BREAKING NEWS
latest
Featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.२६ – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज, दि. २६ जानेवारी, २०२६ रोजी साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.
मिशन भरारी' अंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना विमानवारीची संधी

मिशन भरारी  उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांच्या केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा परीक्षांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी व मार्च २०२६ दरम्यान देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असून, या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमानवारी करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा व नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी 'मिशन भरारी' उपक्रमाचे कौतुक करत, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

'ग्लोबल इंग्लिश स्कूल'मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२६ जानेवारी : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर 'ग्लोबल इंग्लिश स्कूल'मध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी व 'दक्ष पोलीस टाईम्स' चे संपादक किरण सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलीस ठाण्याचे सपोनि. वसंत खतेले, अमोल कोळेकर आणि राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरेंची साथ सोडणाऱ्या महिला नेत्याच्या गळ्यातच महापौर पदाची माळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२२ : मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाला आरक्षण जाहीर झालं आहे. यानंतर आता भाजपच्या काही महिला नगरसेवकांचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. ठाकरे गटाला केवळ ६५ जागांवर यश मिळालं. तर भाजपला ८९ जागांवर यश मिळालं. भाजप हा मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा मुंबईतील क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत २९  जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबई महायुतीला ११६  जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतसाठी ११४ जागांची आवश्यकता होती. पण महायुतीला त्यापेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. पण तरीही महापौर पदाच्या सोडत पर्यंत भाजप आणि शिवसेनेला धाकधूक होती. कारण महापौर पदाची सोडत ही एसटी प्रवर्गासाठी असती तर सत्ताधारी पक्षांचे त्या प्रवर्गातील उमेदवार जिंकून आलेले नाहीत. केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे एसटी प्रवर्गातील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आणि ठाकरेंच्या शिलेदाराच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगली होती.

यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या महिला नेत्याच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. खरंतर भाजपकडे तब्बल ४९ महिला नगरसेविका जिंकून आल्या आहेत. यापैकी अनेक महिला नगरसेवकांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. तसेच महापौर पदाची सोडत ही सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमधील राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शितल गंभीर, योगिता सुनील कोळी यांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आहे. पण असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेत एकेकाळी काम केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचंदेखील नाव मुंबईच्या महापौर पदासाठी चर्चेत आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काही महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. पण त्यांचा फेब्रुवारी २०२४ मध्ये निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत. स्वत: तेजस्वी घोसाळकर या दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून गेल्या आहेत. तसेच पतीच्या निधननंतर मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली होती.

तेजस्वी घोसाळकर हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला होता. पण काही दिवसांनी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेजस्वी घोसाळकर या दहीसर येथील वॉर्ड क्रमांक २ येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय अनुभव पाहता भाजपकडून त्यांची मुंबई महापालिकेच्या महापौर पदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. असं असलं तरी भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला तर वेगळ्याच चर्चेत नसलेल्या चेहऱ्यालाही महापौर पदाची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.

दिव्यात आशेची किरणे उगवत ठाणे महापौरपदासाठी दिपक जाधव यांचे नाव आघाडीवर..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२२ जानेवारी – ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जाती (एस सी) साठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक २८ मधील एस सी आरक्षित जागेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक दिपक जाधव यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिपक जाधव हे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापालिकेतील अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कामकाजामुळे ते पक्षातील विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवा–शीळ विभागातून शिवसेनेचे १० तर भाजपचा १ नगरसेवक निवडून आल्याने या विभागात शिवसेना भक्कम स्थितीत असल्याचे चित्र आहे. दिव्यातील २७,२८ आणि २९ हे प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातात. 

दरम्यान, अनुभवी नगरसेवक दिपक जाधव यांची ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यास दिवा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व नागरी समस्यांवर प्रभावी निर्णय घेणारे नेतृत्व दिव्याला मिळावे, अशी दिव्यातील नागरिकांची इच्छा आहे.

महापौरपदाचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून होणार असला, तरी सध्याच्या घडीला दिपक जाधव यांचे नाव जोरदार चर्चेत असून, त्यांच्या संभाव्य निवडीकडे दिवा परिसराचे लक्ष लागले आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक १८/०१/२०२६ रोजी ०५.५६ वाजताच्या सुमारास साई पान शॉप समोर, फुटपाथवर, इंन्टरसिटी मॉलचे बाजुला, वागळे इस्टेट ठाणे (पश्चिम) येथे विधीसंघर्षित बालक नामे अबक राहणार: मु.खजुरिहा कला, तहसिल: रामनगर राजापुर, जिल्हा: चित्रकुट, रहेपुरा पोलीस ठाणा, राज्य: उत्तर प्रदेश हा दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकुण २,१४,०००/- रु किंमतीचा माल अवैधरित्या विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या विनापरवाना हत्यारे कब्जात बाळगुन ठेवले असतांना सापडल्याने त्या  विधीसंघर्षित बालक नामे अबक याचेविरुध्द वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक, ठाणे हे  करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, मा.श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, मा. श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२. गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, पोहवा. ठाकूर, शिंदे, जाधव, गायकवाड, पोशि. शेजवळ, मपोशि. भोसले यानी केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये साकारला गेला 'प्रतिकृती काला घोडा' महोत्सव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२० - कला आणि संस्कृतीचा संगम असणारे शहर म्हणजे मुंबई. सर्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकारांना वाव मिळवून देणारा 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन दर वर्षी मुंबई येथे होत असते. त्याचीच प्रतिकृती डोंबिवली शहरांमधील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये दिनांक २० जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय प्रांगणात 'काला घोडा महोत्सव' मोठ्या दिमाखदार रीतीने पार पडला.
 एक आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणारी 'जे एम एफ' संस्था म्हणजे उभरत्या कलाकारांना कलेचे दालन उघडून देणारे प्रवेशद्वारच होय. दिनांक १९ जानेवारी रोजी 'जे एम एफ' रोजगार मेळाव्याचे (जॉब मेळा) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ३३ कंपन्या व ३५० च्या वर उमेदवार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या संकल्पनेतून 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सरस्वती, नटराज व गणेश पूजन करून व पाहुण्यांचे स्वागत करून संस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या व कलाकार श्रीमती बॉस्की मॅडम यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले.
'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील अनेक विध्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीने अनेक प्रकारचे प्रकल्प   हस्तकलेने बनवून आणले होते तर हस्तकलेने रेखाटलेले चित्रफलक (कॅनव्हास पेंटिंग) हे काला घोडा महोत्सवाचे खास आकर्षण होते .  त्याच बरोबर हस्तकलेने तयार केलेला काला घोडा देखील संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा करण्यात आला होता.संपूर्ण महोत्सव हा चल चित्राने साजरा होत होता. 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळेमधील इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी  कु. अर्णव डोंगरे सुबक रित्या गणपती बाप्पाचे चित्र रेखाटत होता तर मूर्तिकार मग्न होऊन मूर्ती घडवण्याचे कार्य करत होते, हातावर मेहंदी काढणे, चित्र काढून त्यामध्ये रंग भरण्यात सगळे कलाकार मग्न झाले होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती बॉस्की मॅडम यांनी देखील संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे चित्र रेखाटले .
कलात्मक शिक्षिका दीपा तांबे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, अभिषेक देसाई, नरेश पिसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व मुलांनी काला घोडा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेऊन नाविन्य पूर्वक प्रकल्प बनवले. संपूर्ण ब्रह्मा रंगतालय प्रांगण हे विविध कलात्मक साहित्याने भरून गेले होते. ब्रह्मा रंगतालयाच्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी आणि उभरते कलाकार गायक शिक्षक नितेश मेस्त्री यांनी नाट्यसंगीत सादर करून इयत्ता चौथी मधील व जाई या विद्यार्थिनीने नाट्य संगीतावर आपल्या कथक नृत्यातून गणेश वंदना सादर केली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक सादर केले. तसेच पदवी महाविद्यालय चे प्रोफेसर श्री.योगेश शिरसाट यांनी वासुदेवाचे रूप धारण करून "वासुदेव आला".. हे नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता तिसरी चौथी मधील विद्यार्थ्यांनी गायन करून आपली कला सादर केली तर इयत्ता सातवी मधील कार्तिक या विद्यार्थ्याने उत्कृष्ट तबला वाजवून सर्व उपस्थितांना आनंद दिला. सौ.कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षिकानी काव्य वाचन सादर केले.
'जन गण मन' शाळा व्यतिरिक्त डोंबिवली मधील अनेक बाहेरच्या शाळांनी या महोत्सवाला हजेरी लावून आनंद घेतला. कला ही माणसाला जिवंत ठेवते तर कलाकार हा आपल्या कलेतून इतरांना जिवंत ठेवतो असे सांगत असतानाच, अंगी कला असणारा माणूसच केवळ जगण्याची कला साध्य करू शकतो, असे सांगत संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे पुढे म्हणाले की, कलाकार हा नेहमी पैशापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा भुकेलेला असतो, कोणत्याही कलाकाराला मनापासून दाद मिळाली की ती दाद त्याच्या मध्ये असलेल्या अंतर्गत भावने पर्यंत  पोहचते, आणि त्याची कला तप्त सोन्या प्रमाणे निखारते. खरोखरच अभिमान वाटतो की आज हे कलादालन केवळ एकाच कलेने भरलेले नाही तर यामध्ये असंख्य कलांचा संगम आहे. हस्तकला, चित्रकला, तैलचित्र, रांगोळ्या, मेहंदी सारख्या या कलांचा संगम म्हणजे कलाकारांना दिलेली मानवंदनाचं होय असेही उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सहभागी कलाकारांना पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
'काला घोडा'  हे जरी महोत्सवाचे नाव असले तरी आमच्या शाळेतील मुलांची घौडदौड ही एखाद्या चेतक घोड्याप्रमाणेच आहे, आणि म्हणूनच नवनवीन प्रकल्प सादर करताना उत्साह आणि आनंद हा द्विगुणित होत असतो असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. सर्व उपस्थितांनी रेलचेल असणाऱ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. खजिनदार जान्हवी कोल्हे, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काला घोडा प्रदर्शनाला भेट देऊन मनोमन आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौं. श्रेया कुलकर्णी व प्रो.एकनाथ चौधरी यांनी केले तर वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दिव्यातील पूर्वेकडील मध्य रेल्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवावे अशी प्रवाशांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत असून दिवा शहराची ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती पूर्वेला आहे. असे असूनही या स्थानकातील पूर्वेचे तिकीटघर रात्री नऊ वाजता बंद होत असल्याने त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेला जावे लागते.

मात्र पश्चिमेला असणारे तिकीटघर हे मुंबई दिशेकडे असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते. यामुळे रात्रीच्या वेळेस विशेषतः महिलांना त्रास होत असल्याने पूर्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

मार्चपासून पत्रीपुलाच्या तिसऱ्या पुलावरून होणार वाहतुकीचा सुखकर प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : पत्रीपुलाच्या तिसऱ्या उड्डाणपुलावरून वाहतूक महिनाभर विलंबाने सुरू होणार असून जे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आता ते मार्चमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो पूल जानेवारी अखेर काम पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात खुला केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत, तांत्रिकदृष्ट्या ती कामे पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या पुलासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला होता, त्या पुलाचे ३६.६ आणि ४० मीटर अशा दोन भागात गर्डर टाकण्यात आले होते. पुलाची लांबी १०९ मीटर असून त्या पुलाची मागणी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खा. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीने त्यास मंजुरी दिली. नव्या पुलामुळे वाहतूककोंडी कमी होणार असून समांतर रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक होते. त्यानुसार आधीचा उड्डाणपूल तयार झाल्यावर तिसरा उड्डाणपूल होणे आवश्यक होते.

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात वसलंय दिवा शहर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

निवडणूक काळात व त्या आधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील १५ अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या.

दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देत सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केली आहे. ठोस कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर कल्याण मध्ये महापालिका निकालानंतर जीवघेणा हल्ला.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील कैलासनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. अंबादास कांबळे असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून जखमी अंबादास कांबळे यांना हल्ल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते अंबादास कांबळे यांना जीवघेणी मारहाण झाली. किरण पावशे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. किरण पावशे हा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

स्थानिक नागरिकांनी जखमी अंबादास कांबळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे निवडणूक निकालानंतरही राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी अंबादास कांबळे यांनी आरोप करताना म्हटलं की 'किरणने जातीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. निवडणुकीत शिंदे गटाचं काम केल्याने मारहाण केली. त्याने लोखंडी फायटरने एकट्यानेच मारहाण केली.

भाविकांच्या सेवेत आजपासून मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१८ : कल्याणमधील श्री मलंगगडावर आता भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर  सुरू झाली आहे. रविवारी भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या फ्युनिक्युलर सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणं अधिक सोपं, सुरक्षित आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कंपनीकडून भाविकांसाठी दोन दिवस ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री मलंगगड यात्रेच्या आधीच आता भाविकांच्या सेवेत फ्युनिक्युलर सेवा यंदा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठी सोय होणार आहे.

हा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली आणि अखेर यंदा २०२६ मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे.

मलंगगडावर, हाजी मंगलला कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. जाण्यासाठी अंदाजे २६०० पायऱ्या चढून वर गडावर जावं लागतं. हा गड चढण्यासाठी जवळपास २तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून सुरू झाल्याने हे २ तासांचं अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून जाता येईल. या सुविधेच्या देखरेखीसाठी ७० जण असून १२० जण यातून प्रवास करू शकतात, अशी माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सेवेला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. श्री मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मलंगगडावर जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागत असे, ज्यामुळे अनेक भाविकांना त्रास होत असे. आता या फ्युनिक्युलर सेवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही सहजपणे गडावर जाता येणार आहे. या सेवेमुळे मलंगगडावरील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

काय आहे फ्युनिक्युलर सेवा ?

फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे, ट्रॉली सारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे-पुढे अशा दोन गाड्या एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे.

या फ्युनिक्युलर सेवेसाठी पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकार्पणाच्या वेळी अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला शिंदे गटाचे खासदार आणि पदाधिकारी अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे भव्य स्वरूपात उद्‌घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.१८ - ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटलच्'या ठाणे शहरातील दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन आनंद भवन सोसायटी, भक्ती मंदिर रोड, तीन हात नाका, नेक्सा शोरूमच्या वर,  ठाणे येथे आज मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडले. या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाच्या  उद्‌घाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे लाडके लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवेचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री.निरंजन डावखरे यांनी देखील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात मा. श्री.नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणेकरांसाठी सुरू झालेल्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी ठाणे शहरातील नगरसेवक, नामवंत डॉक्टर, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ठाणे शहरासाठी सर्वोत्तम, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा देण्याचा आमचा संकल्प पुढेही तितक्याच निष्ठेने सुरू राहील.”
ठाणे येथील हे नवीन रुग्णालय 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवाविस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून, ठाणेकरांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक नवा विश्वास निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १६ जानेवारी - महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारे सोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.

भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.

देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम "निवडणूक सिद्धता" म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.

शिवसेना-महायुतीच्या पाठीशी नेहमीच दिवेकर भक्कमपणे उभे - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

विशेष प्रतिनिधी

दिवा - “शिवसेना-महायुतीच्या नेहमीच दिवेकर पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत जे काम करण्याचे वचन दिले ते पूर्ण केले आहे. दिवा शहराचा कायापालट करून, तुम्हाला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. भविष्यात दिवा ते सीएसटी लोकल सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, दिव्यातील विविध विकासकामे सुरू असून, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे शिवसेना महायुतीचेच आहेत, त्यामुळे पुढील काळात दिवा शहराचा अधिक आणि वेगाने विकास होईल", असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेने प्रतिपादन केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिव्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा येथे शिवसेना-भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिव्याच्या कायापालटाचा उल्लेख करत आगामी काळात 'दिवा ते सीएसटी' विशेष लोकल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिवा शहरात गेल्या दहा वर्षांत झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा देण्यात आला. दिवा-शीळ मार्गाचे काँक्रीटीकरण, दिवा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांसाठी वाढविण्यात आलेल्या सुविधा, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत दिवा येथील स्थानकाचे सुरू असलेले काम, क्लस्टर पुनर्विकास योजना, भुयारी गटारी योजना, आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, महापालिकेच्या शाळांचा विकास, प्रशस्त पोलिस स्टेशन, डम्पिंग ग्राउंड हटविण्याचा निर्णय आणि आरोग्य सुविधांमधील सुधारणा यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

दिवा शहराचा बदल अधोरेखित करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी दिवा केवळ गाव स्वरूपात होता. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि रेल्वे स्थानकाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून उतरावे लागायचे. आज दिवा स्थानकाचा कायापालट झाला असून सुरक्षितता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.”  दिवा शहरात मोठ्या गृहसंकुलांचा विस्तार होत असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ येथे मंजूर करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदाहरण देत, भविष्यात दिवा शहरातही असे प्रकल्प उभारले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवा स्थानकावर फास्ट व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि तिकीट खिडक्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. भविष्यात कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही दिव्यात थांबतील, तसेच दिवा-सीएसटी विशेष लोकल सुरू होणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा स्किल सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा ते सात महिन्यांत ते सुरू होणार आहे. भविष्यात दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवा शहरात आगरी-कोळी वारकरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अग्निशमन केंद्र, पोलिस स्टेशन, तलाव सुशोभीकरण, परिवहन सेवा आणि महापालिकेच्या शाळा उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प मंजूर झाल्याने, भविष्यात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पूर्णतः सुटणार असल्याचेही सांगण्यात आले.

दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ चे शिवसेना-भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, आदेश भगत, दिपाली भगत, स्नेहा पाटील, प्रभाग क्रमांक २८ मधील रमाकांत मढवी, साक्षी मढवी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे तसेच प्रभाग क्रमांक २९ चे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील, अर्चना पाटील आणि वेदिका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी शिवसेना-महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.

सभेच्या शेवटी १५ जानेवारी रोजी धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. “काम करणारा पक्ष आणि काम करणारे सरकार हे महायुतीचेच आहे. पुढील काळात दिवा शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्लस्टर पुनर्विकास योजनेचे सर्वेक्षण ९५% पूर्ण, लवकरच काम सुरू होणार

क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ही योजना म्हणजे केवळ घर नव्हे, तर सर्वांगीण विकास आहे. धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात एकाचवेळी १३ क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत. दिवा शहरातही ९५ टक्के सर्वे पूर्ण झाला असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.”

आम्ही दहा वर्षांत दिलेला शब्द पाळला - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

"प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष लोकांसमोर येतात. मुंबईच उदाहरणं, आज मराठीच्या नावावर एकत्र आलेले आहेत, पण २५ वर्षांत काय केलं ते त्यांनी सांगितलेलं नाही. उलट पुढे काय करणार ते सांगण्यासाठी लोकांच्या समोर जात आहेत. पण आम्ही १० वर्षांत दिलेला शब्द पाळला आहे, हे अभिमानाने सांगतो” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.

'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा भव्य क्रीडा सोहळा १० व ११ जानेवारी रोजी संपन्न झाला असून डोंबिवली व परिसरातील ३५ शाळांमधील ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोळ हे मुख्य अतिथी म्हणून लाभले, तर RPSF १२वी बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्री. दाहाके आणि इन्स्पेक्टर दिनेश कुमार यांनी मान्यवर म्हणून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रायोजक Galaxy IEC India Pvt Ltd चे संचालक रोटेरियन विजय अव्हाड, Union Bank चे DBM अतुल शिंदे तसेच स्वच्छता भागीदार Sumeet Elkoplast तर्फे श्री. सानू वर्गीज यांनीही कार्यक्रमाला आपली उपस्थिती देऊन उपक्रमाला बळ दिले.
RPSF ग्राउंडवर ऍथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉर, कानविंदे हॉलमध्ये बॅडमिंटन (व्हेन्यू पार्टनर : नॅशनल यूथ ऑर्गनायझेशन), डोंबिवली स्पोर्ट्स अरेना टर्फवर फुटबॉल आणि रोटरी भवन येथे बुद्धिबळ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय क्लब अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई आणि प्रोजेक्ट चेअरमन विवेक गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २१ जानेवारी रोजी रोटरी भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.११ : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मेळावा आज सकाळी ११ वाजता दिवा–आगासन रोडवरील दळवीनगर मैदानात उत्साहात पार पडला. या प्रवेशामध्ये मनसेचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच शाखा अध्यक्ष अशा विविध पदांवरील कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवसेनेच्या धोरणांवर विश्वास ठेवत आणि महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महायुतीचे नेते, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात “शिवसेना जिंदाबाद”, “महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

मोतीराम दळवी, उपशहर अध्यक्ष मनसे, दिलिप गायकर, विभाग अध्यक्ष मनसे,कुशाल पाटील, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, अर्पित पोळ, वैष्णव दळवी, विदयार्थी सेना विभाग अध्यक्ष मनसे, नितिन आदवडे शाखा प्रमुख मनसे, विकी भगत शाखा प्रमुख मनसे, विशाल भिडे, निखिल पाटील, वेदांत दळवी, विशाल शिंदे, दुर्वेश दळवी, राहुल नाईक, संदिप शिंदे, सचिन गायकर, कौस्तुभ गायकर, चित्रा दळवी महिला आघाडी, चैतन्या दळवी, चैताली दळवी, ममता शिंदे, दिक्षा माने, जागृती जोशी इत्यादींनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत दिवा परिसरात शिवसेना–महायुतीची ताकद आणखी मजबूत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या मेळाव्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

मतदान यंत्रणा पूर्ण तयारीत असून दि. १५ जानेवारी रोजी मतदान करून नागरिकांनी बजवावा आपला मतदानाचा अधिकार - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - गुरुवार दि.१५ जानेवारी २०२६ रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी आज मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेसमयी केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे समन्वय अधिकारी बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकुण १५४८ मतदान केंद्र असून, एकुण ९ ठिकाणी स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ ते ९ यांच्या अधिनस्त असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी होणार आहे. महापालिकेने मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रदर्शित केलेली आहे. तसेच एकुण ११८२ मतदान केंद्रस्त‍रीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत वोटर स्लिप चे वितरण करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी पूर्णपणे सज्ज असून, या निवडणूकीसाठी एकुण १७०  झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ सीयु आणि उमेदवारांच्या संख्येनुसार बीयु उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, मतदान केंद्रामध्ये नागरीकांना आपले मोबाईल फोन नेण्यास मनाई आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी मतदान व मतमोजणी दिवशी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची/बंदोबस्ताची माहिती विषद केली. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी, मतदानाचे दिवशी व मतमोजणीचे दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहील अशीही माहिती त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.

डोंबिवली पाश्चिमेकडील प्रभाग क्र.२५ मधील मनसे पुरस्कृत उमेदवार शैलेश, मनीषा, पूजा धात्रक यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा नागरिकांनी केला संकल्प..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २५ (अ) मधून सौ. मनीषा शैलेश धात्रक २५ (ब) मधून पूजा शैलेश धात्रक व २५ (क) मधून शैलेश रमेशचंद्र धात्रक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदान मागत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ते संवाद साधत आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. 

शैलेश रमेशचंद्र धात्रक व मनीषा धात्रक हे कुटुंब गेली अनेक वर्ष या प्रभागाचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, गटारे, नाले सफाई, मुबलक  पिण्याचे पाणी या सुविधा नागरिकांना नियमित दिल्या आहेत तसेच इतर सामाजिक कामे देखील केलेली आहेत व विकासकामांची गंगा प्रभागात वाहत आहे. मनीषा शैलेश धात्रक यांनी सांगितले की प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेले अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कल्याण-डोंबिवलीला आनंदी शहर करायचं आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली परिसरात विविध प्रकल्प राबविले जात असून अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरांना आनंदी शहर बनवायचं असल्याचे सांगत कोणी कितीही करूद्या दावेदारी महायुतीच राखणार कल्याणची सुभेदारी असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर आयोजित विजय संकल्प सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील आदींसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर पहिला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकी नंतर आता महापालिका निवडणुकीत चौकार षटकार मारायचा आहे. विरोधकांचा सुपडा साफ करायचा आहे. ६० हुन अधिक नगरसेवक निवडून येऊन विजयाची नांदी सुरू झाली आहे. काही लोकं फक्त टीका टिपण्णी करतात, दुसऱ्यांचा आधार घेऊन काही लोकं मला बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत. आपल्यावर कितीही टीका झाली आरोप झाले तरी या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. 

काहींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. घरी बसून सरकार चालवता येत नाही.  लोकांणा सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. काही लोकं मुंबईकडेच लक्ष लावून बसले आहेत. काहींचा डोळा मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीवर असून आमचा डोळा मुंबईच्या विकासावर आहे. निवडणूक आली की मुंबईतील मराठी माणूस विरोधकांना आठवतो.   
कल्याण हे मुंबईचे शॉकऍपजोबजर आहे. मुंबईचा भार हे उपनगर सांभाळत आहेत. पाच वर्षात कल्याण हे आघाडीचे शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कल्याण-डोंबिवली धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केल्या जातीलअडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. सर्वसामान्याचा विकास, शहरांचा विकास झाला पाहिजे यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामे केली जात आहेत. 

कल्याण ऐतिहासिक नगरी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात येथून झाली त्याचे स्मारक केलं आहे. ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट. लोकांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मी प्रतिपादन करतो.रखडलेले पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिव्यातील साबे गावात महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार..

विशेष प्रतिनिधी

दिवा : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र.२९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी आमदार निरंजन डावखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रभाग क्र.२९ मधील २९ (अ) मधून अर्चना पाटील, २९ (ब) मधून वेदिका पाटील आणि २९ (क) मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच प्रभाग क्र.२९ मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.