सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली पोलीसांच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४ नंतर पोलीस कार्यालये व पोलीसांची निवासस्थाने यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात आला. राज्यात २,००,००० पोलीस असून गेल्या १० वर्षात पोलीसांसाठीच्या ९४,००० निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यात आताच्या काळातील लोकसंख्येला अनुरुप पोलीस ठाणी, पोलीस मुख्यालये, पोलीस अधिकारी - कर्मचारी व इतर व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे. मागील काळात राज्यात जवळपास ४०,००० पोलीसांची भरती करण्यात आली असून यापुढेही पोलीस भरती सुरुच राहणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन्सची सुविधा करण्यात येत आहे. राज्याने ६० दिवस किंवा काही गुन्ह्यांत ९० दिवस अशा विहित कालावधीच्या आत चार्जशीट दाखल करण्याची क्षमता प्राप्त केली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात ‘रेट ऑफ कन्व्हिक्शन‘मध्ये ५०% पर्यंत वाढ झाली असून ते ७०-७५% पर्यंत न्यायचे आहे. देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर महाराष्ट्राने तयार केले आहे. अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स मोहीम’ सुरु करण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी CCTNS-2 प्रणाली आणत आहोत, ऑनलाईन FIR ची व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे, स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क सर्वत्र तयार करण्यात आले आहे. याचा उपयोग सामान्य माणसाला दिलासा देण्याकरिता करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, आ.सुधीर गाडगीळ, आ.सुरेश खाडे, आ.सत्यजित देशमुख, आ.गोपीचंद पडळकर, आ.अमल महाडिक, पोलीस गृहनिर्माण विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा