डोंबिबली दि.२३ : डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील "अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड" या रासायनिक कारखान्यात गेल्या वर्षी दि. २३ मे २०२४ रोजी रिएक्टरमध्ये तापमान व दाब वाढल्यामुळे या रिएक्टरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात १३ कामगारांचा मृत्यू झाला व ६७ व्यक्ती जखमी झाल्या. शिवाय या कारखान्याच्या दोन तीन किलोमीटरच्या परिसरातील राहत्या घरांचे व औद्योगिक आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची कधीही भरून न निघणारी हानी झाली. राज्य शासनामार्फत मृतांच्या वारसांना 'मुख्यमंत्री सहायता निधी' मधून प्रत्येकी रु. ५ लाख अदा करण्याची तरतूद करण्यात आली.
या भीषण स्फोटामध्ये मौजे सोनारपाडा व सागांव येथील भूमिपुत्रांच्या राहत्या घरांचे व व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान झाले. हे भूमिपुत्र कोण ? तर १९६० च्या दशकामध्ये राज्याच्या विकासाकरिता व उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी याकरिता डोंबिवली शहरालगतच्या मौजे माणगाव, संदप, सागांव, सोनारपाडा, गोळवली, खंबाळपाडा, पाथर्ली, आजदे, सांगर्ली इत्यादी गावांच्या सुपीक शेत जमिनी राज्य शासनाने तुटपुंजा मोबदला देऊन संपादित केल्या. या डोंबिवली एमआयडीसी विभागामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्याला आपला स्वतःचा पीऍपी प्लॉट मिळवताना सुद्धा अनेक अडचणी येत आहेत. या डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रामधून अनेक कारखान्यांचे स्थलांतर झालेले आहे. तसेच अशा भीषण स्फोटांच्या मालिकांमुळे धोकादायक, अती-धोकादायक कंपन्यांचे स्थलांतर होण्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे. या स्थलांतरित झालेल्या कंपन्यांच्या जागांमध्ये येथील बाधित भूमिपुत्रांना ज्याप्रमाणे लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांनी नवी मुंबईतील सिडको प्रशासना विरोधात जे आंदोलन केले त्या आंदोलनामुळे तेथील सिडको बाधितांना १२.५०% टक्के पुन्हा नव्याने भूखंड मिळाले. त्याचप्रमाणे येथील बाधितांना सुद्धा नव्याने भूखंड वितरित करावेत अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
अमुदान कंपनीच्या चुकीमुळे गेल्या वर्षी झालेल्या या भीषण स्फोटाने येथील राहती घरे व व्यावसायिक मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत राज्य शासनाने सूचना केल्याप्रमाणे कल्याण तहसील कार्यालयामार्फत एकूण ९८० नुकसानग्रस्तांची राहती घरे व व्यावसायिक मालमत्तांचे पंचनामे करून १३ कोटी, ९० लाख, ७३ हजार, ४१८ रु. इतकी नुकसान भरपाईची रक्कम कळविण्यात आली होती. या कार्यवाहीला एक वर्ष होत आले तरी सुद्धा नुकसानग्रस्त मालमत्ता धारकांना अजूनही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. या नुकसानग्रस्त मालमत्ता धारकांना ही नुकसान भरपाई मिळावी याकरिता संविधानिक मार्गाने राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सोनारपाडा येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर बैठकीत सर्व नुकसानग्रस्तांनी सहभाग घेऊन राज्य शासनाविरुद्ध आक्रोश आंदोलन केले.
या सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या जाहीर बैठकीला काँग्रेसचे श्री. संतोष केणे, गजानन पाटील, ऍड. शिवराम गायकर, राम पाटील, महेश संते, कर्सन पाटील, ऍड. राजेश जाधव, सुनील पाटील, शशी पाटील, दत्ता वझे, रतन पाटील, बालाराम ठाकूर, मधुकर माळी, शिवाजी माळी, सुमित वझे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा