BREAKING NEWS
latest

पालपेणे गावात आरोग्य महोत्सव! संतोष जैतापकर यांच्या पुढाकाराने गावात आनंदाची लाट!

"गुहागरमध्ये आरोग्याची पर्वणी! संतोष जैतापकर यांच्या पुढाकाराने मोफत तपासणी आणि रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद"

गुहागर, दि. १० एप्रिल –पालपेणे गावात नुकताच एक जनहितकारी आणि आरोग्यवर्धक उपक्रम पार पडला, जिथे ‘आरोग्य हेच खरे धन’ हे साकारणारे संतोष जैतापकर वैद्यकीय टीम आणि वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हेमोग्लोबिन व इतर तपासण्या करण्यात आल्या. तरुणांनी रक्तदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे मार्गदर्शक म्हणून समाजसेवक आणि भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत, “कोणतीही वैद्यकीय अडचण असल्यास आमच्या वैद्यकीय टीमशी थेट संपर्क साधा, आम्ही नक्कीच मदत करू,” अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ, मुंबई आणि संतोष जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या सहकार्याने पार पाडले गेले. संदीप खैर यांच्या नेतृत्वाखाली टीम खास मुंबईहून शिबिरासाठी हजर होती.

ग्रामस्थ, स्वयंसेवक व तरुण मंडळी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आरोग्य महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला.

"हे केवळ शिबिर नव्हे, तर आरोग्य जनजागृतीचा सुरुवातीचा टप्पा होता – असे उपक्रम पुढेही राबवणार आहोत," असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

कॅमेऱ्यात हसणारे चेहरे रक्तात माखले! पहलगाममध्ये 26/11 पेक्षा भीषण हल्ला!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

"नाव विचारलं... आणि गोळ्या झाडल्या!" — पहलगाममध्ये पर्यटकांवर थेट नरसंहार, २७ मृत, देश हादरला


पहलगामच्या शांत, थंडगार वाद्यांत पर्यटक फेरफटका मारत होते. कुणी निसर्गाच्या सौंदर्यात हरवले होते, तर कुणी मोबाइलमध्ये आठवणी कैद करत होते. पण या सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर मृत्यू दबा धरून बसला होता… अचानक काही अज्ञातांनी पर्यटकांना अडवलं… नाव विचारली… आणि काही क्षणांतच हवेत गोळ्यांचा आवाज घुमला! एकाच क्षणात हास्य, आनंद आणि जगण्याची आशा रक्तात माखली गेली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत २७ निष्पाप जीवांचा बळी घेतला. देशात खळबळ उडवणाऱ्या 26/11 हल्ल्याची आठवण करणारा हा हल्ला सध्या देशभर चर्चेचा विषय ठरतोय.

या भीषण हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. जखमींमध्ये माणिक पटेल (पनवेल) आणि एस. भालचंद्रराव हे असून सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती काश्मीर प्रशासनाने दिली आहे.

बैसरन खोऱ्याच्या उंच डोंगराळ भागात पर्यटक फिरत असताना दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यांनी एक एकजण पुढे बोलावून नाव विचारण्यास सुरुवात केली. 'तुमचं नाव काय?' या प्रश्नाच्या उत्तरादाखल काहीजणांनी नावं सांगितली आणि त्याच क्षणी गोळीबार सुरु झाला. अनेक पर्यटकांना काही कळायच्या आत गोळ्यांच्या वर्षावात कोसळावं लागलं. मृतांमध्ये तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. पुण्यातील एका पाच जणांच्या कुटुंबालाही या गोळीबाराचा फटका बसला असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर देशभरातून संतापाचा सूर उमटला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतली. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याशी त्यांनी फोनवर संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. हल्ल्यानंतर पहलगाम आणि आसपासच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रश्न उभा राहतोय — दहशतवाद्यांना पर्यटकांची नावं कशासाठी हवी होती? त्यामागे धार्मिक ओळखच होती का?

या घटनेनंतर केंद्र सरकारवर आणि जम्मू-काश्मीर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढला आहे. देशातील सामान्य जनतेसह विविध पक्षांचे नेतेही या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.

पाहुणचाराच्या भूमीत पाहुण्यांचा संहार — अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे.

ही घटना केवळ एक दहशतवादी हल्ला नाही, तर देशातील सुरक्षिततेच्या यंत्रणेला टाकलेलं आव्हान आहे.
हे फक्त मृत्यूनं झाकोळलेलं पहलगाम नाही, तर देशाच्या मनामनात घर करून बसलेलं एक जखमी वास्तव आहे.


फायर इक्स्टिंग्विशर हातात... नागरिक सज्ज! अग्नी सुरक्षा सप्ताहात धडाकेबाज उपक्रम!

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

जोगेश्वरी | एप्रिल २०२५
अग्नी सुरक्षा सप्ताह २०२५ निमित्ताने मुंबई अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध ठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत. "सावध रहा, सुरक्षित रहा!" या संदेशासोबत नागरिकांना आगीच्या धोक्यांपासून बचावाचे धडे दिले जात आहेत.

१३ एप्रिल – रणभेरी वाजली रस्त्यावर!
परिमंडळ ३ तर्फे वांद्रे अग्निशमन केंद्र ते अंधेरी अग्निशमन केंद्र दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायरन, बॅनर्स आणि अग्निशमन दलाच्या शिस्तबद्ध पावलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

१५ एप्रिल – समाजाच्या हृदयाशी भिडले ‘फायर सेफ्टी’चे धडे!
शिव साफल्य गृहनिर्माण संस्था, शिवाजी नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
"आग लागल्यावर घाबरायचं नाही, सज्ज व्हायचं!" या मंत्रासोबत नागरिकांना फायर इक्स्टिंग्विशर वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

अग्निशमन दलाचे अधिकारी, स्वयंसेवक यांची प्रेरणादायी उपस्थिती
या कार्यक्रमात मरोळ अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ केंद्र अधिकारी अजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कायम सज्जतेचा संदेश दिला.
समाजसेविका आणि अग्निशमन स्वयंसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी महिलांना आग लागल्यास काय काळजी घ्यावी यावर विशेष मार्गदर्शन केले.

स्थानिक सहभाग हीच खरी ताकद!
कार्यक्रमाचे आयोजन शिव साफल्य संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. डॉमिनिक फर्नांडिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने केले.
"जनजागृती हीच खरी आग विझवण्याची पहिली पायरी आहे!" हे त्यांचे विचार उपस्थित नागरिकांना प्रेरणा देऊन गेले.

जैन मंदिर प्रकरण: घाडगे हटले... पण खरा निर्णय घेणारा मास्टरमाईंड कोण? राजकीय पक्ष की आणखी कोण?

श्रद्धेवर बुलडोझर! विले पार्लेतील ९० वर्षे जुने जैन मंदिर तोडले, समाजात संताप… BMC अधिकारी नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली!

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई | १९ एप्रिल २०२५
मुंबईतील विले पार्ले पूर्व येथील प्रसिद्ध दिगंबर जैन चैतालयावर बीएमसीच्या के/ईस्ट विभागाने अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली केलेली कारवाई सध्या संपूर्ण शहरात संतापाचा विषय ठरली आहे. ९० वर्षांहून अधिक प्राचीन असलेले हे मंदिर कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात आले, आणि या घटनेने जैन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

कारवाईचा धक्का – आणि तत्काळ परिणाम
१६ एप्रिल रोजी पहाटे बीएमसीचे अधिकारी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह मंदिरात दाखल झाले. मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश करत पूजासामग्री, धार्मिक मूर्ती आणि ग्रंथांची नासधूस करण्यात आली, असा आरोप विश्वस्तांनी केला आहे. या कारवाईने केवळ एक धार्मिक स्थळ नव्हे तर एक ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त केला.

घाडगे यांची तडकाफडकी बदली
संपूर्ण घटनेमुळे बीएमसीच्या के/ईस्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे वादाच्या भोवऱ्यात आले.
संतप्त समाजाच्या निदर्शनानंतर मुंबई महापालिकेने तत्काळ निर्णय घेत, घाडगे यांची बदली केली असून सध्या त्यांची जबाबदारी इतर विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

हा निर्णय जाहीर होताच, आंदोलन करीत असलेल्या नागरिकांनी व जैन समाजाने काहीसा दिलासा व्यक्त केला, परंतु समाजाचा रोष अद्याप शांत झालेला नाही. "फक्त बदली नाही, कारवाई हवी!" अशी मागणी अजूनही होत आहे.

जैन समाजाचा सवाल – श्रद्धा अनधिकृत असते का?
मंदिर प्रशासनाने आधीच नियमनासाठी अर्ज केले होते, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, तरीही कारवाई करण्यात आली. ८ एप्रिल रोजी कोर्टाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ दिला होता, हे समजूनही BMC ने अचानक कारवाई केली.

मोठ्या प्रमाणात निषेध, पाठिंबा आणि राजकीय हालचाली
या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने आणि इतर धार्मिक संघटनांनी मोर्चे, निदर्शने केली.
"श्रद्धास्थळावर कारवाई हे केवळ बेकायदेशीर नव्हे तर अमानुष देखील आहे," असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

शेवटचा सवाल:
"आज मंदिर… उद्या कोण?"
धर्मस्थळे अनधिकृत असू शकतात का? की नियोजनशून्य प्रशासनच जबाबदार आहे?

क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना 'शिवछत्रपती पुरस्कार'..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला 'द्रोणाचार्य पुरस्कार' आणि 'शिवछत्रपती पुरस्कार' हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले, त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे. डोंबिवली शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन 'द्रोणाचार्य पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला याबद्दल या दोन्ही युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला.
त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, "हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे."
डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला आहे, तसेच त्यांचे गुरू पवन भोईर यांना 'द्रोणाचार्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले. 'माझे डोंबिवलीकर माझा अभिमान' असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीतील नांदिवलीत विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारतीची उभारणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डोंंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील इमारती तोडण्याचे नियोजन कल्याण-डोंबिवली पालिका, पोलीसांकडून सुरू आहे. या बेकायदा इमारतींवर न्यायालयाची टांगती तलवार असताना डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे आर.के. बाझार दुकान, सर्वोदय ऑर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजूस भूमाफियांनी पालीकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये घाईघाईने एक बेकायदा इमारत उभारणीचे काम पूर्ण केले आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून एकाचवेळी बांधकाम आणि त्याचवेळी त्या इमारतीला सफेद रंग लावून ही इमारत जुनी आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून केला जात आहे.

६५ इमारती तोडण्याचे नियोजन सुरू असताना भूमाफियांचे पालिकेला आव्हान

डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील आर.के.बाजार दुकानाच्या पाठीमागील भागातील रस्त्यावर, सर्वोदय ऑर्चिड गृहसंकुलाच्या लगत मागील भागात ही बेकायदा इमारत पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. या भागातून पालिकेचा विकास आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता जातो. या रस्त्यामध्येच ही बेकायदा इमारत भूमाफियांकडून उभारली जात आहे. डोंबिवलीतील बेकायदा इमारती तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिका, पोलीस आणि या इमारतींमधील रहिवासी हादरून गेले आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय, पालिका या यंत्रणांना आव्हान देत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण आहेत. या भूमाफियांना पालिका प्रशासनाचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ही बेकायदा इमारत अधिकृत आहे असे घर खरेदीदारांना दाखवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका विक्री करण्याची प्रक्रिया भूमाफियांनी सुरू केली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीत घर खरेदीदारांची फसवणूक होण्यापूर्वीच पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे आणि इमारत तात्काळ भुईसपाट होईल यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक आणि तक्रारदारांकडून केली जात आहे

नांदिवली पंचानंद हा डोंबिवली शहरातील नागरीकरण होत असलेला महत्वाचा भाग आहे. या भागात आखीव रस्ते, बगिचे, उद्याने, मैदानांसाठीचे राखीव भूखंड भूमाफियांनी यापूर्वीच बेकायदा इमारती बांधून हडप केले आहेत. सर्वोदय ऑर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजुला आठ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या आठ बेकायदा इमारती रखडलेल्या अवस्थेत आहेत. सर्वोदय ऑर्चिड ला पण त्यावेळच्या जिल्हाधिकारी यांनी सील ठोकले होते अशी कुजबुज ऐकू येत आहे.


नांदिवली पंचानंद भागात सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणारा भूमाफिया रस्ते मार्गात बेकायदा इमारत उभारत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. डोंबिवली नांदिवली पंचानंद भागात अलीकडे एकाही नवीन बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित इमारत बेकायदा आहे. या इमारतीची सर्वेयरमार्फत पाहणी करून कारवाईच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील असे नगररचना विभागाचे उपअभियंता देविदास जाधव म्हणाले. तसेच 'ई' प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम सुरू नाही. तरीही असे काही बांधकाम सुरू असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्यावर विहित प्रक्रिया पार पाडून त्या बेकायदा इमारतीवर तात्काळ कारवाई केली जाईल असे 'ई' प्रभाग सहाय्यक आयुक्त, तुषार सोनावणे यांनी बोलून दाखवले.

विद्यार्थ्यांच्या मनात थरांच्या उंचीइतकी प्रेरणा...! जय जवान गोविंदा पथकाचं भांडुपमधील थरारक सादरीकरण


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)

नुकतेच भांडुप (प.) येथील यशवंत चांदजी सावंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष नगर येथे एक आगळं-वेगळं दृश्य पाहायला मिळालं. परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीला दिली जाणारी ऊर्जा यांचा अनोखा संगम विद्यार्थ्यांनी अनुभवला – कारण जय जवान गोविंदा पथकाला शाळेकडून थरांचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.

या वेळी विद्यार्थ्यांनी गोविंदांच्या सादरीकरणाकडे केवळ पाहिलं नाही, तर त्या प्रत्येक थरात त्यांनी प्रेरणाही शोधली. प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिस्तबद्ध आणि जीव ओतून सादर केलेलं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर ठसलं. त्यांच्या डोळ्यांतील चमक, विचारलेले प्रश्न, आणि प्रत्येक क्षणाचं कौतुक – हे दृश्य वर्णन करण्याइतपत शब्द अपुरे पडतात.

दहीहंडी केवळ सण नाही तर तो आता संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास शिकवणारा एक प्रकारचा साहसी खेळ बनला आहे, हे या उपक्रमाने अधोरेखित केलं. या विशेष कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक राजू तु. गडहिरे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले गेले.