BREAKING NEWS
latest

आईपण भारी देवा...


आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर असे म्हटले जाते. आई हा शब्द उच्चारला की मनात वात्सल्याचा पाझर फुटतो. ती प्रत्येकाच्या जीवनातील वरदान आहे. असे असताना समाजात घडणाऱ्या विपरीत घटनांना नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधितांच्या आईला जबाबदार धरले जाते. 

जेव्हा परिसरात ८ व्या महिन्यात गर्भपात केलेले तेही मुलगा असलेले अर्भक गटारात फेकलेले आढळते तेव्हा संवेदनशील मनाला यातना होतात आणि आश्चर्यही वाटते. एकीकडे महिलांवर बलात्कार होतात तर दुसरीकडे महिला कशा वागतात? याचा विचार करून आपल्या पैकीच एका स्त्रीच्या क्रूर कृत्याची लाज वाटते. आधुनिकतेकडे आकर्षित होणाऱ्यांनी या घटनांचे दुष्परिणाम गांभिर्याने लक्षात घेतले पाहिजेत. समाजात कुमारी मातांचेही प्रमाण वाढत आहे. एक हात कमरेत आणि दुसऱ्या हाताने सिगारेटचा धूर हवेत सोडणारा, एक हात खांद्यावर आणि दुसऱ्या हाताने दारूचा पेग घेणारा प्रियकर मुलींना लयभारी वाटतो. कारण मुलीने बापालाअगोदरच प्रेम प्रकरणातील खलनायक ठरविलेला असतो. आईला नेहमी प्रमाणे गृहीत धरले जाते. आई होणे खरच इतक सोप आहे का? आईपणा बरोबर मुलांचे संस्कार , संगोपन , सुरक्षिततेची जबाबदारी तिला पेलवायची असते. आई होण्याची चाहूल लागते तेव्हा स्त्री आनंदाने भारावून जाते. त्याच बरोबर शरीरात होणाऱ्या बदलांनी अंतर्बाहय हेलावून जाते. गर्भधारणे पासून प्रसूती पर्यंतच्या वेदना ती निमूटपणे स्विकारते कारण तिला मूल केव्हा होणार? या प्रश्नाने आप्त-स्वकीयांनी भंडावून सोडलेले असते. त्यांची तोंड तात्पुरती बंद झालेली असतात. मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या स्त्रीला सतत आपल्याला होणारे बाळ कसे असेल? कसे दिसेल? प्रसूती व्यवस्थित होईल का? मला त्रास झाला तरी चालेल पण माझे बाळ निरोगी जन्माला यावे अशी तिची माफक इच्छा असते. तिच्यासाठी तो आनंददायी व अविस्मरणीय क्षण असतो. प्रसूती होईपर्यंत सर्वांनाच मुलगा की मुलगी होणार याबद्दल उत्सुकता असते. आपल्या देशात अजूनही लिंग भेदाला सामोरे जावे लागते. पहिली मुलगी जन्माला आली किंवा सर्व मुलीच असलेल्या स्त्रीला समाजात टोमणे ऐकावे लागतात. त्यापेक्षा भयंकर स्थिती तृतीयपंथी, दिव्यांग मूल जन्माला आलेल्या आईची असते. आई मुलांमध्ये भेदभाव करू शकत नाही.अजूनही तृतीयपंथी आणि दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित आहे. त्यांना योग्य न्याय देताना आईला कौटुंबिक आणि सामाजिक कोंडीही सहन करावी लागते.

सर्वसामान्य मुलांच्या लैंगिक विकासाच्या दृष्टीने विषय, प्रकल्प असतात . परंतु असामान्य मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अजूनही जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. अशा मुलांकरीता आई ही दिपस्तंभ असते. स्वतःला विसरून तिला या मुलांच्या शारिरिक, मानसिक , बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या भविष्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करूनही आज देशात विविध क्षेत्रात मेहनतीने, प्रामाणिकपणे ही मुले नेतृत्व करीत आहेत. त्यासाठी आईने प्राथमिक शरीरशास्त्रा पासून सुरूवात करून व्यापक अर्थाने जीवन शिक्षणा पर्यंत मेहनत घेतलेली असते. याउलट निसर्गाने कृपा केलेली स्मार्ट मुले आज भरकटलेली दिसतात. विविध माध्यमांमुळे मुलांमध्ये लैंगिक जाणिवा विकसित होत आहेत. मुलांना लवकर येणारी समज हा सर्वसामान्य पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. विधि आयोगाच्या सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या किमान वयोमर्यादे बाबत केंद्राकडून सूचना मागविल्या आहेत. सद्या ही वयोमर्यादा १८ वर्षे आहे ती १६ वर्षे करावी अशी मागणी जोर धरत आहे. विधि आयोगाने महिला आणि बालविकास मंत्रालयाकडेही त्यांचे मत मागितले आहे. तर दुसरीकडे प्रसूती दरम्यान माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बालविवाह हा गुन्हा असा विरोधाभास पहायला मिळतो. यामध्ये प्रत्यक्ष दुष्परिणाम सहन करावे लागतात ते स्त्रीला. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलीच्या संगोपना सोबत तिच्या संरक्षणाची आणि समुपदेशनाची भूमिका आईलाच निभवावी लागते.   मुलगी वयात येते तेव्हा आई काळजीपोटी तिला राहण्याच्या सहलीला जाणे, मुलांसोबत खेळणे, पोहणे, पाय पसरून बसणे, अनोळख्या ठिकाणी जाण बंद करायची. शरीरा विषयी बोलणे घरामध्ये मान्य नव्हते . परंतू आता मुलीला अस्वस्थ करणारे, बुचकळ्यात टाकणारे, विचारात पाडणारे किंवा उध्वस्त करणारे अनेक अनुभव, प्रसंग, व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊ शकतील त्यांच्यापासून सावध रहा अशी सांगणारी अल्पशिक्षित आई आधुनिक मुलींना मागासलेल्या विचारांची वाटते.

शारीरिक दृष्ट्या स्री पुरूषां पेक्षा जास्त बळकट असते. सारख्याच परिस्थितीत वाढविल्यास मुली मुलांपेक्षा सहनशील असतात आणि जास्त वेदना सहन करू शकतात . जास्त खंबीरपणे आयुष्याशी सामना देऊ शकतात . वयात येताना मुलींची मानसिक अवस्था नाजूक हळवी होते. त्यांना मुलांबद्दल खूप आकर्षण वाटू लागते. मुलांच लक्ष वेधून घ्याव, सिनेमे पहावेत, शरीराचा सारखा विचार करावा, त्याविषयी बोलावे अशा सारख्या प्रवृत्ती या वयात मुलींमध्ये उफाळून येतात. व काही मुली खुप टोकाच वागतात. निसर्गाने दिलेल्या शक्तीचा गैरवापर न करता तिचा आदर राखायला आपल्याला जी शिकवते तिलाच संस्कृती म्हणतात . 

वयात येताना आईशी मुलीचे संबंध अगदी मोकळेपणाचे हवेत आणि ती जे सांगेल ते आपल्या हिताचेच असेल असा विश्वासही हवा. सुमारे अठरा वर्षाच्या आसपास तिचे शरीर आईपणास समर्थ होते. त्यापूर्वी मुल होण म्हणजे तिला बाळंतपणाचा धोका, तिच्या मुलपणावर बंधन आणि पुढे जन्मणार मुल कितपत सशक्त असेल या विषयीही शंका म्हणून  तर आपल्या शासनाने, कायदयाने मुलीच्या लग्नाच किमान वय अठरा वर्षे ठरवलेले आहे. ती अट खुद्द मुलीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्याही हिताचीच आहे. आज शहरांमध्ये चांगल्या प्रतिष्ठित वस्त्यांमध्ये, रस्त्यांवर, कचरा कुंड्यांच्या आसपास, गटारात मासिक पाळीच्या रक्ताळलेल्या घड्या खुशाल भिरकावून देतात. त्याच प्रमाणे रक्तामासाचं अर्भक फेकून देण्याचा कल वाढलेला आहे. याला काय सुसंस्कृतपणा म्हणतात? घरातील पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तरी त्याला विधिपूर्वक दफन केले जाते.

इंग्रजी चित्रपट, मासिक , कथा कादंबऱ्या मधिल अवास्तव चित्रणाने शरीराची व मनाची गरज टोकाला गेल्याने कामेच्छा पूर्ण करण्यासाठी अचाट आणि अफाट कल्पनांमुळे उत्तेजित होणाऱ्या मुलांपेक्षा मुली जास्त भावनाप्रधान असतात या सर्वसामान्य प्रवृत्ती आहेत. परंतू आपल्याला माणसा सारख किमान सुसंस्कृत, विचारी, समतोल आयुष्य जगायच आहे इतपत भान युवक युवतींना शाळा महाविद्यालयातील शिक्षणाने येणार नसेल तर ते ज्ञान काय कामाचे? अर्थात मुलामुलींनी एकत्र वावरण्यात काहीच धोका नाही . मग एकत्र जगायच असेल तर पुरेशा माहितीनिशी, पुरेशा खबरदारीनिशी का जगू नये? पालकांना मित्र मैत्रीणीं सोबत सहलीला जातो, गणपती, नवरात्री सारख्या मंगल प्रसंगी फिरायला जातो अस खोट सांगून त्यांचा विश्वासघात करताना हल्लीच्या तरूणाईला काहीच वाटत नाही ? अजूनही आम्ही शिक्षणाने माणूस समृद्ध होतो या भ्रमात आहोत असे वाटते. यांना जिवशास्त्र शिकवल जीवनशास्त्र कोण शिकवणार? त्रिकोण , चौकोन, षटकोना पेक्षा महत्वाचा  आहे आयुष्याचा दृष्टिकोन. विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वांची कारण व्याकरणा पेक्षाही अंतःकरणाची भाषा असते महत्त्वाची. लेकराला पाॕकेटमनी, बाईक अन भलेही दिली जरी कार किती छान झाल असत जर दिले असते संस्कार  अशा आशयाची वाचनात आलेली कविता ह्याला आयुष्य म्हणाव काय? ही अशा प्रसंगी तंतोतंत पटते.

या वागण्याला केवळ तरूणाईला दोष देऊनही प्रश्न सुटणार नाहीत कारण लिव्ह इन रिलेशनशीपच फॕड वैवाहिक जीवनाचा आस्वाद घेतलेल्या दोन मुले असणाऱ्या जोडप्यां मध्येही वाढत आहे. आपल्याला अनेकदा भूक लागते आणि अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्या आसपास असतात. पण म्हणून काही दर भुकेला चोरून , बळजबरीने किंवा दुसऱ्यापुढच अन्न ओढून आपण आपल्या पोटाची तरतूद करत नाही . तर आपली भूक आटोक्यात रहावी आणि सन्मानाने भागवता यावी असे व्यवस्थापन शास्त्र अत्यंत दारिद्रयात दिवस काढणारी आई शिकवत असते. मग केवळ पैसा आणि कामशास्त्राच्या आहारी जाऊन आईच्या संस्कारांची कमी असा आपल्या आईचा उध्दार करायला लावणे केव्हातरी थांबणार आहे का? 

आपल्या बाळाच्या ओढीने व्याकुळ होऊन अवघड कडा पार करणारी हिरकणी सर्वश्रुत आहे.

असा आपला इतिहास असताना  पोटच्या गोळ्याला नाल्यात फेकून देणारी आई कुठून तयार झाली?

वर्षभर बेभान होऊन नाचा पण कधीतरी समाजसुधारक सावित्री बाई फुले, अनाथांची माय सिंधूताई  सपकाळ यांना वाचा. केवळ एक दिवस मदर्स डे साजरा करण्यापेक्षा आईपणाचे महत्व प्रत्येक पाऊल उचलताना स्मरणात ठेवा. जिथे चुकतय तिथे खर बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही  पण आईच्या मनाला नक्की समाधान मिळेल. गर्भातील बालकांचा मृत्यू टळेल ही माफक इच्छा. जय हिंद !


आपली नम्र,

सुरक्षा शशांक घोसाळकर

पवई, मुंबई .

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत