मुंबई - महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महागाईने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी वीज ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून राज्यातील वीज दरामध्ये १० टक्क्यांनी कपात होणार आहे. विशेष म्हणजे, ही फक्त सुरुवात असून, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महावितरणने दाखल केलेल्या एका विशेष याचिकेवर बुधवारी (२५ जून २०२५) हा निर्णय दिला. या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत याला राज्याच्या इतिहासातील ‘प्रथमच’ घडलेली घटना म्हटले आहे. यापूर्वी वीज दरवाढीच्या याचिका सादर केल्या जात होत्या, मात्र पहिल्यांदाच महावितरणने एमएसईडीसीएल (MSEDCL) वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.
राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा