BREAKING NEWS
latest

नवीन उद्योग उभारणीबाबत ५० हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांचे वचन..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राज्यातून आतापर्यंत सहा प्रकल्प बघता-बघता एकापाठोपाठ दुसऱ्या इतर राज्यात गेले असल्याने राज्य सरकार आणि उद्योगमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. हे सर्व प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीक्षम असल्याने अनेक बेरोजगारांना आपल्या तोंडचा घास कुणीतरी पळविला असल्याचे याप्रसंगी जाणवले. प्रसंगी विरोधक आणि सामाजिक स्तरातून नाराजीचा सूर देखील आवळला गेला. आता मात्र, खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ५० हजार कोटींची उद्योग गुंतवणूक राज्यात आणण्याचे वचन दिले आहे.

  सविस्तर वृत्तानुसार, जर्मनीतील काही उद्योगसमूह महाराष्ट्रात उद्योग गुंतवणूक करण्यास उत्सुक असून, याचाच भाग म्हणून भेटीकरिता पुण्यात जर्मन शिष्टमंडळ आले असल्याची माहिती सामंतांनी दिली. या भेटीमुळे रखडलेले उद्योग सुरु होणार असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्या जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. दाओसमधील काही कंपन्यांचे 'एमओयू' करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली, तसेच पुण्यात ज्या जर्मन कंपन्या सोलर, विंड, ऑटोमोबाईल आणि बॉयलर इत्यादी मध्ये कार्य करत आहे, त्यादेखील मोठी गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे सामंतांनी सांगितले. येत्या काळात महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक आणणार हे आश्वासन नाही तर वचन देत आहे, असे मत सामंतांनी मांडले.

  एकंदरीतच उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यास नक्कीच रोजगार पूरक उद्योगउभारणी होण्यास हातभार लागणार आहे, यामुळे अनेक बेरोजगारांचा प्रश्न सुटणार आहे. लवकरच सिनारामस हा १० हजार ५०० कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, त्यामुळे या सर्व बाबी सत्यात उतरण्याची सर्वांना आशा लागून राहणार आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत