कल्याण - कल्याण तालुक्यातील नालिंबी गावच्या जंगलात आढळलेल्या शिरविच्छिन्न अवस्थेतील मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, सावत्र भावानेच संपत्तीच्या वादातून भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
२९ मे २०२५ रोजी सकाळी नालिंबी ते अंबरनाथ रस्त्यालगत असलेल्या निर्जन जंगलात एका अनोळखी पुरुषाचा शीर विरहित मृतदेह आढळला होता. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलीस पाटील संगीता शिंदे यांच्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या अमानुष खुनाच्या तपासासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. घटना स्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचे तांत्रिक प्रयत्न, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा शोध घेण्यात आला.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटना स्थळाजवळ संशयास्पदरीत्या आढळलेली कार. तपासणीअंती ही कार सलमान महंमद गौरी अन्सारी (वय: २५ वर्षे, रा. मांडा, टिटवाळा) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सलमानला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने थरकाप उडवणारी कबुली दिली. मृत इसम त्याचाच सावत्र भाऊ फैसल अन्सारी (वय: २९ वर्षे) असून, संपत्तीच्या वादातूनच त्याचा खून केला, आणि पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केले. या खुनाच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा