BREAKING NEWS
latest

बिल्डरच्या घशात रस्त्याची जागा घालण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी मंजूर रस्ता वळवल्यामुळे उबाठा गटाचे पालिकेविरोधात आमरण उपोषण..

विशेष प्रतिनिधी

कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्व कोळसेवाडी परिसरात बिल्डरच्या फायद्यासाठी कित्येक वर्ष जुना दळण वळणाचा व मंजूर झालेला रस्ता वळवण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही वळवलेला रस्ता थांबवण्यासाठी, पालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण कोळसेवाडी येथील भैरव टी- हाऊसच्या शेजारी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पालिका प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पालिका प्रशासन नेमकं कोणासाठी काम करत आहे? जनतेच्या सेवेसाठी का शासनाच्या जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
"शिवाजी कॉलनी ते भैरव टी- हाऊस ते म्हसोबा चौक" पर्यंत काँक्रीटचा रस्ता खासदार निधीतून मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी जुनी जनता सहकारी बँक ते भैरव टी-स्टॉल या सुमारे १५० ते २०० मीटर अंतराच्या मंजूर जुन्या रस्त्याचे काम करण्याऐवजी तो रस्ता बिल्डरच्या फायद्यासाठी वळवून जुनी जनता बँक ते जॉली टेलर असा रस्ता बांधण्यात आला आहे.

याचदरम्यान, वहिवाटीचा रस्ता बंद करून नव्या जागी रस्ता वळवून तो बांधण्याची प्रक्रिया महानगरपालिका अधिनियम व नगररचना कायद्याच्या तरतुदींना बगल देत केली जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे. सार्वजनिक रस्ता बंद किंवा स्थलांतरित करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया केली गेलेली नाही.

जॉली टेलर ते जनता बँक दरम्यान नव्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या नव्या रस्त्याच्या निर्मितीनंतर विद्यमान रस्ता बंद करून त्या जागेचा समावेश शेजारील विकासकाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

म्हसोबा चौक ते भैरव टी-हाऊस हा सुमारे १८ मीटर रुंदीचा मंजूर विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता असल्याची माहिती समोर येत असताना, प्रत्यक्षात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामध्ये रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी झाल्याचे तसेच आवश्यक फुटपाथ व गटारांची कामे करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे मंजूर डी.पी. आराखड्याचे उल्लंघन होत असल्याची शक्यता वर्तवली जात असून आवश्यक त्या प्रकरणांमध्ये राज्य शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात अशा कोणत्याही प्रक्रियेचा पारदर्शकपणे अवलंब करण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ नागरिकांच्या वापरात असलेला हा रस्ता अचानक बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने, या मार्गावर उपजीविका करणाऱ्या अनेक लघु व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचाही भंग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मूळ डी.पी. रस्त्यामध्ये फेरफार करून एका विकासकाच्या फायद्यासाठी रस्ता वळवण्यात आला असून, यात काही संबंधित पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे काल उपोषण करण्याचा निर्णय प्रकाश घन‌श्याम जाधव (उपशहरप्रमुख), ऋतू कांचन रसाळ (कक्ष शहर संघटक), नितिन मोलुल, संगिता गांधी, गणपत घुगे, वैभव घाडगे, अमित हरिश्चंद्र उगले, अर्जुन कणसे, अक्षता पवार (गटप्रमुख), गितांजली परशुराम आंबे, भारती सांबुख, अनंत केशव ब्रिद, अशोक सावंत, रमेश काचाई मेहर, अरुण उगले, राम शिंदे (उपशहर प्रमुख), गांधी (विभागप्रमुख), भारती (कार्यप्रमुख) यांनी घेतला आहे.

नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा करून रस्त्याचे बांधकाम सुरू - सचिन घुटे, नगररचना विभाग

कल्याण पूर्वेकडील म्हसोबा चौक ते भैरव टी-हाऊस पर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाबाबत विचारले असता, कल्याणचे शहर नियोजक, सचिन घुटे यांनी सांगितले की, रस्त्यासाठी मंजूर नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा करण्यात आल्या असून त्यानुसार रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावेळी आमरण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या गुलवे यांनी आरोप केला की, त्या रस्त्याचे बांधकाम मंजूर आणि खुणा केलेल्या नकाशाप्रमाणे केले जात नाही असे सचिन घुटे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सांगितले की, नकाशाप्रमाणे जमिनीवर खुणा आमच्या विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पण त्या रस्त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, त्यामुळे या प्रकरणी फक्त तेच कोणतीही माहिती देऊ शकतात.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत