कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून नागरिकांनी यंदाही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल सुमारे ८६% विक्रमी कर वसुली पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
महापालिकेच्या महसुलाचा मुख्य आधार असलेल्या मालमत्ता करातून सन २०२५-२०२६ या वर्षासाठी सुमारे ₹५०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आयुक्त डॉ. अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोसावी तसेच उपआयुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी समन्वय साधत सातत्याने आढावा बैठका घेतल्या.
या प्रयत्नांचे फलित म्हणून मार्च अखेरपर्यंत ₹३३१.४१ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, “अभय योजना” राबवली नसतानाही नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे करवसुली वाढल्याचे केडीएमसीला गती मिळाल्याची प्रतिक्रिया कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनी वेळेवर कर भरण्याची जबाबदारी पार पाडल्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २०२६-२०२७ या नवीन आर्थिक वर्षासाठी अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पर्यायाद्वारे कर भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर कराच्या माध्यमातून शहरामध्ये अधिकाधिक लोकाभिमुख सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा कल्याण-डोंबिवलीकरांनी केडीएमसी प्रशासनाकडून व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा