डोंबिबली दि.२३: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार करत जनतेच्या खिशावर लूट करणाऱ्या “चेन्नई पॅटर्न”च्या विरोधात पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नवीन “चेन्नई पॅटर्न” कचरा संकलन प्रक्रिया विषयी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पक्षाने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आणि महानगरपालिकेच्या सर्व भोंगळ कारभारावर गंभीर आरोप केले. नवीन कर पद्धतीनुसार सर्वसामान्य नागरिकांवर ५०% पर्यंत कर वाढ लादण्यात आली आहे. ६०० रुपये वार्षिक कर असलेला आता वर्षाला ९०० रुपयांचा कर सर्व नागरिकांना भरावा लागणार असून, घराचे क्षेत्रफळ लहान असो वा मोठे, सर्वांना समान कर लावण्यात आला आहे. ही सरळसरळ जनतेची लूट असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
या योजनेअंतर्गत कचऱ्याचे केवळ संकलन केले जाणार असून त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही. सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये दररोज सुमारे ८५० टन कचरा तयार होतो. मात्र, उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीतील लवकरच सुरू होणाऱ्या प्लांटची एकत्रित प्रक्रिया क्षमता जवळपास ६५० टन एवढीच आहे. अजून मागील बऱ्याच वर्षापासून पडलेला कचरा दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या डोंगरांवर आहे. मागील अनेक वर्षांपासून तिथे १०,००० मेट्रिक टन कचरा साचलेला असून कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेतील ठेकेदार बदलले जातात पण काम करणारी माणसे मात्र तीच राहतात. ऍंथोनी, आरबीएल, आणि आता सुमित ही नावे बदलली, पण कामाच्या दर्जात कोणताही फरक पडलेला नाही. शिवसेनेने आरोप केला की सत्ताधारी पक्ष नागरिकांना दिशाभूल करत आहे आणि लपवाछपवी करून जनतेवर आर्थिक बोजा टाकत आहे. शहरातील ड्रेनेज आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. काँक्रीट रस्त्यांची कामे रखडली आहेत, मलवाहिन्या चोकअप झालेल्या आहेत आणि नवीन ठेकेदार नेमलेले ही नाहीत. येणाऱ्या पावसाळ्यात शहरात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असूनही प्रशासन गंभीर नाही.
शिवसेना पक्षाच्या वतीने आयुक्तांना या पत्रकार परिषदे मधून विनंती करण्यात आली की जर या सर्व बाबींवर प्रशासनाकडून योग्य नियंत्रण नसेल, अंकुश नसेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्यास समर्थ असेल. सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी वाढीव कराचा विरोध करावा आणि आपला हक्क मागावा. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा सचिव सुधीर पाटील, कल्याण उप तालुकाप्रमुख भालचंद्र म्हात्रे, कल्याण ग्रामीण डोंबिवली विधानसभा समन्वयक ओमनाथ नाटेकर, डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहर प्रमुख शाम चौगुले, चेतन म्हात्रे , कुणाल ढापरे, संजय पाटील, राहुल चौधरी, युवासेनाचे आदित्य पाटील, शिवसेना महिला आघाडी सुप्रियाताई चव्हाण, विधानसभा संघटिका सौ. अक्षरा मनोज पटेल, शहर संघटिका डोंबिवली पूर्व सौ. प्रियंका विचारे, शहर संघटिका डोंबिवली पश्चिम रिचा कामतेकर, युवती शहर अधिकारी डोंबिवली पश्चिम प्रियांका पाटील, शाखा संघटिका कोपरगाव स्मिता पाटिल, ऊपशहर प्रमुख डोंबिवली पूर्व दीपाली राऊळ, उपविभाग संघटिका आयरे रोड छाया सावंत, शाखा संघटिका प्रिया विजय दांडगे, शाखा संघटिका डोंबिवली पश्चिम स्वप्नाली बांधणे तसेच शिवसैनिक, युवासैनिक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा