या सुविधेसाठी एक ऍम्बुलन्स स्वखर्चातून चालू केली आहे. शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयामध्ये हृदयविकारावर कोणताही उपचार नसल्यामुळे अशा रुग्णांना शिवाजी हॉस्पिटल कळवा किंवा परळ ला केईएम सारख्या ठिकाणी उपचारासाठी न्यावं लागतं. इतका लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्या पेशंटच्या जीवाला दगा फटका न होता तो सुरक्षित रुग्णालयापर्यंत पोहोचावा यासाठी, कार्डियाक ॲम्बुलन्स ही खूप गरजेची असते म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रभागासाठी सुरू केली आहे. 

रुग्णांना उपचार हे आपल्या इथे डोंबिवली मधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्व नगरसेवकांच्या मदतीने सर्वच सर्जरी केल्या जातील याचा प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच "सुभाष रोड" चे डोंबिवली स्टेशन पासून नवापाडा चौक पर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. गटार असेल त्यावरील चेंबर, रोडच्या बाजूला असलेले पादचारी रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू केले आहेत. 

पाण्याच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून गणेश घाट येथील, २.५० लक्ष मिली लिटर जलकुंभाचे काम ८०% पूर्ण झाले, पुढील चार ते पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन लवकरच या जलकुंभामुळे डोंबिवली पश्चिमेतील जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र तोपर्यंत डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांच्या स्वखर्चातून ज्या ठिकाणी जुन्या विहिरी आहेत त्या विहिरी स्वच्छ करून त्या विहिरीतील पाणी नागरिकांना वापरासाठी पुरवण्यात येत आहे.

कसारा जलद लोकलचा दिवा थांबा रद्द करण्याची प्रवासी संघटनेची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कसारा जलद लोकलचा दिवा स्थानकातील थांबा रद्द करावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या सर्व लोकलला दिवा स्थानकात थांबा दिल्याने अधिक प्रमाणात गर्दी होत आहे. दिवा, ठाणे स्थानकात उतरण्याचा दरवाजा एकाच दिशेला येत असल्याने प्रवाशात भांडणे होत आहेत.

संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी ही मागणी करत सांगितले की, प्रवाशांमध्ये अशा घटना वाढत असून, आता त्या शाब्दिक बाचाबाची, हाणामारीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. नव्याने येणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, दिव्यांग, महिलांना ठाणे स्थानकात उतरणे आणि चढणे अत्यंत कठीण आणि जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. भविष्यात ही स्थिती अशीच राहिली तर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होऊन उद्रेक होईल.
कळवा-मुंब्रा मार्गावर गेले सर्वाधिक बळी

डोंबिवली-कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सर्वाधिक लोकलमधील प्रवासात बळी गेले आहे. दोन्ही स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी पारसिक स्थानक पुन्हा सुरू करा, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सिद्धेश देसाई यांनी केली आहे. त्यांनी नव्या ठाणे स्थानकापेक्षा पारसिक स्थानक व्हावे असे म्हटले आहे.

माणकोली उड्डाण पुलावर 'रेस' लावणाऱ्यांना विष्णूनगर पोलीसांचा मोठा दणका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील माणकोली-मोठागाव ठाकुर्ली उड्डाणपुलावर रेस लावून स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना विष्णूनगर पोलीसांनी मंगळवारी चांगलाच दणका दिला. मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितांकडून दंड वसूल करून पुन्हा असे प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पीयूष म्हात्रे (२१), वेदांत सावंत (१८), प्रदीप ढाकणे (२१) या वाहनचालकांसह रेसिंगचा व्हिडिओ तयार करणारे विशाल विश्वकर्मा (२१), कृष्णा विश्वकर्मा (१९) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्रामवर मैत्री करून संबंधितांनी कार, जीप रेसिंसाठी व्हॉट्सऍपवर एक ग्रुप तयार केला होता. त्या सर्वांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

भाजप नगरसेवकाची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

माणकोली उड्डाणपुलावर सुरू असलेल्या जीवघेण्या रेसिंग स्टंटबाजी प्रकरणी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने थेट ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे तक्रार केली होती.

विष्णूनगर पोलीसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना दंड ठोठावत तंबी दिली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे यांचे पथक आणि डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे पथक यांनी ही कारवाई केली.

कोपरमधील विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून अपघाती मृत्यू..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.१० फेब्रुवारी - बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीतील कोपर येथे राहणारा सोहम सचिन कठरे हा विद्यार्थी बारावीची परीक्षा देण्यासाठी कळवा येथील मनिषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जाणार होता. यासाठी तो कोपरहून कळव्याला जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होता.

दरम्यान, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमधून पडून सोहमचा अपघाती मृत्यू झाला. लोकलमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विकास कामे मिळविण्यासाठी केडीएमसीच्या नव्या महापौरांना ठेकादारांचा गराडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारी पार पडली. नव्या महापौर पदी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल चौधरी या विराजमान झाल्या. महापौर झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच कामकाज सुरु केले. त्यांनी कामकाज सुरु केल्यापासून त्यांना ठेकेदारांनी गराडा घातला आहे. विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग सुरु झाली आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहेत, अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येते. 

महापालिकेच्या निवडणूक २०१५ साली झाली होती. त्या वेळच्या सदस्यांची मुदत २०२० साली संपुष्टात आली. निवडणुकीची मुदत संपली तेव्हा कोरोना महामारी सुरु होती. त्यामुळे राज्यात कोणत्याही महापालिकेत निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूकही झाली नाही. गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीत आयुक्तांच्या अधिकारात विकास कामांना मंजूरी दिली गेली. आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन कोरोना काळात आरोग्य सोयी सुविधांकरीता लागणारी खरेदी असो किंवा अन्य विकास कामे यांना मंजूरी दिली गेली.

त्यामुळे त्यावर राजकीय पदाधिकारी यांचा वचक नव्हता. गेल्या पाच वर्षात ठेकेदारांना कामे मिळाली. मात्र त्यांना कामे देण्याचा अथवा नाकारण्याचा सर्वस्वी अधिकार हा आयुक्तांचा होता. गेली पाच वर्षे ठेकेदारांवर प्रशासनाचे नियंत्रण कामे वाटपाच्या बाबतीत होते. आत्ता निवडणूक होताच कामे होतील अशा ठेकेदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे कामे मिळविण्याकरीता ठेकेदारांनी नवनिर्वाचित महापौराना गराडा घातला आहे. ठेकेदारांचा राबता महापौरांच्या केबीनमध्ये वाढला आहे. विकास कामे पदरात पाडून घेण्यासाठी महापाैरांच्या दालनात काही मंडळी जास्त प्रमाणात ये-जा करीत आहेत. महापालिकेती ठेकेदारी ही काही विशिष्ट ठेकेदारांच्या हाती आहे. त्यांच्याशिवाय अन्य ठेकेदारांचा पत्ता हालत नाही. त्यांना कामेही मिळत नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊनच महापौरांनी या संदर्भातील निर्णय घेणे अपेक्षित आहेत. त्यातही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे विकास कामांची कंत्राटं घेण्यासाठी आघाडीवर असतील हे विरोधकांनाही चांगलेच ठाऊक आहे.

एसटीच्या ताफ्यात लवकरच राजमाता जिजाऊ बस..

प्रतिनिधी:अवधुत सावंत

मुंबई - शिवशाही, शिवनेरीनंतर आता एसटीची 'राजमाता जिजाऊ' बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ही नवीन बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागू नये यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी नव्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभ्या राहिलेल्या राजमाता जिजाऊ या प्रेरणास्थान आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या या नव्या बसेसना 'राजमाता जिजाऊ' असे नामकरण करण्यात आले आहे.

सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसची आसन क्षमता ४० इतकी आहे. मात्र, नवीन 'राजमाता जिजाऊ' बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसून प्रवास करू शकतील. यामुळे अतिगर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करणाऱ्या अतिरिक्त १५ प्रवाशांना आता बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. दोन शहरांमधील मुख्य मार्गांवर ही सेवा प्राधान्याने सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे.

या नवीन बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतील. या बस भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत तयार करण्यात आल्या असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. केवळ नावच नाही, तर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बस प्रवाशांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यापासून प्रवाशांना या नवीन आणि आरामदायी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.