BREAKING NEWS
latest

देशात पहिल्यांदाच खेळवण्यात येणार इंडियन पिकलबॉल लीग..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली: देशात पहिल्यांदाच इंडियन पिकलबॉल लीग (आयपीबीएल) आयोजित केली जाणार आहे. या शहर-आधारित लीगमध्ये पाच संघ सहभागी होतील. ही लीग १ ते ७ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळवली जाईल. काल लीगच्या पहिल्या हंगामासाठी पाच फ्रँचायझी संघांची घोषणा करण्यात आली. चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघांची नावे आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. भारतातील आघाडीचे पिकलबॉल खेळाडू मिहिका यादव आणि अमन पटेल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता टाईम्स ग्रुपने सुरू केलेली आयपीबीएल ही भारतातील एकमेव पिकलबॉल लीग आहे जिला क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ही लीग इंडियन पिकलबॉल असोसिएशन (आयपीए) द्वारे मान्यताप्राप्त आहे.

शहरातील संघ पहिल्यांदाच पिकलबॉलमध्ये

पिकलबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच, भारतात शहर-आधारित संघ मैदानात उतरले आहेत.

५ संघांची नावे जाहीर

गुरुग्राम कॅपिटल वॉरियर्स
मुंबई स्मॅशर्स
बंगळुरू ब्लास्टर्स
चेन्नई सुपर वॉरियर्स
हैदराबाद रॉयल्स

या लीगमध्ये भारत आणि परदेशातील सर्वोत्तम पिकलबॉल खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळतील. गुरुग्राम पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा लीगमध्ये संघ खेळवत आहे. एम३एम इंडियाचे संचालक पंकज बन्सल म्हणाले, “गुरुग्रामला वेगवान, सामाजिक आणि उत्साही खेळ आवडतात. शहराचा पहिला प्रमुख संघ असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

अदानी ग्रुप ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ म्हणून या लीगमध्ये सामील झाला आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय अदेसरा म्हणाले, “पिकबॉल हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या खेळांपैकी एक आहे. ही भागीदारी उदयोन्मुख प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था तयार करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.”

बीडमध्ये राज्य खो-खो च्या राष्ट्रीय संघ निवडीसाठी १८ ते २१ डिसेंबरला महासंग्राम रंगणार - डॉ. चंद्रजित जाधव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, १८ नोव्हे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बीडमध्ये रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस व नवनिर्वाचित महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.

राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंचा खो-खो कौशल्यदंगल श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बीड येथे पार पडणार आहे. बीड येथे होणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य स्पर्धेतून ५८ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. निवडलेला संघ हैद्राबाद, तेलंगणा येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.  

खो-खो महासंघाकडे नोंदणी केलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज नमुना व गणवेश क्रमांकानुसार यादीचे नमुने १ डिसेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. राज्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्धारित फॉर्ममध्ये माहिती भरून १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत <maharashtrakhokhoassociation@gmail.com> या मेलवर पाठवणे बंधनकारक आहे. हाताने लिहिलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

प्रा. जे. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष - ऋषिकेश शेळके, सचिव - विजय जाहेर यांच्यासह वर्षा कच्छवा, योगेश सोळसे, मनोज जोगदंड, रमेश शिंदे, कैलाश गवते प्रफुल्ल हाटवटे आदी कार्यकर्ते हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत. या स्पर्धेमुळे बीडच्या क्रीडा संस्कृतीला नवा जोश आणि वेग मिळणार असून, राज्यभरातील अव्वल खेळाडूंमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळणार असल्याचे सरचिटणीस डॉ. जाधव यांनी सांगितले.

'डावखर फिल्म्स' निर्मित व दिग्दर्षित महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा 'गोंधळ' चित्रपट प्रदर्शित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिग्दर्शक संतोष डावखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला आधुनिक रुप देत ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'गोंधळ' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून 'डावखर फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. 
मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा आणि कलात्मक आणि दर्जेदार सादरीकरणासाठी ओळख निर्माण करणारा 'गोंधळ' हा सिनेमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा चित्रपट भारतीय सरकारतर्फे आयोजित केलेल्या गोव्यातील ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन' मध्ये निवडला गेला आहे. चित्रपटाच्या घोषणे पासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या 'गोंधळ' या परंपरेवर आधारित सिनेमाची कहाणी आहे. या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला. गोंधळातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवांच्या नावाचा जयघोष करत या मंडळींनी 'गोंधळ' चित्रपटाचा आनंद घेतला.
'गोंधळ' या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लोककला, श्रद्धा, आणि संस्कृती यांचा समृद्ध आविष्कार आहे. 'गोंधळ' या चित्रपटाची कथा पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर उलगडते. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी होणारा गोंधळ हा धार्मिक विधी असला, तरी चित्रपटातून मानवी भावना, श्रद्धा आणि समाजातील बदलत्या विचारसरणींचा वेध घेतला आहे.
हा चित्रपट पाहतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या. आजवर मराठी सिनेमात अभावानेच दिसणारी गोष्ट म्हणजे कलात्मकतेसोबतच तांत्रिक बाबींमध्येही जणू नवा मापदंड निर्माण केला आहे. कॅमेऱ्याचे अप्रतिम दृष्यबंध, उत्कृष्ट छायाचित्रण, परिपूर्ण संपादन आणि जागतिक दर्जाच्या ध्वनीमिश्रणामुळे 'गोंधळ' हा चित्रपट पाहाताना एक दृश्य-सांस्कृतिक मेजवानी ठरला आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम अवर्णनीय आहे. आम्ही 'गोंधळ' हा चित्रपट पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने केला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ते प्रेम परत मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रेक्षकांना 'गोंधळ' आवडत आहे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे." गोंधळ' म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, परंपरा आणि विधींना आम्ही एका नव्या दृश्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटामागे एक समर्पित आणि कल्पक टीम कार्यरत आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सूर हा आपल्या संस्कृतीचा स्पंदन अनुभवायला लावेल. 'गोंधळ' प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर एक भावनिक आणि भव्य अनुभव देईल, जो मनात बराच काळ रुंजी घालेल, याची मला खात्री आहे."
नुकतेच प्रदर्शित झालेले 'कांतारा' आणि 'दशावतार' यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच 'गोंधळ'ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात 'कांतारा' मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात 'दशावतार' ला मोठे स्थान आहे. मात्र 'गोंधळ' ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे. 'कांतारा' आणि 'दशावतार' च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. 'गोंधळ' ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, सुरेश विश्वकर्मा असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत, संतोष डावखर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, दीक्षा डावखर सहनिर्माती आहेत. 
बऱ्याच कालावधीनंतर एक छान आणि चांगला, हटके विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे .'गोंधळ' च्या इंडियन पॅनोरमामध्ये झालेल्या निवडीमुळे मराठी सिनेमाला नवी ओळख मिळाली आहे. चाहत्यांची उत्सुकता पाहता अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा सिनेमा  मराठी चित्रपटसृष्टीत नवीन मापदंड प्रस्तापित करू शकेल यात काही शंका नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.त्यातून आपल्या कुळाचाराबद्दल आणि परंपरेबद्दल नक्कीच आदर निर्माण होऊ शकतो.

