BREAKING NEWS
latest
Featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शालेय विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीच्या 'रोटरी डाऊनटाउन क्लब' तर्फे धावण्याची स्पर्धा आयोजित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने शालेय विद्यार्थ्यांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. डोंबिवली शहरातील सुमारे १४० शाळांमधील एकूण २,१०० विद्यार्थ्यांनी या धावण्याच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. इतर मान्यवरांमध्ये आमदार श्री. राजेश मोरे, श्रीमती. सुलभा गायकवाड, रोटेरियन श्री. हर्ष मोकल तसेच होली एंजल शाळेचे मुख्याध्यापक श्री. बिजॉय ओमेन यांचा समावेश होता.
वंचित मुलांसाठी बालरोग हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला अनेक संस्थांकडून मोठा पाठिंबा मिळाला. रुस्तमजी ग्रुप, फेडरल बँक, डेकॅथलॉन आणि डोंबिवली शहरातील १५ हून अधिक संस्थांनी आपले मौल्यवान योगदान दिले.
गेल्या वर्षी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने केलेल्या अशाच निधी संकलनाच्या प्रयत्नांमुळे मुरबाडमध्ये चेक डॅम बांधणे शक्य झाले होते. त्याच भावनेला अनुसरून, या वर्षीच्या स्कूल रनमधून उभारलेला निधी लहान मुलांसाठी जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी समर्पित केला जाईल असे आयोजक रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या रोटेरियन ऍनी बिजॉय यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवलीत भाजपा-शिवसेनेत तणाव; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांसमोर शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीमधील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. डोंबिवली पश्चिम भागातील कुंभारखाणपाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनामुळे वातावरण तापले होतं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि घोषणाबाजीने दणानून सोडत परिसरात राजकीय शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात राजकीय तणाव वाढल्याचं पाहायला मिळाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला की शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या स्वागताचे बॅनर जाणूनबुजून झाकण्यात आले. त्यामुळे उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपामध्ये वाद झाला. उद्घाटनासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्याचवेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेसमोर घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

उद्घाटनासारख्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळं तणावनाची परिस्थिती निर्माण झाली होती. अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केलं. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. भाजपा कार्यकर्ते शिवसेनेविरोधत कुरघोडी करणार असल्याच बोललं जात आहे. या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बैठकीत व्यस्त असल्याचं कारण देत प्रतिक्रिया दिली गेली नाही.

आरोपीस २४ तासाचे आत अटक करत देसाई गावच्या खाडी पुलाचे खालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १२.५५ वा. नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गावकडुन कल्याणकडे जाणारे रोडवर देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजच्या खाली एका बॅगेमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे बिट मार्शल २ वरील अंमलदार यांनी खात्री करुन पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्याप्रमाणे लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलीस पथकाने सदर ठिकाणी भेट देवुन पाहणी केली असता तेथे खाडीचे पाण्यातील मातीचे भरावावर एक ट्रॉली बॅग पडलेली दिसुन आली. त्यामध्ये एका २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह पाय गुडघ्यात दुमडुन ट्रॉली बॅगमध्ये भरलेला व अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मयत महिलेचे अंगात गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांची डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगिन्ग्स घातलेली होती. तिचे डावे हाताचे मनगटाजवळ पी.व्ही.एस. असे इंग्रजीमध्ये गोंदलेले होते. तसेच प्रेत फुगलेले व अर्धवट कुजलेले होते. सदर मयत महिलेचे नातेवाईक किंवा परिचीत संपडलेले नाहीत. त्यावरुन दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १३.१५ वा. पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी महिलेस अज्ञात कारणावरुन कश्याने तरी जिवे ठार मारून प्रेत ट्रॉली बॅगमध्ये भरुन सदर ठिकाणी प्रेत ट्रॉलीबॅगसह पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने देसाई खाडी ब्रिजखाली फेकुन दिलेले असल्याबाबत शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. ९५५/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), २३८ प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध तपासकामी अधिकारी / अंमलदार यांचे चार तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या बातमीद्वारे एका साक्षीदाराकडून मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना प्राप्त उपयुक्त माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीताबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातुन कसोशीने शोध घेवुन सदर गुन्ह्यात आरोपी नामे विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय: ५० वर्षे) राहण्याचे .ठिकाण. देसाईगाव, ता. जि: ठाणे, मुळगाव-गोरखपुर, उत्तरप्रदेश यां lस देसाई येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील मयत महिला नामे प्रियांका विश्वकर्मा (वय: २२ वर्षे) ही आरोपीसोबत मागील ०५ वर्षापासुन राहावयास होती. त्याच्यात दिनांक २१/११/२०२५ रोजी रात्रौ आपसात भांडण झाले होते. आरोपी याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला ट्रॉली बॅगमध्ये भरुन एक दिवस रुममध्येच ठेवले होते. मयत महिलेच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्यानंतर दिनांक २२/११/२०२५ रोजी रात्रौ ११.३० ते १२.०० वा. चे दरम्यान प्रेत असलेली ट्रॉलीबॅग रोडने पायी चालत खाडी पुलाकडे घेवुन जावुन सदरची ट्रॉलीबॅग पुलावरुन खाली फेकुन दिली होती. मयत व आरोपीताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना सोशल मिडीयामध्ये प्रसारीत झालेल्या बातमीच्या आधारे साक्षीदार मिळवून, हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास करुन सदर गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून आरोपीस सदर गुन्ह्यात २४ तासात अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.

सदरची कामगिरी श्री. सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ठाणे, श्री. प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ वागळे इस्टेट, श्रीमती प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्री. श्रीराम पौळ वपोनि. शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सपोनि. संतोष चव्हाण, अनिल राजपुत, योगश लामखडे, शहाजी शेळके, अमोल पोवार, पोउपनिरी. माने, बेळगे, तिडके, पोह. श्यामकुमार राठोड, हनुमंत मोरे, भरत जाधव, तेजस परब, विश्वास मोटे, महेंद्र लिंगाळे, सचिन कोळी, अजय साबळे, रमेश पाटील, विक्रांत कांबळे, पोना. मंदार यादव, महेंद्र पाटील, पोशि. संदीप बोरकर, सुशिल पवार, ललीत महाजन, जयेश येळवे, रत्नदिप चौधरी, अक्षय पाडळे, स्वप्निल सोनवलकर, वाहीद तडवी, विजय खाडे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

ठाकुर्ली पुलाच्या बॅनरबाजीच्या राजकीय वादावरून शिवसेना (शिंदे) गट आणि भाजप आमनेसामने..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबीवली, दि.२६ नोव्हेंबर - ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) गट आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू असून, त्याची ठिणगी आता कल्याण- डोंबिवलीत पडल्याचे चित्र आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना (शिंदे) गटाने भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांना पक्षप्रवेश करून ‘फोडाफोडी’ची सुरुवात केल्यानंतर, भाजपनेही कल्याण-डोंबिवलीत पक्षप्रवेशाचा धडाका लावत प्रत्युत्तर दिले होते.

याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकुर्ली पुलावरून दोन्ही पक्षांमध्ये नवा वाद उफाळून आला आहे.
ठाकुर्ली पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर शिवसेना (शिंदे) गटाकडून बॅनरबाजी करत खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख “फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देणारा विकासाचा योद्धा” असा करण्यात आला होता. यावर भाजपकडून तात्काळ प्रत्युत्तर देत माजी नगरसेविका रेखा चौधरी, प्रमिला चौधरी, खुशबू चौधरी आणि साई शेलार यांच्या वतीने प्रतिउत्तरात्मक बॅनर लावण्यात आले. या बॅनरमुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

भाजपने थेट सवाल उपस्थित करत विचारले की, “हा पूल व्हावा यासाठी आ. रविंद्र चव्हाण सुरुवातीपासून प्रयत्नशील असताना, शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार आणि पालिकेच्या चाव्या त्यांच्याच हाती असतानाही आजवर प्रशासकीय मान्यता का मिळाली नाही?” इतकेच नव्हे तर “विकासाचा योद्धा” ही उपाधी वास्तवात कल्याण- डोंबिवलीच्या विकासासाठी ‘स्पीडब्रेक’ ठरत नाही ना, अशी बोचरी टीकाही भाजपने केली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) गट पुढील पाऊल कोणत्या दिशेने टाकतो आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात भाजप कसे प्रत्युत्तर देतो, याकडे कल्याण- डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय वादाची ही ठिणगी आणखी पेटणार की थंडावणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा 'ही-मॅन वीरू' काळाच्या पडद्याआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा 'ही-मॅन वीरू' काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री पवार, आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. 

'शोले', 'चुपके चुपके', 'अनुपमा', 'सत्यकाम', 'दिल्लगी' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः 'शोले' मधील त्यांनी साकारलेली 'वीरू'ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळवले होते. त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयामुळे त्यांना 'हिंदी सिनेमा'चा 'ही-मॅन वीरू' म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मेंद्र यांना भावनापूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

१५ बारबाला सहित २८ जणांवर गुन्हा दाखल करत परिमंडळ-३ उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाचा 'ताल' बार वर छापा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदेशीर आणि अनधिकृतरीत्या चालणाऱ्या लेडीज बारवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ चे अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी धडक कारवाई केली. या मोहिमेअंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ताल रेस्टॉरंट ऍण्ड बार वर छापा टाकला.
गुप्त माहितीच्या आधारे २३ नोव्हेंबर रोजी 'ताल रेस्टॉरंट ऍण्ड बार' वर छापा टाकण्यात आला असता बारमध्ये नियमबाह्यरीत्या जास्त बारबाला ठेवून अश्लील नृत्य सुरू असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान हॉलमध्ये एकूण १५ बारबाला नाचत असल्याचे समोर आले. तसेच बारमालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, पुरुष वेटर्स आणि काही ग्राहक अशा १३ जणांनी या गैरप्रकारांना प्रोत्साहन दिल्याचेही पोलीसांनी नोंदवले.

या सर्व २८ जणांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११७२/२०२५ अन्वये बीएनएस कलम २९६, २२४(२), ५४, ३(५) तसेच डान्स बार बंदी कायदा २०१६ चे कलम ३, ४, ८(१) (२) (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान 'ताल बार' चे मालक, चालक, मॅनेजर आणि कॅशियर अशा एकूण ६ आरोपींना महात्मा फुले पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे करीत आहे. उपायुक्त कार्यालय परिमंडळ-३ च्या विशेष पथकाने बेकायदेशीर व नियमभंग करणाऱ्या लेडीज बारवर सुरू केलेली मोहिम पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरला घुमणार विभागीय खो-खोचा गौरवशाली महासंग्राम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या व धी ऍमॅच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मान्यतेने आणि 'धी.युनायटेड स्पोर्ट्स क्लब', ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सव २०२५ निमित्त कै. जे.पी.कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन २ ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान ठाण्यात करण्यात आले आहे.

युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू कै. जनार्दन पांडुरंग कोळी हे ठाण्यातील पहिले राष्ट्रीय खो-खोपटू होते. विजयवाडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी बजावली होती. त्यांची तीन वेळा राज्य संघात निवड होऊन त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले होते.

या विभागीय स्पर्धेसाठी पुरुष व महिलांच्या प्रत्येकी १६ प्रतिष्ठित संघांना सहभागाची परवानगी तसेच शुभेच्छा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिल्या आहेत. तर स्पर्धेचे निरीक्षण राज्य खो-खो असोसिएशनतर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष दत्तात्रय गोपाळ ठाणेकर आणि विश्वस्त आयोजक हेमंत जयवंत कोळी यांनी दिली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई व मुंबई उपनगरातील दमदार आणि परंपरागत ताकदवान संघांची रंगतदार लढत होणार आहे. 

स्पर्धेत सहभागी पुरुष संघ :
विहंग क्रीडा मंडळ (ऐरोली), ग्रिफीन जिमखाना (कोपरखैरणे), ज्ञानविकास फाउंडेशन (कोपरखैरणे), युवक क्रीडा मंडळ (कल्याण), धी. युनायटेड स्पोर्ट्स क्लब (ठाणे), आनंदभारती समाज (ठाणे), मावळी मंडळ (ठाणे), शिवभक्त क्रीडा मंडळ (बदलापूर), राज क्रीडा मंडळ (बदलापूर), शिर्सेकर्स महात्मा गांधी (मुंबई उपनगर), सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), प्रबोधन क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), श्री समर्थ व्यायाममंदिर (मुंबई), विद्यार्थी क्रीडा केंद्र (मुंबई), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), ओम समर्थ व्यायाममंदिर (मुंबई).

स्पर्धेत सहभागी महिला संघ :
ज्ञानविकास फाउंडेशन (कोपरखैरणे), रा.फ.नाईक महिला संघ (कोपरखैरणे), शिवभक्त क्रीडा मंडळ (बदलापूर), धी.युनायटेड स्पोर्ट्स क्लब (ठाणे), शाहू स्पोर्ट्स क्लब (रबाळे), आनंदभारती समाज (ठाणे), मावळी मंडळ (ठाणे), राज क्रीडा मंडळ (बदलापूर), न्यू बॉम्बे सेंटर स्पोर्ट्स अकॅडमी (घणसोली), शिर्सेकर्स महात्मा गांधी (मुंबई उपनगर), सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), शिवनेरी (मुंबई), श्री समर्थ व्यायाममंदिर (मुंबई), अमरहिंद (मुंबई), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), वैभव क्रीडा मंडळ (मुंबई).

ठाण्यातील खो-खोप्रेमींसाठी तीन दिवसीय ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, कौशल्य, वेग, चातुर्य आणि संघभावनेच्या दुर्मिळ मेळ्याचे दिमाखदार दर्शन घडवणार आहे.

अवयव प्रत्यारोपणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सुप्रीम कोर्ट चे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (मुख्य न्यायमूर्ती भुषण आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन) महत्त्वपूर्ण आदेश दिला. 'इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन' यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला देशभरात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय धोरण व एकसमान नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. या धोरणामुळे सर्व नागरिकांना समान संधी मिळावी, तसेच लिंग, जात, आर्थिक स्थिती यांमुळे होणारी असमानता दूर व्हावी, असा उद्देश असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले की, देशभरात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत मोठी असमानता आहे. काही राज्यांनी 'Transplantation of Human Organs Act, 1994' मधील 2011 दुरुस्ती व 2014 नियम अद्याप स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांना अवयव मिळवताना अडचणी येतात. न्यायालयाने केंद्राला अशा राज्यांना लवकरात लवकर हे नियम स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचे आदेश दिले.

*आदेशातील महत्त्वाचे मुद्दे*

राष्ट्रीय धोरण: सर्व राज्यांसाठी लागू होईल असे एकसमान धोरण तयार करणे.

मॉडेल अलोकेशन निकष: अवयव वाटपासाठी पारदर्शक व न्याय्य निकष निश्चित करणे.

लिंग, जात व आर्थिक भेदभाव दूर करणे: सर्व रुग्णांना समान संधी मिळावी यावर भर.

राष्ट्रीय वेब पोर्टल: अवयव प्रत्यारोपणाची माहिती व नोंदणीसाठी एकसमान पोर्टल तयार करणे.

पाच वर्षांची योजना: सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व NOTTO (नॅशनल ऑर्गन ऍण्ड   टीश्यु ट्रान्सप्लांट ऑरगॅनायझेशन) यांना योजना तयार करण्याचे निर्देश.

जिवंत दात्यांचे संरक्षण: अवयव दान करणाऱ्यांच्या हक्कांचे व कल्याणाचे रक्षण करण्यासाठी मजबूत यंत्रणा उभारणे.

आता १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही लागणार फिटनेस टेस्ट शुल्क..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
नवी दिल्ली, दि. २० : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, आता १० वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेली वाहने जास्तीची फी भरतील तर २० वर्षांपेक्षा जुन्या कमर्शियल वाहनांसाठी ही फी तब्बल दहापट वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे जुनी वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

केंद्र सरकारने जुनी आणि सुरक्षित नसलेली वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाहन फिटनेस टेस्ट शुल्कात दहापट वाढ करण्यात आली आहे. तसेच आता १५ नाही, तर १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही हे शुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी फक्त १५ वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेल्या जुन्यावाहनांकडून शुल्क आकरले जात होते. पण आता ह्या वाहनांची ही वयमर्यादा १० वर्षांवर आणली आहे.

केंद्र सरकारने हा बदल तत्काळ लागू करून वाहनांचे वय आणि प्रकारानुसार १० ते १५, १५ ते २० वर्ष, आणि २० वर्षांपेक्षा जास्त अशा तीन प्रकारात विभागले आहे. यानुसार २० वर्षांपेक्षा जुनी - अवजड कमर्शियल वाहन (ट्रक/बस) रुपये २५ हजार (पूर्वी अडीच हजार), मध्यम कमर्शियल वाहन रुपये २० हजार (पूर्वी १ हजार ८००), हलकी वाहने रुपये १५ हजार, ऑटोरिक्षा रुपये ७ हजार, मोटारसायकल रुपये २ हजार (पूर्वी ६००) तर १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या वाहनांसाठीही फी वाढवली आहे. यामध्ये मध्यम/जड कमर्शियल वाहनांसाठी १ हजार रुपये, हलकी वाहने ६०० रुपये आणि मोटरसायकलसाठी ४०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे.

लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद, मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
ठाणे, दि. २० : मुंबई-शहर आणि उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी मराठी-अमराठी वादाचे अनेक प्रसंग घडून येत आहेत. आज झालेल्या अशाच एका वादावादीत एका मराठी तरुणाने लोकल ट्रेनमध्ये हिंदीमध्ये बोलल्यामुळे मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे निराश होऊन आत्महत्त्या केली आहे. कल्याण पूर्व तिसगांव नाका येथे राहणारा अर्णव खैरे मुलुंडच्या 'केळकर कॉलेज' मध्ये सायन्स शाखेत शिकत होता. १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. गर्दीच्या डब्यात अर्णवने इतरांना बाजूला होण्यासाठी सहज हिंदीत “थोडा आगे हो..” असे म्हटले. एवढ्यावरून काही अनोळखी प्रवाशांनी त्याला घेरले. “मराठी बोलता येत नाही का ?”, “मराठी बोलण्याची लाज वाटते का ?” अशा उलटसुलट प्रश्नांनंतर त्याला बेदम मारहाण केली.

अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेला अर्णव पुढच्या ठाणे स्टेशनला उतरला, भावनिकदृष्ट्या कोसळलेला तो मागील लोकल पकडून मुलुंडला पोहोचला. त्याने कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पूर्ण केले, पण मनात खोलवर बसलेला अपमान आणि भीती त्याला स्वाभाविक राहू देईना. दुपारी तो घरी परतला आणि वडिलांना फोन करून त्याने संपूर्ण प्रसंग सांगितला.

सायंकाळी ७ वाजता वडील जितेंद्र खैरे घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुग्णालयात नेले असता रात्री ०९.०५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिलांच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार दहाव्यांदा विराजमान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पाटना,दि. २० : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला मिळालेल्या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर आज जनता दल (युनायटेड) चे नेते नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते या सोहळ्यास उपस्थित होते. हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी मैदानात हजेरी लावून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात २६ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. मंचावर पीएम मोदींशिवाय अमित शाह, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते. शपथ ग्रहणाआधी जेडीयू च्या अनेक नेत्यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेले. ज्या नेत्यांना फोन गेले, त्यात विजय चौधरी, श्रावण कुमार, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मदन सहनी, जमा खान आणि लेशी सिंह हे नेते आहेत.

भाजपचे ५ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील पाच ज्येष्ठ नगरसेवकांनी थेट भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतप्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळेच आम्ही पक्ष सोडला, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर भाजप मध्ये असंतोष उफाळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उल्हासनगर महापालिकेतील
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

सलग पाच वेळा निवडून आलेले जमनू पुरसवानी हे भाजपचे १९८४ पासूनचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सलग १७ वर्ष उल्हासनगर महापालिकेत गटनेता असलेले पुरसवानी सिंधी समाजातले २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. पुरसवानी यांनी यापूर्वी भाजपचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कंटाळून उल्हासनगरातील भाजपच्या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे ३० कोटींचा आमदार निधी वापराविना पडून राहिला, तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. बाहेरून आलेल्या नेत्यांना पद सन्मान, पण जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान नाही अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरच भाजपमध्ये फुट पडल्याने महायुतीतच उघड संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर युतीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. दरम्यान इतर पक्षांचा पर्याय होता मात्र हिंदुत्व आणि एनडीए मध्ये राहण्यासाठी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराचा ज्या प्रकारे विकास केला तसा विकास उल्हासनगराचा करावा, या विचाराने पाचही ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

देशात पहिल्यांदाच खेळवण्यात येणार इंडियन पिकलबॉल लीग..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली: देशात पहिल्यांदाच इंडियन पिकलबॉल लीग (आयपीबीएल) आयोजित केली जाणार आहे. या शहर-आधारित लीगमध्ये पाच संघ सहभागी होतील. ही लीग १ ते ७ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळवली जाईल. काल लीगच्या पहिल्या हंगामासाठी पाच फ्रँचायझी संघांची घोषणा करण्यात आली. चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघांची नावे आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. भारतातील आघाडीचे पिकलबॉल खेळाडू मिहिका यादव आणि अमन पटेल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता टाईम्स ग्रुपने सुरू केलेली आयपीबीएल ही भारतातील एकमेव पिकलबॉल लीग आहे जिला क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ही लीग इंडियन पिकलबॉल असोसिएशन (आयपीए) द्वारे मान्यताप्राप्त आहे.

शहरातील संघ पहिल्यांदाच पिकलबॉलमध्ये

पिकलबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच, भारतात शहर-आधारित संघ मैदानात उतरले आहेत.

५ संघांची नावे जाहीर

गुरुग्राम कॅपिटल वॉरियर्स
मुंबई स्मॅशर्स
बंगळुरू ब्लास्टर्स
चेन्नई सुपर वॉरियर्स
हैदराबाद रॉयल्स

या लीगमध्ये भारत आणि परदेशातील सर्वोत्तम पिकलबॉल खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळतील. गुरुग्राम पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा लीगमध्ये संघ खेळवत आहे. एम३एम इंडियाचे संचालक पंकज बन्सल म्हणाले, “गुरुग्रामला वेगवान, सामाजिक आणि उत्साही खेळ आवडतात. शहराचा पहिला प्रमुख संघ असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

अदानी ग्रुप ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ म्हणून या लीगमध्ये सामील झाला आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय अदेसरा म्हणाले, “पिकबॉल हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या खेळांपैकी एक आहे. ही भागीदारी उदयोन्मुख प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था तयार करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.”

बीडमध्ये राज्य खो-खो च्या राष्ट्रीय संघ निवडीसाठी १८ ते २१ डिसेंबरला महासंग्राम रंगणार - डॉ. चंद्रजित जाधव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, १८ नोव्हे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बीडमध्ये रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस व नवनिर्वाचित महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.

राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंचा खो-खो कौशल्यदंगल श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बीड येथे पार पडणार आहे. बीड येथे होणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य स्पर्धेतून ५८ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. निवडलेला संघ हैद्राबाद, तेलंगणा येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.  

खो-खो महासंघाकडे नोंदणी केलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज नमुना व गणवेश क्रमांकानुसार यादीचे नमुने १ डिसेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. राज्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्धारित फॉर्ममध्ये माहिती भरून १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत <maharashtrakhokhoassociation@gmail.com> या मेलवर पाठवणे बंधनकारक आहे. हाताने लिहिलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

प्रा. जे. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष - ऋषिकेश शेळके, सचिव - विजय जाहेर यांच्यासह वर्षा कच्छवा, योगेश सोळसे, मनोज जोगदंड, रमेश शिंदे, कैलाश गवते प्रफुल्ल हाटवटे आदी कार्यकर्ते हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत. या स्पर्धेमुळे बीडच्या क्रीडा संस्कृतीला नवा जोश आणि वेग मिळणार असून, राज्यभरातील अव्वल खेळाडूंमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळणार असल्याचे सरचिटणीस डॉ. जाधव यांनी सांगितले.

किरकोळ धक्का लागण्याच्या वादातून तरुणाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  डोंबिवली पूर्व येथील एम.आय.डी.सी. परिसरात 'मालवण किनारा' हॉटेल जवळ घडलेल्या या घटनेत आकाश सिंग या तरुणाची हत्या झाली होती. डोंबिवली पूर्वेतील स्थित मालवण किनारा हॉटेलसमोर शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधून बाहेर पडताना किरकोळ धक्का लागला. त्यानंतर दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेने डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आकाश सिंग असे आहे. तो नवी मुंबई येथे कॉल सेंटरमध्ये काम करत होता. हॉटेलमधून बाहेर पडताना त्याचा एका दुसऱ्या तरुणाला किरकोळ धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून वाद वाढला होता आणि अनुचित प्रकार घडला होता. या प्रकरणात हत्येनंतर नाशिक, मालेगाव, चाळीसगाव येथे लपून बसलेल्या अमर महाजन, अक्षयकुमार वागळे, अतुल कांबळे, निलेश ठोसर, प्रतिकसिंग चौहान, लोकेश चौधरी अशी अटक आरोपींची नावे असून मानपाडा पोलीसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या  आवळून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चार दिवसीय कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल. याचबरोबर महाराष्ट्र राज्य रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली आहे. याबाबत सकारात्मक विचार करू असे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

'रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ' आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात ४ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. समारोह कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रशिक्षक लोमेश नारखेडे, सल्लागार गजानन हेगडे, वरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तव, प्रशासकीय सहाय्यक ऋषी देठे, शॉर्ट टर्म कोर्सेस चे शुभम शेंडे, श्रावणी कोचरे, भूषण पवार तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापर कसा करावा, वृत्ताची पडताळणी, माहिती शोधण्याची गती, तसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन घोषणेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची मोफत संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “आज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशा वेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल”

चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना कोणकोणते प्रॉम्प्ट द्यायचे, चॅट जीपीटीला कोणकोणते पर्याय आहेत, त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर कोणते सहायक टूल्स आहेत. फोटोवरून बातमी कशी बनवायची, फोटोवरून व्हिडिओ कसा बनवायचा, न्युज रिपोर्ट कसा बनवायचा. प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियासाठी बातमी कशी वापरायची ? त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर कसा करायचा याची माहिती त्यांनी दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली आहे याबाबत सकारात्मक विचार करू. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल. पत्रकारांनी त्यांना या कार्यशाळेबद्दल चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या वेळेला पत्रकार दीपक कैतके, पत्रकार संजय जोग, पत्रकार क्लारा लुईस यांनी चार  दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मत व्यक्त केले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्र संचालन केले. कार्यकारिणीचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले.

बिहारमध्ये भाजपला मोठे यश, पुन्हा येणार एनडीए (NDA) सरकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पाटना, दि. १४ : आज जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आणि एनडीए आघाडीने प्रचंड यश मिळवले असून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीए आघाडीने तब्बल २०० हून अधिक जागा जिंकून “डबल सेंच्युरी” मारली. या निकालामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा *नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार* स्थापन होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राजद आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र होते, मात्र दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. महागठबंधनला मोठा धक्का बसला असून त्यांची दाणादाण झाली आहे. या विजयामध्ये महाराष्ट्र भाजपमधील नेते विनोद तावडे यांच्या रणनितीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षनिहाय मतसंख्या
भाजप (BJP) - 128
जेडीयू (JDU) - 52
लोक जनशक्ती पार्टी (LJP) - 22
इतर एनडीए सहयोगी - 5
राजद (RJD) - 25
काँग्रेस (INC) - 7
डावे पक्ष (CPI, CPI(M), CPI(ML)) - 3
इतर / अपक्ष - 1
एकूण - 243

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच एनडीएतील प्रमुख नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्याचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने स्थानिक सत्ता-विरोधी लाटेला तोंड देत प्रचंड विजय मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सुशासन आणि विकास यांचीच जनतेने निवड केली आहे”. तर गृहमंत्री अमित शाह यांनी हा विजय बिहारच्या जनतेचा विश्वास असल्याचे म्हटले.

महागठबंधनातील राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तेजस्वी यादव आणि त्यांच्या आघाडीला मोठा धक्का बसला असून बिहारमध्ये एनडीएचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय हा सुशासन, विकास आणि जनहित आणि सामाजिक न्यायाच्या भावनेचा विजय असल्याचे म्हटले. एक्सवरील पोस्टच्या मालिकेत मोदींनी भाजपच्या आघाडीतील भागीदार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजेपी-आरव्हीचे प्रमुख चिराग पासवान, एचएएम नेते जीतन राम मांझी आणि आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांचे अभिनंदन केले.

"२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून देणारे बिहारमधील माझ्या कुटुंबातील सदस्यांचे मनापासून आभार,” असे मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, जनतेचा जबरदस्त जनादेश एनडीएला लोकांची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नवीन संकल्पाने काम करण्यास सक्षम करेल.

भाजप, जेडी(यू) आणि इतर पक्षांचा समावेश असलेला एनडीए २४३ सदस्यीय सभागृहात २०४ जागांवर आघाडी घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजयाच्या मार्गावर आहे. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधी महाआघाडीला ३३ जागांवर आघाडी मिळवता आली, जे २०२० च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा ८१ जागा कमी आहेत. “एनडीएने राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्याला नवीन उंचीवर नेण्याचे आमचे स्वप्न पाहून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे,” असे मोदी म्हणाले.

“या शानदार विजयाबद्दल मी मुख्यमंत्री नितीश कुमार जी आणि आमच्या एनडीए कुटुंबातील सदस्य चिराग पासवान जी, जीतन राम मांझी जी आणि उपेंद्र कुशवाह जी यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी अथक परिश्रम घेतलेल्या आणि सत्ताधारी आघाडीचा विकास अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक एनडीए कार्यकर्त्यांचे आभार मानले. “मी त्यांचे मनापासून कौतुक करतो,” असे ते म्हणाले. “येणाऱ्या काळात, आम्ही बिहारच्या विकासासाठी सक्रियपणे काम करू, येथील पायाभूत सुविधांना आणि राज्याच्या संस्कृतीला एक नवीन ओळख देऊ. येथील युवा शक्ती आणि महिला शक्तीला समृद्ध जीवनासाठी भरपूर संधी मिळतील याची आम्ही खात्री करू,” असे मोदी म्हणाले.

१४ नोव्हेंबर २०२५ च्या निकालाने बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे वर्चस्व सिद्ध झाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता स्थापन होणार आहे. हा विजय केवळ राजकीय नाही तर जनतेच्या विश्वासाचा पुरावा मानला जात आहे.

सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'सार्वत्रिक निवडणूक सन २०२५' मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगर रचना, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२ इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या ३१ असून तीन जागांचे ०२ प्रभाग व चार जागांचे २९ प्रभाग आहेत.
१२२ जागापैकी १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी ०६ जागा अनुसूचित जाती (महिला), ०२ जागा अनुसूचित जमाती (महिला), १६ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि ३७ सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
"आरक्षण सोडत बाबत १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार नागरिकांच्या हरकती.."

सदर आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप (ड्राफ्ट) प्रसिद्ध केले जाणार आहे.
नागरिकांना १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात ८ ठार अनेक जखमी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : देशात निवडणूक वातावरण चांगलेच तापले असताना राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाने हादरली. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्ब स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना तातडीने एल.एन.जेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोट स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता झाला. स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली, आसपास उभ्या असलेल्या काही वाहनांना देखील आग लागल्याने काही क्षणांतच भगदड माजली. परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

*राजधानी दिल्लीत "हाय अलर्ट.."*

घटनास्थळी तातडीने दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तसेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एन एस जी) यांचे पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे. परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. घटनास्थळावरून काही संशयास्पद अवशेष आणि सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “स्फोट अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. दोषींना वाचू दिले जाणार नाही,” असे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे दिल्ली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.

भाजप चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे शिंदे सेनेत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षदा भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.