BREAKING NEWS
latest

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून, शिवजयंती दिनी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुलांना, विद्यार्थ्यांना आपली तत्वे, मुल्ये आणि गौरवशाली वारशाची ओळख होईल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून, शिवजयंती दिनी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुलांना, विद्यार्थ्यांना आपली तत्वे, मुल्ये आणि गौरवशाली वारशाची ओळख होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून, आज किल्ले दुर्गाडी समोरील नॅशनल ऊर्दु हायस्कुल पासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यासमयी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त वंदना गुळवे, स्वाती देशपांडे, अतुल पाटील, संजय जाधव, अवधुत तावडे, रमेश मिसाळ, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र, स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर डॉ. प्रशांत पाटील, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, योगेंद्र राठोड‍, शैलेश कुळकर्णी, मनोज सांगळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
आजच्या शिवजयंती दिनाचा प्रारंभ शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी व कर्मचारी आरएसपी शिक्षक अधिकारी ,स्काऊट गाईड विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी यांच्या भव्य रॅलीने झाला. सकाळच्या शितल वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांच्या वेशभुषेत तसेच पारंपारिक पोषाखात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बालचमुने, सर्व पांथस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. सदर रॅलीची सांगता लाल चौकी - सहजानंद चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड आणि महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तद्नंतर प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासमयी आमदार सुलभाताई गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव व इतर मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना न्याय मिळून दिला, त्यांना माझा मानाचा मुजरा आहे" असे सांगत आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विद्यार्थी वर्गास शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
दुर्गाडी खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले नौदल आरमाराची स्थापना केली होती. ही आठवण जतन करण्यासाठी महापालिकेमार्फत सदर ठिकाणी नौदल संग्रालय उभारण्यात येत असून, सदर संग्रालय नागरिकांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव व प्रशांत पाटील यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. यानंतर महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
डोंबिवलीतही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, अवधूत तावडे यांनी डोंबिवली (पूर्व) मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे , ६/फ व ८/ग प्रभागाचे सहा. आयुक्त अनुक्रमे हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

बांबू मॅन" पाशा पटेल यांचा Kya News मुंबई मुख्यालयात सन्माननीय सत्कार!

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि "बांबू मॅन" म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल यांनी आज Kya News मुंबई मुख्यालयाला सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी Kya News चे CEO देवेश गुप्ता, संपादक संदिप कसालकर, संचालक गौरव शेट्ये तसेच संपूर्ण Kya News टीम उपस्थित होती. पाशा पटेल यांनी कृषी, पर्यावरण आणि शाश्वत विकासासंबंधी विस्तृत चर्चा करतानाच माध्यमांची भूमिका, डिजिटल युगातील पत्रकारिता आणि स्थानिक पातळीवरील समस्यांवरील उपाययोजना याबद्दल आपले विचार मांडले.

Kya News तर्फे त्यांचे शाल आणि विशेष भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना माहिती मिळणे किती महत्त्वाचे आहे, तसेच शाश्वत कृषी धोरणांचा प्रभावी अंमल कसा होऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला.

त्यांनी Kya News च्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले की, "हाइपर लोकल न्यूज माध्यमे ही समाजातील समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी प्रभावी ठरत आहेत आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत."




कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे रुग्णालयातूनही काम सुरूच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून आमदार झाल्यापासून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी प्रत्येक क्षण नागरिकांच्या सेवेत वाहून घेतला आहे. अपघातानंतर गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात असतानाही नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देत एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल टाकून आमदार मोरे यांनी दाखवून दिले आहे. आठवड्याभरातील प्रस्तावित कामे रखडून पडू नयेत यासाठी शस्त्रक्रिया पूर्ण होताच वेळ न दवडता या कामांच्या फाईल्स मागवून घेत त्यावर स्वाक्षऱ्या करत आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे अंबरनाथ येथील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रकल्प पाहणी दौऱ्यात पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. लीलावती रुग्णालयात त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र शस्त्रक्रियेनंतरही आराम न करता त्याच दिवशी नियोजित कामांचा निपटारा करताना आमदारांना आपण रुग्णालयात असल्याचाही विसर पडला. रस्ते बाधितांना मोबदला, पाणी प्रश्नावर बैठका, रस्त्यातील इलेक्ट्रिकचे उघडे डीपी बॉक्स आणि पोल स्थलांतरणासाठी महावितरणकडे पाठपुरावा यासारख्या कामांचे नियोजन या आठवड्यात करण्यात आले होते. ही कामे आपण रुग्णालयात असल्याने रखडून पडू नयेत यासाठी आमदार मोरे यांनी रुग्णालयातच या कामांच्या फाईल्स मागवून घेत त्यावर स्वाक्षऱ्या करत संबंधित विभागाला तातडीने पत्रे पाठविण्याचे निर्देश दिले. तर अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत पाठविलेल्या पत्रांवरती चर्चा करत कामे रखडून पडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

केडीएमसीला स्मार्ट गव्हर्नन्ससाठी प्रतिष्ठित 'SKOCH म्युनिसिपल गोल्ड पुरस्कार' सन्मान !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सन २००२ पासून 'ई-गव्हर्नन्स' प्रणाली कार्यान्वीत असून विविध पुरस्कारांसोबत सर्वोत्कृष्ट ई- गव्हर्नन्स सोल्यूशन म्हणून सन २००४ आणि सन २०११ मध्ये SKOCH ग्रुपतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अशाच प्रकारे स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी प्रतिष्ठित 'SKOCH म्युनिसिपल गोल्ड' पुरस्कार दिनांक १५-०२-२०२५ रोजी नवी दिल्ली येथे SKOCH ग्रुपचे अध्यक्ष श्री. समीर कोचर यांच्या हस्ते महापालिकेस प्रदान करण्यात आला. हा सन्मान महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी स्वीकारला.महापालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळत आहेत.

“डिजिटल गव्हर्नन्स आणि स्मार्ट सेवा – एक महत्त्वपूर्ण पाऊल”

या उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व सार्वजनिक सेवा सुधारणा यामध्ये मोठी प्रगती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल वाढ, स्वयंचलित प्रक्रिया, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे यावर भर देण्यात आला आहे.

महसूल सुधारणा :- डिजिटल पेमेंट आणि पारदर्शक व्यवहार प्रणाली यामुळे महसूलात वाढ झाली आहे.

स्वयंचलित प्रक्रिया :-  कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करून प्रत्यक्ष सेवा जलद गतीने देता याव्या यासाठी स्वयंचलित प्रक्रीयेचा अवलंब करण्यात येत आहे.

नागरिक सहभाग आणि सहजता :- सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देऊन अर्ज करणे आणि सेवा प्राप्त करून घेणे हे सहज आणि सुलभ झाले.

डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया :- व्यवस्थापकीय निर्णयांची अचूकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर.

पुरस्कार स्वीकारताना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी सांगितले की, ”हा पुरस्कार केडीएमसीच्या टीमच्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि स्मार्ट सेवांच्या मदतीने आम्ही शहरातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.भविष्यातही या प्रवासात सातत्य ठेवू.”

या सन्मानामुळे केडीएमसीच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि प्रशासकीय सुधारणा यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार केडीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत सजला द्राक्षांचा मळा, आनंद लुटण्यासाठी झाले बालगोपाल गोळा तर खजिनदार जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : निसर्गाच्या सान्निध्यात राहणे सर्वानाच आवडते. त्यातून फेब्रुवारी महिना म्हणजे द्राक्षांचा महिना, सर्व मुलांना आवडणारे फळ म्हणजे द्राक्ष. असाच आनंद लुटण्यासाठी 'जे एम एफ' मंडपात द्राक्षांचा मळा फुलवण्यात आला आणि द्राक्षांबरोबरच कलिंगड, केळी , अननस, आणि अनेक फळं ठेवण्यात आली. मोठा मळा बनवून द्राक्षांचे घोस दोरीला लटकवून ठेवले गेले ही कल्पना अस्तित्वात आणली ते म्हणजे 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी. मुलांच्या आनंदामधे आनंद मानणारे कोल्हे दाम्पत्य नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी सज्ज असतात.
१७ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या खजिनदार व चित्रपट दिग्दर्शिका जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस. दरवर्षी जान्हवी मॅडम चा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांचे आजी आजोबा सोबत साजरा केला जातो व निसर्गाच्या सानिध्यात छोट्याशा सहलीचे आयोजन केले जाते, पर्यंतु ह्या वर्षी मुलांसहित सर्व पालकांना, आजी आजोबांना 'जे एम एफ' मंडपम मध्ये साकारलेल्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. पालकांनीही मुलांबरोबर येथेच्छपणाने द्राक्षाचा आनंद लुटला. संस्थेच्या सचिव व जान्हवी कोल्हे यांच्या मातोश्री डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या लेकीला औक्षण करून भरभरून आशीर्वाद दिला तर संस्थापक व पिताश्री डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील लाडक्या लेकीला 'यशस्वी भव' असा शुभाशीर्वाद दिला. त्यासोबत सर्व आजी आजोबांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. एकाच वेळी एवढे मोठे मनापासून दिलेले आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव बघून मी कृतकृत्य आणि धन्य झाले असे उद्गार जान्हवी कोल्हे यांनी काढले. प्रत्येक वाढदिवस हा मला नेहमीच नवीन अनुभव आणि आनंद देऊन जातो आणि दरवर्षीच 'जे एम एफ' कुटुंबाबरोबर मला माझा वाढदिवस साजरा करण्यात आनंद मिळतो असेही त्या म्हणाल्या.
सर्व कलात्मक शिक्षकांनी ही द्राक्षांची बाग बनवली. शिशुविहार ते इयत्ता आठवी पर्यंत सर्वच मुलांनी लटकवलेली द्राक्ष हात न लावता, उडी मारून खाण्याचा आनंद घेतला. अनेक फळांनी सजवलेली ही बाग म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच होती. शिशु विहार च्या शिक्षकांनी सुंदर रित्या फळे कापून फळांचा केक, फळाचे प्राणी आणि सुबकरीत्या फळांचे तबक सजवून ठेवले होते. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते बागेचे उद्घाटन करून सर्व मुलांनी एकच जल्लोष केला व स्वतः डॉ. श्री व सौ कोल्हे यांनी मुलांना त्यांच्या हाताने खाऊ घातले. द्राक्षाच्या बागेत तर-तऱ्हेची खेळणी ठेवण्यात आली होती. सर्व मुलांनी त्या सर्व खेळण्याचा आनंद लुटला.
फलाहार हा आरोग्यासाठी नेहमीच चांगला असतो, रोज पिझ्झा, बर्गर, मॅगी सारखे फास्ट फूड न खाता ऋतुनुसार फळं खावी, असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना मनसोक्तपणे फळे खाऊ घातली. रोजच्या शालेय डब्यात देखील रोज एक फळ आणा आणि प्रतिकार शक्ती वाढवा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगितले. 'जन गण मन' सीबीएसई , विद्यामंदिर तसेच पदवी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व मुलांनी द्राक्ष महोत्सवाचा आनंद लुटला. शिशु विहार मधील अनेक छोट्या मुली मुले शेतकरी वेशभुषेमधे आली होती, व स्वतःच्या हाताने फळांचे तबक घेऊन आनंदाने वावरत होते. सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील 'जे एम एफ' द्राक्ष बागेत बागडण्याचा आनंद घेतला.

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ !


प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दि २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.  या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
    
या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही (वाचन) आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.

“व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन”

आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.
    
आपले व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ईमेल: <dgiprdlo@gmail.com> या ईमेलवर अथवा ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६ या व्हॉट्सऍप क्रमांकावर तसेच ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या <diothane2013@gmail.com> अथवा 9503546004 या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावेत.
    
महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल –
महासंवाद – <https://mahasamvad.in/> 
एक्स – <https://twitter.com/MahaDGIPR> 
फेसबुक – <https://www.facebook.com/MahaDGIPR> 
इन्स्टाग्राम – <https://www.instagram.com/mahadgipr> 
युट्यूब – <https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR>
टेलिग्राम चॅनल – <https://t.me/MahaDGIPR>

तरी, ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ या उपक्रमात सहभागी व्हावे व आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवावी, असे आवहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

’महाकुंभ प्रयाग योग ‘ कार्यक्रमाला उपस्थिती

शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 'द सत्संग फाउंडेशन' नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय मेटे आदी यावेळी उपस्थित होते.

५० कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.