BREAKING NEWS
latest

सर्वपक्षीय युवा मोर्चा आंदोलनकर्त्यांच्या मंडपावर महापालिकेची तोडक कारवाई; शेतकरी भूमिपुत्र संतप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.०६ : २७ गावांची वेगळी नगरपालिका झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी सर्व पक्षीय युवा मोर्चा अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांनी दिनांक २ जुलै पासून सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाची परवानगी घेतली नाही म्हणून त्यावर कारवाई करीत तेथील मंडप पालिका प्रशासनाने उखडून टाकला, पोलीसांकडून दडपशाही सुरू आहे, आमचे आंदोलन चिरडून टाकू नका, भूमीपुत्रांच्या आत्मसन्मानाला जागे करू नका त्याचा परिणाम वाईट होईल, पूर्वी आम्हाला ब्रिटिश संबोधले जायचे, त्यापद्धतीची कृती करण्यास भाग पाडू नका असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चा चे बेमुदत आंदोलन थांबविलेल्या आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
                           
२७ गावांमधील शेतकरी भूमीपुत्रांच्या अतिमहत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागले जावेत तसेच राज्य शासनाचे लक्ष याकडे केंद्रीत व्हावे यासाठी डोंबिवली पूर्वेकडील मौजे सोनारपाडाजवळील साईबाबा मंदिर शेजारी भूमिपुत्र बेमुदत धरणे आंदोलनासाठी मंगळवार  दि.०२ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून बसले होते. मात्र शुक्रवारी पालिकेने आंदोलनकर्त्यांच्या मंडपावर परवानगी नव्हती म्हणून तोडक कारवाई केली. आमचे आंदोलन थांबणार नाही तर ते अधिक मोठे आणि उग्र असेल याची माहिती देण्यासाठी सांगाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेण्यात आली.
                            
यावेळी सर्व पक्षीय युवा मोर्चा अध्यक्ष गजानन पाटील, सल्लागार तथा माजी नगरसेवक संतोष केणे, मुकेश पाटील, रतन चांगो पाटील, काळू कोमस्कर, बाळाराम ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी भूमिपुत्र उपस्थित होते.

यावेळी गजानन पाटील म्हणाले, २७ गावातील गावकऱ्यांनी गरजेपुरती बांधलेली बांधकामे सरसकट दस्त नोंदणी करणे, डोंबिवली एमआयडीसीच्या झालेल्या स्फ़ोटात आगीमध्ये होरपळलेल्या नागरिकांना नुकसानीची भरपाई ताबडतोब देणे, कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या प्रकल्पात स्थानिकांना न्याय देणे अशा मागण्यांसाठी सर्व पक्षीय युवा संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण केले होते. मात्र शुक्रवार ५ तारखेला सायंकाळी सहा नंतर कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन आणि पोलीसांनी उपोषणकर्त्यांच्या मंडपावर कारवाई करत नोटीसा पाठविल्या आहेत. तर संतोष केणे यांनी सांगितले की, मंडप उखाडला म्हणून आम्ही मागे हटणार नाही, आमच्या मागण्या जोर धरणारचं, सरकारने जर आमच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आषाढी एकादशीनंतर भूमिपुत्र टाळ-मृदुंग हाती घेऊन रस्त्यावर उतरतील.
याशिवाय इतर भूमिपुत्रांचे म्हणणे आहे की, २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका याबरोबरच 'अमुदान केमिकल कंपनी' च्या बॉयलर रिऍक्टर स्फोटातील मुत्युमुखींच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये, मेट्रो संदर्भात माणगाव आणि सोनारपाडा येथे कारशेड होतेय त्याप्रित्यर्थ पोलीसांनी व एमएमआरडीएने भर पावसात जेसीबी लाऊन घरे तोडली. जनतेचे सरकार म्हणणाऱ्या या लोकांनी 'माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आणि दुसरीकडे या कारवाईत ४० दिवसाची मुलगी हातात घेतलेल्या मातेला बेघर केले. हि अत्यंत वाईट आणि खेदाची गोष्ट आहे. तहसीलदारांना विनंती केल्यानंतरही कारवाई केली गेली. वास्तविक भूमिपुत्रांना विश्वासात न घेता व पूर्व सूचना न देता भूसंपादन केले. स्वातंत्र्य काळापासून शेतकऱ्यांकडे या जमिनी आहेत, त्यावर त्यांचा अधिकार असून ताबा त्यांचा आहे. कारवाई करताना सरकारने शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. आम्ही विषयावर आवाज उठविल्यावर विधानसभेत कल्याण ग्रामीण मतदार संघाचे मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी आवाज उठविला आहे. आम्ही आमच्या मागण्यासाठी बेमुदत आंदोलन छेडले. मात्र त्यावर कारवाई झाली. आता यानंतर 'जेल भरो आंदोलन' करू असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत