BREAKING NEWS
latest

कोकणवासीयांच्या गणेशोत्सव प्रवासावर दलालांचा ताबा; विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण ग्रामीण :  गणेशोत्सवात गौरी गणपती निमित्त मुंबई सह उपनगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या हि लक्षणीय असते. परंतु कोकणवासियांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्याकरिता रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. यंदा देखील एकाही रेल्वे गाडीत कोकणवासियांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकणवासियांची निराशा झाली आहे. त्यामुळे कोकणवासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच असणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीट बुकिंग फुल्ल झाली असल्यामुळे सध्या कोकणवासीयांसमोर गावी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या व्यथा मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मांडल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे गौरी गणपती दरम्यान सर्व गाड्या फुल्ल झाल्या असून एकही गाडीमधील प्रतीक्षा यादीत उपलब्ध तिकीट दिसून येत नाही. कोकणात गणपती उत्सवानिमित्त जाणारे बांधव आरक्षित तिकीट मिळावं म्हणून रात्रभर रांगेत उभे असतात. परंतु तिकीट मिळत  नाही कारण रेल्वे आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात गेलेलं आहे. दरवर्षी रेल्वे कडून दलालांवर कारवाईचा फार्स केला जातो पण प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे गौरी गणपती निमित्त आत्ताच नवीन विशेष गाड्यांचे नियोजन करावं असं आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. 

तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल, वसई येथून सर्वाधिक आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून कोकणवासियांना दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांच्या पत्रानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्व कोकणवासियांच्या नजरा खीळल्या असल्याचे दिसून येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत