कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या कचरा संकलन करवाढीविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. "महापालिका हाय हाय, केडीएमसी हाय हाय" अशा जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा मुख्यालयाचे बंद दार ढकलून थेट आतमध्ये धडक दिल्याने सुरक्षारक्षक आणि पोलीसांची एकच धावपळ उडाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे, उपनेते विजय साळवी, संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने गेल्याच महिन्यात महापालिका क्षेत्रातील सात प्रभागांच्या स्वच्छतेसाठी एका खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. या कंत्राटाच्या रकमेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. तसेच केडीएमसी प्रशासनाने घरगुती तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांच्या कचरा संकलन शुल्कामध्ये ३०० रुपयांनी वाढ केली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत असून काही दिवसांपूर्वीच मनसेने याच मुद्द्यावर केडीएमसीवर मोर्चा काढला होता.
त्यापाठोपाठ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही मोर्चा काढून केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. तसेच नागरिकांवर लादलेली ही करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदनही त्यांना सादर केले. केडीएमसी प्रशासनाने केलेली ही करवाढ लवकरात लवकर रद्द करावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केले जाईल असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिला. तर केडीएमसी प्रशासनाने करवाढ रद्द करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा