कल्याण - कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तश्रृंगी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले. यात सहा जणांचा मृत्यू झाला. यात एका बालकाचा यामध्ये समावेश आहे. चार जखमींवर पालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आणि इमारत परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः झोपड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत प्रशासनाला सांगितले. दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा