BREAKING NEWS
latest

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले. शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिन महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आज संपन्न झाला. यासमयी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गामार्फत सामूहिक मतदान शपथ घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ, उपआयुक्त प्रसाद बोरकर, अतुल पाटील, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, माधवी पोफळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.
यावेळी “नथीन्ग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर”  या शासनाच्या थीमनुसार महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी यावेळी केले.

डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल २०२५ चा उत्साहात शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: डोंबिवलीकर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे मन प्रसन्न करणारा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे आपला 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'. गेल्या १५ वर्षांपासून आपल्या डोंबिवलीत हा रोझ फेस्टिवल होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, रविवारी रामनगर मधील बाल भवन येथे हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. त्या फेस्टिवलचे शनिवारी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. 
या फेस्टिवलला दरवर्षीप्रमाणे 'इंडियन रोझ फेडरेशन' या अखिल भारतीय गुलाबप्रेमींच्या संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच बॉम्बे रोझ सोसायटी आणि इनर व्हील क्लब, कल्याण यांची बहुमूल्य साथ लाभली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाबप्रेमी या फेस्टिवलमध्ये सामील झाले आहेत.
राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिक विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे यांच्या गुलाबाला 'गुलाबांचा राजा' व 'गुलाबांची राजकुमारी', पुण्यातील पुंडलिक निम्हण यांच्या गुलाबाला 'गुलाबांची राणी', वांगणी येथील चंद्रकांत मोरे यांच्या गुलाबाला 'गुलाबांचा राजकुमार' तर मन्सूरा जहूर हुसेन यांच्या गुलाबाला 'सर्वोत्कृष्ट सुवासिक गुलाब' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रशांत तेलंग, तिझारे, डॉ. धनंजय गुजराथी, निलेश आपटे यांना गुलाब प्रदर्शनात विविध पुरस्कार देण्यात आले. तसेच गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने गुलाब स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या चंद्रकांत मोरे यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. 
डॉ. विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे, जगदीश म्हात्रे, गणेश शिर्के, अर्शद भिवंडीवाला, मंछेर इराणी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. असा हा आपला जिव्हाळ्याचा 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल' रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या मित्रपरिवारासोबत या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि एक आनंददायी अनुभव घ्या असे अवाहन त्यावेळी आ. रवींद्र चव्हाण यांनी केले.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रम साजरा..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : २२ जानेवारी २०१५ रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हा उपक्रम राबविण्याची मोहीम सुरू केली. त्या उपक्रमाअंतर्गत 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय मधे देखील दिनांक २४ जानेवारी रोजी 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळच्या सत्रात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या विषयावर भाषण केले व मुलगी वाचवा आणि शिकवा या विषयीची चित्र फित बघितली.
दुपारच्या सत्रात जन गण मन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सादर केला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शिक्षणाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. स्त्री भ्रूण हत्या, लिंग हत्या यावर प्रतिंबंध लागला पाहिजे या उद्देशाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा स्तुत्य उपक्रम आदरणीय नरेंद्र मोदीजीनी अंमलात आणला. मुलगी ही घरातली लक्ष्मी आहे, ती एका घरातून दुसऱ्या घरात सोन्याच्या पावलाने आगमन आणि निर्गमन करत असते, शिक्षणाने मुलगा हा फक्त एका घराचा विकास करतो परंतु मुलगी ही माहेर आणि सासर अशा दोन्ही घरचा विकास करते म्हणूनच मुलीला सरस्वती आणि लक्ष्मी अशा दोन्ही उपमा दिल्या आहेत, असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सावित्री बाईंनी जनतेचे घाव सोसून शिक्षणाचा पाया रचला आणि सर्व मुलींना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या म्हणूनच आईच्या गर्भात असतानाच ती मुलगी सरस्वतीचा अंश होऊनच वाढत असते तर तिला जीवदान देऊनच असंख्य सावित्री उदयास येणार असे उद्गार डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले.
तर आई मधील प्रेमळ ओलावा आणि वडिलांबद्दल आदरयुक्त भीती, या दोघांच्या वेलीवरचे फुल म्हणजे 'मुलगी'. मुलांपेक्षा मुली ह्या जास्त जवळच्या असतात, प्रेम, भावना, जिव्हाळा याच्याही पलीकडे जाऊन  शिक्षणाने, प्रगल्भ विचाराने सक्षम होऊन घर संसार आणि नोकरी सांभाळून न थकता ऊर्जेचा स्रोत बनून कायमच दुसऱ्यांना ऊर्जा देत राहतात, म्हणूनच स्त्री ला 'नवदुर्गेची' उपमा दिली आहे, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंचे अप्रतिम नाटक सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच नाटकामधील सर्व मुलांना अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांनी टाळा वाजवून त्यांच्या अभिनयाला दाद दिली. नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे व सौ. कविता गुप्ता यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले तर सूत्र संचलन सौ. श्रेया कुलकर्णी यांनी केले. बेटी बचाओ,बेटी पढाओ, असा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

ओपन जिमचे साहित्य तुटल्यास होणार तात्काळ दुरुस्त - मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील मैदाने,उद्याने आणि इतर अनेक अशा सुमारे २५० ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी ओपन जिम व त्यासाठी लागणारी व्यायामाची साधने आणि लहान मुलांसाठी खेळणी कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत बसविण्यात आली आहेत. महापालिकेने दिलेल्या या सुविधेचा फायदा महापालिका क्षेत्रातील अनेक आबालवृद्धांना होतो तथापि सततच्या वापराने ही खेळणी व ओपन जिम मधील व्यायामाची साधने तुटण्याच्या घटना निदर्शनास येतात.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशान्वये महापालिकेने बसविलेली खेळणी ओपन जिम मधील साहित्य इ.च्या दुरुस्ती साठी महापालिकेच्या वार्षिक अंदाज पत्रकात निधीची तरतुद करण्यात आली आहे आणि त्यानुसार कल्याण व डोंबिवली साठी एकूण ३ वर्षाकरिता स्वतंत्र निविदेस मंजूरी देण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात कामालाही सुरवात झाली आहे. असे असतानाही एखाद्या उद्यानातील खेळणी अथवा ओपन जिमची साधने तुटल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी केले आहे.

शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते शास्त्रीनगर इस्पितळातील रुग्णांना मोफत फळे आणि ब्लॅंकेटचे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या  जयंती आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त 'भगवा पंधरवडा' या उपक्रमात डोंबिवलीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान शिवसेना शाखा क्र.६५ चे कल्याण-डोंबिवली महापालिका   माजी नगरसेवक तथा परिवहन समिती माजी सभापती संजय लक्ष्मण पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील रुग्णांना मोफत फळे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पार पडला. हॉस्पिलमधील रुग्णांना फळे आणि उबदार ब्लँकेट चे मोफत वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील अनेक त्रुटी यावेळी आमदार राजेश मोरे यांना पहावयास मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक संजय पावशे, अपर्णा पावशे, वृषाली रणजित जोशी, केतकी पवार, सुभाष गायकवाड, धनाजी चौधरी, कल्पना कांबळे, सुदाम जाधव, यांच्यासह शिवसैनिक तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आमदार राजेश मोरे यांनी शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी योगेश चौधरी यांची भेट घेतली तेव्हा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुखसुविधा मिळत नसल्याच्या अनेक त्रुटी यावेळी पहावयास मिळाल्या.
आमदार राजेश मोरे यांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन..

शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे व ब्लँकेट चे वाटप  करत प्रसूती कक्षात गेला असता पासूतिकक्षात बेडची कमतरता असल्याने एका महिला रुग्णाला चक्क जमिनीवर औषधोपचार करण्यात येत असल्याचे दिसून आले. याबाबत हॉस्पिटलचे प्रभारी वैद्यकीय प्रमुख डॉ. योगेश चौधरी यांनी त्यांच्या अनेक समस्या आमदार मोरे यांच्यासमोर मांडल्या. सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ, भुलतज्ञ डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आणि जागेचा अभाव असल्याच्या समस्या इस्पितळातील नर्स व  कर्मचाऱ्यांनी मांडल्या. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये पोलिस चौकीची नितांत गरज असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या वेळी अनेक वेळा काही लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमदार मोरे यांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना तुमच्या समस्या सोडविण्यासाठी हा विषय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून समस्या कशा जलदगतीने सोडविल्या जातील, याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन प्रसिद्धी माध्यमांसमोर देत सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दावोस मध्ये केला १५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दावोस दि.२२ : दावोसमधील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.
आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते ३,०५,००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून ३ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.
दुसरी मोठी गुंतवणूक ही ऍमेझॉन करणार असून, ती ७१,७९५ कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या २ दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५५,२०० कोटींचे करार केले आहेत.
टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे..

२१) सीऍट
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक : ५०० कोटी
व्यवसाय : ५००
कोणत्या भागात : नागपूर

२२) व्हीआयटी सेमिकॉन्स
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : २४,४३७ कोटी
व्यवसाय : ३३,६००
कोणत्या भागात : रत्नागिरी

२३) टाटा समूह
क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक : ३०,००० कोटी

२४) रुरल एन्हान्सर्स
क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
गुंतवणूक : १०,००० कोटी

२५) पॉवरिन ऊर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूकः १५,२९९ कोटी
व्यवसाय : ४०००

२६) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १५,००० कोटी
रोजगार : १०००

२७) युनायटेड फॉस्परस लि.
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ६५०० कोटी
रोजगार : १३००

२८) ईरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूकः २०,००० कोटी
रोजगार : २०,०००

२९) ऍलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूकः ३००० कोटी
रोजगार : १०००

३०) फ्युएल
क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
राज्यातील ५००० युवकांना एआय, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस ऍनालिटिक्सचे प्रशिक्षण

दि. २१ जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : ६,२५,४५७ कोटी
एकूण रोजगार : १,५३,६३५

दि. २२ जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

३१) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट
गुंतवणूकः ३,०५,००० कोटी
रोजगार : ३,००,०००

३२) ग्रिटा एनर्जी
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १०,३१९ कोटी
रोजगार : ३२००
कोणत्या भागात : चंद्रपूर

३३) वर्धान लिथियम
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
गुंतवणूक : ४२,५३५ कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : नागपूर

३४) इंडोरामा
क्षेत्र : वस्त्रोद्योग
गुंतवणूक : २१,००० कोटी
रोजगार : १०००
कोणत्या भागात : रायगड

३५) इंडोरामा
क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
गुंतवणूकः १०,२०० कोटी
रोजगार : ३०००
कोणत्या भागात : रायगड

३६) सॉटेफिन भारत
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूकः ८६४१ कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

३७) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ४३,००० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

३८) सिलॉन बेव्हरेज
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : १०३९ कोटी
व्यवसाय : ४५०
कोणत्या भागात : अहिल्यानगर

३९) लासर्न ऍण्ड टुब्रो लि.
क्षेत्र : संरक्षण उत्पादन
गुंतवणूक : १०,००० कोटी
व्यवसाय : २५०००
कोणत्या भागात : तळेगाव

४०) नेल्सन मीडिया प्रा. लि.
क्षेत्र : आयटी
गुंतवणूकः ४५० कोटी
रोजगार : ११००
कोणत्या भागात : एमएमआर

४१) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
गुंतवणूक : १२,७८० कोटी
रोजगार : २३२५
कोणत्या भागात : नागपूर

४२) एमएसएन होल्डिंग्ज लि.
क्षेत्र : सौर
गुंतवणूक : १४,६५२ कोटी
रोजगार : ८७६०
कोणत्या भागात : नागपूर

४३) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.
क्षेत्र : ड्रोन निर्मिती
गुंतवणूक : ३०० कोटी
रोजगार : ३००
कोणत्या भागात : जालना

४४) रेनिसन्स सोलार ऍण्ड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूकः ५००० कोटी
रोजगार : १३००
कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

४५) हॅझेरो इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १६,००० कोटी (दोन प्रकल्प)
रोजगार : १०,०००
कोणत्या भागात : बुटीबोरी

४६) टॉरल इंडिया
क्षेत्रः ऍल्युमिनियम आणि मेटल्स
गुंतवणूक : ५०० कोटी
रोजगार : १२००
कोणत्या भागात : अहिल्यानगर

४७) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ४३,००० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

४८) हिरानंदानी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ५१,६०० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

४९) एव्हरस्टोन समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ८६०० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

५०) ऍमेझॉन
क्षेत्र : डेटा सेंटर
गुंतवणूक : ७१,७९५ कोटी
रोजगार : ८३,१००
कोणत्या भागात : एमएमआर

५१) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषतः शाश्वत परिवहन सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

५२) एमटीसी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषतः सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
कोणत्या भागात : एमएमआर

५३) क्रॉसरेल इंटरनॅशनल
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषतः वाहतूक सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

दि. २२ जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : १५.७० लाख कोटी
एकूण रोजगार : १५.७५ लाख

७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्याचे महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे निर्देश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अधिकारी वर्गास दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संकेतस्थळावरील माहिती अद्यावत करण्यात येत असून त्या मध्ये आर.टी.एस. व आर.टी.आय ची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नागरिकांना मालमत्ताकरां विषयी विविध सेवा घेताना येणारा त्रास कमी करण्यासाठी परिवर्तन योजना महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. नगररचना विभागाकरीता सुलभ एस.ओ.पी. (सर्व साधारण पध्दती) निर्धारित करून दिल्यामुळे नागरिकांचा महापालिकेसोबतचा व्यवहार सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. या कृती आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी सर्व खाते /विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेवून आपापले कार्यालय स्वच्छ ठेवण्याबाबत व भंगार सामानाची विल्हेवाट लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभाग/प्रभागात स्वच्छतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जुन्या वाहनांसंदर्भात आर.टी.ओ. सोबत आवश्यक पत्रव्यवहार करून सदर वाहने निर्लेखित करण्याबाबत आर.टी.ओ. विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचे शिघ्रगतीने निवारण करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे आणि ४ थ्या मंगळवारी सफाई मित्र दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे देखील आयोजन करण्यात येत आहे.

राज्यसेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने प्रथम सन २०१५ च्या आदेशानुसार शासनाकडील १५ सेवा अधिसुचित केल्या. तद़नंतर जून २०२३ च्या आदेशानुसार शासनाकडील १२ आणि महापालिकेकडील ५ अशा १७ सेवा अधिसुचित करण्यात आल्या. ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार महापालिकेकडील ४४ आणि शासनाकडील ३१ अशा ७६ सेवा नागरिकांसाठी अधिसुचित करण्यात आल्या आणि जुन २०२४ च्या आदेशानुसार शासनाच्या ६८ आणि महापालिकेच्या ४९ अशा एकूण ११७ सेवा महापालिकेने अधिसुचित केल्या आहेत. याबाबत चे फलक सर्व नागरी सुविधा केंद्र आणि विभागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपले सरकार पोर्टलवर व पी.जी.पोर्टलवर  तक्रारीचे निराकरण नियमित स्वरूपात करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.