डोंबिवलीला ‘ब्लाईन्ड-फ्री सिटी’ करण्याचा संकल्प करत ‘नेत्र रक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक’ ला सुमारे १५०० नागरिकांचा सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१६ : 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS), 'इंडियन मेडिकल अससोसिएशन' (IMA) डोंबिवली आणि 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेत्र रक्षा - ए वॉक फॉर डायबेटीस आय अवेअरनेस' या भव्य रॅलीला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे १५०० नागरिकांनी या वॉक मध्ये आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार माननीय श्री. रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष (भाजपा) यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना आवाहन केले की, “नियमित डोळ्यांची तपासणी  करून डोंबिवलीला अंधमुक्त 'ब्लाईन्ड-फ्री' शहर बनवण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.” तसेच त्यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे डोंबिवली आरोग्यदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले.
'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) चे अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितले की, “प्रत्येक डायबेटीक रुग्णाने दर वर्षी किमान एकदा तरी डायबेटीक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. उशिरा निदान झाल्यास दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो.” तसेच त्यांनी नागरिकांना डोळ्यांच्या आजाराबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) तर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘बाल नेत्र रक्षा अभियान’ जाहीर करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विस्तृत नेत्र तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या रॅलीमध्ये डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, डोंबिवली क्लस्टर कॉलेज ३४, रोटरी व रोटरॅक्ट क्लब्स, ज्येष्ठ डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर, तसेच 'इंडियन मेडिकल अससोसिएशन (IMA), सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात आय एम ए प्रेसिडेंट (IMA) डोंबिवली चे डॉक्टर विजय चिंचोले, श्री. किशोर मानकामे, डॉ. सुशीला विजयकुमार, श्री. प्रभू कापसे, श्री. भाई पानवडीकर  यांचीही उपस्थिती लाभली.
नागरिकांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा उपक्रम डोंबिवलीला अंधमुक्त शहर (ब्लाईन्ड-फ्री सिटी) करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले. आगामी काळातही अशा जनजागृतीद्वारे नागरिकांचे डोळे आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे 'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

किरकोळ धक्का लागण्याच्या वादातून तरुणाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  डोंबिवली पूर्व येथील एम.आय.डी.सी. परिसरात 'मालवण किनारा' हॉटेल जवळ घडलेल्या या घटनेत आकाश सिंग या तरुणाची हत्या झाली होती. डोंबिवली पूर्वेतील स्थित मालवण किनारा हॉटेलसमोर शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधून बाहेर पडताना किरकोळ धक्का लागला. त्यानंतर दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेने डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आकाश सिंग असे आहे. तो नवी मुंबई येथे कॉल सेंटरमध्ये काम करत होता. हॉटेलमधून बाहेर पडताना त्याचा एका दुसऱ्या तरुणाला किरकोळ धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून वाद वाढला होता आणि अनुचित प्रकार घडला होता. या प्रकरणात हत्येनंतर नाशिक, मालेगाव, चाळीसगाव येथे लपून बसलेल्या अमर महाजन, अक्षयकुमार वागळे, अतुल कांबळे, निलेश ठोसर, प्रतिकसिंग चौहान, लोकेश चौधरी अशी अटक आरोपींची नावे असून मानपाडा पोलीसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या  आवळून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चार दिवसीय कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल. याचबरोबर महाराष्ट्र राज्य रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली आहे. याबाबत सकारात्मक विचार करू असे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

'रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ' आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात ४ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. समारोह कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रशिक्षक लोमेश नारखेडे, सल्लागार गजानन हेगडे, वरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तव, प्रशासकीय सहाय्यक ऋषी देठे, शॉर्ट टर्म कोर्सेस चे शुभम शेंडे, श्रावणी कोचरे, भूषण पवार तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापर कसा करावा, वृत्ताची पडताळणी, माहिती शोधण्याची गती, तसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन घोषणेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची मोफत संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “आज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशा वेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल”

चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना कोणकोणते प्रॉम्प्ट द्यायचे, चॅट जीपीटीला कोणकोणते पर्याय आहेत, त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर कोणते सहायक टूल्स आहेत. फोटोवरून बातमी कशी बनवायची, फोटोवरून व्हिडिओ कसा बनवायचा, न्युज रिपोर्ट कसा बनवायचा. प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियासाठी बातमी कशी वापरायची ? त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर कसा करायचा याची माहिती त्यांनी दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली आहे याबाबत सकारात्मक विचार करू. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल. पत्रकारांनी त्यांना या कार्यशाळेबद्दल चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या वेळेला पत्रकार दीपक कैतके, पत्रकार संजय जोग, पत्रकार क्लारा लुईस यांनी चार  दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मत व्यक्त केले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्र संचालन केले. कार्यकारिणीचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले.

बिहारमध्ये भाजपला मोठे यश, पुन्हा येणार एनडीए (NDA) सरकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पाटना, दि. १४ : आज जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आणि एनडीए आघाडीने प्रचंड यश मिळवले असून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीए आघाडीने तब्बल २०० हून अधिक जागा जिंकून “डबल सेंच्युरी” मारली. या निकालामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा *नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार* स्थापन होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राजद आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र होते, मात्र दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. महागठबंधनला मोठा धक्का बसला असून त्यांची दाणादाण झाली आहे. या विजयामध्ये महाराष्ट्र भाजपमधील नेते विनोद तावडे यांच्या रणनितीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षनिहाय मतसंख्या
भाजप (BJP) - 128
जेडीयू (JDU) - 52
लोक जनशक्ती पार्टी (LJP) - 22
इतर एनडीए सहयोगी - 5
राजद (RJD) - 25
काँग्रेस (INC) - 7
डावे पक्ष (CPI, CPI(M), CPI(ML)) - 3
इतर / अपक्ष - 1
एकूण - 243

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच एनडीएतील प्रमुख नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्याचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने स्थानिक सत्ता-विरोधी लाटेला तोंड देत प्रचंड विजय मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सुशासन आणि विकास यांचीच जनतेने निवड केली आहे”. तर गृहमंत्री अमित शाह यांनी हा विजय बिहारच्या जनतेचा विश्वास असल्याचे म्हटले.

महागठबंधनातील राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तेजस्वी यादव आणि त्यांच्या आघाडीला मोठा धक्का बसला असून बिहारमध्ये एनडीएचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय हा सुशासन, विकास आणि जनहित आणि सामाजिक न्यायाच्या भावनेचा विजय असल्याचे म्हटले. एक्सवरील पोस्टच्या मालिकेत मोदींनी भाजपच्या आघाडीतील भागीदार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजेपी-आरव्हीचे प्रमुख चिराग पासवान, एचएएम नेते जीतन राम मांझी आणि आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांचे अभिनंदन केले.

"२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून देणारे बिहारमधील माझ्या कुटुंबातील सदस्यांचे मनापासून आभार,” असे मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, जनतेचा जबरदस्त जनादेश एनडीएला लोकांची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नवीन संकल्पाने काम करण्यास सक्षम करेल.

भाजप, जेडी(यू) आणि इतर पक्षांचा समावेश असलेला एनडीए २४३ सदस्यीय सभागृहात २०४ जागांवर आघाडी घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजयाच्या मार्गावर आहे. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधी महाआघाडीला ३३ जागांवर आघाडी मिळवता आली, जे २०२० च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा ८१ जागा कमी आहेत. “एनडीएने राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्याला नवीन उंचीवर नेण्याचे आमचे स्वप्न पाहून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे,” असे मोदी म्हणाले.

“या शानदार विजयाबद्दल मी मुख्यमंत्री नितीश कुमार जी आणि आमच्या एनडीए कुटुंबातील सदस्य चिराग पासवान जी, जीतन राम मांझी जी आणि उपेंद्र कुशवाह जी यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी अथक परिश्रम घेतलेल्या आणि सत्ताधारी आघाडीचा विकास अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक एनडीए कार्यकर्त्यांचे आभार मानले. “मी त्यांचे मनापासून कौतुक करतो,” असे ते म्हणाले. “येणाऱ्या काळात, आम्ही बिहारच्या विकासासाठी सक्रियपणे काम करू, येथील पायाभूत सुविधांना आणि राज्याच्या संस्कृतीला एक नवीन ओळख देऊ. येथील युवा शक्ती आणि महिला शक्तीला समृद्ध जीवनासाठी भरपूर संधी मिळतील याची आम्ही खात्री करू,” असे मोदी म्हणाले.

१४ नोव्हेंबर २०२५ च्या निकालाने बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे वर्चस्व सिद्ध झाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता स्थापन होणार आहे. हा विजय केवळ राजकीय नाही तर जनतेच्या विश्वासाचा पुरावा मानला जात आहे.