BREAKING NEWS
latest

'अल्टीमेट खो-खो सीझन २' मधील खरी लढत अखेर महाराष्ट्रातच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये साखळी सामने संपले असून गुरुवारी पहिला उपांत्य फेरीचा सामना 'ओडिशा जगरनॉट्स' व 'गुजरात जायंट्स' तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना  'चेन्नई क्विक गन्स' व 'तेलगु योध्दास' यांच्यात रंगेल. या चारही संघांचे कर्णधार हे महाराष्ट्राचे असून खरी लढत महाराष्ट्रामधून प्रतिनिधित्व करत असलेल्या या कर्णधारांमध्येच होणार आहे.

अक्षय भांगरे : सर्वप्रथम महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरात जायंट्सच्या संघाचा कर्णधार अक्षय भांगरे असून तो मुंबईतील भांडूप येथील श्री सह्याद्री संघाचा एक आघाडीचा खेळाडू आहे. सलग दुसऱ्या वर्षी तो गुजरात जायंट्सचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या वर्षी गुजरात जायंट्स वि.ओडिशा जगरनॉट्स असा उपांत्य फेरीचा सामना झाल्याचे त्याने सांगितले. मात्र त्यावेळी ते शेवटच्या क्षणी कमी पडल्याचे तो म्हणाला.

आमचा उपांत्य फेरीतील सामना ओडीसा संघाबरोबर होणार आहे. त्यामुळे आधीच्या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिलेली होती. ओडीसाचा संघ समतोल आहे. त्यांच्याबरोबर झालेला पहिला सामना आम्ही जिंकलो होतो. त्यानंतर दुसरा सामना ओडीसाने जिंकला. त्यांची संरक्षणाची फळी खुपच स्ट्राँग आहे. ती भेदण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आम्ही आमची रणनिती तयार केलेली आहे. त्यांच्या बरोबरचा सामना हायव्होल्टेज असेल. प्रेक्षकांचा सपोर्ट त्यांच्याबाजूने असेल हे आम्हाला माहिती आहे. परंतू आम्ही पुर्ण ताकदीने मैदातना उतरणार आहोत. सध्या आम्ही सामन्यापुर्वी प्रत्येक खेळाडू प्रशिक्षणावर भर देत आहे.

दिपेश मोरे : दिपेश मोरे हा गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्स संघाचा कर्णधार असून उद्या होणारा सामना हा हायहोल्टेज सामना होईल असे त्याने सुरवातीलाच सांगितले. दिपेश मोरे हा मुंबईतील बांद्रा येथील   शिर्शेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमीचा एक धडाकेबाज खेळाडू आहे. मुंबईत जेव्हा श्री सह्याद्री संघ व शिर्शेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये सामने होतात त्यावेळी क्रिकेट मधील भारत-पाकिस्तान सामना जसा होतो तसेच हे सामने होतात याची आठवण दिपेश मोरेने सांगितली. दिपेश मोरे सुध्दा सलग दुसऱ्या वर्षी ओडिशा जगरनॉट्सचे प्रतिनिधित्व करत आहे.

उपांत्य फेरीत पोचल्याचा खुपच आनंद झाला आहे. मुंबईबरोबर झालेल्या सामन्यात आमचा 'ब' संघ खेळवलेला होता. तरीही सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला. आम्हाला हे अपेक्षित नव्हते. आम्ही मोठ्या फरकाने मुंबईला पराभूत केले आहे. मनोज आजारी होता, तरीही त्याने संरक्षण चांगले केले. सर्वात महत्वाचे म्हणजे वजीराची भूमिका योग्य पध्दतीने बजावली. उपांत्य फेरीत आमचा सामना गुजरातबरोबर होणार आहे. हा सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबरोब झालेले यापुर्वीचे सामने आम्ही जिंकलेले आहेत. त्यामुळे खुप आनंद होत आहे. सामने पहायला येणार्‍या प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मैदानात चांगला खेळ करण्याची अतिरिक्त ताकद आम्हाला मिळते.

अमित पाटील : अमित पाटील हा जयहिंद क्रीडा मंडळाचा खेळाडू असून कोल्हापूरचा तो एक अप्रतिम खेळाडू आहे. सध्या तो चेन्नई क्विन गन्सचा कर्णधार असून या वेळी त्यांनी अप्रतिम खेळी करत २५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने आम्ही विजय मिळवण्याच्या जिद्दीने खेळलो होतो. त्यात आम्हाला यशही आले आहे. संघातील सर्व खेळाडू पुर्ण ताकदीनिशी मैदानात खेळ दाखवत आहेत. त्यामुळे आमचा विजय सोपा होतो. उपांत्य फेरीत पोचलेले चारही संघ तगडे आहेत. त्यामधून कोण पुढे जाईल हे सांगणे कठीण आहे, परंतु आमचा संघ मैदानात उतरल्यावर सर्वोत्तम खेळ करणार आहे. आमच्या संघातील सर्व खेळाडूंमधील समन्वय चांगला असल्याने खेळी व्यवस्थित होतो. त्याचबरोबर रामजी कश्यप सारखा हुकमी एक्का आमच्या बरोबर असल्याने आम्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे त्याने सांगितले.

प्रतिक वाईकर : प्रतिक वाईकर हा पुणेकर असून तो नवमहाराष्ट्राचा एक तगडा खेळाडू आहे, अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये सध्या तो तेलगु योध्दासचा कर्णधार असून गेल्या वर्षी सुध्दा तो तेलगु योध्दास कडूनच खेळत होता. या वर्षी तेलगु योध्दास साखळी सामन्यानंतर ४ थ्या स्थानावर असला तरी आमचा संघ केंव्हाही उसळी मारून वर येऊ शकतो असे तो आवर्जून सांगतो. आमचे पहिले उद्दिष्ट उपांत्य फेरीतील सामना असून तो सामना झाल्यानंतरच पुढील नियोजन करू असे त्याने सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत