दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे," अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलीसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार. राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला. पोलीस प्रशासनास कळवले, दिवा प्रभाग समिती यांनाही कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्येक वर्षापासून हिच परिस्थिती आहे. कोण बोलणार ? गुंडागर्दी, हुकूमशाही सुरू आहे. माणुसकी जिवंत राहिली नाही. कायद्याचा धाक राहिला नाही. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा अशी मी दिवा वासियांतर्फे मागणी करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा