कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन फी म्हणून ९०० रुपये वसुली करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व उबाठा सेनेने करदात्या नागरिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी मोर्चा काढून ३०० रुपयांचा वाढीव कर रद्द करावा अशी मागणी केली, मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त अभिनव गोयल यांनी वाढीव कर रद्द केला जाणार नसल्याचे जाहीर केले. राज्य शासनाच्या निर्देशनानुसार महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन साठी महापालिकेने निधी जमा करावयाचा असून त्या साठी राज्य वा केंद्र सरकार कोणताही निधी देणार नसल्याने, पालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर ६०० रुपयावरून ९०० रुपये केल्याने राजकीय पक्षामध्ये एकच खळबळ माजली व विरोध सुरू झाला.
मात्र महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आयुक्तांच्या परवानगीने वाढीव कर असलेली बिले पाठविली असून वसुली सुरू केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषद मध्ये पत्रकारांनी घनकचरा व्यवस्थापन करवाढीबद्दल विचारले असता आम्ही वाढ केली आहे, या राज्य सरकारचा काही संबंध नाही, आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सांगून निर्णय बदलणार नसल्याचे सूतोवाच केला. घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाणवते. कल्याण-डोंबिवली महापालिकेला जनतेची नाहीतर फक्त न्यायालयाचीच भाषा समजते अशी प्रतिक्रिया श्रीनिवास घाणेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा