कल्याण : यावर्षीच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा जलद गतीने राबविण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन यंत्रणांशी निगडित अधिकारी /कर्मचारी वर्गास आचार्य अत्रे रंगमंदिर येथे प्रशिक्षण देखील देण्यात आले असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.
पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार हापालिकेच्या दहा प्रभागात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सहा. आयुक्त यांचे अधिनस्त सर्व संबंधित विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून प्रभाग निहाय उपायुक्त वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिका मुख्यालयातही (आपत्कालीन) मुख्य नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष ३० ऑक्टोबर पर्यंत कार्यरत राहणार आहे. सदर मुख्य नियंत्रण कक्ष सकाळी ६ ते २ दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ या तीन सत्रात सुरू राहणार असून या मुख्य नियंत्रण कक्षावर रात्रीचे सत्रात पर्यवेक्षण करण्यासाठी वर्ग एक व वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात 18002337383 आणि 18002334392 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा