BREAKING NEWS
latest

कर दरवाढ़ न करता रस्ते, उड्डाणपूल व सांस्कृतिक प्रकल्पांना प्राधान्य देत कडोंमपाचा ३,१८६ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून सादर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.२० मार्च : कोणतीही कर दरवाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे सन २०२५-२६ चे रु.२७४४.९९ कोटी जमा व रु.२१७२.२२ कोटी खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक आणि रक्कम रु.३१८६.४९ कोटी खर्चाचे आणि रक्कम रु.३१८६.६० कोटी जमा रक्कमेचे व रक्कम रु.१०.५१ लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेस सादर केले. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उप महापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, महापालिका मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे उपस्थित होते.

या अंदाजपत्रकात सन २०२६-२७ या वर्षात मालमत्ता करापोटी रु.६००.०१ कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्का पोटी रक्कम रु.५१०.०३ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पाणी पट्टी वसुली पोटी रक्कम रु.१०१ कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासकीय अनुदाने व अंशदाने अंतर्गत शिक्षण वेतन अनुदानासह रक्कम रु.११५.०६ कोटी अनुदान अपेक्षित आहे. विशेष अधिनियमाखाली वसुली रु.५२६.३० कोटी उत्पन्न अपेक्षित असून रु.२८.८५ कोटी संकिर्ण उत्पन्न अपेक्षित आहे.

यामध्ये सन २०२६-२७ वर्षाकरीता रु.८२९.२५ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ मध्ये रु.१६5४.०८ कोटी रुपये महसुली खर्च अपेक्षित व रु.१५२४.२० कोटी भांडवली खर्च अपेक्षित आहे. महापालिका निधीतून कल्याण (पूर्व) भागातील युटाईप रस्ता व श्री मलंग रोड, चेतना शाळा ते नेवाळी नाका, मांडा टिटवाळा भागातील विविध रस्त्यांची कामे, ठाणगे वाडी येथील रस्ता अशी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठा गांव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी महापालिकेने रेल्वे उड्डाणपुल प्रस्तावित केला आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपुल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने, सदर ठिकाणी नविन दोन पदरी अतिरिक्त उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे.
महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले कलामंदिराचे अ‍धुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याच योजनेच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागात आगरी, कोळी, कुणबी, वारकरी सांस्कृतिक भवन, बारावे येथील आरक्षित भुखंडावर डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान, सुभाष मैदान येथील स्टेडियम ही कामे लवकरच सुरु करण्यात येत आहेत. महापालिकेच्या फंडातून आधारवाडी, लालचौकी, कल्याण (पश्चिम), बैलबाजार कल्याण (पश्चिम), मुरबाडा रोड कल्याण (पश्चिम), विठ्ठलवाडी कल्याण (पूर्व), थारवाणी कॉम्प्लेक्स जवळ टिटवाला (पश्चिम), मोक्षधाम स्मशानभुमी डोंबिवली (पूर्व), पाथर्ली डोंबिवली (पूर्व), कोळेगाव डोंबिवली (पूर्व) येथे स्मशानभूमी पुर्ननिर्माणचे काम सुरु करण्यात आले आहे. तर, मुलभूत सुविधाअंतर्गत कॅसारिओ डोंबिवली (पूर्व) व माणेरे येथे स्मशानभूमीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.

रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - नाशिक मधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. अखेर या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेतली होती. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

तदनंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीस दाखल झाल्या होत्या. त्या नंतर या सर्व पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कडे सुपूर्द केला आहे.

सुमित कंपनीने सफाई कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडवल्याने कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण:डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत सुमित कंपनीला कचरा उचलण्याचे काम दिलेले आहे. परंतु या कंपनीने सफाई कामगारांचे गेले दोन महिन्यापासून पगार थकविले आहे. याकरता बुधवार १८ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथे कामगारांनी पुंडलिकशेठ म्हात्रे कामगार संघटनेने काम बंद आंदोलन केले. 

यादरम्यान शहरात कचरा सकाळी उचलला गेला नाही. त्यामुळे कामगारवर्ग जमल्यानंतर युवा नेते भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना एक इशारा देऊन आजचं पगार देण्याचे सांगितले, अन्यथा उद्या पुन्हा काम बंद करू, असा इशारा दिला आहे. यावेळी घनकचरा व्यवसस्थापण विभागाचे उप-आयुक्त रामदास कोकरे हजर होते. त्यांनी लवकरात लवकर कामगारांचे पगार द्यावेत असे ठेकेदाराला सुनावले.

डॉ.मनिलाल शिंपी यांना 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' तर्फे "समाजभूषण" पुरस्कार जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - आजचा 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' चॅनेल चा वर्धापन दिनाच्या निमित्ताने, मानवसेवा, समाजसेवा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील समाजसेवकांचा विशेष पुरस्कार सोहळा दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य 'मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप'चे प्रमुख व रस्ता सुरक्षा अभियान चे विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) आदिवासी भागातील सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरातील परिवर्धा येथील श्री. रतिलाल रामदास शिंपी व लीलाबाई रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी हल्ली मुक्काम: आंबिवली (कल्याण)  यांचाकडून सुरू असलेल्या समाजसेवेचा व मानवसेवेचा कार्याची दखल घेऊन आजचा 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' चॅनेल चे संपादक प्रशांत/प्रसाद गणपत मोरे यांनी घेतली असून दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यतील रोहा येथे चॅनलच्या वर्धापन दिनाचा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांना "महाराष्ट्र समाज भूषण" पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

डॉ. मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा गौरव आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे, त्यांचा संकल्पनेनुसार आम्ही खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहोत अशी माहिती 'दैनिक स्वराज्य तोरण' चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील व 'चंद्रानंद कृषी पणन' संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक डॉ. रामचंद्र देसले, भाजपा व्यापारी असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.यशवंत(भाऊ) सोरे, समाज सेवक उद्योजक डॉ.किशोर अढळकर, यांनी विशेष माहिती दिली. राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा, कल्याण शिंपी आमचे सचिव, अरविंद शिंपी, प्रविण भांडारकर, गणेश साळवे, किशोर बागुल, मनोहर सोनवणे, पोलिस पाटील सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुप चे नितील चंदेया, निलेश शहा, महिला फाऊंडेशनचा रश्मी शर्मा, 'लेडीज एक्सप्रेस' च्या मधुबेन ठक्कर, इच्छामणी भजनी मंडळाच्या अध्यक्षा, खजिनदार सचिव, परिवर्धा येथील आरोग्य सेवक, प्रसिद्ध डॉक्टर किशोर आमोदकर यांच्यासह सर्व मित्र मंडळी कडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत एक खास आकर्षण ठरलेलेली दीडशे फुटांची महाकाय गुढी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१९ मार्च – डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे २८ वे वर्ष होते. आपल्या हिंदू संस्कृतीच्या नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी आणि तरुण पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीशी नाते टिकवून ठेवावे या उद्देशाने ही संकल्पना सांस्कृतिक डोंबिवली शहरातून श्री गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सुरु झाली आणि याचा एक डोंबिवलीकर म्हणून कायमच अभिमान वाटतो, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. या संकल्पनेचे श्रेय आबासाहेब पटवारी आणि सुधीर जोगळेकर या भाजपा संघ परिवारातील डोंबिवलीकरांना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 
या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी. विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

त्याच बरोबर डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले. 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी १५० वे वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी १०० वे वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने २ चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेत डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचिता सोबतच राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले. हा दुर्मिळ असा दुग्धशर्करा योग आल्याने यंदा डोंबिवलीकर परिवाराने याच राष्ट्रीयत्वाच्या विषयाला अनुसरून चित्ररथ साकारले. 
'वंदे मातरम'चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि रा.स्व संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला अपेक्षेनुसार डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांना दिली.

तसेच यंदाच्या वर्षी देशभक्तीची अनेक रूपं अशा आशयाची संकल्पना राबवली त्यास डोंबिवलीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. "क्रांतिकारी देश सेवक" या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा झाली. त्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७५ वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विजेत्यास ₹ २५,००० रुपयांची रोख रक्कम देण्यात आली तर उपविजेत्यास ₹ १५,००० त्याचबरोबर अन्य पारितोषिके देण्यात आली.

रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता खोदकाम व भरणी टाकत असल्याने कडोंमपा विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत रिंगरूट बनवला जात असून त्या विकासकामांसाठी स्थानिक भूमिपुत्र यांच्या जागेतून तो बनवला जातं असून सदर रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना  त्या बाधित जागेचा मोबदला मिळावा म्हणुन उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून त्यावर रिंगरूट बाधित शेतकऱ्यांनी अपील सुद्धा केले आहे.


२०२३ च्या अखेरीस उच्च न्यायालयात अपील केलेली असताना की रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणुन काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यांनी सुद्धा सांगितले की रिंगरूट बाधित शेतकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या आहेत त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळेल याचा आम्ही पाठपुरावा करू. पण तसं काहीच न होता तीन ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनी त्या जागेत घुसून खोदकाम करत भरणी टाकत असल्याचे बघून ते आम्हांस खटकत आहे की बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व मोबदला न मिळता माननीय उच्चं न्यायालयाच्या आदेशाचं भंग करत अवमान करीत असल्याने आम्ही पुन्हा न्यायालयात व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जातं असल्याचे दयानंद म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

यावेळी या बाधित शेतकऱ्यांमध्ये राजू काथोड म्हात्रे, दयानंद अनंत म्हात्रे, गोपाळ गोविंद भोईर, हेमकांत बाबू म्हात्रे, जयवंत मुकुंद जोशी, हरी दत्तू म्हात्रे, नाना गंगाराम पाटील, सुनील राजाराम खारे हे या एल्गारात उपस्थित होते.


५९ अनुसूचित जातींसाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची आमदार अमित गोरखे यांची सरकार कडे मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई , दि.१६ : अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना समान न्याय, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. अनुसूचित जातींमधील ५९ विविध जातींना त्यांच्या लोकसंख्या, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीनुसार योग्य संधी मिळण्यासाठी हे वर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जस्टीस अनंत बदर समिती’ ने उपवर्गीकरणाबाबत जो अभ्यास केला आहे, त्याचा अहवाल आता तातडीने शासनाकडे सादर करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली आहे. 
आमदार अमित गोरखे यांनी प्रतीकात्मक आंदोलन करून सरकारचे वेधले लक्ष

अनोख्या पद्धतीने आंदोलन
या मागणीसाठी आज आमदार अमित गोरखे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. ५९ अनुसूचित जातींच्या नावांचा प्रतीकात्मक हार परिधान करून त्यांनी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी अधोरेखित केली. या आंदोलनातून अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना समान संधी देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

मागास घटकांना समान न्याय पाहिजे 
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, अनुसूचित जातींमधील काही घटकांना आरक्षण व शासकीय योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत असताना काही जाती अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींच्या अंतर्गत ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण केल्यास वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळू शकतो.

'अ-ब-क-ड’ वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे
 
सत्तेत असतानाही समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणे ही आमची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे, असेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि अनुसूचित जातींमधील सर्व घटकांचा समतोल विकास साधण्यासाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला. या वर्गीकरणामुळे दीर्घकाळापासून वंचित राहिलेल्या घटकांना शिक्षण, नोकरी आणि विविध शासकीय योजनांमध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल. तसेच समाजातील असमानता कमी होऊन अनुसूचित जातींतील सर्व घटक मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. राज्य शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जातींमधील ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण लागू करून सामाजिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल उचलावे असे आमदार अमित गोरखे म्हणाले 

यापूर्वीही त्यांनी 'अ, ब, क, ड' अशी अक्षरे असलेला शर्ट परिधान करून विधानसभेत आणि बाहेरही या विषयाचा पाठपुरावा केला होता. आजच्या या कृतीतून त्यांनी उपवर्गीकरणाचा मुद्दा किती संवेदनशील आणि न्याय्य आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आमदार गोरखे यांच्या या आंदोलनामुळे उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्वरित हे वर्गीकरण जाहीर करावे असे आमदार गोरखे यांनी मागणी केली आहे.

दिव्यातील 'रोटरी क्लब'तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : 'रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे' यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काल सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिव्यातील हनुमान मंदिर, दातिवली गाव येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण २५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष, किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख, आदित्य पाटील आणि सचिव स्वप्नील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व सहकार्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मागासवर्गीयांच्या अंत्यसंस्कारात आडकाठी आणणाऱ्यांची आता खैर नाही; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर सरकारचे कडक कारवाईचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पुरोगामी राज्य आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आजही ग्रामीण भागात मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब आपल्या लोकशाहीसाठी आणि माणुसकीसाठी अत्यंत क्लेशदायक आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार श्री. अमित गोरखे यांनी विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास होणारा विरोध हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी म्हटलं आहे. 
तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधले

पुरोगामी महाराष्ट्रात मरणानंतरही सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही लोकशाहीसाठी क्लेशदायक बाब असून, अशा घटना घडल्यास संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस पाटलांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास होणाऱ्या विरोधाबाबत आमदार गोरखे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी प्रशासकीय अनास्था आणि सामाजिक विषमतेवर प्रखर प्रहार केला.

संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली

तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या राज्यात आजही अनेक गावांमध्ये मागासवर्गीयांना सार्वजनिक स्मशानभूमीत प्रवेश नाकारला जातो. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून किंवा नदीपात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. हे रोखण्यासाठी 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना अजामीनपात्र अटक झालीच पाहिजे. 

आमदार गोरखे यांची भूमिका :

१. प्रशासकीय जबाबदारी व निलंबन: ज्या गावांमध्ये स्मशानभूमीअभावी प्रेताची विटंबना होईल किंवा अंत्यसंस्कार रोखले जातील, त्या भागातील तहसीलदार, सरपंच, पोलीस पाटील आणि गटविकास अधिकारी (BDO) यांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर 'कर्तव्यात कसूर' केल्याप्रकरणी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.

२. अजामीनपात्र गुन्हे: अंत्यसंस्काराला विरोध करणे हा केवळ सामाजिक वाद नसून तो अमानवीय अत्याचार आहे. अशा घटनांत सहभागी असणाऱ्यांवर 'ॲट्रॉसिटी' (SC-ST Act) अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अजामीनपात्र अटक करण्यात यावी.

३. राज्यस्तरीय हेल्पलाइन व टास्क फोर्स: अशा संवेदनशील घटनांची तक्रार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र 'राज्यस्तरीय हेल्पलाइन' सुरू करावी. तक्रार प्राप्त होताच पुढील २ तासांच्या आत पोलीस संरक्षण देऊन अंत्यविधी सन्मानाने पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात यावी.

सामाजिक न्याय मंत्र्यांचे उत्तर :

आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, जिथे मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी नाही, तिथे गायरान जमिनीतून स्मशानभूमीसाठी जागा देण्याचा सरकारचा प्राधान्याने प्रयत्न राहील. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून आवश्यक निधी दिला जाईल. जे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यामध्ये अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीबाबतही तसे निर्बंध घातले जातील. या चर्चेत आमदार अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी देखील सहभाग नोंदवून या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. सरकारकडे मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आमदार अमित गोरखे यांनी मांडलेली ही परखड भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि मरणानंतर सन्मानाने निरोप घेण्याचा अधिकार दिला आहे. ग्रामीण भागात आजही मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीला होणारा विरोध हा अमानवीय अत्याचार आहे. ज्या गावात अंत्यसंस्कार रोखले जातील, तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे, ही माझी ठाम मागणी आहे. मरणोत्तर विटंबना थांबवण्यासाठी आणि दोषींना अजामीनपात्र कोठडी मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच आहे asebआमदार अमित गोरखे म्हणाले.

कल्याण लोकसभा खासदार आणि कडोंमपा महापौर यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात गुरुवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. याचसमवेत नेत्रदीपक अशी आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी यांनी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थीत होते.

दिव्यातील साबे गावामध्ये सीलबंद पाण्याच्या जारमध्ये साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. ५ मार्च :- दिव्यातील साबेगाव परिसरात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या सीलबंद पाण्याच्या जारमध्ये चक्क साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साबेगाव परिसरातील एका कुटुंबाने घरगुती वापरासाठी २० लिटरचा सीलबंद पाण्याचा जार विकत घेतला होता. जार पारदर्शक असल्यामुळे वापरण्यापूर्वी तो पाहताना त्यामध्ये साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दिवा परिसरात वर्षभर पाणीटंचाई असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर २० लिटरच्या जारमधील ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘आरओ (RO) वॉटर’वर अवलंबून असतात. मात्र या घटनेमुळे स्थानिक पाणी शुद्धीकरण केंद्रांच्या (RO प्लांट) स्वच्छतेबाबत आणि त्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीलबंद जारमध्ये साप कसा गेला ?याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणी बिनपरवानगी आणि नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये जारच्या आत साप स्पष्टपणे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचे जार वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरपोच येणारे जार स्वीकारण्यापूर्वी ते स्वच्छ आहेत का, त्यामध्ये कोणताही कचरा किंवा जीवजंतू नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच जार पारदर्शक असल्यामुळे तो उजेडात तपासून मगच सील उघडावे, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेता शक्य असल्यास पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिवा आणि आसपासच्या परिसरातील सर्व पाणी शुद्धीकरण केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.०३ मार्च - दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय 'प्रभास कराटे स्पोर्ट एकॅडमी' यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेसाठी विविध शहरांमधून अनेक संघ आणि स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि दिवा शहराच्या नावलौकिकात भर घातली. विजेत्या स्पर्धकांना गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ पदके तसेच विविध सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १ ते ५ क्रमांकाच्या संघांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक विजेते संघ:
 प्रथम पारितोषिक – चंचल स्पोर्ट्स, नाशिक (आनंद रोकडे सर), द्वितीय पारितोषिक – प्रभास कराटे स्पोर्ट्स एकॅडमी, दिवा (प्रशांत कसबे सर, भारती कसबे मॅडम), तृतीय पारितोषिक – वॉरिअर स्पोर्ट कराटे असोसिएशन, गवंडी (प्रदीप ओव्हाळ सर), चतुर्थ पारितोषिक – थापा सर यांचा संघ, पंचम पारितोषिक – उमा मॅडम, टिटवाळा यांचा संघ

स्पर्धेचे पंच म्हणून युनायटेड मार्शल आर्ट एकॅडमी इंडियाचे ग्रँडमास्टर रवींद्र केणी सर (सायन), ना. सी. मुलानी सर (ठाणे) आणि कोरी सर (कल्याण) यांनी कुशल नेतृत्व करत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. आयोजन व नियोजनात दिवा शहरातील समाजसेवक प्रविण उतेकर, आकाश विचारे, आयु. जयसिंग कांबळे, सतीश निकम, आयु. विश्वास भालेराव, विशाल मन्ना डे, संगीता उतेकर, पार्वती आनंदा कसबे, मनीषा सुरेश लांडगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धांचे आयोजन करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे दिवा शहरातील भावी पिढी सक्षम, आत्मविश्वासू आणि शिस्तबद्ध बनवणे हेच असल्याचे प्रशांत कसबे व भारती कसबे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे दिवा शहरात क्रीडा क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्व असलेले 'आट्या पाट्या' खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर ; नवीन पिढी खेळापासून दूर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उरण - होळी जवळ आली कि सर्वांना आठवण होते ती आट्या पाट्या खेळाची. प्राचीन काळापासून चालत आलेल्या व भारतीय परंपरेतील आट्या पाट्या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र सध्याच्या २१व्या युगातील जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात हा खेळ मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यात पूर्वी मोठया उत्साहात व आनंदाने खेळल्या जाणारे सण आता उरण मध्ये एक दोन ठिकाणे सोडली तर कुठेही खेळले जात नाही. पूर्वी उरण तालुक्यात हा खेळ होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून जिथे होळी पेटवली जाते त्या ठिकाणी खेळला जात होता. आता मात्र नवीन पिढीला हा खेळ माहित नसल्याने तसेच मैदानी खेळापासून आजची लहान मुले हळूहळू दूर जात असल्याने सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या खेळाला राजाश्रय होता म्हणून हा खेळ टिकून राहिला. आता मात्र या खेळाला शासकीय अनुदान व सहकार्यावर अवलंबून राहावे लागते.भारतीय संस्कृतीतील या खेळाला नव संजीवनी प्राप्त करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात या खेळाचे सर्वत्र आयोजन केल्यास, जनजागृती केल्यास निश्चितच या खेळाला चांगले दिवस येतील.
उरण शहरामध्ये 'श्री शीतळा देवी मंदिर', देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्या पाट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. पूर्वी होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा. आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो. आट्यापाट्या हा महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये (किलिथट्टू नावाने) लोकप्रिय असलेला, शारीरिक चपळाई व धोरणात्मक कौशल्याचा प्राचीन भारतीय मैदानी खेळ आहे. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात, एका संघाला सूरपाटी व इतर नऊ आडव्या पाट्यांतून (गाळ्यांतून) बचाव करत, प्रतिस्पर्ध्यांच्या अडथळ्यांना हुलकावणी देऊन शेवटच्या लोणपाटीपर्यंत पोहोचायचे असते.
आट्यापाट्या खेळाची सविस्तर माहिती :

मैदान आणि रचना:-  
हा खेळ सपाट मैदानात खेळला जातो. शहरात मैदानात हा खेळ खेळला जातो. यात मध्यभागी एक लांब रेषा (मृदंगपाटी किंवा सूरपाटी) असते आणि तिला छेदून ९ आडव्या पाट्या (कप्पे) असतात. खेळाच्या सुरुवातीच्या पाटीला 'चांभारपाटी' तर शेवटच्या पाटीला 'लोणपाटी' म्हणतात. 

खेळाडू आणि संघ:- 
प्रत्येक संघात साधारणपणे ९ खेळाडू असतात. खेळामध्ये दोन संघ असतात. एक 'पाटी धरणारा' (Defending) आणि दुसरा 'खेळणारा' (Attacking)   असे दोन संघ असतात. एक संघ बचावाच्या भूमिकेत तर दुसरा संघ आक्रमणाच्या भूमिकेत असतो.

खेळाचे नियम आणि उद्देश:- 
बचाव (Defending) भूमिकेत असलेले  खेळाडू फक्त उभ्या रेषेवर (सूरपाटी) पाय ठेवून दोन्ही बाजूंना उड्या मारून किंवा धावून अटॅकिंग खेळाडूंना आडव्या पाट्या ओलांडण्यापासून रोखतात.
आक्रमण (Attacking) च्या भूमिकेत असणारे, खेळणारे खेळाडू हुलकावणी देऊन, वेगाने धावत एक-एक पाटी पार करून लोणपाटीपर्यंत जातात. एक एक चौकोन पार करत पुढे जातात व शेवटी आपले उद्दिष्टे साध्य करतात.

बाद (Out):-  जर पाटी धरणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्या खेळाडूला स्पर्श (Touch) केला, तर तो खेळाडू बाद होतो. त्यामुळे अत्यंत एकाग्रतेने हा खेळ खेळला जातो.

गुण:-  जो खेळाडू नऊही पाट्या पार करून लोणपाटीपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा सुरक्षित माघारी फिरतो, त्या संघाला गुण मिळतात.

फायदे:-  या खेळामुळे मुलांमध्ये चपळता, वेग, निर्णयक्षमता आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या खेळामुळे शरीराचा विशिष्ट व्यायाम तर होतोच शिवाय एकाग्रता सुद्धा वाढीस लागते. मनोरंजन आणि व्यायामाव्यतिरिक्त, हा खेळ वैयक्तिक वेगवानपणा आणि सामूहिक संघ कामगिरीचे उत्तम संयोजन आहे.

इतिहास:-  हा खेळ अत्यंत प्राचीन असून महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित आहे. हा खेळ मुख्यत्वे भारतातील काही ग्रामीण भागात, विशेषतः होळी किंवा इतर सणांच्या वेळी अत्यंत उत्साहाने खेळला जातो. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला, आट्या-पाट्या हा एक प्राचीन क्रीडा खेळ आहे ज्यामध्ये गुंतागुंतीचे नियम आहेत. तामिळनाडूमधील किलिथट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रदेशातून उगम पावलेला हा खेळ बऱ्याच काळापासून धोरणात्मक विचारसरणी आणि शारीरिक चपळतेची चाचणी म्हणून ओळखला जातो. हा खेळ राष्ट्रीय व्यासपीठावर तामिळ ओळख वाढवतो. महाराष्ट्रात आट्या पट्या म्हणून हा खेळ ओळखला जातो. महाराष्ट्रात हा खेळ पूर्वी 'भांडणाचा खेळ' म्हणून प्रसिद्ध होता. प्रत्येक राज्यात व देशात या खेळाला वेगवेगळे नाव आहेत. गुजरात राज्यात आटा पाता, खरो पाट, लुणी पाट, तामिळनाडू मध्ये किलीथट्टू, धटूतुकडा, उप्पू कोडू, उप्पू पटाई, बंगाल मध्ये डोरिया बांध, महाराष्ट्र मध्ये सुरपट्या, आत्या पत्या, आट्या पाट्या, सारगरी, सरमणी, पंजाब मध्ये लोणापती, सुरपती चिक्का, यूरोप मध्ये ढोंगाचा खेळ, अतिरेक्यांचा पाठलाग या नावाने हा खेळ परिचित आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे गौरवास्पद सादरीकरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - "माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll" संत ज्ञानेश्वर पासून ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अलौकिक दर्जा प्राप्त करून ती समृद्ध केली  आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थांतर्गत 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या गौरवात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथ हेच आपले गुरू आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वागत गीत गाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मराठी शिक्षिकांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी गाऊन त्याचा अर्थ देखील सांगितला. आजच्या दिवशी सर्व मुले मुली हे साहित्यिक, कवयित्री च्या वेशभूषेमधे आली होती. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मराठी शिक्षिका सौ. मानसी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सांग सांग भोलानाथ' हे बालगीत सादर केले तर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारुड सादर केले. तर दुपारच्या सत्रात सौ.वर्षा पवार, सौ.स्वाती सोनवणे या मराठी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी  मराठी नाटक, नृत्य, गायन सादर केले. कविता वाचन ,  मराठी म्हणी यांची जणू आज मेजवानीच होती. नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व नितेश मेस्त्री यांनी देखील विद्यार्थांना दिग्दर्शन केले.
   
मराठी भाषा ही मराठी माणसाचा आत्मा आहे. आजच्या स्पर्धायुक्त जगात माणूस नाविन्याचा ध्यास घेत पुढे जाण्याच्या शोधात आहे तर एआय (AI) सारख्या अत्याधुनिक प्रणीलाचा वापर करून टीकून राहण्याचा प्रयत्न करतो आहे, असे जरी सर्व असले तरी मराठी माणूस शेवटी मराठी विचारामधूनच आपल्या  बुद्धिमत्तेला वाव देतो, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. "आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहाराचा निघाला" शेवटी आहे काय अन् नाही काय.. ही स्वरचित कविता संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी वाचून दाखवून त्याचा अर्थ देखील सांगितला.

ज्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे अशा सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे ह्या   दरवेळीच नवनवीन मराठी काव्य लिखाण करीत असतात आजच्या दिवशी देखील त्यांनी  स्वरचित काव्य पंक्तींचे वाचन करून कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली अर्पण केली. प्रत्येक मैलावर मराठी भाषेची उच्चार पद्धती म्हणजेच भाषेचा लहेजा बदलत जातो, असे असले तरी आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या भावनांचा अर्थ हा एकच असतो जो आपल्या हृदयापर्यंत भिडतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला रसाळ वाणी संबोधून अमृतापेक्षाही गोड आहे असे १५ व्या शतकातच लिहून ठेवले आहे. असेही सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने मराठी अभिमान गीत गाऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा केला तर विद्यार्थ्यांनी शुद्ध मराठी भाषेतून सूत्रसंचलन केले. संगीत शिक्षका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमांची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाची सजावट श्री.नरेश पिसाट यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिवा शहरातील आगासन येथे उभारला जाणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असून, दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी देखील पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पुतळा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामासाठीची २ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली आहे. यामुळे येत्या १ मे रोजी आगासन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक वारसा, संवर्धन अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मतदारसंघातील प्राचीन मंदिर परिसरांचा विकास करण्यासमवेतच महापुरुषांचा सन्मान राखत त्यांची स्मारके देखील मतदारसंघात उभारण्यात येत आहे. याच पद्धतीने खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे ही मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दिवा शहरात ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांकडून केली जात होती. तर यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. यासर्वांच्या मागणीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या राज्याच्या नगरविकास विभागाकडे पुतळा उभारणीसाठीच्या निधीची मागणी केली. या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर आता राज्याच्या नगरविकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. येत्या १ मे रोजी आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सांस्कृतिक अभिमानाच्या प्रतिका समवेतच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश देणारा ठरेल. तर आगासन रोड परिसरातील या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिवा शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पांसाठी निधी मिळवून दिला असून, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे.

डोंबिवली-ठाणे बस सेवेला हिरवा कंदील; नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना, नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन महानगरपालिका (केडीएमसी) विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर दि. ४ मार्च २०२६ पासून डोंबिवली मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे डोंबिवलीकरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यायी प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार असून लोकल रेल्वेवरील ताण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. 

नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासनाला याची तातडीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, डोंबिवलीचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी देखील या विषयात सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. ही सेवा पुढील काळात नियमित स्वरूपात सुरू ठेवण्यासाठी आणि अधिक बस फेऱ्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

महापालिकेचा क्रीडा उपक्रम यशस्वी राबवत कल्याण-डोंबिवलीमध्ये दिव्यांग क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत दिव्यांग खेळाडूंचा गौरव करत दिव्यांग मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांचे पालकांनी त्यांना सर्व स्पर्धांसाठी संधी द्यावी असे प्रतिपादन महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत स्व. नाना फडके मैदान कल्याण (पश्चिम) येथे समाज कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटनासमयी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. स्पर्धेत सहभागी खेळाडुंचे कौतुक करताना माझ्यासाठी कोणी दिव्यांग नाही तर सर्वजण सर्वसामान्य आणि सक्षम  नागरिक आहेत असे सांगत त्यांनी दिव्यांग बांधवांचा गौरव केला. 

या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापालिका सचिव किशोर शेळके, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच पालिका सदस्य, सदस्या व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्यांगाना सक्षम बनविण्याचा आपला प्रयत्न असून क्रिडा स्पर्धा ही देखील एक ट्रीटमेंट थेरेपी आहे, यासाठी पालकांनी मुलांना विविध ऍक्टीव्हिटीमध्ये घालावे. महापालिका अशा उपक्रमांमधून दिव्यांग व्यक्तींना नक्कीच प्रोत्साहन देत राहील असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपले मनोगतात काढले. 
स्व.नाना फडके मैदानात आज दिव्यांग बांधवांसाठी कॅरम, गोळाफेक, बुध्दीबळ, व्हिलचेअर रेसिंग, नेमबाजी, १०० मीटर धावणे (कर्णबधिर आणि मुकबधिर व्यक्तींसाठी), बादलीत चेंडू टाकणे (गतीमंद व्यक्तीसांठी), इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धांमध्ये दिव्यांग बांधवांनी मोठया प्रमाणत सहभाग नोंदवून आपल्या कौशल्य व जिद्दीचे दर्शन घडविले. या स्पर्धांच्या आयोजनामुळे दिव्यांग बांधवामध्ये आत्मविश्वास वाढून समाजामध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मजदूर संघटनेच्या माध्यमातून नाका कामगारांना 'सुरक्षा संच' (सेफ्टी किट) चे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील लेवा भवन सभागृहात नाका कामगारांना शासन योजनेंतर्गत गृहोपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच, सुरक्षा संच (सेफ्टी कीट) ज्या कामगार कार्यालयात ऑनलाईन नोंदणी झालेल्या आहेत, त्या कामगारांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, प्रसिद्ध कलाकार अक्षदा दास, समाजसेवक समीर जगे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, रिपाइंचे माणिक उघडे, मीना साळवे, समाधान तायडे, दिलखुश माळी, शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव, रेश्मा चिकटे, संघटनेचे सहखजिनदार रामचंद्र वाघ, संघटनेचे केंद्रीय कमिटी सदस्य रामेश्वर शेजूळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोंदणीकृत नाका कामगारांना गृहउपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच देण्यात येते. परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे म्हणाले की, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नेहमीच नाका कामगारांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. संघटनेच्या प्रयत्नात यश येत असून आजवर अनेक नाका कामगारांना याचा लाभ मिळाला आहे.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 'इंडोनेशिया' शिष्टमंडळाचे नेतृत्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळा-मधीला सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवि-ण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप मध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून इंडोनेशिया दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ते करणार आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगातील पातळीवर मांडत होते. या मोहिमेत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत युएई, सिएरा लियोन, लायबेरिया आणि डी आर काँगो या देशांना भेट देत भारताची ठाम भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या संयमी, अभ्यासू आणि ठाम मांडणीमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी मिळाल्याचे मानले गेले. यापूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि वाहतूक प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टीव्ही वाढविणे, मेट्रो व रेल्वे प्रकल्पांना गती देणे, तसेच मतदारसंघातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.

युवा खासदार म्हणून संसदेतील सक्रिय उपस्थिती, विकासाभिमुख भूमिका आणि आंतरराष्ट्रीय विषयावरील अभ्यासू मांडणी यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 'पार्लेमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'च्या माध्यमातून भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हून अधिक देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री यांना थेट निवेदन देत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे.

आरोग्य सेवांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले असून, पालिकेच्या रुग्णालयांत सर्दी-खोकल्यापलीकडे उपचार मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच पालिका शाळांचा दर्जा घसरल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, गटारांची दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काही कर्मचारी गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे, तर राजकीय पाठबळ असलेले कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे आयुक्तांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, केडीएमसीमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक प्रतिमेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लक्ष्मण हजारे, दिलीप मगर या नागरिकांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.