पुणे - मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यात २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे व दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे घडली. रविवार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. केवळ पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या या पुलावर काही चारचाकी आणि दुचाक्या देखील होत्या आणि सुमारे शंभर जण यावेळी पुलावर जमा झाले होते. याच गर्दीत काही पर्यटक पुलावर थांबले असताना भार सहन न झाल्याने तीस वर्षे जुना असलेला हा लोखंडी पूल अचानक कोसळला आणि अनेक जण थेट नदीत पडले.
मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल कोसळला आहे. दरम्यान, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातातील सुमारे ३८ जणांना वाचविण्यात आले असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, पोलीस, एन डी आर एफ, स्थानिक लोकांच्या सहाय्याने हे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा